Monday, February 28, 2011

ट्रॅफिकमधला गारवा

काल सकाळी ३५ मिनिटांचा रस्ता पार करून ऑफीसला पोहोचायला तब्बल दीड तासांहून अधिक वेळ लागला. गाडी चालू बंद करून करून कंटाळा आला. अश्याच एका निवांत क्षणी मोबाईलवर गाणी लावून ईअर् फोन कानात घातले आणि पहिलच गाणं लागलं ते म्हणजे मिलिंद इंगळेचे गारवा. त्यातल्या पहिल्याच "ऊन जरा जास्तच आहे" ह्या ओळी कानावर पडल्या आणि पुढचं विडंबन सुचले. तसं पाहिलं तर कविता करणे, कवितेचा आस्वाद घेणे (अर्थात संदीप खरेच्या कविता आणि बझ्झवरच्या चारोळ्या, दिपोळ्या, आपोळ्या असे काही सन्माननीय अपवाद वगळता) वैगरे दूरच पण यमक जुळवणेदेखील मुश्कील अशी माझी अवस्था. त्यामुळे भर उन्हात त्या ट्रॅफिकमधल्या परिस्थितीला गांजून माझ्यातल्या कोकणी भाषेला 'भ'हर आलेला असताना सुचलेला हा ट्रॅफिक मधला गारवा तुमच्यासाठी. तसं पाहायला गेलं तर हे विडंबन ब्लॉगवर पोस्ट करण्याच्या लायकीचं नाही तरी माझ्यासारख्या पद्य विभागातल्या माठ माणसाकडून त्या रखरखीत परिस्थीत का होईना चुकुन जुळले गेलेले यमक (जे पुन्हा घडण्याची तीळमात्र शक्यता नाही) तुमच्या समोर यावे म्हणून हा खटाटोप.

मी माझ्या परीने धोक्याचे इशारे दिले आहेत. एका टुकार काव्यापासून स्व:ताला वाचवण्याची तुम्हाला ही शेवटची संधी. अजूनही मागे फिरा. मनस्तापातून जन्माला आलेल्या काव्यापासून केवळ मनस्तापच होऊ शकतो आणि त्या मनस्तापला कविवर्य(?) जबाबदार राहाणार नाहीत.


ट्रॅफिक जरा जास्तच आहे, दररोज वाटतं,
भर गर्दीत मोकळ्या रस्त्याचे चित्र मनात दाटतं,
लोकं चालत रहातात, गाडी मात्र चालत नाही,
गर्दीमध्ये हॉर्नशिवाय कुणीच बोलत नाही,
तितक्यात कुठून एक पांडू सिग्नल समोर येतो,
ट्रॅफिक मधला चालू भाग हाताखाली घेतो,
गियर ऊनाड मुलासारखा सैरावैरा पडू पहातो,
न्यूट्रल सोडून उगीचच फर्स्ट सेकंडवर पडून पाहतो,
क्लच सोडताच वेगाचा सुरू होतो पुन्हा खेळ,
पुढचा सिग्नल मिळेपर्यंत कुणाकडेच नसतो वेळ,
मघाचचाच मोकळा रस्ता अचानक गजबजून जातो,
पुन्हा लाल होण्यासाठी सिग्नल हिरवा होतो.


तुम्हाला झालेला मानसिक त्रास ही श्रींची इच्छा. तरीही ह्या मनस्तापाला निमित्तमात्र झाल्याबदल आपण प्रतिक्रीयेमध्ये वरचा 'भ' देऊन अस्मादिकांनीं तुमच्यावर केलेल्या अन्यायाची परतफेड करू शकता.

Friday, January 14, 2011

टाइम मॅनेजमेंट



एखादी जॉब प्रोफाइल वाचताना टाइम/टास्क मॅनेजमेंट, मल्टी टास्किंग वैगरे शब्द हमखास वाचायला मिळतात. मिळालेली वेळ कामांचे महत्व पहाता त्या त्या कामांना विभागून देऊन त्यानुसार काम पुरे करणे ही झाली टाइममॅनेजमेंटची ऑफीसमधली व्याख्या. अगदी परफेक्ट नसेल. सांगायचा मुद्दा हा की ऑफीसमध्ये टाइम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट वैगरे गोष्टी प्रॉजेक्ट प्लॅनिंगचा एक हिस्सा असतात. काम नेमुन देण्यासाठी आणि दिलेले काम होतं आहे की नाही हे पहाण्यासाठी मॅनेजर असतो. पण प्रॉजेक्ट म्हणजे टीमवर्क आलंच. इथे काही प्रॉब्लेम असतील, काही मदत हवी असेल तर टीम असते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि ट्रॅकिंग सिस्टमची निरनिराळी सॉफ्टवेअरस् वापरुन सगळी कामं (बहुतेकवेळा) नीट पार पडली जातात. त्यामुळे प्रोफेशनल लाइफमध्ये तरी डेड लाईन या ना त्या प्रकारे पाळली जाते किंबहुना काम करणार्‍या लोकांकडून (झक मारुन का होईना) पाळून घेतली जाते.

टाइम मॅनेजमेंटचा खरा प्रश्न सुरू होतो तो ऑफीस मधून बाहेर पडल्यावर. वैयक्तिक आयुष्यात आपण किती वेळा कामे आखून त्या नुसार काम करतो? माझ्या मते मी आत्ता आपण म्हणणे थांबवावे. मी माझ्यापासून सुरूवात करतो. ऑफीसच्या बाहेर किती कामे मी आखून त्या नुसार ती पार पाडतो? नक्की नाही सांगता येत. नक्की नाही म्हणजे आखणी होते. बहुतेक सगळ्या कामांची आखणी ही होतेच. ऑफीसप्रमाणे अगदी पद्धतशीर कागदोपत्री प्लॅनिंग नाही पण मनात कुठे तरी काही गोष्टी ठरवल्या जातात. अमुक तमुक गोष्ट करायची. आणि त्यासाठी एक ढोबळ वेळ/तारीख/महिना निश्चित करायचा. अजुन तरी मी कधी वर्ष वैगरे निश्चित नाही केलेलं कारण तेवढी दूरदृष्टी नाही. आधीच वेळ/तारीख/महिना असे जे काही मनात ठरवतो ते ढोबळ असते. हा ढोबळ शब्दच घात करतो.

जेंव्हा एखादी गोष्ट पुढे ढकलली तरी चालून जाते तेंव्हा ती गोष्ट माझ्या हातून कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. सगळ्या सुविधा असतात पण जोवर ती करायचीच असा मनात ठाम निर्णय होत नाही तोवर हातून काहीच होत नाही. आत्ता टॅक्स सेव्हींग. हा दरवर्षीचा प्रकार आहे. दरवर्षी ठरवतो की डिसेंबरपर्यंत सगळी गुंतवणूक पूर्ण करून कागदपत्र तयार ठेवायची. एचआरचा मेल आला रे आला की दिली. पण नाही. मेल आला की शेवटची तारीख बघायची. मग त्याच्या आधीच्या वीकेंडला जाऊन पैसे भरायचे आणि पावत्या आणायच्या. बरं सगळी कागदपत्र तयार आहेत तर जमा करेन तर तेही नाही. दोन दिवस आधी एचआरचा Gentle Reminder म्हणून एक प्रेमळ मेल येतो पण आपण अगदी शेवटची तारीख उजाडेपर्यंत वाट पाहायची. तो दिवस आला तरी अगदी संध्याकाळ होण्याची वाट बघा. दुपारी जेवून वैगरे आलं की प्रिंटआऊट काढा आणि मग एकदाचा घरी जाता जाता एचआर कडे जायचे. तिथे आपली भावंडे उभी असतातच. एकदम कामाचा लोड पडू नये म्हणून त्या बिचार्‍या एचआरने महिनाभर आधी तारीख दिलेली असते तर माझ्यासारखी लोकं अगदी ती तारीख म्हणजे एक एकच आणि शेवटचा दिवस असल्यासारखे त्या दिवशी संध्याकाळी हजर. काही लोकं तर कुठे काही माहिती भरून आणतात. शेवटच्या दिवशी ह्यांच्या हजार शंका. नशिबाने मी इतका गया गुजरा नसल्याने ह्यांच्यामुळे आम्हाला उशीर ;-)

टॅक्स सेव्हींगचे उदाहरण हे वार्षिक श्रेणीमध्ये मोडते. मासिकश्रेणीमध्ये लाईटबिल येते. लाईटबिल साधारण दर महिन्याच्या ४-५ तारखेला हातात पडते. बरं इथे बिल भरण्याची शेवटची तारीख १८ असते. बिल भरण्याचे ठिकाण देखील ५ मिनिटांवर आणि रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर आहे पण बिल हातात मिळाल्यापासून वीकेंडला भरू, वीकेंडला भरू असे करता करता १७ तारीख उजाडते. वीकेंडला आठवण असते, नाही असे नाही पण सकाळी वाटते आत्ता गेलो तर गर्दी असेल. लोकं उन्हातून बाहेर पडत नाही तेंव्हा आपण १२-१२:३०च्या आसपास जाऊ पण दुपारी ऊन्हातून किती लोकं बाहेर पडतात हे पाहायला मी आजपर्यंत बाहेर पडलो नाही. १७ तारखेला नेहमीप्रमाणे ऑफीसला जायला उशीर झालेला असतो त्यामुळे उद्या शेवटचा दिवस आहे ह्या भरोश्यावर बिल भरायला १८ तारीख उगवतेच. आत्ता १८ शेवटची तारीख असल्याने दंड भरावा लागू नये म्हणून झक मारत त्या दिवशी बिल भरायला जावं तर नेमका त्या दिवशी तिथे प्रिंटर बिघडलेला असतो. आणि बहुतेक प्रत्येक महिन्यात १८ लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने आपली 'वेळेचा सदुपयोग करणारी भावंडे'देखील त्याच दिवशी गर्दी करून रांगेत उभी असतात. पण गर्दी पाहून दुपारी/संध्याकाळी येऊ म्हणाव तर शक्य नसतं त्यामुळे तिथे रांगेत उभं राहून वीकेंडला आलो असतो तर बर झालं असतं असं वाटून जातं. आत्ता बिल मिळालं की पहिल्याच वीकेंड्ला भरून टाकायचे असं ठरवतो पण हाच निश्चय पुन्हा पुढच्या महिन्यात १७-१८ तारखेला केला जातो.

ही झाली दोन ठळक उदाहरणे. पण सध्या बर्‍याचश्या गोष्टी ह्या अश्या ढोबळ कारभारावर सुरू आहेत. काही ठिकाणी गोष्टी अडून बसल्या आहेत तर काही ठिकाणी सगळ्या चाव्या माझ्या हाती असून केवळ नियोजनाचा अभाव आणि कंटाळा ह्यामुळे मी स्व:त सगळ्या गोष्टी अडकवून ठेवल्या आहेत. जेवढ्या लवकर टाइम मॅनेजमेंटच्या घड्याळात मी सेल्फ स्टार्टची चार्ज झालेली बॅटरी टाकेन तितक्या लवकर गोष्टी टिक-टिक करीत पुढे सरकतील.

फोटो गूगलवरुन साभार

Monday, January 10, 2011

देवबाग बीच रिसॉर्ट

३१ डिसेंबर विकांताला लागून येत असल्याने कुठेतरी बाहेर जायचे हे नक्की ठरवले होते. केरळला जायचे कधी पासून मनात होते म्हणून कोट्टयाम-आलप्पी येथे हाउसबोटवर ३१ची रात्र घालवण्याचा प्लॅन केला. पण ख्रिसमस आणि वर्षअखेर असल्याने केरळचे बुकिंग ४ महिने आधीच फुल्ल होते. आत्ता कुठे जायचे असा विचार सुरू होता. एका मित्राकडून देवबाग बीच रिसॉर्टबद्दल ऐकून होतो. तिथेदेखील हाउसबोट उपलब्ध असते असे कळले पण केरळच्या बॅक-वॉटर इतकी मज्जा नाही पण प्रत्यक्ष बीच रिसॉर्टचा रिव्यू चांगला होता. बुकिंग तसं महाग होतं आणि त्यात हे रिसॉर्ट कर्नाटक सरकारद्वारा चालवले जाते म्हणून कसं असेल ह्याबद्दल मन जरा साशंकच होतं. नेट वर पाहिलं तर रिव्यू चांगला होता. अर्थात काही ठिकाणी under utilize असा उल्लेख होता पण बहुतेक सर्व लोकांनी या ठिकाणाला पसंती दर्शवली होती. म्हटलं तसं ही काही मिळत नाही तर करून टाकु बुकिंग. ऑनलाइन बुकिंग सेवा आहे आणि अगदी तत्पर. मी तिथे चौकशीची नोंद केल्यावर काही तासात त्यांनी फोन करून शेवटची काही कॉटेज शिल्लक आहेत असं कळवलं. मी पण फार आढे वेढे न घेता त्याच दिवशी बुकिंग करून टाकलं.

ठरल्याप्रमाणे ३०च्या रात्री बंगलोरहून आम्ही निघालो. देवबाग कारवारमध्ये आहे. दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही कारवारला पोहोचलो. चेकईन दुपारी बारा वाजताचे होते. आत्ता इतका वेळ काय करायचे हा प्रश्न. मला वाटले होते की कारवार बर्‍यापैकी मोठे शहर असेल. सकाळी फ्रेश होऊन आजूबाजूला काही भटकण्यासारखे असेल तर चक्कर मारू. पण कसलं काय? तिथे धड बस स्टॅंड देखील नव्हता. ब्रेकफास्ट करावा तर धड नीट हॉटेल नाही. शेवटी एक बर्‍यापैकी हॉटेल दिसले तिथे टिपिकल डोसा वैगरे खाऊन घेतला. तिथे जवळपास काही बघण्यासारखे आहे का अशी चौकशी केली तर कारवार बीच सोडून दुसरं काही ऐकू आले नाही. आत्ता इतक्या सकाळी बीचवर खो-खो खेळायला बसलेली लोकं थोडीच पाहायची होतीत?

दुसरा काही मार्ग नव्हता म्हणून सरळ देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला फोन लावला. तर त्यांनी ऑफीसला या असे सांगितले. म्हटले चला इथे तिथे भटकत बसण्यापेक्षा सरकारी कचेरीतल्या बाकड्यावर बसून मख्ख चेहरे पाहत बसू. मग रिक्षा करून देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला गेलो. शहरापासून ५-६ किलोमीटर आहे. तिकडे पोहोचल्यापासून एक एक सुखद अनुभव यायला सुरूवात झाली. त्यांचे ऑफीस कारवारबीच जवळ एका बंगल्यात होते. आजूबाजूला मस्त नारळ पोफळीची झाडे. आत गेलो तर सकाळ असून ऑफीसची पुरेशी लोकं होती. चौकशी केल्यावर समजलं की ते लोकं शिफ्टमध्ये काम करतात आणि ऑफीस कायम उघडे असते. आमचे वाऊचर पाहून आधी आमची आल्याची नोंद केली आणि लगेचच आम्हाला बारा वाजेपर्यंत रहाण्यासाठी त्याच बंगल्यात वरच्या मजल्यावरची एक सुसज्ज रूम दिली. चेक-ईन/चेक-आउट हे दुपारी बारा वाजता असल्याने आणि शहरातील असुविधांचा विचार करून पर्यटकांसाठी ही सोय केलेली होती. जाताना देखील दुपारपासून ते रात्री तुमची बस/ट्रेनची वेळ होईपर्यंत तुम्ही इथे आराम करू शकता. आधीच रात्री बसमध्ये झोप नीट झाली नव्हती त्यात सरकारी कचेरीतल्या बाकड्या ऐवजी बेड मिळाल्यावर आम्ही मस्त ताणून दिली. दोन-अडीज तास झोप पूर्ण केल्यानंतर आंघोळ वैगरे करून आम्ही रिसॉर्टला जायला तयार झालो. तोवर इतर लोकं देखील आली होती. मग तिथून बोटीत बसून आम्ही रिसॉर्टला जायला निघालो. रिसॉर्ट म्हणजे तसं पूर्ण बेटावर वसलेलं नाही. एका बाजूने जमिनीला जोडलेले आहे. पण शहराच्या दिशेने पाहिलं की दर्शनी भागाकडून ते पाण्यात आहे असे वाटते. त्यात बोटराइडचा आनंद मिळावा म्हणून पर्यटकांना बोटीने रिसॉर्टला घेऊन जातात. १५-२० मिनिटांच्या बोटराइड नंतर आम्ही तिकडे पोहोचलो.

बोटीतून खाली उतरल्या उतरल्या सुरुची दाट झाडी सुरू होते. सुरुवातीलाच जंगल लॉजेस अँड रिसॉर्टचा फलक आहे. सुरूच्या बनातून एक पायवाट आत जाते. समुद्रावरचा वारा सुरुच्या झाडामधून वाट काढत सूss सूss आवाज करत जात होता. आजूबाजूचे वातावरण पाहाता सगळे अपेक्षेपेक्षा चांगले अनुभवायला मिळत होते. ८-१० वर्षा पुर्वी रत्नागिरीलादेखील भाट्ये समुद्रकिनारी असलेल्या नारळ संशोधनकेंद्रासमोर समुद्रावरुन येणार सोसाट्याचा वारा अडावा म्हणून दाट सुरूची झाडी होती. पण तिथे येणार्‍याजाणार्‍यावर बंधन नसल्याने ती हळू हळू कमी झाली. येणारे जाणारे ह्यामध्ये सुरुबनात चाळे करायला येणार्‍या लोकांचाच जास्त भरणा होता. त्यात पावसाळ्यात वादळाने पडलेली झाडे जवळपासची लोकं जळणासाठी लाकूडफाटा म्हणून वापरु लागली. पुढे पुढे तर लोकांनी जळणासाठी झाडे तोडून देखील नेली पण पुन्हा झाडे लावण्याचे कुणाच्या मनात आलेले नाही. त्या दृष्टीने कर्नाटक सरकारने देवबागला सुरुबनाचा पर्यटनासाठी खूप चांगला वापर करून घेतला आहे. असो...

१०-१५ मिनिटे चालल्यानंतर कॉटेज दिसू लागली. सुरुवातीला काही चिरेबंदी कॉटेज लागली. ती बहुतेक नवीन बांधलेली दिसत होती. तिथे एकूण १५ कॉटेज आहेत. सर्व एसी. पुढे गेलो तशी पुर्वी बांधलेली, जमिनीपासून उंचावर असलेली लाकडी कॉटेज होती. प्रत्येक कॉटेजसमोर सुरूच्या झाडामध्ये बांधलेला झुला. आमच्या सुदैवाने आम्हाला वुडन फ्लोअर असलेलं लाकडी कॉटेज मिळालं. कॉटेज देखील आतमधून एकदम प्रशस्त आणि सुसज्ज. सगळी सोय बघून इथे येण्याचा खेळलेल्या जुगारातून जॅकपॉट लागल्याचे समाधान मिळाले. बरं बायकोला नेहमीप्रमाणे काहीच न सांगितले असल्याने तिच्यासाठी तर मस्त सरप्राइज होते. खरं तर मला देखील आधी काय आणि कसं असेल ह्याची काहीच माहिती नसल्याने माझ्यासाठीसुद्धा मोठे सरप्राइजच होते.

कॉटेजमध्ये फ्रेश होऊन आजुबाजूला काय काय आहे त्यावर नजर टाकतो तोच जेवणाची वर्दि घेऊन एक जण आला. अरे हो एक सांगायाचेच राहीले. इथले लोकं कोंकणी भाषा बोलतात. कन्नड पण चालते पण आम्ही सकाळपासून लोकांचे बोलणे ऐकत होतो ते यंडूगुंडू नव्हते. बर्‍यापैकी कळत होते. त्यांना पण आम्ही आपापसात काय बोलतो ते थोडे फार कळत होते. कॉटेज दाखवायला जो मुलगा आमचे सामान घेऊन आला आमच्या बरोबर आलेला तोच पुन्हा जेवाणाचा निरोप घेऊन आलेला. आम्हाला मराठीत बोलताना ऐकले असल्याने त्याने सरळ "१ वाजल्या पासून गोलघरमध्ये जेवण सुरू होते" असा शुद्ध मराठीत निरोप दिला. सुरूबनात मधोमध गोलघर आहे. नावाप्रमाणेच गोलबांधणीचे. तिथे डायनिंगची सोय आहे. सगळं बुफे पद्धतीने. दुपारचे जेवण आणि संध्याकाळी स्नॅक्स/चहापाणी गोलघरमध्ये. स्नॅक्सनंतर समुद्रात तासाभराची बोटराइड, रात्री बार्बीक्‍यू, ड्रिंक्स आणि जेवण समुद्रकिनारी वाळूत कॅंपफायरमध्ये. भल्या सकाळी ६:३० वाजता Nature Walk आणि त्यानंतर पुन्हा गोलघरमध्ये ब्रेकफास्ट आणि दुपारी चेकआउट असा २४ तासांचा कार्यक्रम होता जो दुपारच्या जेवणापासून सुरू होतो.



भुका लागल्याच होत्या. नॉनव्हेज मेनुमध्ये फिश् फ्राय आणि मटण होते. भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर कोकण किनारपट्टी आणि मंगलोर, कारवारमध्ये काही फरक नाही. फक्त मंगलोर, कारवार कर्नाटकात येत असल्याने भाषा सोडली तर जेवणाखाण्याच्या पद्धती बर्‍याचश्या सारख्या आहेत. निदान फिश्-फ्राय, माश्याचे कालवण ई प्रकार तरी अगदी रत्नागिरी सारखे. इथली लोकं देखील तांदळाची भाकरी खातात, तांदळाच्या भाकरीला अक्की रोटी म्हणतात इतकचं. देवबाग समुद्र किनारीच मग काय मासा एकदम ताजा होता. भुकेच्या गडबडीत कॉटेज सोडताना कॅमेरा विसरलो. तसं ही मच्छी पुढयात आली की फोटो वैगरे काढायचे लक्षात राहात नाही. जेवाणात इतरही प्रकार होते पण नेटवरच्या रिव्यूप्रमाणे जेवणात (नॉनव्हेज सोडता) जरा सुधारणा करायला वाव आहे. आम्ही सगळ्याची थोडी थोडी चव घेऊन मुख्य:त फिश्-फ्राय आणि चपात्या हाणल्या. जेवण जरा जडच झाले म्हणून आजूबाजूला फेर फटका मारायला निघालो. गोल घराला लागूनच टीव्ही रूम आहे. ती देखील गोल घरासारखीच गोल. एकीकडे टीव्ही आणि समोर गोलाकार मांडलेल्या खुर्च्या. गोलघर आणि टीव्हीरूम लाकडी पुलाने जोडलेली आहे. टीव्ही पहात जेवायची सवय असेल तर जेवण घेऊन इथे बसू शकता.

जवळच काही अंतरावर टेंट ठोकलेले दिसले. जेंव्हा कॉटेज फुल्ल होतात किंवा जे कुणी ८-१० च्या ग्रूपने येतात त्यांची सोय टेंटमध्ये केली जाते. हे टेंट देखील अगदी सुसज्ज आहेत. आतमध्ये डबल बेड, छोटे टेबल, सामान ठेवायला खण. तीन बेड असलेले देखील २-३ टेंट होते. ह्या टेंटचा दुसरा उपयोग म्हणजे दुपारी १२ वाजता चेक-आउट केल्यानंतर जर का तुम्हाला संध्याकाळपर्यंत बीचवर वेळ घालवायचा असेल तर कॉटेज मधून तुम्हाला टेंटमध्ये शिफ्ट करून देतात. तेदेखील विनामूल्य.

बीचवर काही वेळ भटकून आम्ही पुन्हा कॉटेजवर परतलो. ४ वाजता चहा घेऊन बोटराइडचा प्लान होता. तासाभराच्या बोटराइडमध्ये बीचजवळ समुद्रात आत ३ छोटी बेटे आहेत त्याला फेरी मारुन आणतात. त्या बेटांच्या थोडं पुढे खोल समुद्रात डॉल्फिनचे दर्शन देखील होते. मधूनच पाण्यावर येणारे काही डॉल्फिन दिसायचे पण 'तो बघ', 'तिकडे बघ' असे म्हणे पर्यंत ते पटकन गायब व्हायचे. बरेचदा सूर मारल्यानंतरच्या त्यांच्या शेपट्याच दिसायच्या. बरोबर गाईड होता. तो इंग्रजी, हिंदी, कन्नड अश्या प्रत्येकाच्या सोयीनुसार सगळ्या भाषेत माहिती देत होता. जर कधी वारे जोरात वहात असतील तर ही बोटराइड दुसर्‍या दिवशी सकाळी ठेवतात किंवा रद्द देखील करतात. आमच्या नशिबाने त्या वेळी वातावरण खूप छान होते. बोटराइड वरुन परत आल्यावर आम्ही पुन्हा बीचच्या दिशेने निघालो. येणार्‍या जाणार्‍या लोकांवर निर्बंध असल्याने बीच एकदम स्वच्छ आहे. कुठे ही फोडलेल्या बाटल्या, प्लास्टिक, समुद्रातून वहात आलेला कचरा नाही. सरकारी काम असलं तरी सगळी व्यवस्था चोख होती. कॉटेज आणि गोल घर ही बांधकामे सोडली तर तिथे बाकी काही विशेष बदल केलेले नाहीत. त्यामुळे च तिथे त्या नैसर्गिक वातावरणाचा जास्त आनंद मिळतो. उगीचच उंट घोडे आणून, पाळणे लावून तिथे कमर्शियलगिरी केलेली नाही. मी समुद्र किनारीच लहानचा मोठा झाल्याने बीच वैगरे गोष्टींचे मनाला फार कौतुक वाटत नाही पण तरीदेखील व्यापारीकरणापासून अलिप्त असा तो शांत आणि स्वच्छ देवबाग बीच भावला एवढे मात्र नक्की.

२०१० च्या शेवटच्या सुर्यास्ताचा आनंद घ्यायला सगळे किनार्‍यावर जमले होते. बहुतेक सगळ्या फॅमिलीज होत्या. थोड्याच वेळाने मघाशीच फिरून आलेल्या त्या छोट्या छोट्या बेटांच्या पाठीमागे सुर्यनारायण मावळतीला आला. १०-१५ मिनिटे सूर्यास्ताच्या मस्त वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. सूर्यास्तानंतर किनार्‍यालगत एका ठिकाणी कॅम्पफायरची तयारी सुरू झाली. बाजूलाच बार्बीक्‍यूसाठी निखारे फुलू लागले होते. दुपारचे जेवण अजुन जिरले नव्हते पण बार्बीक्‍यूची तयारी पाहून पुन्हा हाणायला तयार होण्यासाठी आम्ही त्या संधीप्रकाशात पुन्हा बीचवर भटकून घेतले. फेरफटका मारुन परत आलो तर कॅंपफायर धगधगत होते. आजुबाजूला गोलाकार खुर्च्या मांडल्या होत्या. स्नॅक्स तयार होता. ज्यांना ड्रिंक्स हवीत त्यांच्यासाठी एका बाजूला वेगळी सोय होती. एकंदरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मस्त माहौल तयार झाला होता.

तश्या सगळ्या फॅमिलीज असल्याने ३१ डिसेंबरच्यावेळी असतो तसा फार धांगड धिंगा नव्हता. एकमेकांशी फार ओळख नसल्याने सगळेजण आपल्या आपल्या ग्रूपमध्ये होते. लवकरच मिक्स भजी, चिकन चिली, व्हेज ६५ असा रुचकर आणि अप्रतिम स्नॅक्स सर्व्ह केला गेला. हळू हळू गारठा वाढु लागला तस तसे सगळे खुर्च्या ओढून कॅम्पफायरच्या जवळ येऊ लागले. जवळच समुद्राच्या लाटांचा संथ आणि लयबद्ध आवाज येत होता. एकदम परफेक्ट अशी संध्याकाळ आम्ही अनुभवत होतो. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने तिथे काही वेगळे होते अश्यातला भाग नाही. तिथल्या कर्मचार्‍यासाठी तो रूटिनचा भाग होता. एका अर्थी सरकारी आळस किंवा निष्क्रियाता का काय ती थोडीफार जाणवली. कदाचित ३१ डिसेंबरच्या मुहूर्तावर नेहमी दिसणारा झगमगाट आणि गोंधळ तेथे नव्हता म्हणून देखील असं वाटलं असण्याची शक्यता आहे. अधून मधून ते कॅम्पफायरमध्ये लाकडे लावून जात होते. चांदणे फार नव्हते त्यामुळे कॅंप फायरच्या उजेडातच सगळे व्यवहार सुरू होते. थोड्यावेळाने काही लोकं आपापल्या कॉटेजच्या दिशेने पांगली आणि कपडे वैगरे बदलून पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी तिथेच एकत्र जमली. जेवण दुपारपेक्षा छान होते. आलू-पालक तर अप्रतिम होता. कदाचित दुपार पासून यथेच्छ नॉनव्हेज खाऊन झाले असल्याने आम्हाला तो पालक रुचकर लागला असेल. असो जेवणानंतर पुन्हा बीचवर जवळच फेर फटका मारुन नंतर कॅम्पफायरमधली लाकडे वर खाली करत शेकोटी करीत बसलो होतो. कॅम्प फायरची मज्जा लुटण्याचे खूप जुने स्वप्न पूर्ण झाले होते. कोकणातले शिमग्याचे दिवस, समुद्र, काळोख आणि घनदाट सुरूबन यावरून लहानपणीच्या भुताखेतांच्या गोष्टी असे करता करता बारा वाजले. नाही म्हणायला त्या दिवशी देवबाग बीचवर देखील थोडी आतषबाजी केली गेली. हॅपी न्यू ईअरचा नारा झाला. फोनाफोनी सुरू झाली. त्या शांततेत वेगवेगळ्या रिंगटोनचे आवाज येऊ लागले. बीचवरुन समोरच कारवार शहरातून आकाशात सोडले जाणारे फटाके दिसत होते. ती रोषणाई बघून साधारण १ च्या सुमारास आम्ही सगळे आपापल्या कॉटेजवर परतलो. सकाळी लवकर उठून सुर्योदयाबरोबर नवीन वर्षाचे स्वागत करायचे होते नां!!!

Friday, December 31, 2010

२०१० जाता जाता...

सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नववर्षाचे स्वागत करायला कारवारला देवबाग बीचवर आलोय. २०१० ची सुरूवात स्कंधगिरीवरुन सूर्योदय पाहून केली होती त्यामुळे २०१० चा शेवट सूर्यास्ताने. बाकी यंदा जास्त फिरणे झाले नाही म्हणून आत्ता २०११ चा पहिला विकांत देवबाग आणि मुरुड़ेश्‍वर फिरून साजरा करणार. परतलो की पोस्ट लिहायचा विचार आहे पण ईग्रहांची महादशा अजुन संपली नसल्याने आजकाल ब्लॉगिंग पूर्णपणे थंडावले आहे. संकल्प सोडत नाही पण निदान २०११ मध्ये तरी लिखाण नियमीत सुरू व्हावे असे मनापासून वाटते. पाहू...

२०१० चा निरोप घेऊन मावळलेला सुर्यनारायण...



जाता जाता नवीन वर्षासाठी म्हांराजाकं गार्‍हानं घालतायं.

रे म्हांराजा !!!!!
बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्‍हाणं घालतायं रे म्हांराजा !!!

ह्या सरत्या साला बरोबर हे भ्रष्टचारी, त्यांचे घोटाले, महागाई पण नष्ट होऊदें...
व्हयं म्हांराजा !!!

लोकांच्या ईडा-पीडा त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाइतक्याच टिकूदें...
व्हयं म्हांराजा !!!

कांदाभजी परत रस्त्यावरच्या गाडीवर मिलूदें...
व्हयं म्हांराजा !!!

सगळ्यांका चांगली बुद्धी आणि आरोग्य लाभूदें...
व्हयं म्हांराजा !!!

आणि येता नवीन वर्ष सगळ्यांका सुखसमृद्धी आणि भरभराटीचो जावंदे...
व्हयं म्हांराजा !!!

Tuesday, September 21, 2010

ई ग्रहांची महादशा

गेले दीड वर्ष बी.एस्.एन्.एल्.चे इंटरनेट वापरतोय. आत्तापर्यंत सरकारी काम म्हणून कधी बी.एस्.एन्.एल्.चे कुठलेही कनेक्शन घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. एका शनिवारी सकाळी चहा प्यायला म्हणून बाहेर पडलेलो. चहा पिता पिता बी.एस्.एन्.एल्.ने रस्त्यावर लावलेला स्टॉल दिसला. बी.एस्.एन्.एल्.चा आधून मधून ग्राहक मेळावा भरतो आणि त्या दोन तीन दिवसांमध्ये फुकट सिम कार्ड, ज्यादा टॉक टाइम, बिना डीपॉझीट नवीन ब्रॉडबॅंड कनेक्शन वैगरे वैगरे स्किम असतात. मित्र म्हणाला अरे तसही डीपॉझीट वैगरे काही घेत नाही आहेत तर भर अर्ज. मग काय पत्ता लिहून आलो. मोडेम आणि फोन वैगरे माझ्याकडे होताच. त्यामुळे मला केवळ इंटरनेटचे बिल भरायला लागणार होते. मग आम्ही "आज अर्ज दिलाय, आत्ता हे येतील एक वर्षांनी" अश्या गप्पा मारत घरी आलो आणि विसरून पण गेलो. पण झालं भलतचं सोमवारी दुपारीच मोबाइल थरथरला.

मी: हॅलो
पलीकडून: साssssर, बी.एस्.एन्.एल्.कनेक्सन.
मी: हू ईज़ धिस?
पलीकडून: साssssर तमिल, तेलगू, कन्नडा?

आयला ह्यांच्यासाठी तमिल, तेलगू, कन्नडा झालं की थेट पाकिस्तान आणि नेपाळची बॉर्डर लागते. मध्ये बाकी कुणी नाहीच. मराठी सोडा राष्ट्रभाषा पण फाट्यावर?

मी: (मनात: हाड् रे) हिंदी हिंदी.
पलीकडून: साssssर बी.एस्.एन्.एल्. कनेक्सन होना ?
मी: हां हां मैने अप्लिकेशन किया था.
पलीकडून: हा करेक्ट साssssर.
मी: कब मिलेगा कनेक्शन?
पलीकडून: अब्बी.
मी: अभी? अभी तो मैं ऑफीस मे हूँ.
पलीकडून: आय यॅम इन फ्रंट ऑफ युवर हौस नो? कम नाऊ ओन्ली.

नशिबाने ऑफीस पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी त्याची नाऊ ऑर नेव्हर ऑफर स्वीकारून लगेच रूमवर पोहोचलो. पुढच्या दहा मिनिटात सगळं जोडून माणूस (पैसे न मागता) निघून गेला देखील. बी.एस्.एन्.एल्.चं असं सुसाट काम बघून माझा विश्वासच बसत नव्हता. ऑफीसच्या लोकांनाही ही गोष्ट पचनी पडली नाही. त्यातल्या काही बुजुर्ग लोकांनी "अरे आत्ता बघ रोज रोज डिसकनेक्ट झाल्याच्या तक्रारी करायला बी.एस्.एन्.एल्. ऑफीसच्या वार्‍या करायला लागतील" असा आशीर्वाद दिला. पण नाही. तो ते कनेक्शन जोडुन गेल्या पासून पुढची दीड वर्षे मी ती रूम बदले पर्यंत काडीचीही तक्रार नाही. केवळ वेळेवर बिल भरा आणि सेवेचा आनंद घ्या. बिलात देखील कधी चुकीचे रीडिंग नाही की भरमसाठ रक्कम नाही. ह्याच बी.एस्.एन्.एल्.च्या कृपेमुळे ब्लॉग देखील सुरू झाला. जमेल तसं लिखाणं झालं. बी.एस्.एन्.एल्.बद्दल असलेलं माझं मत पूर्ण बदललं होतं. प्राइवेट कनेक्शन वापरणार्‍या माझ्या एक दोन मित्रांना पण मी पुढच्या मेळाव्यावर लक्ष ठेवा आणि बी.एस्.एन्.एल्. चं ब्रॉड बॅंड घ्या असं सांगून ठेवलं.

सगळं कसं सुरळीत सुरू होतं. मे महिन्याची सुट्टी संपवून हापूस आंब्याचे फोटो ब्लॉगवर टाकले आणि जून अखेरीस ग्रह फिरले. नवीन जॉब जॉइन केला त्याच बरोबर आधीच्या मालकाने भाडेवाढ मागीतल्याने त्याच गल्लीत चार घरं सोडून नवीन रूमवर शिफ्ट देखील झालो. नवीन नोकरीत आणि नवीन जागेत इतर गोष्टी सुरळीत सुरू झाल्या मात्र माझ्या पत्रिकेतले ई-ग्रह मात्र बिघडले. त्यांची महादशा सुरू झाली. नवीन प्रॉजेक्टमध्ये बाहेरच्या सगळ्या साइट्स ब्लॉक. ब्लॉगिंग सोडा पर्सनल ई-मेल्सदेखील वाचता येईनात. म्हटलं नवीन रूम त्याच गल्लीत आहे बी.एस्.एन्.एल्. ब्रॉडबॅंड कनेक्शन पटकन जोडुन देतील. जुलैच्या पहिल्याच विकांताला जाऊन त्याबद्दल अर्ज देऊन आलो. म्हटलं नवीन कनेक्शन फटकन दिलं तर हे रिलोकेशन रातोरात करून टाकतील. पण नाही. ई-ग्रहसौख्य पूर्ण बिघडून गेलेलं होतं. पूर्ण आठवडा गेला तरी साधा फोन देखील नाही. शनिवारी बी.एस्.एन्.एल्. ऑफीसला चक्कर टाकून आलो तर संबंधित माणसे गायब. कुठे तरी मोठा लोचा झालेला तो सोडवात बसलेले. आत्ता माझं नवीन ऑफीस लांब गेल्याने सोमवार ते शुक्रवार काहीच करता येईना. दोन आठवड्यानंतर संबंधित माणूस भेटला एकदाचा. इथल्या प्रथेप्रमाणे त्याचंही नावं श्रीनिवास होतं. मी माझी शिफ्टिंगची वर्कऑर्डर त्याच्या पुढयात धरली. ती हातात धरून एखाद्या माणसाची पत्रिका पाहावी तशी पहात २-३ मिनिटे काहीतरी गूढ विचार करीत बसला. थोड्यावेळाने त्याने गंभीर शब्दात समस्या सांगितली

श्रीनिवास : "साssर, केबल नही है".
मी: क्या??? केबल नही?
श्रीनिवास : हा स्टोर रूम ने भी नही. आप अपना नंबर दो मुझे मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ.

मी आपला नंबर देऊन आलो पण पुन्हा आठवडा भर काहीच हालचाल नाही. साहेबांना फोन केला तर साहेब फोन उचलतील तर हराम. महिना होऊन गेला पण रूमवर ब्रॉडबॅंडचा काहीच पत्ता नाही. महिना अखेरीस बी.एस्.एन्.एल्.ने न वापरलेल्या इंटरनेटचे बिलमात्र नवीन पत्त्यावर पाठवून आपली तत्पर सेवा दाखवून दिली. त्याच्या पुढच्या शनिवारी ते बिल घेऊन बी.एस्.एन्.एल्.च्या ऑफीस मध्ये गेलो. म्हटलं इंटरनेटचा पत्ता नाही आणि हे बिल कुठून आले? तर म्हणतात कसे "ते तुम्ही इंजिनियरला विचारा. आम्ही फक्त बिलं बघतो." श्रीनिवासच्या थोबाडासमोर बिल नाचवलं तर त्याचं पुन्हा "साssर, केबल नही है". म्हटलं अरे महिना उलटून गेला तरी बी.एस्.एन्.एल्.कडे केबल नाही सांगताना लाज वाटतं नाही का? त्याच्यावर काही परिणाम दिसला नाही. मागच्यावेळीप्रमाणे "मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ" सांगून मला मार्गाला लावला. सर्वीस नसताना बिल कसं काय आलं हे विचारायला तिथल्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे गेलो तर तो म्हणे "डोण्ट वरी साssर. वी विल कॅन्सल इट नो." कॅन्सल कसलं डोंबलाचं आधीच्या महिन्याची लेट फी मिळवून दर महिना बिल येतय. मध्यंतरी माझ्या बोलण्यातून हा विषय घरी बाबांना पण कळला होता. ते म्हणाले अरे दे १०० रुपये, करेल काम सटकन. मी म्हटलं त्याला हवे तर त्याने हात पसरून मागवेत. मी स्वत:हून देणार नाही. भीक हवी तर भीक मागण्यात लाज कसली? आणि मला असं दोन महिने पिळल्यानंतर आत्ता तर मी त्याला xxदेखील देणार नाही.

हळूहळू कामाच्या गडबडीत बी.एस्.एन्.एल्.चा नाद सोडून दिला. दरम्यान ह्या महादशेतून एक दोन ग्रह हटले आणि महिनाभरात मला दुसरा प्रॉजेक्ट मिळाला. आत्ताच्या ह्या प्रॉजेक्टमध्ये कुठलीही साइट ब्लॉक नाही. त्यामुळे ऑफीसमधून का होईना इंटरनेट वापरायला मिळतं. अधूनमधून बझता येतं. बी.एस्.एन्.एल्.कडून पुन्हा कनेक्शन मिळेलं ही अशा सोडली आहे तरी पण परवा पुन्हा सहजच त्यांची छेड काढायला गेलो. पाहतो तर श्रीनिवासकडे नेहमीप्रमाणे कुणीतरी आपले गार्‍हाणे घेऊन उभा होता आणि श्रीनिवास आपल्याकडच्या कागदावर काहीतरी लिहून घेत होता.

मी: क्या ये आप से अपना नंबर मांग रहे है?
पीडीत: हां
मी: इसने कहा की ये आप को दो बजे कॉल करेगा?

इतकं अचूक निदान ऐकल्यावर त्या पीडीत माणसाबरोबर श्रीनिवासनेदेखील चमकून वर पाहिले. मला पाहून तो काही बोलणार इतक्यात

मी: इसने बहूत लोगोंक को कहा है की ये दो बजे कॉल करेगा. क्या है ना इसे सिर्फ दो बजे फ्री कॉलिंग होता है. आज दो बजे तो आप का नंबर नाही लगने वाला क्यों की मैं पहलेसे लाइन मे हूं और मुझे दो महिने से कभी कॉल नही आया. अगर आप चाहते हो की ये आपको कॉल करे तो इसे ५० पैसा दे दो.

मग श्रीनिवासकडे वळून

मी: बराबर है ना? आपको आउट गोइंग ५० पैसा ही है ना?

त्याला काही बोलू न देता पुन्हा त्या पिडीताला उद्देशून

मी: चलो छोड दो. आप पुरा १ रुपया ही दे दो. पक्का कॉल आयेगा.

पुन्हा श्रीनिवासकडे वळून

मी: ठीक है ना?

ह्या दरम्यान श्रीनिवासच्या चेहर्‍यावर "हा आत्ता कुठून उपटला" पासून "क्या बात करते साssर", "हो", "नाही", "अबे चूप" असे सगळे भाव झरझर उमटत होते. माझा बोलण्याचा पवित्रा पाहून ह्या वेळी मी कनेक्शन कधी देताय हे विचारायला आलेलो नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. तरी पण काहीतरी सबळ आणि नवीन कारण देण्यासाठी त्याने तोंड उघडले.

श्रीनिवास: साssर, ऐसा नही है साssर. आप बोलते ऐसा क्या भी नाही होता.

मी मात्र माझ्या भलत्याच मुद्द्यावर ठाम.

मी: क्यों आप को दोपहर दो बजे फ्री कॉलिंग नही होता? तो कब होता है? आप तो सब को दो बजे हो बोलते हो.
श्रीनिवास: (त्रासून तरी पण शक्य तितक्या समजावणीच्या सुरात) नही साssर. क्या है ना पहले हमारे पास केबल नही था. अब केबल आया पर उस के लिये रास्ता खोदना पडता. मुन्सिपालटी उसका पर्मिसन नही देता.
मी: तो अब क्या? मैं क्या करू?
श्रीनिवास: क्या बी नही . जैसे ही काम होगा मैं आप को कॉल करूंगा.
मी: (जाता जाता) हा ठीक है, लेकिन बस दोपहर को दो बजे कॉल मत करना. क्या है दो बजे मैं थोडा ज्यादा बिज़ी रहता हूँ. आप कॉल करो. काम होते ही आप के कॉल का पैसा मैं आपको लौटा दूँगा.

एवढे बोलून अजुन काही आणा भाका न घेता मी तिकडून बाहेर सटकलो.

तर असं आहे. सध्या नवीन प्रॉजेक्टमध्ये काम पण खूप आहे त्यामुळे ऑफीसमध्येच जास्त वेळ जातो. ऑफीसच्या जवळच नवीन रूम पहावी म्हणतो त्यामुळे सध्यातरी नवीन कनेक्शन घ्यायचा विचार नाही. ऑफीसमध्ये वेळ मिळाला तशी ही पोस्ट टंकली. बी.एस्.एन्.एल्.बद्दल बोलायचं तर अपेक्षाभंग नक्की कधी झाला हे कळत नाही? अपेक्षा नसताना मिळालेल्या सेवेमुळे की त्यांनी आपली औकात दाखवून दिली तेंव्हा?

असो. आत्ता पाहू ई-महादशा कधी संपते आणि पुन्हा कधी घरून विकांताला मस्त लोडाला टेकून वाचन सुरू होतं. कोकणात असतो तर एखाद्या भगताकडून श्रीनिवासचे भूत उतरवले असते (की त्याच्या मानेवर बसवले असते?). सध्या तरी ह्या ईहलोकात असून ई-लोकात येण्याजाण्यावर काही निर्बंध आले आहेत हे नक्की.

Wednesday, August 25, 2010

श्रावण, शाकाहार आणि आम्ही

सोमवारी रत्नागिरीच्या भैरीचा (रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी) श्रावणातला हरीनाम सप्ताह संपला आणि आज तब्बल दोन आठवड्यानी नॉनव्हेज खाल्ले. सतत उसळी, पालेभाज्या खाऊन पोटावर अमानुष अत्याचार झाले होते. श्रावण महिना म्हणजे आमच्यासारख्यांना काळ्या पाण्याची शिक्षा. आमच्या घरी रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे मांसाहार करण्याचे तीन दिवस. त्यापैकी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे कसे एकदिवासाआड येतात. रविवारनंतर बुधवारची तब्बल दोन दिवस चातकाप्रमाणे वाट पाहाणारे आम्ही, आमच्यासाठी श्रावणाचा पूर्ण महिना पाळणे म्हणजे जिभेची आणि पोटाची काय अवस्था होत असेल बरे? लहानपणापासून घरची वडीलधारी माणसे (पक्षी: महिला वर्ग) घरातल्या सगळ्यांनी (म्हणजे मुख्यत: आम्ही लहान मुलांनी, कारण मोठी माणसे (पक्षी: पुरूष वर्ग) त्यांचे ऐकत नसत) श्रावण पाळावा असा आग्रह धरत असत. आपल्या मुलाबाळानां थोडेफार पुण्य लागावे असं त्यांना वाटायचे. पण श्रावण पाळण्यावरून ह्या दोन्ही वर्गाचे (आजतागायात) कधीही एकमत न झाल्याने आणि आम्हा मुलांचा पुरूषवर्गाला मूक आणि बिनशर्त पाठिंबा असल्याने ग्रामदेवतेचा हरीनाम सप्ताह संपेपर्यंत तरी शाकाहार करावा असा एक अघोषित कायदा आमच्याकडे पाळला जातो.

हरीनाम सप्ताहादरम्यान आठ दिवस देवळात अखंड भजन सुरू असते. आत्ता आमचे ग्राम दैवत भैरी म्हणजे शंकराचे एक रूप. त्यामुळे त्याचा सप्ताह श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन दुसर्‍या सोमवारी म्हणजे आठ दिवसांनी संपतो. त्यामुळे शाकाहाराचा हा अघोषित नियम केवळ सोमवार ते सोमवारच्या साप्ताहा दरम्यान पाळायचा की श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावणातल्या दुसर्‍या सोमवारपर्यंत पाळावा ह्यावर आजही दुमत आहे. वर वर जरी हा प्रश्न अत्यंत साधा दिसत असला तरी खोलवर विचार करता तो गहन आहे. उदाहरणार्थ यंदा श्रावण मंगळवारी सुरू झाला म्हणजे श्रावणाचा पहिला सोमवार उजाडला तेंव्हा श्रावणातले पहिले ७ दिवस उलटून गेले होते. याचाच अर्थ आमच्या घरी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही हक्काचे दिवस फुकट गेले. म्हणजेच हरीनाम साप्ताहातले बुधवार, शुक्रवार आणि रविवार धरून एकूण दोन आठवडे शाकाहारी. याउलट श्रावण जर का सोमवारीच सुरू झाला तर मोजणी पहिल्या दिवसापासूनच सुरू होईल आणि एका आठवड्यात 'जन'जीवन पूर्व पदावर येईल. आत्ता ह्या विचार सरणीस आमचे आजोळ जबाबदार आहे कारण मामा मंडळी (स्त्रीवर्ग धरून बरं का) केवळ सोमवार ते सोमवार श्रावण पाळतात.

यंदा शाकाहाराचे दोन आठवडे पाहाता गटारी आमावस्येच्या (पुण्य?) दिवशी आमच्या मामामंडळीच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही केवळ हरीनाम सप्ताहादरम्यान, म्हणजे सोमवार ते सोमवार श्रावण पाळावा असा प्रस्ताव संबंधित मंडळींनी मांडला होता परंतु तो प्रस्ताव गृहखात्याने गटारीच्या मटणाच्या उरलेल्या हाडकांबरोबर केराच्या टोपलीत टाकला. उलट यंदा तसेही दोन आठवडे श्रावण पाळता आहातच तर अजुन दोन आठवडे कळ काढा आणि गौरी विसर्जनानंतरच सगळे मिळून उपवास सोडू असा उलटा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव आज मासे खाऊन आम्ही Dustbin मध्ये (ऑफीसमध्ये असल्याने) टाकला हे सांगायलाच नको. असो पुढील वर्षी मामा मंडळीचा पाठिंबा घेऊन पुन्हा हा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवायचा मनसुबा आहे. मामा लोकं बिनशर्त पाठिंबा देतीलच पण तरी देखील त्यांच्याकडून अधिक जोर लागण्यासाठी पुढील आषाढात कोलंबी, पापलेट, सरंगा, बांगड्याच्या उपस्थितीत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणी करून घेऊ म्हणतो. तूर्तास पुढील गटारीपर्यंत नियमीतपणे रविवार, बुधवार आणि शुक्रवारची वाट बघणे.

Monday, June 14, 2010

सुट्टी संपली!!!



तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या...



ShareThis