Showing posts with label मस्त्याहार. Show all posts
Showing posts with label मस्त्याहार. Show all posts

Wednesday, November 23, 2011

एकशिपी

साहित्य :- एक शेर तसरे मुळे (एक शिपी), कांदा-सुके खोबरे वाटण १ वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा, लसूण पाकळ्या ३-४, लाल तिखट ३ चमचे, हळद १/४ चमचा, मीठ (चवीनुसार), गरम मसाला १/२ चमचा, कोथिंबीर (आवडीनुसार), फोडणीसाठी तेल.

कृती :- प्रथम मुळे धुवून घेऊन विळीवर उभे चिरून (दुभागून) घ्यावेत. शिपी चिरल्यावर त्यातून पांढरऱ्या रंगाचे पाणी (काट) येईल ते टाकून देवू नये.
त्याची एक शिपी काढून घ्यावी (शिपीच्या आतील मांस एकाच शिपीला आले पाहिजे. त्यासाठी शिपी कशी फिरवावी ते बरोबरच्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे). नीट केलेल्या शिप्या (काटसकट) एकत्र कराव्यात.



कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या चिरून टाकाव्यात, लालसर झाल्यानंतर त्यात कांदा-सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकावे आणि ते परतत राहावे.
परतून झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट क्रमाने टाकावे. हे सगळे मिश्रण (कढईला करपू न देता) व्यवस्थित शिजले की नीट केलेली एकशिपी त्यात टाकावी आणि त्यात प्रमाणानुसार पाणी घालावे. वरती झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे. आवडीनुसार गरम मसाला टाकून पुन्हा थोडे शिजू द्यावे. शेवटी कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे.


शिजण्यासाठी लागणारा वेळ :- १५-२० मिनिटे

ता.क. - चिरण्याआधी सुरुवातीलाच मुळे एकदा चांगले धुवून घ्यावेत. एक शिपी काढून झाल्यावर शिजायला टाकताना त्यात जे पाणी (काट) आले असेल व्यवस्थित गाळून शिजायला टाकावे नाहीतर शिपीचा कच (शिपीचे बारीक तुकडे) त्यात जाण्याची शक्यता असते.
'मोगरा फुलला २०११' च्या ई-दीपावली अंकात पूर्वप्रकाशित

Wednesday, August 25, 2010

श्रावण, शाकाहार आणि आम्ही

सोमवारी रत्नागिरीच्या भैरीचा (रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी) श्रावणातला हरीनाम सप्ताह संपला आणि आज तब्बल दोन आठवड्यानी नॉनव्हेज खाल्ले. सतत उसळी, पालेभाज्या खाऊन पोटावर अमानुष अत्याचार झाले होते. श्रावण महिना म्हणजे आमच्यासारख्यांना काळ्या पाण्याची शिक्षा. आमच्या घरी रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे मांसाहार करण्याचे तीन दिवस. त्यापैकी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे कसे एकदिवासाआड येतात. रविवारनंतर बुधवारची तब्बल दोन दिवस चातकाप्रमाणे वाट पाहाणारे आम्ही, आमच्यासाठी श्रावणाचा पूर्ण महिना पाळणे म्हणजे जिभेची आणि पोटाची काय अवस्था होत असेल बरे? लहानपणापासून घरची वडीलधारी माणसे (पक्षी: महिला वर्ग) घरातल्या सगळ्यांनी (म्हणजे मुख्यत: आम्ही लहान मुलांनी, कारण मोठी माणसे (पक्षी: पुरूष वर्ग) त्यांचे ऐकत नसत) श्रावण पाळावा असा आग्रह धरत असत. आपल्या मुलाबाळानां थोडेफार पुण्य लागावे असं त्यांना वाटायचे. पण श्रावण पाळण्यावरून ह्या दोन्ही वर्गाचे (आजतागायात) कधीही एकमत न झाल्याने आणि आम्हा मुलांचा पुरूषवर्गाला मूक आणि बिनशर्त पाठिंबा असल्याने ग्रामदेवतेचा हरीनाम सप्ताह संपेपर्यंत तरी शाकाहार करावा असा एक अघोषित कायदा आमच्याकडे पाळला जातो.

हरीनाम सप्ताहादरम्यान आठ दिवस देवळात अखंड भजन सुरू असते. आत्ता आमचे ग्राम दैवत भैरी म्हणजे शंकराचे एक रूप. त्यामुळे त्याचा सप्ताह श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन दुसर्‍या सोमवारी म्हणजे आठ दिवसांनी संपतो. त्यामुळे शाकाहाराचा हा अघोषित नियम केवळ सोमवार ते सोमवारच्या साप्ताहा दरम्यान पाळायचा की श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावणातल्या दुसर्‍या सोमवारपर्यंत पाळावा ह्यावर आजही दुमत आहे. वर वर जरी हा प्रश्न अत्यंत साधा दिसत असला तरी खोलवर विचार करता तो गहन आहे. उदाहरणार्थ यंदा श्रावण मंगळवारी सुरू झाला म्हणजे श्रावणाचा पहिला सोमवार उजाडला तेंव्हा श्रावणातले पहिले ७ दिवस उलटून गेले होते. याचाच अर्थ आमच्या घरी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही हक्काचे दिवस फुकट गेले. म्हणजेच हरीनाम साप्ताहातले बुधवार, शुक्रवार आणि रविवार धरून एकूण दोन आठवडे शाकाहारी. याउलट श्रावण जर का सोमवारीच सुरू झाला तर मोजणी पहिल्या दिवसापासूनच सुरू होईल आणि एका आठवड्यात 'जन'जीवन पूर्व पदावर येईल. आत्ता ह्या विचार सरणीस आमचे आजोळ जबाबदार आहे कारण मामा मंडळी (स्त्रीवर्ग धरून बरं का) केवळ सोमवार ते सोमवार श्रावण पाळतात.

यंदा शाकाहाराचे दोन आठवडे पाहाता गटारी आमावस्येच्या (पुण्य?) दिवशी आमच्या मामामंडळीच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही केवळ हरीनाम सप्ताहादरम्यान, म्हणजे सोमवार ते सोमवार श्रावण पाळावा असा प्रस्ताव संबंधित मंडळींनी मांडला होता परंतु तो प्रस्ताव गृहखात्याने गटारीच्या मटणाच्या उरलेल्या हाडकांबरोबर केराच्या टोपलीत टाकला. उलट यंदा तसेही दोन आठवडे श्रावण पाळता आहातच तर अजुन दोन आठवडे कळ काढा आणि गौरी विसर्जनानंतरच सगळे मिळून उपवास सोडू असा उलटा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव आज मासे खाऊन आम्ही Dustbin मध्ये (ऑफीसमध्ये असल्याने) टाकला हे सांगायलाच नको. असो पुढील वर्षी मामा मंडळीचा पाठिंबा घेऊन पुन्हा हा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवायचा मनसुबा आहे. मामा लोकं बिनशर्त पाठिंबा देतीलच पण तरी देखील त्यांच्याकडून अधिक जोर लागण्यासाठी पुढील आषाढात कोलंबी, पापलेट, सरंगा, बांगड्याच्या उपस्थितीत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणी करून घेऊ म्हणतो. तूर्तास पुढील गटारीपर्यंत नियमीतपणे रविवार, बुधवार आणि शुक्रवारची वाट बघणे.

Saturday, February 13, 2010

मेरा पहेला प्यार!!!

कधी तुम्हा कुणाला बोललो नाही. तशी गरज देखील वाटली नाही. पण माझ्या एकंदरीत बोलण्यावरून सॉरी लिहण्यावरून कदाचित तुमच्या पैकी काही जणांनी ओळखलं देखील असेल की I am engaged. हो आहे माझं प्रेम तिच्यावर आणि तेदेखील लहान पणापासून. जेंव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती तेंव्हापासून. खरं तर तिची ओळख घरच्यांनीच करून दिली त्यामुळे आमच्या प्रेमाला विरोध वैगरे कधी झालाच नाही. आत्ता घरच्यांनी विरोध नाही केला त्यामुळे समाज काय म्हणेल वैगरे फालतू विचार मी कधी केला नाही. त्यामुळे माझे तिच्यावर किती प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय कसा राहू शकत नाही ह्याचा बभ्रा करत मी दुनिया फिरलोय.

तिचा विरह तर मी दोन दिवस देखील सोसू शकत नाही. आत्ता मी कोकणात असताना ती मला जशी मनमोकळे पणाने भेटायची तशी पुण्यात असताना आणि आत्ता बंगलोरला नाही भेटत. खरं तर आधी मी बंगलोरला आलो तेंव्हा तर फार हाल झाले हो. अगदी जिकडे पाहावं तिकडे सारखे तीचेच भास व्हायचे. भेट होणार नाही हे माहीत असल्यामुळे निदान तिला पर्याय शोधण्यासाठी तरी मी वीकेंडला नाना ठिकाणी भटकायचो. अर्थात तिला पर्याय शोधत होतो म्हणजे माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं असं समजू नका. उलट तिला दुसर्‍या रूपात स्वीकारण्याची ती तडजोड होती. अखेर एक दिवस केरळी वेषात मला तशीच स्वप्न-सुंदरी भेटली देखील. ही खोबरेल तेल लावून यायची पण आत्ता विरहच सहावेसा झाल्यानंतर खोबरेल तेल तर खोबरेल तेल, मी परिस्थितीला सामोरे जाण्याचं ठरवलं. इतक्या दूर बंगलोर सारख्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रेम मिळतय ह्यातच मी खुश होतो. बाकी सणासुदीला घरी गेलो की ती भेटतच होती. त्या दोन चार दिवसात आमच्या प्रेमाला नुसतं उधाण येत असे. नंतर एके दिवशी मला बंगलोरला तिच्यासारखीच अगदी हुबेहुब दुसरी बसस्टॅंड जवळच्या कामातांकडे दिसली. मला तर अगदी "अगर सच्चे दिल से किसी को चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिये जूट जाती है" चा याची देही याची डोळा प्रत्यय आला. ही अस्सल सारस्वत घराण्यातील होती. मी तर बेह्द्द खुश. सारस्वतांबद्दल ऐकून होतो पण आत्ता तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते. घरापासून इतक्या दूर मला माझे प्रेम पुन्हा मिळाले होते. तेंव्हापासून खोबरेल तेल लावून भेटायला येणारीचं तोंड देखील पाहिलं नाही. चालतं तेवढं. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतात म्हणे. आजकाल रविवार दुपारी १५ किलोमीटर अंतर तुडवून मी कामातांकडे जातो. आठवड्यात एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली तर ती देखील सत्कारणी लावतो. हिच्यासोबत घालवलेल्या रविवारच्या आठवणीत आणि येणार्‍या रविवारच्या भेटीची स्वप्न बघत उरलेला आठवडा कंठतो. खरं प्रेम असेल तर कुठेही भेटतं कारण परदेशी गेलो तेंव्हा मला तिच्या सारख्याच एकीची ओळख झाली. ही जापनीज होती पण किती 'सुशी'ल. आजही तिच्या आठवणीने मनाचा कोपरा हळवा होतो.

आज वॅलिंटाइन डे. शुक्रवारी शिवरात्रीची सुट्टी होती म्हणून खास लॉंग वीकेंडला जोडुन सोमवारी सुट्टी घेऊन आज वॅलिंटाइन डेला हिला भेटायला खासं घरी आलोय. म्हटलं आज वॅलिंटाइन डे हिच्याबरोबर घरी साजरा करू. चला तर मंडळी मी तिला घरी घेऊन जायला आलोय. आत्ता मी तिची एवढी स्तुती केलीय तर तिचे फोटो पण देतो. मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच जण तिला जवळून ओळखत असतील, कदाचित माझ्यप्रमाणे तिच्यावर जीव ओवाळून देखील टाकत असतील. ती आहेच तशी प्रेमात पडण्यासारखी आणि प्रेमात पडल्यावर पुन्हा न विसरण्यासारखी... माझी प्रिय मासोळी...

Saturday, November 7, 2009

यंदाची दिवाळी - भाग २

भाग एक पासून पुढे चालू

दिवाळी दिवशी साडेपाचला उठलो. घरातली मोठी माणसे कधीच ४-४ १/२ पासून उठून तयारीला लागली होतीत. मस्त नारळाच्या रसात भिजवलेल्या ऊटण्याचा छान वास येत होता. आई, बाबा, काका, काकू, भाऊ, वहिन्या ह्यांच्या आंघोळी देखील आटोपल्या होत्या. देवपूजेची तयारी सुरू होती. देवाला देखील ऊटणे लावून पूजेची सुरूवात झाली. तोवर आजूबाजूच्या मुलांनी दणके बाज फटाके फोडले. त्या आवाजाने आमच्या घरातले बाळगोपाळदेखील उठले आणि फटाके फोडण्यासाठी धावले. सगळ्यात लहान सिद्धी फटक्याच्या आवाजाने दचकून उठली आणि फुल्ल भोकाड पसरले. मी देखील ऊटणे लावून आंघोळ करून घेतली. दिवाळी दिवशी आई, काकी, आत्ये अशा सगळ्या आम्हा भावंडांना ऊटणे लावतात. आमच्या वेळी असं नव्हतं असे म्हण्याची अजुन गोष्ट म्हणजे दिवाळीतली थंडी. लहानपणी खूप थंडी असायची. कधी एकदा सगळ्याजणी आपल्याला ऊटणे लावतात आणि कधी एकदचा गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतो असे व्हायचे. थंडी नक्की कोणत्या दिवाळीत गायब झाली आठवत नाही पण गायब झाली हे मात्र नक्की. हल्ली दिवाळी मे महिन्यात येते की काय असे वाटते. आपल्या नकळत सगळं किती भराभर बदलतं नां. आंघोळीनंतर तुळशी समोर कारेट फोडलं. ही प्रथा कुठे कुठे पाळतात हे ठाऊक नाही म्हणून लिहितो. कारेट नावाचं एक अंड्याच्या आकाराचे फळ रानात किंवा डोंगरावर मिळते. नरकचतुर्थी दिवशी नरकासूर समजून डाव्या पायाच्या अंगठ्याने हे कारेट तुळशीसमोर फोडायाचे. लहानपणी मला केवळ पायाच्या अंगठ्याने हे फोडता नाही यायचे. मग पूर्ण पाय द्यायचो आणि कारेट चपटून टाकायचो. घरातल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर पुढच्या ओटीवर सगळे एकत्र फराळाला बसलो. देवपूजा आटोपली होती. दिवाळी दिवशी देवाला दूध पोह्याचा नेवैद्य दाखवतात. मस्त फराळ आणि दूधपोह्यावर ताव मारला. छोट्या मुलांना सतावणे वैगरे सुरू होतेच. आमचं झाल्यावर लेडीजची बॅच फराळाला बसली. नंतर शेजारच्या घरात फराळची देवाणघेवाण सुरू झाली. पप्या वाडीतल्या गँगचा म्होरक्या झालाय. हल्ली बरीचशी मुलं नोकरीशिक्षणानिमित्त घराबाहेर असल्याने पप्या आणि समस्त गँग दसरा, कोजागिरी साजरी करू शकले नव्हते. त्यामुळे दिवाळी दिवशी सगळे एकत्र येऊन सगळ्या घरात जाऊन दिवाळी शुभेच्छा देत फिरत होते. गँगचा दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर दुसर्‍या दिवशी गणपतीपुळे ट्रिपचा प्रस्ताव देखील होता. मे महिन्यानंतर झालेले वाढदिवस आणि कोजागिरी हातखंब्याजवळच्या धाब्यावर चिकन हाणून साजरे करण्याचा प्लान होता. (हातखंबा हे मुंबई-गोवा हाइवे वरचे एक गाव. सुजाण वाचकांनी हात खंबा अशी शब्द फोड करू नये.) आत्ता मी सतत बाहेरच चिकन खात असल्याने रविवार घरीच साजरा करणार होतो. त्यामुळे पप्या आणि कंपनीचा प्रस्ताव साहजिकच धुडकावून लावला आणि मी मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडलो. दिवाळी दिवशी भल्या पहाटे मुले देखील न चुकता मंदिरात जातात ह्याचे कारण सांगायची गरज नाही. त्या दिवशी इतक्या छान छान मुली पाहायला मिळतात की काय बोलावे. मला जरा उशीरच झाला पण Better late than Absent या सदाबहार सुविचारला धरून मी हजेरी लावून आलो. पदरी अगदीच निराशा नाही पडली.

सकाळी सगळे लवकर उठलेले त्यामुळे जेवणं झाल्या झाल्या सगळे पटापट झोपी गेले. २-३ तासाच्या विश्रांती नंतर चहापान झाल्यावर सगळे पुन्हा फ्रेश झाले. संध्याकाळी लक्ष्मी पूजन होते. दिवेलागणी बरोबर पुन्हा एकदा कंदील, पणत्या आणि त्याचबरोबर फटाके फोडणार्‍या बाल-गोपाळ मंडळींवर लक्ष्य ठेवणे हे काम माझ्याकडे आले. मोठी माणसे लक्ष्मी पूजनाच्या तयारीला लागली. वहिनीने पिवळ्या आणि केशरी गोंड्या च्या पाकळ्यांची छान रांगोळी काढली होती. छान प्रसन्न वातावरणात लक्ष्मी-पूजन पार पडले. गोड शिरा आणि श्रीखंड पूरीचा नेवैद्य झाला. सगळं आटपेपर्यंत साडेआठ वाजून गेले. पुन्हा थोड्या गप्पाटप्पा नंतर जेवण करून दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.

दुसर्‍या दिवशी रविवार. साहजिकच पुन्हा एकदा मच्छीमार्केटची वाट धरण्यात आली. रविवार चिंगळ(Prawns), कालव्, तिसरे मुळे (एक शिंपी) यापैकी काहीतरी अशी माझी फर्माईश होती. कालव् आणि तिसरे मुळे मिळणे कठीण आहे हे माहीत होतं. प्लान के मुताबिक चिंगळ आणि जोडीला गावठी चिकन. आमच्याकडे होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलीवंदनाला कोंबडी-बोकडाचे गावजेवण असते. गावाचे लोक होळीला ईच्छेनुसार कोंबडी-बोकड किंवा नाराळाचा नवस बोलतात. हे मटण गावाचे पुरूष शिजवतात. ह्याला कसलेही वाटप किंवा स्पेशल चिकन मसाला वैगरे लावत नाहीत. फक्त नवसाचे नारळ आणि कांदा वापरुन केलेले असते. आम्ही ह्याला सुक्क मटण म्हणतो. त्या दिवशी घरी चिंगळाबरोबर तसं सुक्क चिकन शिजलं होतं. मी रेसिपी लिहून आणली आहे. एक दोन आठवड्यात करून पाहीन एखाद्या रविवारी.

आता अशा जेवणा नंतर पुन्हा झोप ओघानेच आली. झोपून उठल्यावर चहा वैगरे घेऊन झाल्यावर बाजारात जाऊन कागद आणि गोंद घेऊन आलो. महेंद्र्जींनी केलेला कंदील पाहिल्यापासून यंदा आपण देखील कंदील करावा हे मनात आले होते. लहानपणीचे दिवस आठवले. लहानपणी दिवाळीची सुट्टी पडली की कंदील आणि मातीचा किल्ला करणे ही दोन कामे दिवाळीच्या दिवसाआधी उरकणे ही मोठी जबाबदारी असायची. मोठ्या कंदीलाबरोबर १०-१२ छोटे कंदील ही करावे लागत. शेजारच्या काकांकडून सिगारेटची रिकामी पाकिटे आणून ती मधून कापून त्यावर कागदी करंज्या आणि शेपूट लावली की झाला कंदील. आत्ता मात्रा कागदी करंज्यांचाच पण एकच मोठा कंदील करायचे ठरवले. जवळपास १४-१५ वर्षांनी कंदील करत होतो. पुतणे आणि भाचे मंडळी कुतुहलाने बघत होते. कंदीलाचा सांगाडा बनवायला ड्रेसच्या खोक्याचा पुट्ठा वापरला. दोन तासात कंदील झाला. मला कंदील करताना बघून बाबा पण मदतीला आले. बाबांनी प्रत्येक करंजीच्यामध्ये सोनेरी कागद कापून नाजूक ठिपके लावले. दिवाळीला नाही तरी भाऊबीजेआधी कंदील अंगणात लागला. ऑफीसचे बेचव काम सोडून आपल्याला अजुन काही येते ह्याचा उगाचच अभिमान वाटला. पुन्हा एकदा कॅमरा न आणल्याचा पस्तावा झाला. मला साधाच मोबाईल आवडतो पण आपल्या मोबाईल मध्ये कॅमेरा नाही ह्याच त्यावेळी पहिल्यांदा वाईट वाटलं. दादाच्या मोबाईलवर फोटो काढला पण नंतर कॉपी करायाचा राहिला. नंतर चार दिवसांनी संध्याकाळी अचानक पावसाची बर्‍यापैकी मोठी सर आली त्यात कंदीलाचा काही भाग भिजला.

दुसर्‍या दिवशी भाऊबीज. त्या दिवशी दिवाळीसारखचं बहिणींनी उटण लावलं. आंघोळी नंतर ओवाळणी. मला मोठ्या बहिणीने भाऊबीजेला एक छोटी कढई दिली. माझ्याकडे इथे कढई नव्हती म्हणून मी तिला आधीच सांगून ठेवले होते. फ्रायपॅनमध्ये अंडा बुर्जी तितकीशी चांगली होतं नाही आणि शिवाय डीपफ्राय करण्यासारखं काहीच करता येत नाही. आत्ता कढई आलीय मग अंडा बुर्जी, कांदा-भजी, बेसनचा सुका झुणका, हरा-भरा कबाब हे सगळं बनवता येईल. बनवेन लवकरच. माझ्या स्वयंपाक घरातल्या करमती आणि पाक कौशल्यावर एक पोस्ट होईलच कधी तरी. पाहु लिहायला लवकरच वेळ मिळो. असो तर गोडाधोडाचं खाऊन भाऊबीज साजरी झाली. माझ्या वहिन्याचे भाऊ पण भाऊबीजे निमित्त आपल्या बहिणींकडे म्हणजे आमच्या घरी आले होते. आईला भेटायला माझा मामा देखील आलेला. त्या निमित्ताने आमची पण भेट झाली. भाऊबीज संपली. दिवाळीचे सगळे मुख्य कार्यक्रम पार पडले. आत्ता मस्त आराम. म्हणजे मी गेले चार दिवस फार काम उपसले अश्यातला भाग नव्हता. पण तरी आपलं म्हणायचं. सकाळ संध्याकाळ ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय पाहिजे ते फर्मान सोडायाचे आणि हादडायचे हाच एक कलमी कार्यक्रम. अगदीच हुक्की आली तर बाजारात फेरफटका मारायचा. दोन दिवस संध्याकाळी छोटे कंपनीला घेऊन मांडवी बंदरला जाऊन आलो. वाळूत किल्ले बांधले. पुन्हा कॅमेरा नाही!!! भेळ, आइस्क्रीम, कटलेट चोपले. बाकी वडापाव, ढोकळा, मिक्स-भजी ह्या सगळ्यांचा आस्वाददेखील घेऊन झालाचं होता. भावाची छोटी मुलगी होती. तिच्या बरोबर खेळण्यात वेळ चटकन निघून जात होता. ह्या आधी तिला पहिल्यांदा पहिली तेंव्हा ती सहा महिन्यांची होती. नुकतीच बसू लागली होती. आत्ता तर ती दूडू-दूडू धावू लागली होती. वेळ किती भुर्रकन निघून जातो नाही? भाऊ, काका, मामा अशी सगळी नातेवाईक मंडळी मुंबई किंवा पुण्याला. त्यामुळे अधूनमधून त्यांच्या भेटीगाठी आणि रत्नागिरीला येणं जाणं सुरूचं असतं. आम्ही दक्षिणेकडे जाऊन पडावं ही श्रींची इच्छा त्यामुळे मी एकटा तिकडे बंगलोरमध्ये. मुंबईला अगदी जवळचं कुणाचं लग्न असेल तरच जाणं होतं. त्यामुळे गणपती, दिवाळी किंवा मे महिन्यामध्ये जाणं झालं तरच माझी इतरांशी भेट होते. नाहीतर सहा सहा महिने दर्शन नसतं. बघू पुण्याला कधी येणं होतं?

सुट्टीच्या दिवसांपैकी एक दिवस निवडणूक निकालांचा होता. पप्याचा जनसंपर्क एकदम चांगला आहे. गावात कुणाकडे ही अडल्या नडल्यावेळी हा हजर त्यामुळे तो पुण्यात गेल्या पासून त्याची उणीव हल्ली सगळ्यांनाच जाणवते. पोरगं राजकारणात शिरलं तर चांगलं नाव काढेल. तसा तो active आहे सुद्धा. निवडणुकीच्या धामधुमी आधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा निर्माण करून रस्त्याचे काम करून घेण्यात पप्याचा हात होता. साहजिकच निकालादिवशी पप्या सकाळपासून गायब. मतमोजणी केन्द्रावर हजर होता. रत्नागिरीतून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे उदय सामंत निवडून आले. कार्यकर्ता म्हणून साहजिकच पप्याला पार्टीला आमंत्रण होते. गुहागरला रामदास कदम, विनय नातू आणि भास्कर जाधव ह्या तीन त्रिमूर्तीची चार दिवसापासून फार चर्चा होती. निकालादिवशी भास्कर जाधवांनी बाजी मारली. गुहागर मतदारसंघ फेररचनेमुळे कुणाचं कसे नुकसान झाले, मुंबईत शिवसेनेचे कसे हाल झाले, मनसेने कसा दणका दिला ह्याचीच दोन दिवस चर्चा होती.

ह्या सगळ्या मौजमजेत अचानक एक दिवस उद्या आपल्याला निघायचे आहे हे आठवले. मग फराळाचे पॅकिंग सुरू झाले. काय आहे ना घरी असल्याने नॉन-व्हेज आणि बंगलोरला न मिळणार्‍या गोष्टी खाण्यावार मी भर देतो आणि फराळ वैगरे टिकाऊ पदार्थ घेऊन बंगलोरला येतो म्हणजे इथल्या इडली-वड्यापासून काही दिवस सुटका होते. ऑफीसमधल्या मित्रांसाठी भाकर-वडी आणि कोहाळे पाक घेतला. रविवारी दुपारचा मस्त्याहार करून नेहमीप्रमाणे मनात नसताना दुपारच्या कोल्हापूर गाडीने रत्नागिरी सोडले. कोल्हापूरहून पुन्हा बंगलोरची वोल्वो पकडली. पुन्हा कन्नड चित्रपट. बहुतेक क.रा.प.मंने फक्त कन्नड चित्रपटचं लावायचे ठरवलेले दिसते. परतीच्या प्रवासाबद्दल बाकी काही फार लिहाण्यासारखं नाहीए. हा प्रवास जरा उदासवाणाच असतो. बराचसा झोपेतच जातो.

अश्या प्रकारे यंदाची दिवाळी मस्त खादडण्यात आणि मौज-मजेत गेली. इतकी मोठी पोस्ट होईल असे वाटलेच नव्हते. दिवाळीपेक्षा मत्स्याहाराचीच जास्त चर्चा झाली हा भाग वेगळा. लिहायला बसलो आणि बरचं काही काही सुचतं गेलं. वाटलं तसं लिहीत गेलो. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पोस्ट लिहाल्या आहेत. पहिल्या पोस्टला बर्‍यापैकी प्रतिक्रिया मिळाल्या. बरे वाटले. थोडा हुरूप आला लिहण्याचा. बोअरिंग झाले नसेल अशी आशा बाळगतो.

ShareThis