Monday, September 28, 2009

लतादीदीनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आज दसरा, साडेतीन मुहूर्ता पैकी एक त्याचप्रमाणे आज स्वररत्न भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस. दीदीनीं आज ८१ व्या वर्षात पाऊल टाकले. सहस्त्र पूर्णचंद दर्शनाचा प्रवास पुरा करत आलेल्या लतादीदीबद्दल मी काय बोलावे. नुकतीच CNN IBN वर त्यांची मुलाखत पहिली. त्यानी आपल्या लहानपणीच्या, गाण्यांच्या अशा अनेक आठवणी सांगितल्या.

दीदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तुमच्या कर्तुत्वाला सलाम!!!

Saturday, September 26, 2009

'व्हॉट्स युवर राशी'

काल रात्री आशुतोष गोवारीकरचा 'व्हॉट्स युवर राशी' पहिला. मी तसा चित्रपट वेडा नाही पण ठराविक दिग्दर्शक किंवा कलाकारांचे चित्रपट आवर्जून पाहतो. त्यातल्या त्यात आमिर खान, नाना पाटेकर, नसरुद्दीन शहा ह्या कलाकारांचे किंवा आशुतोष गोवारीकर, विशाल भारद्वाज अश्या दिग्दर्शकांचे चित्रपट शक्यतो सोडत नाही. तसं चांगला असेल तर राम गोपाल वर्माचा चित्रपट देखील पाहतो, पण आमिर खान, आशुतोष गोवारीकर अश्या लोकांचे चित्रपट शक्यतो पहिल्या दिवशी पाहतो. दुनियेचा review यायच्या आधी मी आपला रिस्क घेऊन मोकळा होतो. आमिर, आशुतोषने अजुन तरी कधी फार निराशा केली नाही. गेल्या वर्षी 'गजीनी' थेटरला जाऊन पहिला, त्यानंतर गेल्या महिन्यात 'कमिने' ला गेलो होतो. आत्ता काल 'व्हॉट्स युवर राशी' ला गेलो. असो हा झाला माझा थेटर भेटिचा Algorithm.

'व्हॉट्स युवर राशी' बद्दल बोलायचे झाले तर चित्रपट पाहण्यामागे आशुतोष गोवारीकर आणि प्रियांका चोप्रा ही दोन कारणे होती. हर्मन बवेजा हा रिस्क फॅक्टर होता. अपेक्षा भंग झाला की नाही हे मी अजूनही नक्की सांगू शकत नाही. मुलगी पहाणे हा बहुतेक सगळ्या लग्नाळू मुलांच्या आयुष्यातला अविभाजित घटक. (आमचे पण घोडा मैदान दूर नाही. आणि खाजगीत तुम्हाला म्हणून सांगतो मुलगी पहाणे म्हणजे काय हे जरा जवळून समजावून घेता येईल हे चित्रपट पाहण्या मागचे तिसरे कारण). अरेंज मॅरेज असो किंवा प्रेम विवाह, मुलगी पहाणे आलेच. तर असा एक नेहमीचा साधा सरळ विषय फक्त नवीन मांडणी. चित्रपट तसा हलका फुलका आणि विनोदी आहे. बारा राशीच्या बारा मुली प्रियांका चोप्राने छान उभ्या केल्या आहेत. प्रत्येकीचा लुक वेगळा. प्रियांकाची पहिलीच मेष राशी वाली एंट्री आणि त्या राशीचा लुक, मेक अप आणि अभिनय हा बाकी अकरा राषींच्या तुलनेत सरस. फुल्ल टाळ्या!!!
बाकी अकरा खास नाहीत असे नाही. प्रत्येक राशीचे वेगळेपण जपलेले आहे. चित्रपट संपल्यावर देखील प्रत्येक राशीची प्रियांका तिच्या लुक सकट आठवते ह्यातच सगळे आले. अरेंज मॅरेज आणि मुलगी पहाणे ह्या प्रकारमध्ये मुलींना काय काय प्रकारांना तोंड द्यावे लागते, कशा कशाला सामोरे जावे लागते अश्या पारंपारीक रूढी आशुतोष गोवारीकरने कधी विनोदी तर कधी गंभीर पद्धतीने अश्या छान हातालळ्या आहेत. हर्मन बवेजाचे पहिले दोन्ही फ्लॉप चित्रपट मी पाहिलेले नव्हते त्यामुळे तो किती बकवास अभिनेता आहे ह्याची मला तरी कल्पना नव्हती. 'व्हॉट्स युवर राशी'मध्ये तरी तो टोकाचा बकवास वाटला नाही. त्याने बर्‍यापैकी झेपवले आहे. त्याला पाहून हृतिक रोशन आठवतो हे मात्र नक्की. इनफॅक्ट काही वेळा मला इथे हृतिक रोशन असायला हवा होता असे वाटून गेले. रणबीर कपूर पण चालला असता. असो पण हर्मन मुळे चित्रपट असह्य होत नाही हे नक्की.
चित्रपट मध्यंतरापर्यंत मनाप्रमाणे आहे. खरा प्रॉब्लेम सुरू होतो तो गाण्यांमुळे. पहिली मेष रास सोडली तर उरलेल्या अकरा राशीच्या अकरा मुलींचे गाणे आहे. त्यामुळे नंतर नंतर थोडा तोच तोच पणा येतो. २-३ गाणी सोडली तर बाकीची झेपवत नाहीत. ह्यामुळे पूर्ण चित्रपटाची लांबी ४०-४५ मिनिटानी वाढली आणि शेवटी कधी एकदा योगेसला (हर्मनचं चित्रपटातलं गुजराती नाव) पोरगी भेटते आणि चित्रपट संपतो असे होते. सुरुवातीला आवडलेला चित्रपट शेवटी शेवटी आशुतोष गोवारीकरने लोकांसाठी बनवला नसून प्रत्येक मुलीला एक गाणे ह्या न्यायाने तडजोड न करता स्व:त साठी बनवला की काय असे वाटून गेले. हल्ली हिंदी चित्रपट देखील सव्वादोन-अडीज तासात संपतात त्यामुळे साडेतीन तास बसायची राजश्री वाल्यांनी लावलेली जनतेची सवय मोडली आहे. तसे आशुतोष गोवारीकरचेच 'लगान' आणि 'जोधा अकबर' पण साडेतीन तास चालले पण ते अकारण लांबलेले वाटले नाहीत. 'व्हॉट्स युवर राशी' मात्र लांबलेला जाणवतो.
तर गाववाल्यानू माका विचारलाव् तर साताट एक्स्ट्रा गाणी बघीत साडेतीन तास कळ काढलाव तर पिक्चर बघूक हरकत नाय . मनोरंजनाची ग्यारेंटी!!!

Thursday, September 17, 2009

आमच्यावेळी बुवा असे नव्हते...

आमच्यावेळी बुवा असे नव्हते... साधारणपणे वडीलधारी माणसे नवीन पिढीबद्दल बोलू लागली की हे वाक्य हमखास येतेच असे म्हटले तर वावगे नाही ठरणार. मी स्व:तच्या बाबतीत पहिल्यांदा हे उदगार लहानपणी अभ्यास करताना ऐकले. घरी आईला गणिताबद्दल एखादी शंका किंवा गणित सोडवायची पद्धत विचारली की ती काही वेगळ्या पद्धतीने गणित सोडवून दाखवायची. शाळेत काही वेगळी पद्धत शिकवलेली असायची. नक्की कुठली गणिते ते आत्ता आठवत नाही. तसाहि माझा आणि गणिताचा ३६ चा आकडा. मग मी माझ्या पद्धतीने सोडवले की "आमच्या वेळी अशी पद्धत नव्हती" असे ऐकायला मिळायचे. कधी कधी अभ्यासक्रम बदलायचा. काही नवीन विषय असायचे. कधी कधी काही पाठ्यपुस्तकांमधले धडे बदलायाचे. मग ३-४ वर्षे मोठी असलेली भावंडे देखील "आमच्या वेळी असे नव्हते" असे बोलून उगाचचं आमच्यामध्ये ३-४ वर्षाची जनरेशन गॅप निर्माण करायचे.

माझे आई बाबा शाळेत होते तेंव्हा सातवी पास म्हणजे मॅट्रिक आणि सातवी पास झालेल्यानां सरकारी नोकरीसाठी ओढून नेत आणि आम्ही इंजिनियर झाल्यानंतर एक वर्ष काही मिळेल ते काम करत होतो. त्यावेळी निवृत्तीला आलेल्या समस्त जनतेचे "आमच्या वेळी असे नव्हते" असे उदगार पुन्हा एकदा ऐकू आले. हल्ली कोणी पळून जाऊन लग्न केले किंवा रजिस्टर लग्न केले तरी (मानपान हुकलेली) काही टाळकी "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून नाराजी व्यक्त करतात. माझे काका इंग्रजांच्या काळात पोलिस सेवेत होते. त्यावेळी सायबाच्या कडक शिस्तीत काम केलेले. कामासाठी मैलोन मैल चालत फिरलेले. ते हल्लीच्या पोलिसांचा फिटनेस आणि कारभार पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे बरेचदा म्हणत.

पुर्वी म्हणजे अगदी १९९५ पर्यंत म्हणा, मुंबईला असलेल्या काका आणि भावाची खुषालीची पत्रे यायची. आमच्याकडे तेंव्हा टेलिफोन ही नव्हता. तेंव्हा टेलिफोन हा ठराविक लोकांकडे किंवा पूर्ण गावात एक-दोन जाणांकडे असे. टेलिफोन म्हणजे चैनीची वस्तूचं होती. नंबर लावल्यानंतर घरी यायला काही वर्षे लागायची. पण आज गावी गेलो की कट्ट्यावर लोक आपापल्या मोबाइल वर रिंगटोन वाजवत नाहीतर गेम खेळत बसलेले असतात. मोबाइलच्याच बाबतीत बोलायचे झाले तर एके काळी ज्या उच्चभ्रू लोकांकडे मोबाइल होता ते इनकमिंगचे देखील पैसे मोजत होते. मोबाईल असणे म्हणजे एक स्टेटस होते. आज चिंधी-चोर, सोम्या-गोम्याकडे हायएण्ड मोबाइल पाहून एकेकाळचे उच्चभ्रू लोक "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून हळहळत असतील.

तसही हल्ली "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणायला दोन पिढ्यांचे अंतर किंवा वयाने फार मोठे असणे जरूरी राहीले नाही. हल्लीच्या झटपट (सबकुछ ट्वेंटी-ट्वेंटी) युगात जनरेशन-गॅप देखील झपाट्याने कमी झालीय. वीस वर्षात केवळ ५२ कसोटी सामने खेळणारे सर डॉन ब्रॅडमन आज वीस वर्षात सचिन तेंडुलकरला १५९ सामने खेळताना बघून "आमच्या वेळी असे नव्हते" असे नक्कीच म्हणाले असते. हेल्मेटशिवाय विंडिजच्या तोफखान्याचा सामना केलेले सुनील गावसकर आजच्या सुविधा पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणत असतील. कींबहुना कसोटी आणि एकदिवशीय सामने खेळून आज ट्वेंटी-ट्वेंटीचा थरार पाहता सचिन, गांगूली आणि द्रविड "आमच्या वेळी असे नव्हते" असे मनातल्या मनात म्हणत असतील. फार कशाला आम्ही जेंव्हा इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो तेंव्हा आम्हाला सेमिस्टरला ८ असे वर्षाला १६ विषय होते. पण आम्ही शेवटच्या वर्षाला गेलो आणि अभ्यासक्रम बदलला. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यावर्षी १६ ऐवजी १० विषय झाले. त्यावेळी आम्ही आयुष्यात पहिल्यांदा "आमच्या वेळी असे नव्हते" हा डायलॉग मारला होता.

हल्ली सगळं वह्या-पुस्तके, दप्तर, अभ्यासक्रम, मोबाइल(आमच्यावेळी खिशात फणी असायची तसा हल्लीच्या शाळकरी मुलांकडे मोबाइल असतो), फॅशन इतक्या भराभर बदलतं की २ वर्षाचं अंतर असणार्‍या भावंडामध्ये जनरेशन गॅप दिसते. जरा मोठं भावंड दुसर्‍याकडे पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणते. मी स्व:त देखील माझ्या लहानपणी आमच्या गावात जी मज्जा केली,
काजू-कैर्‍या-करवन्दं पाडून खाल्ल्या, दिवाळीत किल्ले बांधले, तासाला १ रुपया देऊन सायकल भाड्याने घेऊन शिकलो, समुद्र किनारी वाळूत किल्ले बांधले, कुर्ल्या पकडल्या अश्या एक ना अनेक उचापती केल्या, पण माझ्यापेक्षा फार फार तर १० वर्षानी लहान भावंडानी ह्यातील निम्म्या गोष्टीचा देखील आनंद लुटला नाही कारण मधल्या १० वर्षात गाव बदलला, घरी स्व:त ची सायकल आली, काजू-कैर्‍या पुर्वी सारख्या लागेना झाल्या, समुद्र किनार्‍यावर गर्दी वाढली. हल्ली तर तिथे कोणीतरी हॉटेल बांधतोय म्हणे. उद्या माझ्या मुलांना ह्यातील किती गोष्टी चित्रात दाखवून आमच्या वेळी असं होतं असे सांगावे लागेल कुणास ठाऊक? पण हे असेच सुरू राहाणार. जनरेशन गॅप एक दिवस दिवसावर येऊन ठेपेल आणि लोक "आमच्या वेळी" ऐवजी "काल" असे नव्हते म्हणून नाक मुरडतील. तो दिवस दूर नाही कारण चार महिन्यापूर्वीचा 'मी' तूरडाळ खरेदी करताना आजच्या 'मी' ला "आमच्यावेळी असं नव्हतं" असे हळूच म्हणतो...

Wednesday, September 2, 2009

एक उनाड दिवस

आज पहिल्यांदा ऑफीसला दांडी मारुन घरी बसलो होतो... तशी उगाच दांडी नाही मारली. काल येताना भिजून आलो. रात्री बर्‍यापैकी थंडी पण होती. रात्री कधी कोणास ठाऊक पण जरा अंग दुखु लागले. सकाळी उठावेसे वाटत नव्हते. उगाचच किंचित अशक्त झालोय असे वाटून गेले. उठून पाणी अंगावर घ्यावे असे बिलकुल वाटत नव्हते. म्हटलं जाऊ दे.... आज आराम करू. तसही कालच टेस्टटीमने वेचून काढलेला संगणक प्रणालीतला एक मोठा सूर्याजी पिसाळ(Bug) ठेचून मारला होता. मग काय ह्या आठवड्याच्या स्टेटस रिपोर्टची सोय झाली होती. पडल्या पडल्या गेल्या वर्षी पाहिलेला अशोक सराफचा "एक उनाड दिवस" चित्रपट आठवला. त्यात म्हटल्याप्रमाणे आयुष्यात एक दिवस वेगळे जगून बघावे, आयुष्य पाच वर्षानी (की दिवसांनी???) वाढते म्हणे. म्हटले चला मारू दांडी... आयुष्य वाढो वा न वाढो आज जरा मज्जा करू. तसाच पडून जरा टी व्ही पहिला. मग आरामात उठून बाहेर जाऊन दूध, पाव, अंडी आणि बारीक-सारिक सामान घेऊन आलो. बाहेर अजूनही पावसाळी वातावरण आणि थंडी होतीच. मस्त ओम्लेट पाव आणि हळद टाकून ग्लासभर गरमा गरम दूध असा मस्त नाश्ता झाला. टाइम्स वाचून झाल्यावर आंतर जाला वर मटा आणि लोकसत्ताचे वाचन झाले. बुधवारचा Times Ascent पण चाळून झाला. साला अजुन मार्केटमध्ये अंबूजा सिमेंट (बोले तो जान) नाही आलेली. जोपर्यंत ईंन्फोसिसची चार थोबाडं पहिल्या किंवा शेवटच्या पानावर दिसत नाहीत तोपर्यंत मार्केट काही स्थिरस्तावर होत नाही. मग मराठी ब्लॉग वर चक्कर टाकली. गेले आठवडाभर तसं सवडीने काही वाचता आलं नव्हतं. आज मस्त निवांतपणे नवे जुने ब्लॉग वाचून काढले.
मग पुन्हा एकदा बल्लव अंगात संचारला आणि मटार भाताचा कूकर लावला. एकदाच दोन वेळा पुरेल इतकी सामुग्री कूकर मध्ये कोंबली. रात्रीच्या जेवणाचा ताप नको, अगदीच मूड आला तर कूळथाचे पीठले करू असा दूरदर्शी विचार त्यामागे होता. दुपारी पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकामधला भारत इंग्लंड सामन्याचे पुन: प्रक्षेपण सुरू होते. मटारभाताबरोबर युवराज सिंगच्या ६ चेंडुत ६ षटकारांची मेजवानी घडली. नंतर थोडी फार ताणून दिली. संध्याकाळ मात्र जरा बोरं गेली. इतर वीकेंड प्रमाणे कोणी गर्लफ्रेंड असती तर बरे झाले असते असे आजदेखील वाटून गेले. तरी बाहेर जरा फेर फटका मारुन आलोच. लहानपणी आजारपणाचे कारण सांगून शाळा चुकवली की दुपारी जेवणाच्या वेळी आणि संध्याकाळी शाळा सुटताना आपण कोणाला दिसणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी लागत असे. शाळा अगदी २ मिनिटांच्या अंतरावर होती. शाळेतली मुले आणि शिक्षक आमच्या घरावरूनच पुढे जात त्यामुळे त्यांना जाता येता आपण दृष्टीस पडू नये ही धडपड असायची. आत्ता मात्र ऑफीस जवळ असले तरी ही चिंता नाही. त्यामुळे मनमोकळेपणाने भटकता आले. आल्यावर पुन्हा टी व्ही. त्यात दुपारपासून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉपटर सकाळपासून गायब असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही ब्रेकिंग न्यूज़ जरा नवीन आणि हटके असल्यामुळे प्रत्येक न्यूज़ चॅनेलवाले वेगळ्या प्रकारे न्यूज़ कव्हर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. दुपारपर्यंत आंध्रप्रदेशपर्यंत सीमित असलेली बातमी संध्याकाळपर्यंत राष्ट्रीय बातमी होऊन गेलेली त्यामुळे जरा गांभीर्य वाढले होते. पुन्हा एकदा देशातील सुरक्षाव्यवस्था आणि तांत्रीक बाबतीतील प्रगती ह्यावर प्रश्नचिन्ह उभे राहीले. आजपर्यंत सामान्य माणूस भोगत होता पण आत्ता हे मुख्यमंत्र्यांच्या स्तराला पोहचले आहे. अजुन तरी काही तपास लागलेला नाही. त्यातल्या त्यात सत्तधारी पक्षाने ही विरोधी पक्षाची चाल आहे अशी वक्तवे केली नाहीत हे नशीब. असो ह्यावर एक वेगळी नोंद होईल.
बाकी सध्या श्रीलंका-न्यूझीलंड ट्वेंटी-ट्वेंटी सामना पाहतो आहे. रात्री पुन्हा ऑस्ट्रेलिया-इंग्लंड ट्वेंटी ट्वेंटी सामना होईलच. मधल्या वेळेत दुपारच्या मटारभाताचा समाचार घेऊन गादीवर टेकलो की कुठेही उनाडक्या न करता साजरा केलेल्या एका उनाड दिवसाची सांगता होईल.

ShareThis