Thursday, September 17, 2009

आमच्यावेळी बुवा असे नव्हते...

आमच्यावेळी बुवा असे नव्हते... साधारणपणे वडीलधारी माणसे नवीन पिढीबद्दल बोलू लागली की हे वाक्य हमखास येतेच असे म्हटले तर वावगे नाही ठरणार. मी स्व:तच्या बाबतीत पहिल्यांदा हे उदगार लहानपणी अभ्यास करताना ऐकले. घरी आईला गणिताबद्दल एखादी शंका किंवा गणित सोडवायची पद्धत विचारली की ती काही वेगळ्या पद्धतीने गणित सोडवून दाखवायची. शाळेत काही वेगळी पद्धत शिकवलेली असायची. नक्की कुठली गणिते ते आत्ता आठवत नाही. तसाहि माझा आणि गणिताचा ३६ चा आकडा. मग मी माझ्या पद्धतीने सोडवले की "आमच्या वेळी अशी पद्धत नव्हती" असे ऐकायला मिळायचे. कधी कधी अभ्यासक्रम बदलायचा. काही नवीन विषय असायचे. कधी कधी काही पाठ्यपुस्तकांमधले धडे बदलायाचे. मग ३-४ वर्षे मोठी असलेली भावंडे देखील "आमच्या वेळी असे नव्हते" असे बोलून उगाचचं आमच्यामध्ये ३-४ वर्षाची जनरेशन गॅप निर्माण करायचे.

माझे आई बाबा शाळेत होते तेंव्हा सातवी पास म्हणजे मॅट्रिक आणि सातवी पास झालेल्यानां सरकारी नोकरीसाठी ओढून नेत आणि आम्ही इंजिनियर झाल्यानंतर एक वर्ष काही मिळेल ते काम करत होतो. त्यावेळी निवृत्तीला आलेल्या समस्त जनतेचे "आमच्या वेळी असे नव्हते" असे उदगार पुन्हा एकदा ऐकू आले. हल्ली कोणी पळून जाऊन लग्न केले किंवा रजिस्टर लग्न केले तरी (मानपान हुकलेली) काही टाळकी "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून नाराजी व्यक्त करतात. माझे काका इंग्रजांच्या काळात पोलिस सेवेत होते. त्यावेळी सायबाच्या कडक शिस्तीत काम केलेले. कामासाठी मैलोन मैल चालत फिरलेले. ते हल्लीच्या पोलिसांचा फिटनेस आणि कारभार पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे बरेचदा म्हणत.

पुर्वी म्हणजे अगदी १९९५ पर्यंत म्हणा, मुंबईला असलेल्या काका आणि भावाची खुषालीची पत्रे यायची. आमच्याकडे तेंव्हा टेलिफोन ही नव्हता. तेंव्हा टेलिफोन हा ठराविक लोकांकडे किंवा पूर्ण गावात एक-दोन जाणांकडे असे. टेलिफोन म्हणजे चैनीची वस्तूचं होती. नंबर लावल्यानंतर घरी यायला काही वर्षे लागायची. पण आज गावी गेलो की कट्ट्यावर लोक आपापल्या मोबाइल वर रिंगटोन वाजवत नाहीतर गेम खेळत बसलेले असतात. मोबाइलच्याच बाबतीत बोलायचे झाले तर एके काळी ज्या उच्चभ्रू लोकांकडे मोबाइल होता ते इनकमिंगचे देखील पैसे मोजत होते. मोबाईल असणे म्हणजे एक स्टेटस होते. आज चिंधी-चोर, सोम्या-गोम्याकडे हायएण्ड मोबाइल पाहून एकेकाळचे उच्चभ्रू लोक "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून हळहळत असतील.

तसही हल्ली "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणायला दोन पिढ्यांचे अंतर किंवा वयाने फार मोठे असणे जरूरी राहीले नाही. हल्लीच्या झटपट (सबकुछ ट्वेंटी-ट्वेंटी) युगात जनरेशन-गॅप देखील झपाट्याने कमी झालीय. वीस वर्षात केवळ ५२ कसोटी सामने खेळणारे सर डॉन ब्रॅडमन आज वीस वर्षात सचिन तेंडुलकरला १५९ सामने खेळताना बघून "आमच्या वेळी असे नव्हते" असे नक्कीच म्हणाले असते. हेल्मेटशिवाय विंडिजच्या तोफखान्याचा सामना केलेले सुनील गावसकर आजच्या सुविधा पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणत असतील. कींबहुना कसोटी आणि एकदिवशीय सामने खेळून आज ट्वेंटी-ट्वेंटीचा थरार पाहता सचिन, गांगूली आणि द्रविड "आमच्या वेळी असे नव्हते" असे मनातल्या मनात म्हणत असतील. फार कशाला आम्ही जेंव्हा इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो तेंव्हा आम्हाला सेमिस्टरला ८ असे वर्षाला १६ विषय होते. पण आम्ही शेवटच्या वर्षाला गेलो आणि अभ्यासक्रम बदलला. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यावर्षी १६ ऐवजी १० विषय झाले. त्यावेळी आम्ही आयुष्यात पहिल्यांदा "आमच्या वेळी असे नव्हते" हा डायलॉग मारला होता.

हल्ली सगळं वह्या-पुस्तके, दप्तर, अभ्यासक्रम, मोबाइल(आमच्यावेळी खिशात फणी असायची तसा हल्लीच्या शाळकरी मुलांकडे मोबाइल असतो), फॅशन इतक्या भराभर बदलतं की २ वर्षाचं अंतर असणार्‍या भावंडामध्ये जनरेशन गॅप दिसते. जरा मोठं भावंड दुसर्‍याकडे पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणते. मी स्व:त देखील माझ्या लहानपणी आमच्या गावात जी मज्जा केली,
काजू-कैर्‍या-करवन्दं पाडून खाल्ल्या, दिवाळीत किल्ले बांधले, तासाला १ रुपया देऊन सायकल भाड्याने घेऊन शिकलो, समुद्र किनारी वाळूत किल्ले बांधले, कुर्ल्या पकडल्या अश्या एक ना अनेक उचापती केल्या, पण माझ्यापेक्षा फार फार तर १० वर्षानी लहान भावंडानी ह्यातील निम्म्या गोष्टीचा देखील आनंद लुटला नाही कारण मधल्या १० वर्षात गाव बदलला, घरी स्व:त ची सायकल आली, काजू-कैर्‍या पुर्वी सारख्या लागेना झाल्या, समुद्र किनार्‍यावर गर्दी वाढली. हल्ली तर तिथे कोणीतरी हॉटेल बांधतोय म्हणे. उद्या माझ्या मुलांना ह्यातील किती गोष्टी चित्रात दाखवून आमच्या वेळी असं होतं असे सांगावे लागेल कुणास ठाऊक? पण हे असेच सुरू राहाणार. जनरेशन गॅप एक दिवस दिवसावर येऊन ठेपेल आणि लोक "आमच्या वेळी" ऐवजी "काल" असे नव्हते म्हणून नाक मुरडतील. तो दिवस दूर नाही कारण चार महिन्यापूर्वीचा 'मी' तूरडाळ खरेदी करताना आजच्या 'मी' ला "आमच्यावेळी असं नव्हतं" असे हळूच म्हणतो...

2 comments:

  1. aamchya veli he blog-big ch fad navht re baba, aamhi kaagdaavarach lihat asu ... :)

    ReplyDelete
  2. हा हा अगदी खरंय!!! आमच्या वेळी पण असा नव्हता...

    ReplyDelete

ShareThis