Sunday, October 7, 2012

भाजीपाला

साधारण जूनचे पहिले दोन आठवडे चांगला पाऊस पडून गेला की बाबा उन्हाळ्यात सुकवून ठेवलेलं बी-बियाण बाहेर काढतात. त्यात फुले, फळे, भाजीपाला अश्या सगळ्या प्रकारचे बी असते. नातेवाईक मित्रमंडळीपासून ते आजुबाजूच्या शेतकर्‍यापर्यंत, असे सगळ्याकडून वर्षभर जमवून ठेवलेले. कुठे कुठला भाजीपाला पेरायचा, नवीन फूलझाडे आणि फळझाडे कुठे लावायची हे सगळे त्यांनी आधीच ठरवलेले असते. मग एकाद्या सुट्टीच्या दिवशी किंवा पावसाने जरा उघडीप दिली की हातात पारय (पहार) घेऊन पावसाने नरम झालेल्या मातीत मारायची आणि त्या खड्ड्यात एक-एक बी टाकायचे. पावसाळा सुरू होण्याआधीच पडवळ, दुधी-भोपळा, तोंडली, कारली अश्या भाज्यांसाठी मांडव तयार असतो. काकडी, चिबूड, भोपळ्याच्या वेली पसरण्यासाठी नीट उताराची जागा केलेली असते. भेंडा, वाली, वांगी, मिरच्या आणि पालेभाजीसाठी छोटे छोटे वाफे तयार करून ठेवलेले असतात. सुरुवातीच्या पावसामुळे त्या वाफ्यातील मातीत असलेले बीज म्हणजे गवत आणि तण आधीच उगवलेले असते. ते साफ करून टाकले की पुन्हा त्या मातीत रानगवत उगवण्याची शक्यता नसते. भाजीपाला लावायला वाफा तयार. अळूवडी आणि फतफत्याच्या भाजीसाठी सालाबादप्रमाणे ठरलेल्या जागी अळूदेखील उगवतो. शेवग्याचे झाड तर असतेच.

पडवळ

दुधी-भोपळा


अशी सगळी पेरणी झाली की मग महिनाभर फार काही काम नाही. फक्त बी रुजून आले की त्यावर लक्ष ठेवायचे. अधून-मधून रोपांच्या वाढीला जोम यावा म्हणून खताचा डोस द्यायचा तो देखील अगदी चिमुटभर. मुळाशी मुंग्या लागू नये म्हणून पावडर मारायची. पुरेसे पाणी मिळावे म्हणून मुळाशी नीट आळी करायची. पाऊस मध्येच गायब झाला तर ह्या वेलांनां आणि नव्या झाडानां पाणी घालायचे तसेच पावसाचा जोर जास्ती असेल तर पाण्याचा नीट निचरा होतो आहे की नाही त्याकडे लक्ष द्यायचे. नाहीतर खास करून भाज्यांच्या वेली अती पाण्याने कुसण्याची भीती असते. शेतीची कामे सुरू असताना विहिरीवर पाणी आणायला येणारे शेतकरीदेखील अधून-मधून पहाणी करून जातात. त्यांच्या डोळ्याला काही तण, गवत दिसले तर काढून टाकतात. पानाला किड दिसली तर पाने खुडून टाकतात.

चिबडाचे फूल

चिबूड

चिबूड

तयार चिबूड

श्रावणाची चाहूल लागली की नवीनच खेळ सुरू होतो. रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ त्या झाडे वेलींकडे बारकाईने पाहण्याचा. मग एखाद्या दिवशी भेंड्याच्या झाडाचा पानाचा देठ आणि झाडाच्या खोडामधून एक छोटीशी कळी दिसून येते. भोपळा, कारली, चिबूड, पडवळांचे वेलदेखील पांढर्‍या पिवळ्या फुलांनी डवरतात. भेंड्याचे एक बरे असते. एकदा कळी आली की हमखास भेंडा लागतो पण बाकीचे वेल मात्र असंख्य फुले देत असले तरी ठराविक फुलेच गळून जाण्यापुर्वी देठाशी फळ सोडून जातात. त्यामुळे ही फुले पूर्ण फुलली की प्रत्येक फुलाचा देठ बारकाईने पाहावा लागतो. त्याच्या देठाशी जर का बारीक मण्याएवढा फुगवठा दिसला की समजायचे ह्यातून फळ मिळणार. मग वेलाचा तो भाग लक्षात ठेवायचा, खास करून चिबूड, काकडी आणि भोपळ्याचा वेळ असेल तर कारण ते वेल जमिनीवर पसरलेले असतता. पडवळ, दुधी, कारली वैगरे मांडवावर असल्याने भाजी वाढीस लागली की हमखास दिसून येते पण चिबूड, काकडी, भोपळा जमिनीवर असल्याने ती फळे वजनाने खाली मातीला टेकतात. वेलाखाली लपून बसतात. ह्या वेलांची पाने देखील मोठी त्यामुळे चिबूड, भोपळा मोठा फोफावला तरी दिसून येत नाही. त्यामुळे ह्या वेलांवर नीट लक्ष ठेवावे लागते.

वाली

भेंडा

ही नवीन फळे शोधण्यात देखील गंमत असते. आम्ही शाळेत होतो तेंव्हा मज्जा असायची. फुलाला लागलेला भोपळा, चिबूड सगळ्यात आधी कुणी पाहिला? ज्याने पाहिला तो इतरांना सांगणार. भोपळ्याचा/चिबडाचा त्या वर्षीचा काउंट एकाने वाढणार. फळ पहिल्यांदा जो पाहील त्याच्याकडे त्या फळाची जबाबदारी आपोआप जाते मग तो भोपळा असो, काकडी असो वा पडवळ, कारली. ते फळ दिसल्यापासून ते घरात आणेपर्यंत मधल्या वेळात त्याची वाढ नीट होते आहे की नाही, जमिनीवर त्याला किड-मुंगी तर लागली नाही, पावसाने कुसत तर नाही वा उन्हाने करपत तर नाही अश्या बारीकसारिक कामांची जबाबदारी. भेंडे, वांगी, मिरच्या जून व्हायच्या आत वेळच्या वेळी काढायाच्या. काकड्या नीट कोवळ्या बघून घ्यायच्या... इत्यादी, इत्यादी.

मिरच्या
वांगी
अळू

भाज्या तयार झाल्या की मग मॅनेजमेंट. एक एक भाजी तयार झाली की घरच्या भाजीचे नवं करायचे. चिबूड, काकडी चवीने खायची. ह्या भाज्या एकदा पडायला (तयार व्हायला) लागल्या की मग नियमीत लक्ष ठेवून वेळच्या वेळी तोडून घरात आणायच्या. मग त्यात सख्या शेजार्‍याचा, नातेवाईकांचा वाटा करायचा. बीयाणे दिलेल्या शेतकर्‍याला आठवणीने भाजी पाठवायची. आत्येला, मावशीला, सासरी गेलेल्या ताईला त्यांच्या दारात स्वस्त भाजी मिळत असली तरी रिक्षाला जास्ती पैसे घालून आपल्या दारातील भाजी कौतुकाने त्यांच्याकडे पोचती करायची. बाजारात सगळ्या भाज्या मुबलक मिळत असल्या तरी गणपतीत ऋषिपंचमी दिवशी ऋषिच्या भाजीत परसात पिकवलेली प्रत्येक भाजी असेल अश्या रीतीने भाजी झाडावर शिल्लक ठेवायची. आणि महत्वाचे म्हणजे सगळ्या प्रकारातील एक-एक फळ तसेच झाडावर ठेवायचे. ते उन्हात पूर्ण सुकले की त्यातील बी काढून पुढच्या वर्षी रुजत घालण्यासाठी.

Tuesday, August 7, 2012

साला एक मच्छर...

नेहमीप्रमाणेच एक इश्यू आला आणि पाहता पाहता डोक्यावर बसला. कस्टमरचा डेटा Encrypt होत नव्हता म्हणजे आमच्या प्रॉडक्टचा मुख्य उद्देश धाब्यावर बसवला गेल्यामुळे आणि त्यात तो कस्टमर म्हणजे एक इंटरनॅशनल बॅंक असल्याने हा इश्यू अगदी मॅनेजर लोकांच्या पण बापांपर्यंत जाऊन पोहोचला होता. आमचे डेटा एनक्रीप्ट/डिक्रीप्ट करणारे प्रॉडक्ट म्हणजे आपल्या WinZip/UnZip सारखेच पण डेटाची सेक्यूरिटी हा मुख्य उद्देश आणि त्यात ते कस्टमरला विकले जात असल्याने जरा "लै भारी" प्रकारातले. प्रॉब्लेम असा होता की कस्टमरचा एनक्रीप्टेड डेटा USB पेन ड्राइव्ह लावून कॉपी करता येत होता. कुणीही ऐरा गैरा माणूस ती सगळी महत्वाची माहिती वाचू शकत होता. त्यात हा डेटा बॅंकेचा म्हणजे प्रश्न अधिकच नाजूक.

नेमका हा इश्यू शुक्रवारी मध्यरात्री रिपोर्ट केला गेल्यामुळे शनिवारी सकाळी सकाळी फोनाफोनी होऊन आमची सगळी टीम हाफिसात. दुपारपर्यंत सोल्यूशन मिळाले. टेस्टिंग टीममधील विभोरला टेस्ट सेटअप तयार करायाला सांगून मी बिल्ड सुरू केले. बिल्ड पूर्ण व्हायला तासभर तरी लागणार होता. ऐन विकांतात सकाळ पासून दगदग झाल्याने म्हणून मी जरा आरामातच खुर्चीत मागे रेलून मॉनिटरवर लक्ष ठेवून होतो. उगाच बिल्ड फेल झाले तर लगेच कळेल, त्यात आणखी वेळ जायला नको म्हणून. बिल्ड आणि स्टेटस रिपोर्टची वाट पाहाणारे अनेक जण होते त्यामुळे सगळे डिटेल्स भरायला सुरूवात केली. रिपोर्ट लिहीत असतानाच अचानक डाव्या हाताला काहीतरी टोचले. पहातो तर डास. मस्तपैकी रक्त शोषित बसला होता. वातानुकुलित वातावरणात मध्येच हा डास कुठून आला मला कळेना. रिपोर्ट पूर्ण करायची गडबड असल्याने मी फार विचार देखील करीत बसलो नाही. नुसताच हात झटकून त्याला पळवून लावला आणि यूनिट टेस्टमध्ये काय काय टेस्ट्स रन केल्या आहेत याची माहिती भरू लागलो..

त्या टेस्ट केसेस लिहिताना अचानका माझ्या लक्षात आले की जरी कस्टमरचा इश्यू फिक्‍स झाला असला तरी आत्ताच एका साध्या डासाने आपला कोड ब्रेक केला. आपले एनक्रीप्टेड रक्त आपले प्रॉडक्ट न वापरता डिक्रीप्ट करून एक डास शोषून गेला. आपले प्रॉडक्ट फेल गेले. इतकी साधी टेस्ट केस आपल्या लक्षात आली नाही. याचा अर्थ हा बग पूर्णपणे फिक्‍स झालेला नाही. जर हे बिल्ड पास करून आपण कस्टमरला दिले असते आणि हा इश्यू जर कस्टमरला पुन्हा सापडला असता तर काही खरे नव्हते. डायरेक्टर, व्हीपी आणि कुणी कुणी अश्या वरच्या लेवलच्या माणसापर्यंत आपली तक्रार गेली असती. आमच्या कंपनीमधील एक साधा डास तुमच्या इंजिनियरने लिहालेला प्रोग्रॅम ब्रेक करू शकतो अश्या शब्दात कस्टमरने टेक-सपोर्टला सुनावले असते आणि टेक-सपोर्टने असला भिकार फीडबॅक पार CEOच्या कानावर घातला असता. कंपनीचे शेअर्स धाडकन खाली पडले असते. आणि आपली तर पार नोकरीतून हाकलपट्टीच. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर साला एक मच्छर....

नुसत्या विचारानेच मला दरदरुन घाम फुटला. घशाला कोरड पडली. मी समोरच डेस्कवरची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली पण हे काय??? मला पाणी पिताच येत नव्हते. अरे देवा, अजुन एक इश्यू. आमच्याच कंपनीमध्ये एनक्रीप्ट केलेले पाणी मलाच डिक्रीप्ट करून पिता येत नव्हते. आमच्ये एनक्रीप्शन/डिक्रीप्शनचे अल्गोरिदम्स साध्या साध्या गोष्टीत फेल होत होते. ह्या इतक्या साध्या चिंधी टेस्ट केसेस आजवर कुणीच कश्या रन केल्या नाहीत? टेस्टिंग टीम काय माशा मारीत होती? टेस्ट प्लानचा रिव्ह्यू कुणी केला? एक ना अनेक. कुणा कुणाला मेल लिहु आणि कुणा कुणाची तक्रार करू असे झाले होते. इतक्यात विभोर माझ्या क्यूबमध्ये आला आणि म्हणाला "सेटअप रेडी हो गया है. बिल्ड रेडी हो जाएगा तो रिलीज नोटस् के साथ मेल भेज देना." मी त्याला म्हटले "अबे काहे का बिल्ड और काहे का रिलीज. इधर बडा गेम हो गया है. साला एक मच्छर अपना कोड ब्रेक कर गया. और उपर से पानी भी डिक्रीप्ट नही हो रहा है." हे ऐकून विभोर पण एकदम टरकून म्हणाला "अरे क्या बात कर राहा है?".



"अरे क्या बात कर राहा है? बिल्ड रेडी हुवा की नाही?" विभोर माझा खांदा धरून मला गदागदा हलवून विचारात होता? मी खडबडून जागा झालो आणि विभोरला म्हटले "दो बग और है. मेजर इश्यू हुवा है" विभोर म्हणाला "कौन से बग? मैने टेस्ट बिल्ड पर तो सारे टेस्ट केसेस रन कीये. सारे के सारे पास हो राहे है. तूने कौन से टेस्ट रन कीये? और तेरे को ईतना पसिना क्‍यू छूट रहा है बे? ले पानी पिले." असे म्हणून त्याने पाण्याची बाटली माझ्या हातात दिली. अरेच्च्या म्हणजे हे स्वप्न होते तर? ... असा विचार करीत करीत मी घाबरत घाबरत मी ती बाटली तोंडाला लावली तर पुन्हा तेच. मी ते एनक्रीप्ट केलेले पाणी पिऊ शकत नव्हतो. म्हणजे हे स्वप्न नक्कीच नव्हते. आमचे प्रॉडक्ट खरोखरीच ते पाणी डिक्रीप्ट करू शकत नव्हते. "देखा देखा. पानी डिक्रीप्ट नहीं हो रहा है रे" बाटली उलटी करून बाटलीकडे बोट दाखवून मी विभोरला म्हटले. विभोर पहिल्यापेक्षाही विचित्र नजरेने आणि त्रासिक चेहर्‍याने माझ्याकडे पहात म्हणाला "अबे ढक्कन, बोतल का ढक्कन तो खोल..."

अरेच्च्याsss... म्हणजे मी बाटलीचे बुच्च न काढताच ते 'सो कॉल्ड' एनक्रीप्टेड पाणी पिण्याचा प्रयत्न करीत होतो तर... मी पुन्हा शांतपणे सगळा विचार केला आणि सगळ्याचा उलगडा झाला. मला माझेच हसू आले. ती बिल्ड होताना खुर्चीत आरामात रेलून बसल्याने मला छोटीशी डुलकी लागली आणि ते भीतीदायक स्वप्न पडले होते. स्टेटस पाहिले तर बिल्ड रेडी झाले होते. विभोर अजुन ही वेड्यासारखाच माझ्याकडे पहात होता. त्याच्याकडे पाहून हा सगळा घटनाक्रम, स्वप्न आणि प्रॉडक्टमध्ये नसलेले बग हे सगळे समजावून त्याला अजुन गोंधळात टाकण्यापेक्षा मी त्याला म्हटले "अरे कोई नहीं. बिल्ड रेडी हो गया है. मैं अभी मेल भेज देता हूँ. तुम रिलीज टेस्टिंग शुरू कर दो."

विभोरला देखील मी काहीतरी बरळत होतो हे कळले म्हणून जाता जाता तोही बोलला .

"आप एक काम करो. एक बार यह बिल्ड आ जाए तो फिर आप एखाद हप्ते की छुट्टी लेके अपने गाँव हो आओ. वहाँ समंदर के एनक्रीप्टेड पानी में मछली पकड़ोगे नां तो सब ठीक हो जाएगा... :D "

=========================================================

Image Courtesy : Google Images

ता.क. - ही पोस्ट काम धंद्यावर आधारित असल्याने काही संदर्भाबाबतीत जरा जडावली आहे. त्यातून "आमी लैई भारी" वैगरे भासवण्याचा अजिब्बात उद्देश नाही. :-)

Sunday, June 3, 2012

कोंबडी-बोकड चषक


काय म्हणतावं मंडळी?

गंपूशेटनी मामाच्या हाटेलात शिरता शिरता जमलेल्या लोकांना प्रश्न टाकला.

रविवारी रात्री जेवण खाण आटोपून सगळे म्हणजे बाबू तोडणकर, गेंगण्या, मास्तर आणि दोन चार इरसाल टाळकी मामाच्या हाटेलात बसली होती.

मामा : काय गंपूशेट आज लै म्हणजे लैच दिवसांनी आलात. म्हयनाभर तरी थोबाड दिसला नव्हतो. खै कडमडलो होतास?

गेंगण्या : ओ मामा, खै कडमडलो होतो म्हणजे? अवो गंपूशेटचो क्रिकेट प्रेम तुम्हाक म्हायत नसा? IPL सुरु असताना असलो फर्मास मनोरंजन सोडून गंपूशेट तुमच्या हाटेलात कशाक येल?

बाबू तोडणकर : नाय तर काय? मनोरंजन ता मनोरंजन आणि वरतून छक्को-चौको पडलो की नाचणाऱ्या त्या बाया पण असतात. असो सगळो टायम पास सोडून हयसर काय तुझ्या हाटेलातली झापा बघूक येतंय गंपूशेट? खानाची टीम जिंकली त्याची पार्टी करून आज आठवडाभरान गंपूशेट आपल्या अड्ड्यावर आलो.

ए गप्प बसा कि जरा. काय IPL IPL लावलाव हाय? माज क्रिकेट आवडता पण म्हणून काय IPL म्हणजे क्रिकेट नव्हे बघीत बसायला. खानाला एक कचकचीत शिवी हासडून गंपूशेट तोंड वाकडा करीत बोलले.

काय तरी काय बोलताव गंपूशेट?

काय तरी काय म्हंजे? जल्ला पैशाचा बाजार ता. कोण कोणाबरोबर आणि कोण कोणाविरुद्ध खेळताय हे कळेल तर शप्पथ.

गंपूशेट येवढा होता मग कशाक IPL बघूक होतात? गेंगण्या आपला ताच खरा धरून बसलेलो.

मी खै IPL बघीत होतो? माज काय कामा नसात? डॉनच्या पार्टीत नाचून पैसे कमावणारी खानासारखी लोकां दादासारख्याला खेळाडूकं नाचवतात. दारू विकून कोट्याधीश झालेली माणसा सट्टा लावतात तसा खेळाडूवर पैसो लावतात. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणणारी लोका देवमाणसाकं पण मुठीत ठेवतंत. ह्यो खय्चो क्रिकेट? गंपूशेट करवादले.

खेळाडू विकत घेताल्यांनी म्हणून काय झाला? क्लब क्रिकेट ता. तिकडे असाच असता. आत्ता आपण नाय काय, कळीत नसला तरी अधनंमधनं ता इंग्लिश प्रिमिअर लीग म्हणजे खरोखुरो IPL बघाताव? तिकडे काय वेगळा असता? मामानं IPLची बाजू घेतालान.

हो. आणि आपल्या मोदीनं सुरु केलेले IPL पण त्या खऱ्याखुऱ्या IPL वरच आधारित आहे. मास्तरांनी अधिक माहिती पुरवली.

त्या फुटबॉल प्रिमिअर लीगबरोबर आपल्या IPLची तुलना करू नका मास्तर. त्याची बात वेगळीच असा.

कशी वेगळी बात. तिकडे पण खेळाडूचो लिलाव होता. तुका इंग्लिश चालते पण देशी नको? बाबू तोडणकरा आंगठा तोंडाजवळ नेत बोललो.

गेंगण्या : मेलो बेवडो आलो परत बाटली वर.

बाबू अरे इंग्लिश आणि देशीची कसली तुलना करतास? इंग्लिशचो स्टॅंडर्ड खै आणि देशीचो खै हे मी तुका सांगूक नको. गंपूशेटनी बाबूला झेपेल असा प्रश्न विचारालांनी.

ता बाकी बराबर बोललास. बाबू मनातल्या मनात कधी काळी ढोसलेल्या इंग्लिशची आठवण काढीत बोललो.

अस कसं गंपूशेट? अहो फक्त खेळ बदलला पण साचा तोच नां? तिकडे पण खेळाडू संघ बदलतात. जिथे जास्ती पैसे मिळतील त्या संघाबरोबर खेळतात. मास्तर आपल्या मुद्द्याला चिकटून.

हो मास्तर पण फरक आहेच ओ. आत्ता बघा तुम्ही जेम्स बॉंडचे पिक्चर बघाताव. आत्ता बॉंड हिरो म्हटल्यावर तो कैच्याकै कारनामे करतो. अगदी काय पण. ते सगला आपण लै भारी म्हणून कौतुकानं बघाताव कि नाय. होय कि नाय सांगा? गंपूशेटने आपला मुद्दा मांडण्यासाठी स्टार्ट घेतला.

हो हो.

पण तेच कारनामे आपलो देशी 'येजंट विनोद' करतो तेंव्हा ते इनोदी का वाटतात? गंपूशेटनी यॉर्कर टाकला.

अवो प्रत्येक गोष्टीचो एक स्टॅंडर्ड असता. बाबू अजूनही इंग्लिशच्या आठवणीतच रमला होता.

ता पण बराबर. बाबूच्या पाठोपाठ गेंगण्यानं गंपूशेटला पाठींबा दिलान.

गंपूशेटचा यॉर्कर ढेंगातून जावून आपल्या यष्ट्या उध्वस्त करून गेला आहे हे मास्तरांना कळून चुकले आणि अलीकडेच केबलवर लागलेला एजंट विनोद सिनेमा पाहून आपण चॅनेल बदलल्याचे झटकन आठवल्यामुळे मास्तरदेखील पुढे काही जास्ती बोलले नाहीत.

एव्हाना गंपूशेटनां आपली लाईन आणि लेंथ सापडली होती. ते फुल्ल फॉर्ममध्ये आले.

अवो तिकडे क्लब असले तरी त्यांनी खेळाचे नियम नाय बदलालांनी. फुटबॉल लीगमुळे मेन खेळाची मजा कधी कमी नाय झाली. फुटबॉल एक खेळ म्हणून आपल्या जागी अजून मोठोच असा. माडी-बिडी विकणारो कोण पण लुंगो-सुंगो पैशाच्या जोरावर तिकडे आंतरराष्ट्रीय खेळाडूकं कसा पण वागवीत नाय. मॅची संपल्या कि ते खेळाडू पण रेव्ह पार्टीत सापडीत नायत. आपली टीम जिंकली तर टीमचो मालक पैशाचो माज घेवन शिवीगाळ करीत, बिड्या फुकीत स्टेडीयमवर उंडारक्या नाय करीत. आधी मेजर राडे करून आणि मग चुक कबूल करून माफी मागण्याऐवजी "आमी मायनर, आमी मायनर" अश्या बोंबा मारीत फिरत नायत. गंपूशेट एकदम तावातावाने बोलले.

मामा : खरा असा रे गंपू.

गेंगण्या : पण हि एवढी फेमस खेळाडू लोकां. साला ह्या दिडदमडीच्या लोकांकडन अपमान कशाक करूक घेतंत? मी माझो लिलाव होवूक देणार नाय असो एक जण पण नाय बोललो. अगदी गेल्या वर्षी काळ्या कुत्र्यांन पण ह्यांका विचारल्यान नाय तरी हे परत पुढच्या वर्षी शोभा करून घेवक हजर.

बाबू तोडणकर : मंग नाय तर काय? सोताच सोताची लंगोटी अशी दुसऱ्याच्या हातात दिली कि दुसरा काय होणार? होती नव्हती ती इज्जत पण जाते.

गंपूशेट : काय नाय ओ साले पैशेवाल्यांचे नाय ते धंदे. अवो ह्या IPL आत्ता पाच वर्षापूर्वी आला. आमचो कोंबडी-बोकड चषक गेली कित्येक वर्ष सुरु असा. IPL पेक्षा भारी.

होय रे गंपू. आपलो कोंबडी-बोकड चषक म्हणजे लैच भारी. मामाचा दुजोरा.

क्काय? कोंबडी-बोकड चषक? हि काय नविन भानगड?

हि भानगड नाय मास्तर. कोंबडी-बोकड चषक म्हंजे क्रिकेटचीच स्पर्धा. आपल्याच गावात भरते. ती समुद्राजवल खलाशी लोकांची वस्ती हाय नां तिकडे भरते स्पर्धा. टेनिसबॉल क्रिकेट. मामान माहिती पुरवलानानं.

होय कि काय? कधी असते हि स्पर्धा.

गंपूशेट : मास्तर, फेब्रुवारी-मार्चमध्ये शिमग्याच्या आसपास तुम्ही वार्षिक परीक्षेचे पेपर छापायची तयारी करीत असता नां तेंव्हा शाळेतली बरीचशी पोरा शाळा चुकवन् समुद्राजवल सुकटा सुकिवतात नां त्या मैदानावर कोंबडी-बोकड चषक बघूक जमलेली असतात. काय समजलाव?

मास्तर : अरेच्चा. हे मला माहितीच नव्हते. हा काय प्रकार आहे?

मामा : अहो कोंबडी-बोकड चषक म्हणजे IPL सारखीच स्पर्धा. वीस-वीस ओवरची.

गेंगण्या : आणि हिची खासियत अशी कि नावाप्रमाणे कोंबडी आणि बोकड बक्षिस दिला जातो. म्हणजे विजेत्या टीमला अख्खो बोकड आणि उपविजेत्या टीमला कोंबड्या.

कोंबड्या म्हणजे ११ कोंबड्या. प्रत्येक प्लेअरला एक. बाबूनं अचूक माहिती दिलान.

मास्तर : हे भारीच आहे.

गंपूशेट : भारी आहेच ओ पण हि कोंबडी-बोकड चषक IPL पेक्षा पण भारी असते. कारण हिकडे एका टीमकडनं खेळणारा माणूस कायम त्याच टीमकडनं खेळताना दिसल. उगाच चार आठ आणे जास्ती मिळतंत म्हणून कोण टीम बदलणार नाय.

बाबू तोडणकर : कोणाची बिशाद हाय टीम बदलायची. आणि कोणी टीम बदललान तर लोकां टोमणे मारून मारून त्याचो जीना हराम नाय करतील?

मामा : अवो आणि IPLमध्ये कसो जास्ती छक्के मारल्यावर आणि लै भारी कॅच घेतली कि वेगळो अवार्ड असता तसा इथे पण वेगळो अवार्ड असता.

गेंगण्या : आणि ता पण प्रत्येक छक्या-चौक्याकं असता. काय असलं ओळख बघू मास्तर?

काय असते? मास्तर स्पर्धेचे स्वरूप ऐकून आधीच हबकले होते.

गेंगण्या : अवो प्रत्येक छक्या चौक्याकं आणि घेतलेल्या झेलाकं एक-एक कवाट बक्षिस मिळता.

गंपूशेट : कवाट म्हणजे काय ता मास्ताराक कळूचो नाय.

बाबू तोडणकर : मास्तर अवो कवाट म्हणजे अंडो. कोंबडीचो अंडो.

गंपूशेट : म्हणजे विचार करा. फायनल मारलाव तर मटणाची पार्टी!!!

गेंगण्या : आणि एकदा का टीम फायनलला गेली कि किमान कोंबडीची पार्टी नक्की. वरतून कवटा मिळतील ती वेगळीच.

आणि ह्या सगळ्याच्या जोडीला भन्नाट कोकणी कॉमेंट्री. यंव रे यंव. मास्तर अजूनही ह्या सगळ्याची कल्पनाच करीत होते.

मग काय म्हणतावं मास्तर? पुढच्या वर्षी IPL बघणार कि कोंबडी-बोकड चषक?

अर्थातच कोंबडी बोकड चषक. इति मास्तर...



Tuesday, January 17, 2012

उत्तरायण...


हुश्श्श्शsssssssss

गेले दोन महिने नाही नाही तब्बल साडेसात वर्षे ज्या दिवसाची वाट पहात होतो तो एकदाचा उजाडला. बंगलोरमध्ये आल्या दिवसापासूनच इथून परत पुण्याला कधी जाणार ह्याचाच विचार सुरु होता. बघता बघता साडेसात वर्षे गेली. शेवटी एकदा १५ नोव्हेंबरला, माझ्या आईच्या वाढदिवशी सगळे फायनल झाले आणि हातात ऑफर यायच्या आधीच तिला वाढदिवसाची भेट म्हणून पुणे परतीची खुष खबर दिली. अर्थात मधल्या काळात पुण्याला जायला मिळणार अश्या आशा खूप वेळा निर्माण झाल्या होत्या, पण जम्याच नही. पुण्याला यायला मिळावे म्हणून "मल्टी कलर सनफ्लॉवर प्रायव्हेट लिमिटेड" कंपनी पण जॉईन केली पण त्यांनी तर नुसत्या हुलकावण्या दिल्या. गेल्या वर्षी मार्चमध्ये तर पुण्याला प्रोजेक्ट मिळून देखील जाऊ दिले नाही. शेवटी जूनमध्ये एक वर्ष वाट पाहून "मल्टी कलर सनफ्लॉवरला" सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. सगळे जमून येईपर्यंत नोव्हेंबर उजाडलाच. हो नाही करीत करीत राजीनामा मंजूर झाला. तरी हलकट बॉस एवढा प्रोजेक्ट संपू दे (कधी ते माहीत नाही), मी स्वतः तुला पुण्यात प्रोजेक्ट मिळवून देतो, ते नाही तर निदान जानेवारी संपेपर्यंत थांब, निदान २६ जानेवारीचे झेंडा वंदन करून जा... एक ना दोन... कसला दीनवाणा चेहरा करून यायचा. लाईन चुकली बिचाऱ्याची. कुठल्याही सिग्नलवर नाव काढेल अशी (चेहऱ्याची) प्रोफाईल आहे. दीनवाणे प्रकार करून झाल्यावर अतिशय हीनवाणे प्रकार देखील झाले. असो त्यावर एक वेगळी पोस्ट लिहून मी पोस्टचा काऊंट वाढवेन :D. शेवटी हो ना करता करता मी दोन महिन्याचा कायदेशीर नोटीस पिरेड पूर्ण करून काल मोकळा झालो.


कितीही कंटाळलो असलो तरी आत्ता माझ्या आयुष्यातील एखादा कोपराच नाही तर चांगली मोठी खोलीच बंगलोरने व्यापली आहे. माझ्या आजच्या वयाचा विचार करता माझ्या जीवनातला चक्क एक चतुर्थांश भाग मी बंगलोरमध्ये काढलाय हे मला खरे वाटत नाही. (माझ्या वयाचा हिशोब करणे बंद करा, हि स्कॉलरशिपची बुद्धीमत्ता चाचणी नव्हे). मुन्नाभाई एम.बी.बी.एस. मधला सर्किटच्या तोंडी एक महान संवाद आहे "लाईफ में बहुत कुछ पहली बार होता है मामू"... तसेच काहीसे माझ्या आयुष्यातले बहुत कुछ पहली बारचे (तुमचा चार यारवाला बसायचा "बार" नव्हे) क्षण बंगलोरमध्ये आले. MNC कंपनीची पहिली ऑफर (आणि अर्थातच पहिला राजीनामा :D), पहिला विमान प्रवास, पहिला परदेश प्रवास. इंजिनीअरिंगमध्ये स्वतःची बाईक असण्याची पूर्ण झालेली इच्छा, दक्षिणेकडची भटकंती... एक ना अनेक गोष्टी. खादडीचे म्हणाल तर बंगलोरला येण्यापूर्वी दोन दशके मिळून न खाल्लेला भात बंगलोरमधल्या पहिल्या दोन वर्षात खावा लागला होता आणि हो दहीभात हा प्रकार देखील आयुष्यात पहिल्यांदा बंगलोर मध्येच खाल्ला. आत्ता मात्र आंध्रा रेस्टॉरंटमधला द्राक्ष, डाळिंबाचे दाणे टाकून मोहरीची फोडणी दिलेला दहीभात प्रचंड आवडतो. अस्मादिकांच्या पाक-कौशल्याला बहर देखील बंगलोरलाच आला. बाहेरच्या खाण्याला कंटाळून विकेंडला आमची पाककला पिठले, बटाट्याची भाजी अश्या गोष्टींपासून सुरु होवून थेट थालीपीठ, मासे, सी-फूड, बिर्याणी, चिकन, मटण, सुकटापर्यंत बहरली. चपाती बनवणे मात्र जमले नाही. दरवेळी नजर हटी, दुर्घटना घटी. पण इतर यशस्वी प्रयोग बरेच झाले. कधी पिझ्झ्यात टाकतात त्याप्रमाणे नाही नाही ते पदार्थ Toppings म्हणून ओम्लेटवर विराजमान झाले तर कधी पिठले शिजताना त्या बरोबर अंडीदेखील उकडली गेली (इंधन बचत). एकदा मसाला चायची हुक्की आली तेंव्हा नाना मसाले चहात टाकून पहिल्याच घोटात स्वतःचा आणि रूम पार्टनरचा घसा जाळण्याची घटना सोडता बाकी इतर सर्व प्रकार सामुदायिकरित्या पचवले गेले. बाकी बाहेर while(1) बोले तो अन लिमिटेड (भात) साऊथ इंडीयन मिल्स ह्या प्रकारात प्रथमच उकडलेल्या/शिजवलेल्या गाजर आणि बीटची भाजी देखील प्रथमच खाण्यात (आणि बंगलोरच्या उर्वरित मुक्कामात टाळण्यात) आली. आणि हो महत्वाचे राहिलेच... माझ्या ब्लॉगचा जन्मदेखील बंगलोरचाच.

तर मधल्या काळात खूप बरे वाईट अनुभव आले. वेगवेगळी माणसे भेटली. आत्ता ह्या क्षणाला खूप साऱ्या गोष्टी डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. नक्की काय लिहू ते कळत नाही. पोस्ट भरकटतेय... इलाज नाही. एअरपोर्टला न्यायला येणाऱ्या कॅबची वाट पहातोय. संध्याकाळी पुण्यात पोहोचेन. आत्ता यापुढे रत्नागिरीला जाण्यासाठी १८-१८ तासांचा प्रवास करावा लागणार नाही. दोन दोन बस बदलाव्या लागणार नाहीत. बायको तिला वाटेल तेंव्हा एकटी रत्नागिरीला जाऊ शकेल. रत्नागिरीहून निघताना दुपारचेच काय पण रात्रीदेखील पोटभर जेवून (पक्षी: मासे हाणून) निघता येईल. लॉंगविकेंड आला तर तडक घरी जाता येईल. प्रवासात ब्रेकफास्टला कांदापोहे, वडापाव, कांदाभजीदेखील मागवता येईल. बाकरवडी खाण्यासाठी पुण्याहून कुणी येतंय का याची वाट पहावी लागणार नाही. (दुपारी १ ते ४ मध्ये बाकर वाडी खावी वाटली तर मात्र इडलीच खायची तयारी ठेवली पाहिजे). ब्लॉगर मित्रमंडळी भेटतील. ट्रेकच्या अपलोडेड फोटोंमध्ये मी देखील असेन.

थोडक्यात काय तर थोड्याच वेळात घडणाऱ्या बंगलोर ते पुणे प्रवासामुळे, मकरसंक्रांतीनंतर दोन दिवसांनी का होईना, पण माझ्या आयुष्यातील दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होतेय...

Friday, December 30, 2011

मसाला चाय...

गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढलेला. रोज घरी येताना कुडकुडत यावे लागतेय. आज तर कहरच झाला. तामिळनाडूत 'थेन' वादळ येवून गेले आणि त्याचा परिणाम म्हणून इथे बंगलोरमध्ये अचानक पाऊस सुरु झाला. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडलो तर आधीच थंडी त्यात रिमझिम पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून पावसामुळे अडलेल्या ट्राफिकमधला गारवा. घरी पोहोचेपर्यंत साडेसात वाजून गेलेले. वाटेत पूर्ण भिजायला झाले होतेच आणि ट्राफिकमध्ये रांगून रांगून थोडीफार भूक पण लागलेली. रात्रीच्या जेवणाला फार वेळ नसल्याने त्याआधी काही गरमा गरम करून मिळेल याची आशा नव्हती. थंडीतून आल्याने चहा तर हवाच होता. त्यामुळे चहा आणि भूक या दोन्हीवर एकच उपाय होता मसाला चहा...

मसाला चहाची कृती एकदम सोप्पी...

साहित्य :- एक कप दूध, एक टी-स्पून चहा पूड, एक चमचा साखर, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची, असे काय काय मिळतील ते मसाल्याचे प्रकार आणि हो सगळ्यात शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फरसाण... तुमच्याकडे फरसाण नसेल तर घेवून या (गुजरात्याकडचे असेल तर अतिउत्तम) आणि जवळपास मिळत नसेल तर पुढे वाचू नका. निषेधाच्या फालतू प्रतिक्रिया स्वीकारल्या जाणार नाहीत.

कृती :- नेहमीप्रमाणे गॅसवर चहाच्या भांड्यात एक कप दूध, चहा पूड आणि साखर टाकून चहा बनवून घ्यावा. कुडकुडणार्‍या थंडीतून येवून तुम्ही हा चहा प्राशन करणार असल्याने उगाच माज दाखवण्यासाठी त्याला अमृततुल्य चहा असे संबोधावे. आत्ता मघाशी साहित्यामध्ये जमवलेले मसाले चहात टाकायचेच राहिले असे तुम्हांला आठवले असेल तर काळजी नसावी. त्या मसाल्याचे खरे काम चहा उकळल्यानंतरच आहे. तर उकळलेला अमृततुल्य चहा, ओट्यावर न सांडता, नीट कपात गाळून घ्यावा. एका छानश्या ट्रेमध्ये हा चहाचा कप आणि मघाचचे मसाले नीट मांडावे. ह्या सगळ्या साहित्याचा 'मसाला चहा' ह्या सदरात टाकण्यासाठी एक छानसा फोटो काढावा. झाले... मसाल्याचे काम संपले. आत्ता हा काढलेला मसाला म्हणजे लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची इत्यादी इत्यादी ज्या छोट्या छोट्या तोंडांच्या पिशव्यांमधून काढला असेल त्या छोट्या छोट्या पिशव्यांच्या छोट्या छोट्या तोंडातून पुन्हा भरून ठेवावा (हे लै वेळ काढू आणि कटकटीचे काम आहे, पण नाही केले तरी कटकट होईलच त्यामुळे कुठली कटकट जास्त सोईची हे तुमचे तुम्ही ठरवा. मी मुळातच व्यवस्थित आणि टापटीप असल्याने मी नेहमीच पहिला पर्याय स्वीकारतो)

तर आत्ता लागलेली सौम्य भूक आणि थंडी यावर उतारा म्हणून अमृततुल्य चहाचे मसाला चहामध्ये रूपांतर करायला घ्यावे. सगळ्यात आधी थंडीचा कडाका कमी व्हावा म्हणून दोन घोट चहा पिऊन घ्या. त्यामुळे थोडी हुशारी येईलच पण अजून एक फायदा म्हणजे मघाशी साहित्यात गोळा केलेला महत्वाचा पदार्थ म्हणजे फरसाण चहाच्या कपात टाकण्यासाठी थोडी जागा देखील होईल. आत्ता थोडीफार भूक लागलेली भूक भागेल आणि रात्रीचे जेवण होईपर्यंत तग धरता येईल अश्या हिशोबाने फरसाण चहात मिक्स करा.

चमच्याने ते फरसाण चहात नीट बुडवून घ्या आणि नीट फुंकर मारून चहा गार होण्याआधी चवीचवीने मिटक्या मारीत खावे. फरसाण खावून झाले की उरलेल्या चहावर छानसा मसालेदार तवंग आलेला दिसेल. अश्या प्रकारे तुम्ही बनवलेला अमृततुल्य चहा मसाला चहामध्ये परिवर्तीत होवून तुमच्या हातातील कपात अवतरलेला दिसेल.

Wednesday, November 23, 2011

एकशिपी

साहित्य :- एक शेर तसरे मुळे (एक शिपी), कांदा-सुके खोबरे वाटण १ वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा, लसूण पाकळ्या ३-४, लाल तिखट ३ चमचे, हळद १/४ चमचा, मीठ (चवीनुसार), गरम मसाला १/२ चमचा, कोथिंबीर (आवडीनुसार), फोडणीसाठी तेल.

कृती :- प्रथम मुळे धुवून घेऊन विळीवर उभे चिरून (दुभागून) घ्यावेत. शिपी चिरल्यावर त्यातून पांढरऱ्या रंगाचे पाणी (काट) येईल ते टाकून देवू नये.
त्याची एक शिपी काढून घ्यावी (शिपीच्या आतील मांस एकाच शिपीला आले पाहिजे. त्यासाठी शिपी कशी फिरवावी ते बरोबरच्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे). नीट केलेल्या शिप्या (काटसकट) एकत्र कराव्यात.



कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या चिरून टाकाव्यात, लालसर झाल्यानंतर त्यात कांदा-सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकावे आणि ते परतत राहावे.
परतून झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट क्रमाने टाकावे. हे सगळे मिश्रण (कढईला करपू न देता) व्यवस्थित शिजले की नीट केलेली एकशिपी त्यात टाकावी आणि त्यात प्रमाणानुसार पाणी घालावे. वरती झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे. आवडीनुसार गरम मसाला टाकून पुन्हा थोडे शिजू द्यावे. शेवटी कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे.


शिजण्यासाठी लागणारा वेळ :- १५-२० मिनिटे

ता.क. - चिरण्याआधी सुरुवातीलाच मुळे एकदा चांगले धुवून घ्यावेत. एक शिपी काढून झाल्यावर शिजायला टाकताना त्यात जे पाणी (काट) आले असेल व्यवस्थित गाळून शिजायला टाकावे नाहीतर शिपीचा कच (शिपीचे बारीक तुकडे) त्यात जाण्याची शक्यता असते.
'मोगरा फुलला २०११' च्या ई-दीपावली अंकात पूर्वप्रकाशित

Saturday, September 24, 2011

पैचान कौन? (भाग-१)

टीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.


आज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या "Over Qualified for job" असे ठणकावून सांगून आपल्या तोंडाला पाने का पुसतात हे त्याला अजून हि कळले नव्हते. आत्ता तो देखील "ह्यांना आपली कदर नाही, आपली कदर करणारा कुणीतरी भेटेल" अशी दरवेळी स्वतःची समजूत करून तो कंटाळला होता. पण आपल्याला पारखण्यात लोकं नक्की कुठे चुकतात हे मात्र त्याला कळत नव्हते.

तसा लहानपणापासूनच तो चिकित्सक होता. अर्थात चिकित्सकपणा त्याच्या रक्तातच होता. त्याचे नाव चिंतन ज्ञानसागर. त्यांचे खरे आडनाव तसे कुणालाच माहीत नव्हते. फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी कुणा राजा/बादशहाच्या दरबारी वेदशास्त्राच्या गाढ अभ्यासाने म्हणा, लेखणीच्या तलवारी चालवून किंवा देशोदेशीच्या विद्वानांना वाद-विवाद स्पर्धेत हरवून ज्ञानसागर हे आडनाव पदरात पाडून घेतले असावे आणि पुढच्या पिढीत सगळी पोरं बापाच्या वळणावर गेली असल्याने सहाजिकच आडनावाला साजेशी कामगिरी प्रत्येक पिढीच्या हस्ते घडली होती. घर-गृहस्थी, संसार ह्या इतर दुय्यम गोष्टीत घरातील स्त्रियांनी लक्ष घातल्यामुळे आजवर घराण्याचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु होते.या घराण्यातल्या कर्त्या पुरुषांनीदेखील आयुष्यभर अर्थार्जनापेक्षा कायम ज्ञानार्जनावरच भर दिला. पुस्तके, ज्ञान, शोधनिबंध यांच्या सदैव संपर्कात रहाता यावे म्हणून बहुतेकांनी शिक्षकी पेशा पत्कारला होता.

चिंतनच्या बाबतीत मात्र आपल्या मुलाने इतके ज्ञान मिळवलेच आहे तर त्याचा उपयोग अर्थाजनासाठी तरी करून घ्यावा असे त्याच्या आईचे ठोस मत होते. त्याने नोकरी धंद्यात यश मिळवून इतर मुलांप्रमाणे चार पैसे गाठीशी बांधावे, त्यातून ऐहिक सुखे अनुभवावी असे तिला वाटे. ती त्यासाठी कायम प्रयत्नात देखील असे. ह्याच कारणासाठी स्वतः फोन/SMS करून तिने मध्यंतरी लेकाला "कौन बनेगा करोडपती"मध्ये देखील पाठवले होते जेणेकरून तिथे करोड नाहीतर निदान काही लाख तरी पदरात पडतील आणि त्याला कामधंदा लागेपर्यंत तरी घरखर्चाचा प्रश्न सुटेल. पण चिंतनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायामधून बघून सांगणे म्हणजे आपल्या ज्ञानाचा अपमान वाटे. त्याच्या मते अशी पर्याय बघून उत्तर देणे म्हणजे परीक्षेत कॉपी करण्यासारखे होते. तरीदेखील घरून मारूनमुटकून KBCमध्ये भाग घेण्यासाठी पाठवलेला चिंतन पोहोचला मात्र "राज पिछले जन्म का"च्या सेट वर. त्याने KBCमध्ये महानायाकाची करंगळी धरून पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा सिक्स्थ-सेन्स, आर्टिफिशीअल् इंटेलिजंन्स वापरून स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावून पहाण्यात धन्यता मानली.

तर असा हा चिंतन ज्ञानसागर. आपले ते खरे करणारा. प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानाच्या आधारे पडताळून पहायला बघणारा. आज देखील एका फार मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देवून आलेला. आलेली संधी त्याच्यासाठी आणि त्याच्या भावी संशोधनासाठी फारच उपयोगी होती. ती मल्टी नॅशनल कंपनी सागरी संशोधनासाठी प्रसिध्द होती. चिंतननेदेखील लहानपणापासुनच पाणी आणि पाण्याखालचे जीवन यावर खूप अभ्यास केला होता. त्याचा हा अभ्यास देखील तसा अपघातानेच सुरु झाला होता. शाळेतून जाता येता वाटेत नदीतल्या पाण्यात दगड भिरकावणे हा सगळ्या मुलांचा चंद. पण नुसता दगड भिरकावून पुढे जायला चिंतन हा काही इतरांसारखा सामान्य मुलगा मुळीच नव्हता. पाण्यात दगड भिरकवल्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. पुढे सहाव्या की सातव्या इयत्तेच्या विज्ञान विषयात पाण्यात वस्तू टाकली की पाण्यावर उठणारे तरंग आणि त्यांची वारंवारता ह्यावर एक धडा होता. तिसरीत असला तरी चिंतनने दिवाळी आणि में महिन्याच्या सुट्टीत शेजारपाजारच्या घरात घुसून दहावीपर्यंतची सगळी पुस्तके चाळून काढली होतीत. जे मिळेल ते अधाश्यासारखे वाचणे हा वडिलोपार्जित गुण असल्याने इतक्या लहान वयातदेखील त्याला वाचायला पुस्तके पुरत नसत.

सहाजिकच दगड टाकल्यावर पाण्यावर उठणारे तरंग मोजण्याचा नविन चिंतनला लागला. पुढे कमी-अधिक आकारमानाचे दगड, मग दगडाऐवजी मातीचे ढेकूळ, लाकडाचा तुकडा, शाळेतल्या खडूचा तुकडा आणि नंतर निरनिराळ्या धातूचे तुकडे असे काय हाताला मिळेल ते पाण्यात टाकणे आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण नोंदवणे अशी सवयच त्याला लागून गेली. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि धातूच्या तुकड्यांची निरीक्षणे झाल्यावर या अकाली शास्त्रज्ञाने एकदा थेट बापाची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी घरून आणून पाण्यात फेकली आणि सोने या नविन धातूचे निरीक्षण नोंदवले. यथावकाश हि गोष्ट घरी समजली. बापाला अर्थातच काही फरक पडत नव्हता पण चिंतनाच्या आईने मात्र आकाश पाताळ एक केले. तेंव्हा ती अंगठी परत आणण्यासाठी चिंतनने पहिल्यांदा पाण्यात उडी मारली. पण पाण्यात शिरताच पाण्याखालचे जग पाहून चिंतन इतका हरखून गेला की अंगठी शोधण्याचे विसरूनच गेला. पूर्वी कधीही पाण्यात न पडलेला चिंतन केवळ "पोहायला शिका" या कधीतरी वाचलेल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हात पाय हलवून लगेचच पोहू लागला. त्यासाठी त्याला सुका नारळ वा टायर कमरेभोवती बांधून बिलकुल सराव करावा लागला नाही. अर्थात इतरांसाठी हे भारी प्रकरण असले तरी चिंतनला मात्र आपण पहिल्यांदाच पाण्यात पडलो आहोत आणि पोहू लागलो आहोत हे कळले देखील नाही. तो आपला सराईतपणे पोहत आपल्या समोर नव्यानेच उघडलेले जग आणि त्यातील जलचर न्याहाळण्यात मग्न होता.

तसंही त्याच्या हुशार आणि चिकित्सक स्वभावामुळे बरोबरची मुले त्याला कधीच आपल्या बरोबर सामावून घेत नसत. खरे तर मुलांची पण चूक नव्हती. ती सुद्धा सुरुवातीला चिंतनला बरोबर घेत असत. त्याचे वेगळेपण कळल्यावर त्याला एक हुशार मुलगा म्हणून मान देत असत. पण पुढे पुढे त्यांना चिंतनचा त्रास व्हायला लागला जेंव्हा एखादा प्रश्न किंवा शंका विचारल्यानंतर त्याचे उत्तर खूप खोलात जावून ऐकावे लागे. 'त' वरून तपेलं अश्या अपेक्षेने चिंतनला काही विचारावे तर तो तपेल्याबरोबर 'त' वरून ताट, तांब्या, तराजूपासून सुरुवात करे तो थेट 'ट' वरून टमरेल पर्यंत जाई. परीक्षेत देखील एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न चिंतनला जाचक वाटे. जिथे लोकं त्याच्या पासून पळायला बघत तिथे लोकांना चार गोष्टी जास्त कळल्या तर काय बिघडलं असा प्रश्न चिंतनला पडे. मुलांबरोबर खेळायला गेला तरी गणित/विज्ञान हे विषय त्याला खेळातल्या आनंदापेक्षा वेग, दिशा, वस्तुमान ह्या गोष्टींकडे पहायला लावीत. क्रिकेट खेळताना स्ट्रेट-ड्राईव्ह सरळ रेषेत, कव्हर-ड्राईव्ह ४५ अंशात तर स्क़्वेअर कट ९० अंशातच असला पाहिजे याबद्दल तो आग्रही असे. सहाजिकच चिंतनला खेळात घेण्याऐवजी घासू, पुस्तकी किडा, लाल्या अश्या अनेक उपाध्या बरोबर देवून पोरांनी त्याला वाळीत टाकले होते. ह्या अश्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे चिंतन बहुतेक वेळा एकटाच असायचा. त्यालाही बाहेरच्या जगाचा तसा कंटाळाच आलेला. तो रहात होता तिथे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्टया वा अन्य कुठल्याही प्रकारे आकलन करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच उरले नव्हते. त्यामुळे अपघाताने का होईना पाण्यात पडल्यानंतर आपोआपच त्याच्यासाठी अभ्यासाचे एक नविन दालन उघडले होते. त्याच्या बुद्धीला एक नविन खाद्य मिळाले होते. त्याकाळी डिस्कवरी, अनिमल प्लॅनेट अश्या वाहिन्या नसल्याने चिंतन हे सर्व पहिल्यांदाच पहात होता. त्या घटनेनंतर त्याचे आयुष्यच जलमय झाले. बरोबरची सामन्य मुले जेंव्हा सूर्यकिरणे पाण्यात शिरली की प्रकाश किरणांचा कोन बदलतो हे बालबुद्धीस किचकट विज्ञान लक्षात ठेवण्यासाठी डोकेफोड करीत होतीत तेंव्हा चिंतन मात्र जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून पाण्याखाली कसे रहाता येईल या प्रयत्नात असायचा.

क्रमशः

(पुढील भागात - चिंतन आणि अजून काही व्यक्तिरेखा टीव्हीवरच्या "पैचान कौन" या कार्यक्रमात...)

ShareThis