Monday, September 28, 2009

लतादीदीनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आज दसरा, साडेतीन मुहूर्ता पैकी एक त्याचप्रमाणे आज स्वररत्न भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस. दीदीनीं आज ८१ व्या वर्षात पाऊल टाकले. सहस्त्र पूर्णचंद दर्शनाचा प्रवास पुरा करत आलेल्या लतादीदीबद्दल मी काय बोलावे. नुकतीच CNN IBN वर त्यांची मुलाखत पहिली. त्यानी आपल्या लहानपणीच्या, गाण्यांच्या अशा अनेक आठवणी सांगितल्या.

दीदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तुमच्या कर्तुत्वाला सलाम!!!

Saturday, September 26, 2009

'व्हॉट्स युवर राशी'

काल रात्री आशुतोष गोवारीकरचा 'व्हॉट्स युवर राशी' पहिला. मी तसा चित्रपट वेडा नाही पण ठराविक दिग्दर्शक किंवा कलाकारांचे चित्रपट आवर्जून पाहतो. त्यातल्या त्यात आमिर खान, नाना पाटेकर, नसरुद्दीन शहा ह्या कलाकारांचे किंवा आशुतोष गोवारीकर, विशाल भारद्वाज अश्या दिग्दर्शकांचे चित्रपट शक्यतो सोडत नाही. तसं चांगला असेल तर राम गोपाल वर्माचा चित्रपट देखील पाहतो, पण आमिर खान, आशुतोष गोवारीकर अश्या लोकांचे चित्रपट शक्यतो पहिल्या दिवशी पाहतो. दुनियेचा review यायच्या आधी मी आपला रिस्क घेऊन मोकळा होतो. आमिर, आशुतोषने अजुन तरी कधी फार निराशा केली नाही. गेल्या वर्षी 'गजीनी' थेटरला जाऊन पहिला, त्यानंतर गेल्या महिन्यात 'कमिने' ला गेलो होतो. आत्ता काल 'व्हॉट्स युवर राशी' ला गेलो. असो हा झाला माझा थेटर भेटिचा Algorithm.

'व्हॉट्स युवर राशी' बद्दल बोलायचे झाले तर चित्रपट पाहण्यामागे आशुतोष गोवारीकर आणि प्रियांका चोप्रा ही दोन कारणे होती. हर्मन बवेजा हा रिस्क फॅक्टर होता. अपेक्षा भंग झाला की नाही हे मी अजूनही नक्की सांगू शकत नाही. मुलगी पहाणे हा बहुतेक सगळ्या लग्नाळू मुलांच्या आयुष्यातला अविभाजित घटक. (आमचे पण घोडा मैदान दूर नाही. आणि खाजगीत तुम्हाला म्हणून सांगतो मुलगी पहाणे म्हणजे काय हे जरा जवळून समजावून घेता येईल हे चित्रपट पाहण्या मागचे तिसरे कारण). अरेंज मॅरेज असो किंवा प्रेम विवाह, मुलगी पहाणे आलेच. तर असा एक नेहमीचा साधा सरळ विषय फक्त नवीन मांडणी. चित्रपट तसा हलका फुलका आणि विनोदी आहे. बारा राशीच्या बारा मुली प्रियांका चोप्राने छान उभ्या केल्या आहेत. प्रत्येकीचा लुक वेगळा. प्रियांकाची पहिलीच मेष राशी वाली एंट्री आणि त्या राशीचा लुक, मेक अप आणि अभिनय हा बाकी अकरा राषींच्या तुलनेत सरस. फुल्ल टाळ्या!!!
बाकी अकरा खास नाहीत असे नाही. प्रत्येक राशीचे वेगळेपण जपलेले आहे. चित्रपट संपल्यावर देखील प्रत्येक राशीची प्रियांका तिच्या लुक सकट आठवते ह्यातच सगळे आले. अरेंज मॅरेज आणि मुलगी पहाणे ह्या प्रकारमध्ये मुलींना काय काय प्रकारांना तोंड द्यावे लागते, कशा कशाला सामोरे जावे लागते अश्या पारंपारीक रूढी आशुतोष गोवारीकरने कधी विनोदी तर कधी गंभीर पद्धतीने अश्या छान हातालळ्या आहेत. हर्मन बवेजाचे पहिले दोन्ही फ्लॉप चित्रपट मी पाहिलेले नव्हते त्यामुळे तो किती बकवास अभिनेता आहे ह्याची मला तरी कल्पना नव्हती. 'व्हॉट्स युवर राशी'मध्ये तरी तो टोकाचा बकवास वाटला नाही. त्याने बर्‍यापैकी झेपवले आहे. त्याला पाहून हृतिक रोशन आठवतो हे मात्र नक्की. इनफॅक्ट काही वेळा मला इथे हृतिक रोशन असायला हवा होता असे वाटून गेले. रणबीर कपूर पण चालला असता. असो पण हर्मन मुळे चित्रपट असह्य होत नाही हे नक्की.
चित्रपट मध्यंतरापर्यंत मनाप्रमाणे आहे. खरा प्रॉब्लेम सुरू होतो तो गाण्यांमुळे. पहिली मेष रास सोडली तर उरलेल्या अकरा राशीच्या अकरा मुलींचे गाणे आहे. त्यामुळे नंतर नंतर थोडा तोच तोच पणा येतो. २-३ गाणी सोडली तर बाकीची झेपवत नाहीत. ह्यामुळे पूर्ण चित्रपटाची लांबी ४०-४५ मिनिटानी वाढली आणि शेवटी कधी एकदा योगेसला (हर्मनचं चित्रपटातलं गुजराती नाव) पोरगी भेटते आणि चित्रपट संपतो असे होते. सुरुवातीला आवडलेला चित्रपट शेवटी शेवटी आशुतोष गोवारीकरने लोकांसाठी बनवला नसून प्रत्येक मुलीला एक गाणे ह्या न्यायाने तडजोड न करता स्व:त साठी बनवला की काय असे वाटून गेले. हल्ली हिंदी चित्रपट देखील सव्वादोन-अडीज तासात संपतात त्यामुळे साडेतीन तास बसायची राजश्री वाल्यांनी लावलेली जनतेची सवय मोडली आहे. तसे आशुतोष गोवारीकरचेच 'लगान' आणि 'जोधा अकबर' पण साडेतीन तास चालले पण ते अकारण लांबलेले वाटले नाहीत. 'व्हॉट्स युवर राशी' मात्र लांबलेला जाणवतो.
तर गाववाल्यानू माका विचारलाव् तर साताट एक्स्ट्रा गाणी बघीत साडेतीन तास कळ काढलाव तर पिक्चर बघूक हरकत नाय . मनोरंजनाची ग्यारेंटी!!!

Thursday, September 17, 2009

आमच्यावेळी बुवा असे नव्हते...

आमच्यावेळी बुवा असे नव्हते... साधारणपणे वडीलधारी माणसे नवीन पिढीबद्दल बोलू लागली की हे वाक्य हमखास येतेच असे म्हटले तर वावगे नाही ठरणार. मी स्व:तच्या बाबतीत पहिल्यांदा हे उदगार लहानपणी अभ्यास करताना ऐकले. घरी आईला गणिताबद्दल एखादी शंका किंवा गणित सोडवायची पद्धत विचारली की ती काही वेगळ्या पद्धतीने गणित सोडवून दाखवायची. शाळेत काही वेगळी पद्धत शिकवलेली असायची. नक्की कुठली गणिते ते आत्ता आठवत नाही. तसाहि माझा आणि गणिताचा ३६ चा आकडा. मग मी माझ्या पद्धतीने सोडवले की "आमच्या वेळी अशी पद्धत नव्हती" असे ऐकायला मिळायचे. कधी कधी अभ्यासक्रम बदलायचा. काही नवीन विषय असायचे. कधी कधी काही पाठ्यपुस्तकांमधले धडे बदलायाचे. मग ३-४ वर्षे मोठी असलेली भावंडे देखील "आमच्या वेळी असे नव्हते" असे बोलून उगाचचं आमच्यामध्ये ३-४ वर्षाची जनरेशन गॅप निर्माण करायचे.

माझे आई बाबा शाळेत होते तेंव्हा सातवी पास म्हणजे मॅट्रिक आणि सातवी पास झालेल्यानां सरकारी नोकरीसाठी ओढून नेत आणि आम्ही इंजिनियर झाल्यानंतर एक वर्ष काही मिळेल ते काम करत होतो. त्यावेळी निवृत्तीला आलेल्या समस्त जनतेचे "आमच्या वेळी असे नव्हते" असे उदगार पुन्हा एकदा ऐकू आले. हल्ली कोणी पळून जाऊन लग्न केले किंवा रजिस्टर लग्न केले तरी (मानपान हुकलेली) काही टाळकी "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून नाराजी व्यक्त करतात. माझे काका इंग्रजांच्या काळात पोलिस सेवेत होते. त्यावेळी सायबाच्या कडक शिस्तीत काम केलेले. कामासाठी मैलोन मैल चालत फिरलेले. ते हल्लीच्या पोलिसांचा फिटनेस आणि कारभार पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे बरेचदा म्हणत.

पुर्वी म्हणजे अगदी १९९५ पर्यंत म्हणा, मुंबईला असलेल्या काका आणि भावाची खुषालीची पत्रे यायची. आमच्याकडे तेंव्हा टेलिफोन ही नव्हता. तेंव्हा टेलिफोन हा ठराविक लोकांकडे किंवा पूर्ण गावात एक-दोन जाणांकडे असे. टेलिफोन म्हणजे चैनीची वस्तूचं होती. नंबर लावल्यानंतर घरी यायला काही वर्षे लागायची. पण आज गावी गेलो की कट्ट्यावर लोक आपापल्या मोबाइल वर रिंगटोन वाजवत नाहीतर गेम खेळत बसलेले असतात. मोबाइलच्याच बाबतीत बोलायचे झाले तर एके काळी ज्या उच्चभ्रू लोकांकडे मोबाइल होता ते इनकमिंगचे देखील पैसे मोजत होते. मोबाईल असणे म्हणजे एक स्टेटस होते. आज चिंधी-चोर, सोम्या-गोम्याकडे हायएण्ड मोबाइल पाहून एकेकाळचे उच्चभ्रू लोक "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून हळहळत असतील.

तसही हल्ली "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणायला दोन पिढ्यांचे अंतर किंवा वयाने फार मोठे असणे जरूरी राहीले नाही. हल्लीच्या झटपट (सबकुछ ट्वेंटी-ट्वेंटी) युगात जनरेशन-गॅप देखील झपाट्याने कमी झालीय. वीस वर्षात केवळ ५२ कसोटी सामने खेळणारे सर डॉन ब्रॅडमन आज वीस वर्षात सचिन तेंडुलकरला १५९ सामने खेळताना बघून "आमच्या वेळी असे नव्हते" असे नक्कीच म्हणाले असते. हेल्मेटशिवाय विंडिजच्या तोफखान्याचा सामना केलेले सुनील गावसकर आजच्या सुविधा पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणत असतील. कींबहुना कसोटी आणि एकदिवशीय सामने खेळून आज ट्वेंटी-ट्वेंटीचा थरार पाहता सचिन, गांगूली आणि द्रविड "आमच्या वेळी असे नव्हते" असे मनातल्या मनात म्हणत असतील. फार कशाला आम्ही जेंव्हा इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो तेंव्हा आम्हाला सेमिस्टरला ८ असे वर्षाला १६ विषय होते. पण आम्ही शेवटच्या वर्षाला गेलो आणि अभ्यासक्रम बदलला. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यावर्षी १६ ऐवजी १० विषय झाले. त्यावेळी आम्ही आयुष्यात पहिल्यांदा "आमच्या वेळी असे नव्हते" हा डायलॉग मारला होता.

हल्ली सगळं वह्या-पुस्तके, दप्तर, अभ्यासक्रम, मोबाइल(आमच्यावेळी खिशात फणी असायची तसा हल्लीच्या शाळकरी मुलांकडे मोबाइल असतो), फॅशन इतक्या भराभर बदलतं की २ वर्षाचं अंतर असणार्‍या भावंडामध्ये जनरेशन गॅप दिसते. जरा मोठं भावंड दुसर्‍याकडे पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणते. मी स्व:त देखील माझ्या लहानपणी आमच्या गावात जी मज्जा केली,
काजू-कैर्‍या-करवन्दं पाडून खाल्ल्या, दिवाळीत किल्ले बांधले, तासाला १ रुपया देऊन सायकल भाड्याने घेऊन शिकलो, समुद्र किनारी वाळूत किल्ले बांधले, कुर्ल्या पकडल्या अश्या एक ना अनेक उचापती केल्या, पण माझ्यापेक्षा फार फार तर १० वर्षानी लहान भावंडानी ह्यातील निम्म्या गोष्टीचा देखील आनंद लुटला नाही कारण मधल्या १० वर्षात गाव बदलला, घरी स्व:त ची सायकल आली, काजू-कैर्‍या पुर्वी सारख्या लागेना झाल्या, समुद्र किनार्‍यावर गर्दी वाढली. हल्ली तर तिथे कोणीतरी हॉटेल बांधतोय म्हणे. उद्या माझ्या मुलांना ह्यातील किती गोष्टी चित्रात दाखवून आमच्या वेळी असं होतं असे सांगावे लागेल कुणास ठाऊक? पण हे असेच सुरू राहाणार. जनरेशन गॅप एक दिवस दिवसावर येऊन ठेपेल आणि लोक "आमच्या वेळी" ऐवजी "काल" असे नव्हते म्हणून नाक मुरडतील. तो दिवस दूर नाही कारण चार महिन्यापूर्वीचा 'मी' तूरडाळ खरेदी करताना आजच्या 'मी' ला "आमच्यावेळी असं नव्हतं" असे हळूच म्हणतो...

Wednesday, September 2, 2009

एक उनाड दिवस

आज पहिल्यांदा ऑफीसला दांडी मारुन घरी बसलो होतो... तशी उगाच दांडी नाही मारली. काल येताना भिजून आलो. रात्री बर्‍यापैकी थंडी पण होती. रात्री कधी कोणास ठाऊक पण जरा अंग दुखु लागले. सकाळी उठावेसे वाटत नव्हते. उगाचच किंचित अशक्त झालोय असे वाटून गेले. उठून पाणी अंगावर घ्यावे असे बिलकुल वाटत नव्हते. म्हटलं जाऊ दे.... आज आराम करू. तसही कालच टेस्टटीमने वेचून काढलेला संगणक प्रणालीतला एक मोठा सूर्याजी पिसाळ(Bug) ठेचून मारला होता. मग काय ह्या आठवड्याच्या स्टेटस रिपोर्टची सोय झाली होती. पडल्या पडल्या गेल्या वर्षी पाहिलेला अशोक सराफचा "एक उनाड दिवस" चित्रपट आठवला. त्यात म्हटल्याप्रमाणे आयुष्यात एक दिवस वेगळे जगून बघावे, आयुष्य पाच वर्षानी (की दिवसांनी???) वाढते म्हणे. म्हटले चला मारू दांडी... आयुष्य वाढो वा न वाढो आज जरा मज्जा करू. तसाच पडून जरा टी व्ही पहिला. मग आरामात उठून बाहेर जाऊन दूध, पाव, अंडी आणि बारीक-सारिक सामान घेऊन आलो. बाहेर अजूनही पावसाळी वातावरण आणि थंडी होतीच. मस्त ओम्लेट पाव आणि हळद टाकून ग्लासभर गरमा गरम दूध असा मस्त नाश्ता झाला. टाइम्स वाचून झाल्यावर आंतर जाला वर मटा आणि लोकसत्ताचे वाचन झाले. बुधवारचा Times Ascent पण चाळून झाला. साला अजुन मार्केटमध्ये अंबूजा सिमेंट (बोले तो जान) नाही आलेली. जोपर्यंत ईंन्फोसिसची चार थोबाडं पहिल्या किंवा शेवटच्या पानावर दिसत नाहीत तोपर्यंत मार्केट काही स्थिरस्तावर होत नाही. मग मराठी ब्लॉग वर चक्कर टाकली. गेले आठवडाभर तसं सवडीने काही वाचता आलं नव्हतं. आज मस्त निवांतपणे नवे जुने ब्लॉग वाचून काढले.
मग पुन्हा एकदा बल्लव अंगात संचारला आणि मटार भाताचा कूकर लावला. एकदाच दोन वेळा पुरेल इतकी सामुग्री कूकर मध्ये कोंबली. रात्रीच्या जेवणाचा ताप नको, अगदीच मूड आला तर कूळथाचे पीठले करू असा दूरदर्शी विचार त्यामागे होता. दुपारी पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकामधला भारत इंग्लंड सामन्याचे पुन: प्रक्षेपण सुरू होते. मटारभाताबरोबर युवराज सिंगच्या ६ चेंडुत ६ षटकारांची मेजवानी घडली. नंतर थोडी फार ताणून दिली. संध्याकाळ मात्र जरा बोरं गेली. इतर वीकेंड प्रमाणे कोणी गर्लफ्रेंड असती तर बरे झाले असते असे आजदेखील वाटून गेले. तरी बाहेर जरा फेर फटका मारुन आलोच. लहानपणी आजारपणाचे कारण सांगून शाळा चुकवली की दुपारी जेवणाच्या वेळी आणि संध्याकाळी शाळा सुटताना आपण कोणाला दिसणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी लागत असे. शाळा अगदी २ मिनिटांच्या अंतरावर होती. शाळेतली मुले आणि शिक्षक आमच्या घरावरूनच पुढे जात त्यामुळे त्यांना जाता येता आपण दृष्टीस पडू नये ही धडपड असायची. आत्ता मात्र ऑफीस जवळ असले तरी ही चिंता नाही. त्यामुळे मनमोकळेपणाने भटकता आले. आल्यावर पुन्हा टी व्ही. त्यात दुपारपासून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉपटर सकाळपासून गायब असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही ब्रेकिंग न्यूज़ जरा नवीन आणि हटके असल्यामुळे प्रत्येक न्यूज़ चॅनेलवाले वेगळ्या प्रकारे न्यूज़ कव्हर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. दुपारपर्यंत आंध्रप्रदेशपर्यंत सीमित असलेली बातमी संध्याकाळपर्यंत राष्ट्रीय बातमी होऊन गेलेली त्यामुळे जरा गांभीर्य वाढले होते. पुन्हा एकदा देशातील सुरक्षाव्यवस्था आणि तांत्रीक बाबतीतील प्रगती ह्यावर प्रश्नचिन्ह उभे राहीले. आजपर्यंत सामान्य माणूस भोगत होता पण आत्ता हे मुख्यमंत्र्यांच्या स्तराला पोहचले आहे. अजुन तरी काही तपास लागलेला नाही. त्यातल्या त्यात सत्तधारी पक्षाने ही विरोधी पक्षाची चाल आहे अशी वक्तवे केली नाहीत हे नशीब. असो ह्यावर एक वेगळी नोंद होईल.
बाकी सध्या श्रीलंका-न्यूझीलंड ट्वेंटी-ट्वेंटी सामना पाहतो आहे. रात्री पुन्हा ऑस्ट्रेलिया-इंग्लंड ट्वेंटी ट्वेंटी सामना होईलच. मधल्या वेळेत दुपारच्या मटारभाताचा समाचार घेऊन गादीवर टेकलो की कुठेही उनाडक्या न करता साजरा केलेल्या एका उनाड दिवसाची सांगता होईल.

Wednesday, August 26, 2009

बाल्या डान्स, जाकडी नृत्य आणि हरीनाम सप्ताह

गणेशोस्तव आला की आठवतात त्या आरत्या, बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य. बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य ही नावं बर्‍याच लोकांना नवीन असतील. कोकणातील नामशेष होत जाणार्‍या संस्कृती आणि कलांपैकी ही दोन नावे. कोकणात हा प्रकार अजूनही काही गावात प्रचलित आहे. ह्यात जण ढोलकी घेऊन बसतात आणि काही लोकं ह्यांच्याभोवती फेर धरून नाचतात. नाचणार्‍यांच्या एका पायात घूंगरू बांधलेले असतात. जसं जसा नाच पुढे सरकत जातो तसं तसा नाचण्याचा आणि फेर धरण्याचा वेग वाढत जातो. मज्जा येते पाहायला. नाचताना उडत्या चालीची गाणी (पारंपरिक गाणी, हिंदी नव्हे) म्हणतात. हल्ली हे कलाकार फार नाही राहीले. पोटापाण्यासाठी बरेच लोकं मुंबईची वाट धरतात आणि गावाची नाळ हळू हळू तुटत जाते. कलियुगात दुष्काळ, भ्रष्टाचार आणि स्वाइन फ्लू अशा अवकळा लवकर पसरतात पण ह्या सगळ्यात बाल्या डान्स आणि जाकडी अश्या कला कधी नष्ट होऊन जातात हे कळत देखील नाही.

गणेशोस्तवा आधी श्रावण महिन्यात गावातल्या देवळात हरीनाम सप्ताह असायचे. श्रावण महिन्यात देवधर्माचे जास्त कार्यक्रम असण्याचे अजुनएक कारण म्हणजे पुर्वी पावसाळा वेळेवर सुरू व्हायचा. मग जून-जुलै मध्ये शेतीची कामे संपली की लोक रिकामेच असायचे दसर्‍यापर्यंत. मग त्यात श्रावण महिन्यात गावातल्या देवळात सप्ताह बसायचे. ह्यात गावातल्या वाड्या (आळी) सहभागी व्हायच्या. प्रत्येक वाडीला ३तास याप्रमाणे दिवसाच्या २४ तासाचे विभाजन व्हायचे. असा पूर्ण आठवडा मंदिरात अहोरात्र हरीनामाचा गाजर चालत असे. सप्ताह दरम्यान अभक्ष्य भक्षण आणि प्राशन बंद असे. पूर्ण सप्ताह गावातल्या बेवड्याची तोंडे बघण्यासारखी होतं असत. भजनात पण मज्जा येई. तीन तास भजन म्हणजे नाही म्हटल तरी लांबायाचेच. मग आधून मधून लोकांमध्ये जान आणण्यासाठी "जंजिरा पाण्यामध्ये किल्ला, शिवाजी आत कसा शिरला", "यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, कान्हा वाजावतो बासरी" अशी "जोश" भजने म्हटली जात. यासाठी खास टाळ आणि घंटानाद केला जाई. अधून मधून भजन म्हणणारा एखाद्या ओळी वर जरा जास्त रमला किंवा काही कीडा करून आपली गायकी दाखवू लागला की जमलेल्या कोरसमधून "वा बुवाsss" अशी शाल जोडीतील दाद येत असे. दाद देणार्‍याला वयाची मर्यादा नव्हती. २री ३री तले शेंबडे मूल देखील ही दाद देऊ शकत होते. फक्त खार्‍या हवेतील खोचकपणा अंगात हवा मग झाले. आम्ही देखील जमेल तशी शाळेला दांडी मारुन देवळात जात असु.आमच्यासाठी खास आकर्षण म्हणजे विणेकरी. देवळात गाभार्‍यासमोर लोक दोन रांगा करून भजन म्हणत उभी असतात. गाभार्‍याकडे तोंड करून तबला-पेटीवाले उभे रहातात. त्यांच्या आजूबाजूला भजन म्हणणारे. ह्या सगळ्यांच्या मधोमध एक जण वीणा घेऊन मागे पुढे फिरत असे. दर्शनाला येणारे सर्वजण विणेची देखील पूजा करतात, विणेकार्‍याला नमस्कार करतात. विणेकरी होण्यासाठी आम्हा मुलांची जोरदार शर्यत असे. लोक आपल्याला एवढा मान देतात, आपल्याला नमस्कार करतात हे म्हणजे आम्हाला काहीतरी आड्स (आड्स म्हणजे अचाट, सही, फंडू इत्यादी इत्यादी...) वाटे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे शाळेतले गुरुजी, बाई, हेडमास्तर हे देखील देवळात आल्यावर विद्यार्थ्यासमोर झुकत असत. आज हे सगळं आठवलं की हसू येतं, पण आजच जीवन पहिलं की वाटत यार आपण लहानपणीचं भरभरून जगलो. आत्ता बस्स श्वास सुरू आहे. सगळं कसं यांत्रीक आणि साचे बद्ध होऊन गेलय.

Sunday, August 23, 2009

औसी की तैसी

आपला तर बुवा बरेच दिवसांनी मस्त वीकेंड साजरा झाला... कांगारूंची औसी की तैसी करून इंग्लंडने मानाची अॅशेस पटकावली. गेले काही दिवस आपण जेव्हा गणपतीबाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गूंतलो होतो तेव्हा इंग्रज कांगारूंच्या विसर्जानाची तयारी करत होते. गेली काही वर्षे घरघर लागलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला आज पुन्हा एकदा तडाखा बसला. क्रिकेटवर जवळपास दोन दशकं अधिराज्य गाजवल्यानंतर त्यांना असा काही माज आला होता की बास रे बास. स्टीव वॉ ने सुरू केलेली हुकुमत पॉंटिंगने पुढे चालू ठेवली होती. अर्थात ज्या टीम मध्ये ग्लेन मॅकग्राथ, गिलख्रिस्त, शेन वॉर्न, लॅंगर असे खेळाडू आहेत ती टीम कुठेही जिंकेल ह्यात काही वाद नव्हता. पण जसजसे हे सगळे दिग्गज हळूहळू निवृत्त झाले तसतशी ऑस्ट्रेलियन साम्राज्याला उतरती कळा लागली. त्यातच बरेचसे ऑस्ट्रेलियन खेळाडू माजले होते. उद्धटपणा आणि गुर्मी मैदानाबाहेर आणि मैदानात ही दिसू लागली होती. सगळ्यात पहिल्यांदा सौरव गांगूलीच्या संघाने त्यांना जमिनीवर आणले होते. त्यानंतर सुद्धा भारतीय संघाने जेव्हा जेव्हा कांगारूंशी सामना केला तेव्हा त्यांना जेरिला आणले होते. ह्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेने त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर पाणी पाजले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये कांगारू पहिल्याच फेरीत झाले होते. हरभजनने माकड नाही म्हटले तरी सायमंड्सने "आधीच सायमंड्स त्यात दारू प्यायला" ही म्हण खरी करून दाखवली.

आत्ता देखील अॅशेस मालिकेसाठी कांगारूंनी इंग्लंडमध्ये पाऊल ठेवताच प्रथेप्रमाणे इंग्लंडच्या खेळाडूवर काही ना काही शेरेबाजी सुरू केलीच होती. खरं तर मालिकेच्या सुरुवातीला इंग्लंड चा संघ मालिका जिंकू शकेल असे मला तरी वाटले न व्हते मालिका सोडाच पण एखादा सामना देखील जिंकेल की नाही ह्या बद्दल शंकाच होती. मायकेल वॉसारखा अनुभवी खेळाडूने निवृत्ती घेतलेली. फ्लिन्टॉपदेखील दुखापतीनी बेजार. त्यात पहिल्या सामन्यानंतर केविन पीटरसन मालिकेबाहेर पडलेला. अश्या एक ना अनेक कटकटी असून देखील इंग्लंडने दुसरा सामना जिंकला. तिसरा सामना कांगारूंसाठी मायकल क्लार्कने वाचवला. चौथ्या सामन्यात कांगारूंनी इंग्लंडचा साफ चोथा करून टाकलेला. चौथ्या सामन्यात कांगारूनी ज्या रीतीने पुनरागमन केले ते पाहून शेवटच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने सामना वाचवून मालिका बरोबरीत सोडावली तरी खूप झाले असे वाटत होते. पण इंग्लिश खेळाडूनी ही विश्वचषक किंवा IPLपेक्षा अॅशेस जास्त मोलाची असा निर्धार करून पण आज मालिका २-१ अशी काबीज करून कांगारूंचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले. संपूर्ण मालिकेत हेडन, लॅंगर, गिलख्रिस्तशिवाय ऑस्ट्रेलियन फलंदाजी आणि ग्लेन मॅकग्राथ, शेन वॉर्न, ब्रेट लीशिवाय गोलंदाजी अगदीच मिळमिळीत दिसली. एखाद दुसर्‍या सामन्यात जॉनसन, मायकल क्लार्क आणि सायमन कॅटीच सोडले तर कुणीही प्रभाव पाडू शकला नाही. इंग्लंडने २००५ प्रमाणेच पुन्हा एकदा गेलेली अॅशेस परत मिळवलीच पण कांगारूना अनेक वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच चौथ्या क्रमांकावर नेऊन बसवले. त्याचबरोबर २००५ची अॅशेस गाजवणारा अँड्रू फ्लिन्टॉप देखील सन्मानने कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झाला. Bravo...

ह्या सगळ्यात रिकी पॉंटिंगचे थोबाड बघण्यासारखे होते. गेली काही वर्षे जी काही गुर्मी आणि माज घेऊन तो वावरत होता तो आज पूर्णपणे उतरलेला दिसला. बरेचदा सचिन, लारा अश्या खेळाडूंशी तुलना करताना २ वेळा विश्वचषक उचलणारा पॉंटिंग वरचढ ठरतो. एक फलंदाज म्हणून पॉंटिंग नक्कीच श्रेष्ठ आहे पण स्टीव वॉनंतर तो आजवर कप्तान म्हणून जो काही नावरूपाला आला तो केवळ ग्लेन मॅकग्राथ, गिलख्रिस्त, शेन वॉर्न, लॅंगर असे खेळाडू दिमतीला होते म्हणूनचं. मला स्व:तला तर ऑस्ट्रेलिया हरली पण त्याचबरोबर ती पॉंटिंगच्या नेतृत्वाखालीखाली इंग्लंडमध्ये सलग दुसर्‍यादा हरली ह्याचा जास्त आनंद आहे. आत्ता सगळ्यात मज्जा येणार आहे ती पुढील काही दिवसात. पंटर आणि कंपनीवर ऑस्ट्रेलियन निवड समिती, माजी खेळाडू आणि मुख्य म्हणजे प्रसार माध्यमं उभी-आडवी चढतील. बहुतेक पॉंटिंगचे कर्णधारपद देखील जाईल. Ashes संपली आणि आत्ता पाळी आहे पंटर आणि कंपनीच्या ASS'es ची. काय मंडळी??? खरा की नाय???

Thursday, August 20, 2009

आमदार दुष्काळग्रस्तांना देणार चक्क २० टक्के पगार ???

पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी गेल्या आठवड्यात, पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या पगारातील २० टक्के रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी द्यावी असा आदेश दिला. आत्ता २० टक्के म्हटल्यावर आपल्यालाही वाटेल की बाबा काही समाधानकारक रक्कम जमा होईल. पण आत्ताच महाराष्ट्र टाइम्स मध्येखालील बातमी वाचली.

"पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी गेल्या आठवड्यात, पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या पगारातील २० टक्के रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी द्यावी असा आदेश दिला. याचे स्वागत महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी करायला हरकत नाही. कारण त्यांना पगार मिळतो अवघा २००० रूपये. यापैकी २० टक्के म्हणजे ४०० रूपये देण्यास त्यांची काहीच हरकत नसणार. इतक्या कमी पगारात आमदारांचे कसे काय भागत असणार असा प्रश्ान् सामान्य मतदाराच्या मनात आला असणार. यावर आमदाराला मिळणारे भत्ते ही पगारापेक्षा कितीतरी अधिक असतात. उदाहरणच द्याचे झाले तर, टपाल खर्चासाठी महिना ७५०० रूपये, वाहन भत्ता २५,००० रूपये, टेलिफोन भत्ता दरमहा ८००० रुपये, इतर भत्ते १५०० रूपये आणि पीएचा पगार ८००० रूपये आमदाराला मिळतात. याखेरीज, अधिवेशनाला आणि सभागृहाच्या समितीच्या बैठकीला उपस्थित राहील्यास दरदिवसाला पाचशे रूपये इतका भत्ता दिला जातो.
हे सर्व भत्ते करमुक्त असतात आणि मिळणारे २००० रूपये मासिक वेतन आयकराच्या जाळयात येत नाही." (संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स)

सर्वसामान्य माणसाला कसं उल्लू बनवला जातं ह्याच अजुन एक उदाहरण. लगे रहो... कारण ह्या बातमीने देखील काहीच फरक पडणार नाही. उलट हा ४०० रुपयाचा निधी अजुन एखादा भत्ता निर्माण करून वसूल केला जाईल. जय हो!!!

ShareThis