Tuesday, August 11, 2009

अजुन एक स्वातंत्र्यदिन...

आज १५ ऑगस्ट... अजुन एक स्वातंत्र्यदिन. सालाबादप्रमाणे आज आपला सगळ्यांचा देशाभिमान जागृत होणार. काल परवापासून सिग्नलला मिळणार्‍या झेंड्याची खरेदी झाली असेलच. मी शाळेत असताना कागदी झेंडे मिळायचे पण हल्ली प्लास्टिकचे मिळतात. दुसर्‍या नाहीतर तिसर्‍या दिवशी जनतेचा देशाभिमान फूटपाथ, रस्ता आणि कचर्‍याकुंड्या अश्या ठिकाणी दिसू लागतो. देशाभिमान टिको ना टिको पण हे झेंडे जास्त टिकतात. आणि मग एक दिवस इतर प्लास्टिकच्या कचर्‍याबरोबर सगळे समुद्रात जाते. पुढच्या पावसाळ्यात एखाद्या वादळी दिवशी समुद्र हा सगळा आहेर तुम्हाला परत देतो. (यंदा मुंबई मध्ये आलेल्या अजस्त्र लाटांनी साडे सहा लाख टनाचा प्लास्टिकचा कचरा साभार परत केला).

हे झाले झेंड्या बाबत. मग देशभक्तिपर चित्रपट पहिल्या शिवाय स्वातंत्र्यदिन पूर्ण होणे शक्यच नाही. तसं ही हा पूर्ण आठवडाच "आजादी का जश्न" म्हणून बहुतेक वाहिन्यानी गाजवला असेलच पण खास स्वातंत्र्यदिना निमित्त राखीव म्हणून बॉर्डर, भगत सिंग, क्रांतीवीर, रंग दे बसंती असा बर्‍यापैकी देश भक्ति उफाळुन आणणारा चित्रपट ठेवलेला असतोच. यंदाचे खास आकर्षण "A Curious Case of" स्लमडॉग मिलेनीयर आहे.

त्याचप्रमाणे यंदा आपल्याकडे श्रियुत कसाब खास पाहुणे म्हणून आहेतच. त्यांच्याबरोबरीने मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी नुकतेच फाशी जाहीर झालेले तिघं देखील एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकतात. बरं फाशीचा दुसरा अर्थ भारतात जन्मठेप असा आहे. कारण फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार हा अतिशय उत्तम आरोग्यदायी आयुष्य भोगून नैसर्गिक रित्या मरतो. उत्तम उदाहरण म्हणजे अत्यंत क्रूरपणे लहान मुलांच्या हत्या केलेली अंजनाबाई तुरुंगात शांतपणे मेली. तिकडे अफजल गुरू फाशीची वाट बघत बसलाय आणि नुकतेच गेल्या आठवड्यात मुंबई बॉम्बस्फोटातील तिघांना वेटिंग लिस्ट टाकलाय. हे लोक एवढे माजले आणि निर्ढावले आहेत की ह्यांना जेवणात मासे-मटण हवे. तो कसाब म्हणे शाकाहारी जेवणाचे ताट फेकून देतो. हे सगळं वाचून अशी काही सणकते की काही विचारू नका. आपले सैनिक, पोलिस जिवावर उदार होऊन लढतात, आपले प्राण गमावतात आणि आपला कायदा कसाब सारख्याला वर्षानुवर्षे खटला चालवत, त्याला हवे नको ते बघत पुढच्या हल्ल्याची वाट बघत राहतो. बॉम्बस्फोट होऊन गेले की पुन्हा सगळा सिनेमाची स्क्रिप्ट लिहाल्यासारखे. तेच तेच Dialoges, आलटून पालटून त्याच त्याच जिहादी संघटनांचे जबाबदारी स्वीकारल्याचे कबुलीजवाब, आपल्या हिजड्या राजकारण्याची घटना स्थळाला भेट आणि "हे खपवून घेतले जाणार नाही, चोख प्रत्तुत्तर दिले जाईल" अशी (ही धमकी बर का) दरवेळची टेप. जखमीना ५० हजार आणि मेलेल्याना ५ लाख. मिळतात की नाही कोणास ठाऊक. ते स्वत: जखमी झाल्याशिवाय कळणार नाही. मेलो तर कळण्याचा प्रश्नच नाही म्हणा. मला तर डाउट आहे की जस सरकारी घर योजना मंत्रीसंत्री लोकांच्या नातेवाईका ना मिळतात तसे हे पैसे पण हेच लोक "आम्ही मेलो" असे दाखवून खात असतील. ह्या साल्यानी सामान्य माणसाचे जीवन स्वस्त आणि जगणे महाग करून ठेवले आहे.

वपु काळ्यांचे एक पुस्तक आहे "आपण सारे अर्जुन". जरूर वाचावे असे पुस्तक आहे. त्यात वपुनी म्हटले आहे "पेपरात रोज भ्रष्टाचार, खून दरोडे आणि इतर मनस्ताप देणार्‍या बातम्या वाचून प्रत्येक घरात, प्रत्येक मनात एक ठिणगी पडते आणि विझून जाते. ज्या दिवशी ह्या ठिणग्या घरात न विझता बाहेर येतील तेंव्हा सगळ्या वाईट प्रवृती, राजकारणी जाळूनच पुन्हा घरात जातील." पण दुर्दैवाने ह्या ठिणग्या कधीच एकत्र येत नाहीत. आणि येणार तरी कश्या? सरकारने व्यवस्थाच अशी करून ठेवली आहे की प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूसुद्धा दररोज धावपळ करून अक्षरशहा जमवव्या लागतात. मग ते दूध असो किंवा स्वयंपाकाचा गॅस, भाजी असो वा पेट्रोल. कधी त्यात भेसळ तर कधी वाहतूकीच्या संपामुळे तूटवडा. ह्या सगळ्यात सामन्या माणसाला इतका गुरफटवून टाकलेला आहे की त्याला समाजात सोडाच घरात पण घरात पण पुरेसे लक्ष्य द्यायला वेळ मिळत नाही. बिचारा बॉम्बस्फोट झाले तरी दोनवेळच्या जेवणासाठी पुन्हा कामावर हजर होतो. तीच गर्दी, तीच धावपळ. बॉम्बस्फोटातून वाचला तर आज वाचलो म्हणून दुसर्‍या दिवशी पुन्हा संध्याकाळी सुखरूप घरी येण्याची आशा धरून पोटासाठी बाहेर पडतो. नाही पडला तर संध्याकाळी काय खायचे हा प्रश्ना आहेच. ह्याला "मुंबई स्पिरिट" म्हणून खपवले जाते. प्रत्येक जण दररोज रात्री दत्ताजी शिंदे असल्याप्रमाणे "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणून झोपी जातो.


स्वतंत्र दिनाकडे एक सुट्टी म्हणून पहिले जाते. यंदा तर १५ ऑगस्ट शनिवारी आला आणि त्यामुळे सुट्टी किंवा संभावीत Long Weekend फुकट गेला असा सूर जास्त होता. चालायचेच. अर्थात ह्यात आपण सगळेच येतो. कुणालाही दोष देण्याआधी आपण किती जबादारीने वागतो ह्याचा विचार केला पाहिजे. मी स्वत: देखील बर्‍याच गोष्टी चुकीच्या आहेत हे माहीत असून देखील दुनिया करते म्हणून करतच असतो. चौकट मोडायची हिंमत नाही. पण दुसर्‍याने मात्र बरोबर वागावे ही अपेक्षा. ह्या सगळ्या मुळे वेनस्डे आणि डोंबिवली फास्ट सारखे चित्रपट मनाला भावतात. आपण कुठेतरी स्वत:ला पडद्यावर पाहत असतो. असो तर. लिहाण्यासारखे खूप आहे पण मी असाच उगाच भरकटत जाईन. लिहायला काही वेगळेच बसलेलो आणि उतरलं काही भलतचं. विषय कुठून कुठे गेला. त्यामुळे बराचसं विस्कळित आहे...

चला तर, गाववाल्यानू तुम्हा सगळ्यांका स्वातंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा... भारत खराखुरा स्वतंत्र होवो, आणि त्यासाठी आपला खारीचा तरी वाटा असो ही मनोकामना...

3 comments:

  1. मित्रा अशाच भावना कागदावर व्यक्त करत राहा. पाहु कमीत कमी हे वाचून काही ठिणग्या आगीचे रूप घेतात का ते

    ReplyDelete
  2. वपुंनी म्हटल्या प्रमाणेच या ठिणग्या घरातच विझतात. अन्यथा भारतात हल्ली जे चाललय ते झालच नसत.
    या ठिणग्या पेटल्यावर त्या पेटतच रहातील हे बघायला हव अन्यथा हे चोर राजकारणी एक दिवस भारताला विकून कुठे तरी पळून जातील आणि आपण येथे ठिणग्यांची वाट बघत बसु.
    तुम्ही लिहीता छान असेच लिहीत रहा. बघुया काही ठिणग्या पेटवता आल्यातर.

    ReplyDelete
  3. Photographer Pappu, HAREKRISHNAJI आणि Green Planet प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!

    सिद्धार्थ

    ReplyDelete

ShareThis