Friday, December 30, 2011

मसाला चाय...

गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढलेला. रोज घरी येताना कुडकुडत यावे लागतेय. आज तर कहरच झाला. तामिळनाडूत 'थेन' वादळ येवून गेले आणि त्याचा परिणाम म्हणून इथे बंगलोरमध्ये अचानक पाऊस सुरु झाला. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडलो तर आधीच थंडी त्यात रिमझिम पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून पावसामुळे अडलेल्या ट्राफिकमधला गारवा. घरी पोहोचेपर्यंत साडेसात वाजून गेलेले. वाटेत पूर्ण भिजायला झाले होतेच आणि ट्राफिकमध्ये रांगून रांगून थोडीफार भूक पण लागलेली. रात्रीच्या जेवणाला फार वेळ नसल्याने त्याआधी काही गरमा गरम करून मिळेल याची आशा नव्हती. थंडीतून आल्याने चहा तर हवाच होता. त्यामुळे चहा आणि भूक या दोन्हीवर एकच उपाय होता मसाला चहा...

मसाला चहाची कृती एकदम सोप्पी...

साहित्य :- एक कप दूध, एक टी-स्पून चहा पूड, एक चमचा साखर, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची, असे काय काय मिळतील ते मसाल्याचे प्रकार आणि हो सगळ्यात शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फरसाण... तुमच्याकडे फरसाण नसेल तर घेवून या (गुजरात्याकडचे असेल तर अतिउत्तम) आणि जवळपास मिळत नसेल तर पुढे वाचू नका. निषेधाच्या फालतू प्रतिक्रिया स्वीकारल्या जाणार नाहीत.

कृती :- नेहमीप्रमाणे गॅसवर चहाच्या भांड्यात एक कप दूध, चहा पूड आणि साखर टाकून चहा बनवून घ्यावा. कुडकुडणार्‍या थंडीतून येवून तुम्ही हा चहा प्राशन करणार असल्याने उगाच माज दाखवण्यासाठी त्याला अमृततुल्य चहा असे संबोधावे. आत्ता मघाशी साहित्यामध्ये जमवलेले मसाले चहात टाकायचेच राहिले असे तुम्हांला आठवले असेल तर काळजी नसावी. त्या मसाल्याचे खरे काम चहा उकळल्यानंतरच आहे. तर उकळलेला अमृततुल्य चहा, ओट्यावर न सांडता, नीट कपात गाळून घ्यावा. एका छानश्या ट्रेमध्ये हा चहाचा कप आणि मघाचचे मसाले नीट मांडावे. ह्या सगळ्या साहित्याचा 'मसाला चहा' ह्या सदरात टाकण्यासाठी एक छानसा फोटो काढावा. झाले... मसाल्याचे काम संपले. आत्ता हा काढलेला मसाला म्हणजे लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची इत्यादी इत्यादी ज्या छोट्या छोट्या तोंडांच्या पिशव्यांमधून काढला असेल त्या छोट्या छोट्या पिशव्यांच्या छोट्या छोट्या तोंडातून पुन्हा भरून ठेवावा (हे लै वेळ काढू आणि कटकटीचे काम आहे, पण नाही केले तरी कटकट होईलच त्यामुळे कुठली कटकट जास्त सोईची हे तुमचे तुम्ही ठरवा. मी मुळातच व्यवस्थित आणि टापटीप असल्याने मी नेहमीच पहिला पर्याय स्वीकारतो)

तर आत्ता लागलेली सौम्य भूक आणि थंडी यावर उतारा म्हणून अमृततुल्य चहाचे मसाला चहामध्ये रूपांतर करायला घ्यावे. सगळ्यात आधी थंडीचा कडाका कमी व्हावा म्हणून दोन घोट चहा पिऊन घ्या. त्यामुळे थोडी हुशारी येईलच पण अजून एक फायदा म्हणजे मघाशी साहित्यात गोळा केलेला महत्वाचा पदार्थ म्हणजे फरसाण चहाच्या कपात टाकण्यासाठी थोडी जागा देखील होईल. आत्ता थोडीफार भूक लागलेली भूक भागेल आणि रात्रीचे जेवण होईपर्यंत तग धरता येईल अश्या हिशोबाने फरसाण चहात मिक्स करा.

चमच्याने ते फरसाण चहात नीट बुडवून घ्या आणि नीट फुंकर मारून चहा गार होण्याआधी चवीचवीने मिटक्या मारीत खावे. फरसाण खावून झाले की उरलेल्या चहावर छानसा मसालेदार तवंग आलेला दिसेल. अश्या प्रकारे तुम्ही बनवलेला अमृततुल्य चहा मसाला चहामध्ये परिवर्तीत होवून तुमच्या हातातील कपात अवतरलेला दिसेल.

Wednesday, November 23, 2011

एकशिपी

साहित्य :- एक शेर तसरे मुळे (एक शिपी), कांदा-सुके खोबरे वाटण १ वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा, लसूण पाकळ्या ३-४, लाल तिखट ३ चमचे, हळद १/४ चमचा, मीठ (चवीनुसार), गरम मसाला १/२ चमचा, कोथिंबीर (आवडीनुसार), फोडणीसाठी तेल.

कृती :- प्रथम मुळे धुवून घेऊन विळीवर उभे चिरून (दुभागून) घ्यावेत. शिपी चिरल्यावर त्यातून पांढरऱ्या रंगाचे पाणी (काट) येईल ते टाकून देवू नये.
त्याची एक शिपी काढून घ्यावी (शिपीच्या आतील मांस एकाच शिपीला आले पाहिजे. त्यासाठी शिपी कशी फिरवावी ते बरोबरच्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे). नीट केलेल्या शिप्या (काटसकट) एकत्र कराव्यात.



कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या चिरून टाकाव्यात, लालसर झाल्यानंतर त्यात कांदा-सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकावे आणि ते परतत राहावे.
परतून झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट क्रमाने टाकावे. हे सगळे मिश्रण (कढईला करपू न देता) व्यवस्थित शिजले की नीट केलेली एकशिपी त्यात टाकावी आणि त्यात प्रमाणानुसार पाणी घालावे. वरती झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे. आवडीनुसार गरम मसाला टाकून पुन्हा थोडे शिजू द्यावे. शेवटी कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे.


शिजण्यासाठी लागणारा वेळ :- १५-२० मिनिटे

ता.क. - चिरण्याआधी सुरुवातीलाच मुळे एकदा चांगले धुवून घ्यावेत. एक शिपी काढून झाल्यावर शिजायला टाकताना त्यात जे पाणी (काट) आले असेल व्यवस्थित गाळून शिजायला टाकावे नाहीतर शिपीचा कच (शिपीचे बारीक तुकडे) त्यात जाण्याची शक्यता असते.
'मोगरा फुलला २०११' च्या ई-दीपावली अंकात पूर्वप्रकाशित

Saturday, September 24, 2011

पैचान कौन? (भाग-१)

टीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.


आज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या "Over Qualified for job" असे ठणकावून सांगून आपल्या तोंडाला पाने का पुसतात हे त्याला अजून हि कळले नव्हते. आत्ता तो देखील "ह्यांना आपली कदर नाही, आपली कदर करणारा कुणीतरी भेटेल" अशी दरवेळी स्वतःची समजूत करून तो कंटाळला होता. पण आपल्याला पारखण्यात लोकं नक्की कुठे चुकतात हे मात्र त्याला कळत नव्हते.

तसा लहानपणापासूनच तो चिकित्सक होता. अर्थात चिकित्सकपणा त्याच्या रक्तातच होता. त्याचे नाव चिंतन ज्ञानसागर. त्यांचे खरे आडनाव तसे कुणालाच माहीत नव्हते. फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी कुणा राजा/बादशहाच्या दरबारी वेदशास्त्राच्या गाढ अभ्यासाने म्हणा, लेखणीच्या तलवारी चालवून किंवा देशोदेशीच्या विद्वानांना वाद-विवाद स्पर्धेत हरवून ज्ञानसागर हे आडनाव पदरात पाडून घेतले असावे आणि पुढच्या पिढीत सगळी पोरं बापाच्या वळणावर गेली असल्याने सहाजिकच आडनावाला साजेशी कामगिरी प्रत्येक पिढीच्या हस्ते घडली होती. घर-गृहस्थी, संसार ह्या इतर दुय्यम गोष्टीत घरातील स्त्रियांनी लक्ष घातल्यामुळे आजवर घराण्याचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु होते.या घराण्यातल्या कर्त्या पुरुषांनीदेखील आयुष्यभर अर्थार्जनापेक्षा कायम ज्ञानार्जनावरच भर दिला. पुस्तके, ज्ञान, शोधनिबंध यांच्या सदैव संपर्कात रहाता यावे म्हणून बहुतेकांनी शिक्षकी पेशा पत्कारला होता.

चिंतनच्या बाबतीत मात्र आपल्या मुलाने इतके ज्ञान मिळवलेच आहे तर त्याचा उपयोग अर्थाजनासाठी तरी करून घ्यावा असे त्याच्या आईचे ठोस मत होते. त्याने नोकरी धंद्यात यश मिळवून इतर मुलांप्रमाणे चार पैसे गाठीशी बांधावे, त्यातून ऐहिक सुखे अनुभवावी असे तिला वाटे. ती त्यासाठी कायम प्रयत्नात देखील असे. ह्याच कारणासाठी स्वतः फोन/SMS करून तिने मध्यंतरी लेकाला "कौन बनेगा करोडपती"मध्ये देखील पाठवले होते जेणेकरून तिथे करोड नाहीतर निदान काही लाख तरी पदरात पडतील आणि त्याला कामधंदा लागेपर्यंत तरी घरखर्चाचा प्रश्न सुटेल. पण चिंतनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायामधून बघून सांगणे म्हणजे आपल्या ज्ञानाचा अपमान वाटे. त्याच्या मते अशी पर्याय बघून उत्तर देणे म्हणजे परीक्षेत कॉपी करण्यासारखे होते. तरीदेखील घरून मारूनमुटकून KBCमध्ये भाग घेण्यासाठी पाठवलेला चिंतन पोहोचला मात्र "राज पिछले जन्म का"च्या सेट वर. त्याने KBCमध्ये महानायाकाची करंगळी धरून पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा सिक्स्थ-सेन्स, आर्टिफिशीअल् इंटेलिजंन्स वापरून स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावून पहाण्यात धन्यता मानली.

तर असा हा चिंतन ज्ञानसागर. आपले ते खरे करणारा. प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानाच्या आधारे पडताळून पहायला बघणारा. आज देखील एका फार मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देवून आलेला. आलेली संधी त्याच्यासाठी आणि त्याच्या भावी संशोधनासाठी फारच उपयोगी होती. ती मल्टी नॅशनल कंपनी सागरी संशोधनासाठी प्रसिध्द होती. चिंतननेदेखील लहानपणापासुनच पाणी आणि पाण्याखालचे जीवन यावर खूप अभ्यास केला होता. त्याचा हा अभ्यास देखील तसा अपघातानेच सुरु झाला होता. शाळेतून जाता येता वाटेत नदीतल्या पाण्यात दगड भिरकावणे हा सगळ्या मुलांचा चंद. पण नुसता दगड भिरकावून पुढे जायला चिंतन हा काही इतरांसारखा सामान्य मुलगा मुळीच नव्हता. पाण्यात दगड भिरकवल्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. पुढे सहाव्या की सातव्या इयत्तेच्या विज्ञान विषयात पाण्यात वस्तू टाकली की पाण्यावर उठणारे तरंग आणि त्यांची वारंवारता ह्यावर एक धडा होता. तिसरीत असला तरी चिंतनने दिवाळी आणि में महिन्याच्या सुट्टीत शेजारपाजारच्या घरात घुसून दहावीपर्यंतची सगळी पुस्तके चाळून काढली होतीत. जे मिळेल ते अधाश्यासारखे वाचणे हा वडिलोपार्जित गुण असल्याने इतक्या लहान वयातदेखील त्याला वाचायला पुस्तके पुरत नसत.

सहाजिकच दगड टाकल्यावर पाण्यावर उठणारे तरंग मोजण्याचा नविन चिंतनला लागला. पुढे कमी-अधिक आकारमानाचे दगड, मग दगडाऐवजी मातीचे ढेकूळ, लाकडाचा तुकडा, शाळेतल्या खडूचा तुकडा आणि नंतर निरनिराळ्या धातूचे तुकडे असे काय हाताला मिळेल ते पाण्यात टाकणे आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण नोंदवणे अशी सवयच त्याला लागून गेली. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि धातूच्या तुकड्यांची निरीक्षणे झाल्यावर या अकाली शास्त्रज्ञाने एकदा थेट बापाची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी घरून आणून पाण्यात फेकली आणि सोने या नविन धातूचे निरीक्षण नोंदवले. यथावकाश हि गोष्ट घरी समजली. बापाला अर्थातच काही फरक पडत नव्हता पण चिंतनाच्या आईने मात्र आकाश पाताळ एक केले. तेंव्हा ती अंगठी परत आणण्यासाठी चिंतनने पहिल्यांदा पाण्यात उडी मारली. पण पाण्यात शिरताच पाण्याखालचे जग पाहून चिंतन इतका हरखून गेला की अंगठी शोधण्याचे विसरूनच गेला. पूर्वी कधीही पाण्यात न पडलेला चिंतन केवळ "पोहायला शिका" या कधीतरी वाचलेल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हात पाय हलवून लगेचच पोहू लागला. त्यासाठी त्याला सुका नारळ वा टायर कमरेभोवती बांधून बिलकुल सराव करावा लागला नाही. अर्थात इतरांसाठी हे भारी प्रकरण असले तरी चिंतनला मात्र आपण पहिल्यांदाच पाण्यात पडलो आहोत आणि पोहू लागलो आहोत हे कळले देखील नाही. तो आपला सराईतपणे पोहत आपल्या समोर नव्यानेच उघडलेले जग आणि त्यातील जलचर न्याहाळण्यात मग्न होता.

तसंही त्याच्या हुशार आणि चिकित्सक स्वभावामुळे बरोबरची मुले त्याला कधीच आपल्या बरोबर सामावून घेत नसत. खरे तर मुलांची पण चूक नव्हती. ती सुद्धा सुरुवातीला चिंतनला बरोबर घेत असत. त्याचे वेगळेपण कळल्यावर त्याला एक हुशार मुलगा म्हणून मान देत असत. पण पुढे पुढे त्यांना चिंतनचा त्रास व्हायला लागला जेंव्हा एखादा प्रश्न किंवा शंका विचारल्यानंतर त्याचे उत्तर खूप खोलात जावून ऐकावे लागे. 'त' वरून तपेलं अश्या अपेक्षेने चिंतनला काही विचारावे तर तो तपेल्याबरोबर 'त' वरून ताट, तांब्या, तराजूपासून सुरुवात करे तो थेट 'ट' वरून टमरेल पर्यंत जाई. परीक्षेत देखील एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न चिंतनला जाचक वाटे. जिथे लोकं त्याच्या पासून पळायला बघत तिथे लोकांना चार गोष्टी जास्त कळल्या तर काय बिघडलं असा प्रश्न चिंतनला पडे. मुलांबरोबर खेळायला गेला तरी गणित/विज्ञान हे विषय त्याला खेळातल्या आनंदापेक्षा वेग, दिशा, वस्तुमान ह्या गोष्टींकडे पहायला लावीत. क्रिकेट खेळताना स्ट्रेट-ड्राईव्ह सरळ रेषेत, कव्हर-ड्राईव्ह ४५ अंशात तर स्क़्वेअर कट ९० अंशातच असला पाहिजे याबद्दल तो आग्रही असे. सहाजिकच चिंतनला खेळात घेण्याऐवजी घासू, पुस्तकी किडा, लाल्या अश्या अनेक उपाध्या बरोबर देवून पोरांनी त्याला वाळीत टाकले होते. ह्या अश्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे चिंतन बहुतेक वेळा एकटाच असायचा. त्यालाही बाहेरच्या जगाचा तसा कंटाळाच आलेला. तो रहात होता तिथे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्टया वा अन्य कुठल्याही प्रकारे आकलन करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच उरले नव्हते. त्यामुळे अपघाताने का होईना पाण्यात पडल्यानंतर आपोआपच त्याच्यासाठी अभ्यासाचे एक नविन दालन उघडले होते. त्याच्या बुद्धीला एक नविन खाद्य मिळाले होते. त्याकाळी डिस्कवरी, अनिमल प्लॅनेट अश्या वाहिन्या नसल्याने चिंतन हे सर्व पहिल्यांदाच पहात होता. त्या घटनेनंतर त्याचे आयुष्यच जलमय झाले. बरोबरची सामन्य मुले जेंव्हा सूर्यकिरणे पाण्यात शिरली की प्रकाश किरणांचा कोन बदलतो हे बालबुद्धीस किचकट विज्ञान लक्षात ठेवण्यासाठी डोकेफोड करीत होतीत तेंव्हा चिंतन मात्र जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून पाण्याखाली कसे रहाता येईल या प्रयत्नात असायचा.

क्रमशः

(पुढील भागात - चिंतन आणि अजून काही व्यक्तिरेखा टीव्हीवरच्या "पैचान कौन" या कार्यक्रमात...)

Saturday, July 30, 2011

बब्याचो बंदोबस्त

बब्या महाडिक... ह्याच्या अंगात लहानपणापासनच हाडका कमी आणि काल्याकांड्या जास्ती. वय वाढलो, मिसरूड फुटलो तशी तोंडाक बाटली लागली अन् ह्याचो अजूनच डोक्यास ताप झालो. आख्ख्या गावात ह्याच्याबद्दल कोण चांगला बोलील तर शप्पथ. ह्याचे घरचे लोकं पण ह्याच्या विरुद्धच असतले. बब्या खै गेलो आणि राडे केलान नाय असा फार कमी वेळा झालो असेल. गावच्या देवळातले पूजा नायतर हरिनामसप्ता असे कार्यक्रम सोडले तर बाकी सगळीकडे हा हजर. बरेचदा टाम् असात म्हणून की देवाक घाबरता म्हणून, पण बब्या तसो देवळात पाऊल नाय टाकणार. पण पालखी बाह्यर पडली की ह्यो आलो ढोल ताशे घेवन. बाकी पूर्वी पासन गावासाठी काय उपयोगाचो काम केलान असेल तर ढोल बनवायचो. बकऱ्याची कातडी आणून सुकवन् त्याचे ढोल ताशे बनवायचो. मग काय शिमाग्याक बब्या म्हणजे हिरो. कोणाक् ढोल ताशे वाजवायचो असाल तर बब्याक् कटवूक लागायचो. बब्या सांगेल त्याचो पयलो चान्स. अगदी झेपा जात आला तरी ढोला जवलन् हलणार नाय. धा वर्षापूर्वी त्यानं बापाच्या नावान् गावच्या देवळाकं नविन स्टायलचे ढोल घेवन देलान.

बब्याचो बाप मास्तर महाडिक. दुसरी तिसरीतच लेकाची प्रगती बघून आपला पोर काय दिवे लावायचो नाय म्हणून मास्तरान गावाची पोरा शिकवता शिकवता आपल्या पोराला, बब्याला मात्र पाचवीत जायच्या आधीच शाळेतना भायर काढलान् आणि सरळ दोन म्हशी घेतालान. पहाटे उठून दूध काढून गावात विकायचा आणि दिवसभर म्हशीकां चरायंक् न्यायाचा, गोठा साफ करायचा अशी कामा बब्याच्या मांग लागली. म्हशी चरवता चरवता गाव भटकूकं मिळायचो म्हणून बब्या पण खुष. मास्तर सोताच्या पोरांक अगदी नीट वळखून होता. बब्या मोठा झालो तसा त्याचा लगीन लावन् दिलान आणि बरोबर हापूसची धा कलमं पण घेवन दिलान. बब्याच्या अंगात किती पन् काल्या कांड्या असल्या तरी मास्तर बापापुढे बब्या वचकून असायचो. मास्तरान पण जीता असे पर्यंत बब्याच्या हातात कधी व्येवार दिलान नाय. मास्तर मजुरी दिल्यासारखा बब्याला आठवड्याला चार-पाच रुपये द्यायचा आणि बब्यापन् गप्-गुमान आपली विडीकाडी त्यात भागवायचा. मास्तर असेपर्यंत गावाकपण बब्याचो तसो त्रास कधी नव्हतो. पण चांगली तीस-बत्तीस वर्षा पेन्शन खावंन् मास्तर खपलो आणि बब्यान् पण कात टाकल्यान. जणू मास्तर आणि बब्या दोघांचे आत्मे कसे एकदम मोकळे झाले. एकीकडं मास्तरान् जाता जाता बब्याच्या उरलेल्या आयुष्याची पन् सोय लावलान् होती. बब्याकं पन् त्याची जाणीव होती पण मास्तराच्या रूपात एक प्रकारचा धाक-दडपन् होता, ता गेला म्हणून बब्याकं कसो मोकळा मोकळा वाटला. आत्ता मास्तराच्या उपकाराची जाणीव म्हणा की तो खपल्याचा आनंद म्हणून म्हणा, पण मास्तर खपल्या खपल्या बब्यान् आधी मास्तराच्या नावान् गावच्या देवळाला ढोल देलान्.

मास्तर अगदी जुन्या हाडाचो त्यामुळे तो खपेपर्यंत बब्यान् पण पन्नाशी पार केलान् होती. नोकरीक् अस्ता तर बब्या पेन्शनीत गेला असता. मास्तरानं अख्खो आयुष्य पांढरा शर्ट आणि खाकी हाफ प्यांट घालून काढलान्. म्हातारपणी डोळ्याला चष्मा आणि आधाराकं घेतलेली काठी हीच काय ती चैन केलान् असेल. करमणूक म्हणजे रोजचो रत्नांग्री टायम्स मोठ्यान वाचायचो. नाय म्हणायाला मास्तरान नंतर ब्लाक अन् व्हाईट टीवी घेतालान पण केबलबिबल घ्यायच्या भानगडीत न् पडता दूरदर्शनवरच भागावाल्यान. म्हावरा बब्याच गरवन आणायचो समुद्रावरून. सांगायचा मुद्दा काय तर घरात पैसा असून सुदिक म्हाताऱ्यामुळे बब्याक् त्याचो कधी उपभोग घेवूक मिळालो नसा. त्यामुळे मास्तर खपल्या खपल्या उभ्या आयुष्यभर सायकलवर फिरून दारोदार दूध घातलेला, चार-पाच रुपयात सगळी चैन भागवलेला बब्या रातोरात राजा झाला. उशिरा का व्हयनां पण बब्याच्या हातात पैसा आला. मग काय बब्यान् आधी दुधाचा धंदा आणि कलमाची कामा करायसं दोन गडी लावलान् आणि आपण सोता इतकी वर्षे आत दाबून ठेवलेल्या काल्याकांड्यांची जादू गावाक् दाखवायक् बाह्यर पडला. घरात कलर टीवी आली, सायकलच्या ऐवजी बुडाखाली फटफटी आली आणि पूर्वी शिमग्याला, गटारीला मिळणारी पहिल्या धारेची आत्ता रोजची झाली. बब्या गावाबाहेरच्या खोपटाचा रोजचा गिऱ्हायक आणि त्याच बरोबर गावातल्या लोकांक् एक नविन ताप झालो.

शिमग्यातले राडे काय गावाक् नविन नवते. शिमग्यात गाऱ्हानां घालायचो काम कैक वर्ष मास्तरांन केलेला त्यामुळे मास्तराच्या पाटी गाऱ्हानां घालायचो मान बब्यास हवो होतो. मन्या गुरवानं अगदी कडकडून विरोध केलान. गावकऱ्यांनी कसो बसो आवरल्यानी बब्याक्. पुऱ्या गावासमोर मन्या गुरवानं केलेल्या विरोधाचा बदला म्हणून बब्यान् हापूसचा सिझन यायच्या आतच आपले गडी लावन् गुरुवाच्या कलमावर लागलेल्या सगळ्या तयार झालेल्या कैऱ्या काढून रातोरात लोणची करणाऱ्या व्यापाऱ्याला जावन् विकलान्. आत्ता हे काम बब्याचाच हे गुरवाला आणि गाववाल्यांना पण ठावक होता पण पुरावा नसल्याने बब्याच्या नादी कोन लागणार म्हणून सगळे गप्प बसले. त्यानंतर बब्यान् पुढचो किडो रंगपंचमीस केलान. रंगपंचमीस गावातली पोरा रंग घेवन गावभर फिरतात आणि जो भेटील त्यास रंगवितात. बब्यान् काय केलान तर तेच्या घरासामोरच्या म्हशीनां पाणी पिवूच्या हौदात चार दिवस आधीपासना शेण कालवन् ठेवल्यान. अगदी सारवान घालायला करतात तसो आणि रंगपंचमीक् जवा गावातली पोरा बब्याच्या घरा समोरून जावक् लागली तेवा अचानक पाटन् येवन पटकन तिघा चौघांना उचलून त्या शेणाच्या हौदात टाकल्यान. बेवडो आणि दिसायाक किडकिडीत, काटक असलो तरी लहानपणी पासन् अंगमेहनतीची कामा करून बब्यात ताकत चांगलीच होती. त्याच्यासमोर पोरा दिसायला वजनदार असली तरी शेवटी वडापाव-मिसळपाव खाल्लेली पोरा ती. त्यांच्यान् काय बब्या आवरला नाय. दोघजण बब्याक पकडूक् गेले आणि आयते त्याच्या तावडीत गावले. बब्यान् त्या दोघांक् पण उचलून हौदात टाकल्यान. पोरांचे अवतार बघवत नव्हते. चांगला चार दिवस कुसवलेला शेण ता, पाच पाच वेळा आंघोळी करून पण पोरांच्या अंगाचो वास जायत नव्हतो.

नंतर बब्याचो अवतार दिसलो दहीकाल्यास्. ह्या वेळी बब्यान् हंडी बांधल्यान पण दोरी दोनीकडे पक्की न बांधता दुसऱ्या बाजूला सोता दोरीचो एक टोक हातात धरून झाडावर जावन् बसलो. पोरा हंडी फोडायस् आली, मनोरा रचल्यांनी. जशी पोरा हंडीच्या जवल जायची बब्या दोरी ताणून हंडी वर घ्यायचो. पोरा पडली की परत हंडी खाली. लै झुंजवल्यान् पोरांना. शेवटी पोरा कंटाळून गेली मग बब्यान् हंडी खाली करून अगदी दुसरी-तिसरीतल्या बारक्या बारक्या पोरांकडन् फोडून घेतल्यान् आणि वर मोठ्या बाप्या लोकांनां "बारक्या पोरांनी हंडी फोडलांनी पण तुमच्या बुडात दम नाय. थू तुमच्यावर" असो बोंबलत गावभर फिरलो.

हळू हळू बब्याचो तरास वाढू लागलो. पूर्वी पौर्णिमा अमावास्येला म्हणजे अधनंमधनं ह्याच्या अंगात यायचो, पण नंतर जवळपास रोजचाच झाला. त्याचो तरास ह्याच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनां आणि घरच्यांना जरा जास्तीच होता. बब्यान् म्युजिक सिष्टीम घेतलान् आणि मग कधी मनात येल तेवा मोठ्या आवाजात गाणी लावन् डोस्की फिरवायला लागला. शेजारीच काय तर आख्ख्या वाडीतल्या लोकांचे कान किटले. पोरांना अभ्यास करणे आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांना दुपारी वामकुक्षी आणि रात्रीची झोप कठीण होवून बसली. ह्या सगळा कमी की काय म्हणून बब्यान् रोज झिंगून आल्यावर वाटेत पारावर बसलेल्या पोरांना शिव्या द्यायस् सुरुवात केलेली. पोरा बिचारी दिवसभर कामधंद्या वरून आल्यावर जेवन-खावंन् जरा पारावर गजाल्या मारायास बसायची तर हा तिकडे जावन् त्यांच्या कुरापती काढायचा. सगळे बब्याला वैतागले होते. शेवटी पोरांनी बब्याचा गेम करायचाच असा ठरवल्यांनी. पप्या मांडवकराच्या डोक्यात एक आयडिया आली, पोरा पण तयार झाली.

रत्नांग्रीत रेल्वे आली पण त्याच्याबरोबर रेल्वे स्टेशनच्या भागात चोऱ्या पण वाढल्या. रेल्वेस्टेशन जवळची घरफोडी, दुकाने छोट्या-मोठ्या टपऱ्या फोडून चोर रातोरात रेल्वेनेच पसार व्हायचे. गावातली पोरा आत्ता अशीच एखादी चोरी होतेय का त्याची वाट बघीत होते. सगळी व्यवस्था तयार करून ठेवलेली होती. आता सगळी पोरा फक्त योग्य संधीची वाट बघीत बसली होतीत. तशी संधी महिना भरात मिळाली पण. कोणीतरी रेल्वेस्टेशन जवळची चायनीजची गाडी फोडलान्. तशी किरकोळ चोरी होती, नुकसान जास्त झाला नव्हता. पैसा अडका चोरीला गेला नव्हता केवळ भांड्याकुंड्यावर निभावले होते. पोरांना पण असाच कायतरी हवा होता जेणेकरून पोलिसांची भानगड जास्ती नसेल. चोरी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोरं संध्याकाळपासून बब्यावर पाळत ठेवून होतीत. बब्यानेहमी प्रमाणे संध्याकाळी टामकावायाला गावाबाहेर गेला आणि दोघे जण थोड्या वेळानं त्याच्या मागावर गेले. बब्या एकटोच पायी चालत जायचो त्यामुळे अजून कोण बघील अशी काही भीती नव्हती. बब्या टामकवून झाल्यावर झेपा टाकत यायला निघाला तसा एका ठिकाणी झाडी बघून पोरांनी पाटना येवन बब्यावर घोंगडं टाकलानी आणि तो बोंबलायच्या आत त्याच्या मुसक्या बांधून तिकडेच आत रानात आडवाटेला ठेवून दिलांनी. रात्रीची जेवणा आटपून पप्या मांडवकर, सुन्या, दादू असे दोघे तिघे बब्याचा बोचका घेवन् नानाच्या रिक्षान् रेल्वे-स्टेशनला गेले. बब्या टाम् होताच त्यामुळे त्यान काय जास्ती त्रास दिलान नाय. रेल्वेस्टेशनवर जावन् पप्या आणि दादू त्या चायनीजवाल्याला भेटले आणि तुमची गाडी फोडलान् तो चोरटा आमच्याच गावातला असा, त्याका घेवन् इलोय असा सांगितल्यानी. तो तसो भुरटो चोर असा, म्हणून पोलिसात न् देता तुमच्या ताब्यात द्यायला आलो. आम्ही गेल्यावर तुम्ही काय ती वसुली करा असे सांगून पोरा परत घरी आली आणि शांत झोपली.

तिकडे चायनीजवाल्याकं पण चोरी करणारा कोन तो भेटला नव्हताच. पोरा काय खरा-खोटा सांगून गेली ते बघुया आणि अगदीच काय नाय तर हा जो कोन भुरटा चोर हाय त्याच्याकडून निदान भांडी तरी घासून घेवया म्हणून त्यानं बब्याचो बोचको सोडल्यान. तोपर्यंत बब्याची पण जरा उतरली होती. हे काम गावातल्याच पोरांचे हे बब्याला माह्यत होता त्यामुळे घोंगड्याच्या बाह्यर आल्या आल्या बब्यान् समोर कोन हाय कोन नाय ते न् बघता घोंगडं काढणाऱ्या चायनीजवाल्याच्याच कानाखाली एक सणसणीत ठेवन् दिल्यान्. वरतून तोंडातन् नाय नाय त्या शिव्या सुरु होत्याच. आत्ता मघापासनं हा माणूस कोन हाय, ह्याने चोरी केलान हाय की नाय अश्या सगळ्याच बाबतीत संभ्रम असलेला चायनीजवाला बाकायदा कानाखाली खाल्ल्यामुळे पिसाळला. मग त्याने आणि आजूबाजूच्या गाडीवाल्यांनी बब्याला असा काय कुटलानी की बास रे बास. पावसाळी दिवस त्यात त्यांनी बब्याला धुतल्यावर त्याचे कपडे काढून हाफ प्यांटवर सोडून दिलानी. आत्ता अश्या अवस्थेत परत घरी जायचा तर रिक्षाला पैसे पण नाहीत. एवढ्या रात्री चालत जायचा तर शरीराचो जो भाग हलतो तो ठणकत होतो, अशा अवस्थेत मार खावंन् सुजलेल्या बब्यान् उघड्या अंगाने तिकडेच एका बस स्टापवर भिकाऱ्यांच्या बाजूला पुरी रात्र कुडकुडत काढलान् आणि दुसऱ्या दिवशी मेनरोड सोडून आडवाटेनं, कातळावरून, शेतीच्या बांधांच्या आडोशाला लपत बब्या कसाबसा दुपारी घरी आला. मुको मार तर इतको पडलो होतो की बब्याक बरा होवूक आटवडो लागलो. झाल्या प्रकारानं बब्यानं गावातल्या पोरांची अशी काही धास्ती घेतलानं की बाहेर जावन् कोणाला जाब विचारायची पण त्याची हिंमत व्हत नव्हती आणि हिंमत व्हयल तरी कशी कारण त्या गाडीवाल्याच्या ताब्यात द्यायचा आधी, पप्या घोंगडीत बांधलेल्या बब्याच्या कानात पुटपुटला होतो...

"आज नुसतीच तुका कुटायची सुपारी दिलीय, पण परत फिरून काल्याकांड्या करशील तर पुढच्या वेळी किल्ल्यावरच्या लाईट हावसवर नेवन् दरीत ढकलून देव. काय समजलास?"

Tuesday, June 7, 2011

७ जूनच्या आठवणी

आज ७ जून. ७ जून ह्या तारखेला लहानपणापासून मनात एक खास स्थान आहे. ७ जूनला शनिवार रविवार नसेल तर ह्याच दिवशी शाळा सुरू व्हायची. दीड-दोन महिन्याची सुट्टी, मुंबईहून आलेले पाहुणे, सुट्टीत रत्नागिरीत आलेल्या माझ्या चुलत भावाबरोबर केलेली धमाल आणि आंबे, फणस, काजू असं सगळंच मे महिन्याअखेर संपून जायचे. माझ्या भावाचीदेखील शाळा सुरू होणार असल्याने तो मे महिन्याअखेर परत मुंबईला जायचा. मग शाळा सुरू होईपर्यंतचा एक आठवडा खायला उठायचा. काय कारायचे कळायचे नाही. घरचे लोकं पावसाळ्यात चुलीला आणि आंघोळीसाठी असलेल्या बंबात टाकायला लाकडे जमा करून ठेव, लाकडे साठवण्याच्या खोपटाला पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणून माडाच्या झावळ्यानीं नीट शाकारून ठेव अश्या कामात मग्न असत. मी काडी पैलवान असल्यामुळे श्रम पडतील अश्या कामात माझा सहभाग नसायचा. त्याकाळी टीव्हीची इतकी क्रेझ नव्हती. केवळ दूरदर्शन असल्यामुळे कार्यक्रमदेखील जास्त नसायचे. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरु होते आहे असे व्हायचे.

शेवटी एकदाचा ७ जून उजाडायचा. ७ जून म्हणजे नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा वास. एखाद्या वर्षी नवीन गणवेश. पुढच्या शैक्षणिक वर्षात गेल्यामुळे नविन वर्ग. नविन वर्गशिक्षक. वर्ग् शिक्षकांकडे हजेरीचा नविन कॅटलॉग. हजेरीसाठी नवा पट क्रमांक. नविन वर्गात नविन जागा. बसायला भारतीय बैठकच असे. वर्गात लाकडी बाके वैगरे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच असतात असे ऐकून होतो. कुणीही कुठेही बसण्याची मुभा असल्याने आपल्या मित्र मंडळींबरोबर बसून घ्यायचे. अगदीच उंच मुलांना शिक्षक मागे बसवायचे. टगी मुलं टेकायला भिंत असावी म्हणून मागेच बसायची. पहिल्या दिवशी एखाद्या ठिकाणी बस्तान मारले की जोपर्यंत गडबड करणे किंवा अन्य काही कारणाने शिक्षकांनी तुम्हाला उठवले नाही तर वर्षभर तीच तुमची जागा. गावात नगरपरिषदेची शाळा होती. सकाळी १० वाजता भरायची. आजूबाजूच्या वाड्यांमधून मुले घोळक्याने चालत यायची. काही एकएकटी. माझे घर शाळेपासून फक्त २ मिनिटांच्या अंतरावर होते. शाळेत शिपाई वैगरे कुणी नसायचा त्यामुळे शाळा भरायच्या आधी पहिली पंधरा मिनिटे सफाईसाठी असत. शाळेभोवतीचा भाग प्रत्येक वर्गाला वाटून दिलेला असायचा. त्या भागात पडणारा पालापाचोळा त्या त्या वर्गाने जमा करून एका ठराविक ठिकाणी जमा करायचा. साफसफाई करताना मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात वर्गमंत्री, क्रीडामंत्री अश्या मानाच्या पदांबरोबर सफाईमंत्री देखील असे. सफाई झाली सगळी मुले पाचवीच्या वर्गात जमत. पाचवीचा वर्ग म्हणजे शाळेतला सगळ्यात मोठा वर्ग. पहिली ते सातवीची सगळी मुले त्या वर्गात मावत. आत्ताच्या काळात त्याला हॉल म्हटले तरी चालेल. त्या वर्गाच्या बाहेर एक लांबलच्चक वर्‍हाडा. तिथे सगळ्यांनी आपले चप्पल काढून ठेवायचे आणि ओळीने आत जायचे. तिथे मग प्रतिज्ञा, राष्ट्रगीत मग प्रार्थना आणि दिवसाचे पंचांग असे कार्यक्रम ठरलेले असायचे. पहिल्या दिवशी सगळी मुले एकदम उत्साही असत, सगळं कसं अगदी खणखणीत आवाजात.

बहुतेक वेळा १ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून बरोब्बर ७ जूनला कोकणात पोहचायचा. त्यामुळे ७ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिला पाऊस देखील पडायचा. पावसाची पहिली सर वर्गाच्या खिडकीतून बघायला मज्जा यायची. सकाळी घरून निघताना पावसाची काही लक्षणे नसल्यामुळे छत्री वैगरे जवळ नसायचीच. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पाऊस आला तर शिक्षक चक्क शाळा सोडून द्यायचे. मग पहिल्या पावसात मस्त भिजत घरी जायचे. पुढे देखील कधी गडगडाटी वादळी पाऊस झाला आणि गावातले आजूबाजूचे नाले, वहाळ भरून वाहू लागले की लगेच शाळा सुटायची. रस्त्यावर वाहणारे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तुडवत जायला मज्जा यायची. काही मुलं प्लास्टिकचे मोठे काळे बूट ज्यांना गमबूट म्हणायचे ते घालून यायची. त्या बुटात देखील पाणी भरायचे आणि चालताना एक वेगळाच पच्याक पच्याक असा गमतीशीर आवाज यायचा. तसे गमबूट आपल्याकडे देखील असावे अशी खूप इच्छा व्हायची पण जेंव्हा शाळेतली बरीचशी मुलं अनवाणी यायची ते पाहून आपण शाळेत चपला घालून जातो हेच अपराध्यासारखे वाटायचे.

खूप पाऊस पडला, वारे सुटले की कुठेतरी झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार हमखास व्हायचे. लाईट जायची. मग घरी रात्री कंदील, मेणबत्तीच्या प्रकाशात कामकाज चाले. रात्रभर लाईट येणार नाही अशी पक्की खबर असेल तर घराच्या माळ्यावर ठेवलेली पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवली जायची. बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला असायचा. घराच्या आजूबाजूचे माड समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यावर हेलकावे घ्यायचे. त्या हलत्या माडांच्या आकृत्या अंधारात खूप भीतीदायक वाटायच्या. माड आपल्या घरावर पडतात की काय अशी भीती वाटायची. वाऱ्यामुळे नारळ, झावळी पडून कधी कधी कौले फुटायची. लाईट गेली मज्जा व्हायची. घरच्या अभ्यासाला सुट्टी मिळायची. अगदी परीक्षा असेल तरच आम्ही दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो. (दिव्याच्या प्रकाशात रोज अभ्यास केला असता तर मी थोरा-मोठ्यांच्या पंगतीत जावून बसलो असतो हा पांचट विनोद आवरावा असं मनापासून वाटल्यामुळे आवरतोय :D). मग अशावेळी मेणबत्ती बरोबर खेळ सुरु व्हायचे. मेणबत्तीतून सांडणारे गरम गरम मेणाचे थेंब बोटावर जमा करून चिमटीत पकडून आपल्या हाताचे ठसे त्यावर घेणे हा आवडता खेळ असायचा. टीव्हीवर लागणाऱ्या एक शून्य शून्य, हॅल्लो इन्स्पेक्टर, व्योमकेश बक्षी ह्या धारावाहिक मालिकांचा तो परिणाम होता. त्याचप्रमाणे मेणबत्तीतून सांडलेले मेण गोळा करून शिवण कामाच्या रिकाम्या रिळाच्या पुठ्ठ्याच्या नळीत भरून त्यामध्ये दोरा टाकून एक नवी मेणबत्ती बनवणे हा ही पावसाळ्यातला अजून एक हंगामी उद्योग. मेणबत्तीशी खेळल्यामुळे बरेचदा ओरडा मिळायचा. मग मेणबत्तीच्या उजेडात बोटांचे निरनिराळे आकार करून भिंतीवर ससा, हरीण अश्या प्राण्यांच्या सावल्या बनवत बसायचो. अजून एक आवडता उद्योग म्हणजे चपातीच्या पिठाचा एक गोळा घेवून त्यापासून टीव्हीवर लागणाऱ्या कार्टूनप्रमाणे सुपरमॅन, स्पायडरमॅनच्या प्रतिकृती बनवणे. सुपरमॅन, स्पायडरमॅन उभे रहावे म्हणून त्यांच्या हातापायात आधारासाठी उदबत्तीच्या काड्या घालणे. ही सुपरमॅन स्पायडरमॅन मंडळी मी झोपेपर्यंत माझ्याबरोबर असत पण सगळे झोपले की घरातले उंदीर बिचार्यांचा फडशा पाडत.

त्या काळी दळणवळणाची साधने आजच्या इतकी जलद नसल्याने मुंबईत छापले जाणारे लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ हे पेपर रत्नागिरीत संध्याकाळनंतरच मिळत. मोठा भाऊ ऑफिसमधून येताना पेपर घेवून येई. तेंव्हा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ताज्या बातम्या रात्री वाचल्या जात. गावात आजूबाजूला खूप सारी दाट झाडे असल्याने उन्हाळ्यातदेखील फार उकडत नसे. पावसात तर गारठा पडे. अश्या गार वातावरणात भाकरीबरोबर माश्याचे कालवण किंवा मातीच्या मडक्यात शिजवलेली चिंगळे, कुर्ल्यांचा रस्सा नाहीतर साधं कुळथाचे गरमा गरम पिठलं आणि उन्हाळ्यात केलेल्या पापड, फेण्या, सांडगी मिरची हाणण्यात अवर्णनीय आनंद मिळायचा.

पुढे सातवीपासून रत्नागिरीमधल्या हायस्कूलला जायला लागलो. त्या शाळेतली दरवर्षीची आठवण म्हणजे शाळा आणि पावसाळा सुरु झाला की शाळेच्या आवारात फुलणारा गुलमोहर. तो गुलमोहर फुलांनी असा काही डवरलेला असायचा की पहातच रहावं. आज ही तो गुलमोहर पावसाच्या आणि लहानपणीच्या भरगच्च आठवणी घेवून मनाच्या एका कोपऱ्यात आहे.

Friday, April 22, 2011

देव दिवाळी



गेल्या आठवड्यातच नायगावकर काका एका कार्यक्रमात म्हणाले की रमेश तेंडुलकरांनी देखील कधीतरी सचिनला म्हटले असेल "फटके दिले पाहिजेत" आणि तो इतका आज्ञाधारक की एवढा मोठा झाला तरी फटके देतोच आहे. अरे बहुतेक त्यांना "तुला फटके दिले पाहिजेत" असे म्हणायचे होते असेल रे पण तू फोडत बसलास गोलंदाजांना. लहानपणी शिवाजी पार्कवरचे चिल्ली पिल्ली गोलंदाज फोडणे ठीक आहे रे, पण अब्दुल कादिरपासून सुरूवात करून वकार, वसिम, वॉर्न, ली, मुरली ह्यांना पण फोडायचे? इथे पाचच लिहाले आहेत कारण नाही म्हटले तरी आमच्या सारख्यांनी पाहिलेले पहिले पाच उत्तम, दर्जेदार गोलंदाज म्हणायला हरकत नाही. बाकी तू हेन्री ओलोंगा वैगरेला (तोच तो हल्ली प्रेज़ेंटेशन सेरेमेनीमध्ये प्रश्न विचारत असतो तो) पण फोडला होतास. त्याची चुक काय तर ओळख नसताना (म्हणजे गोलंदाज म्हणून त्याला कुणी ही ओळखत नसताना) एका मॅचमध्ये त्याने तुझी विकेट काढली आणि मॅचनंतर प्रौढीच्या पिपाण्या वाजवल्या. मग काय पुढच्याच मॅचमध्ये तू त्याला फोडलास. असा तसा नाही तर उण्यापूर्‍या १९६ धावांचा पाठलाग करताना तू शतक ठोकलं होतसं. आयुष्यात पहिल्यांदा तू फोडलेल्या गोलंदाजांची मला दया आली होती. त्यामुळेच तर तो अजुन आमच्यासारख्यांच्या लक्षात. आजवर असे अनेक लुंगेसुंगे आपले लेंगे तुझ्याकडून ओले करून धुवून घेऊन गेले. त्यावेळी ठीक होतं रे, तू तरुण होतास म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर होतास, रक्त सळसळतं होतं. आजच्याच दिवशी तू एकट्याने कांगारूंना शारजाच्या वाळवंटात करपवलं होतंस आणि आपला वाढदिवस साजरा केला होतास. पण आज जवळपास १४ वर्षे झाली तरी वॉर्नने कितीही नाही म्हटलं तरी हल्लीच्या ताज्या फडफडीत लिज़ हुर्ले किंवा तत्सम स्वप्नसुंदरीआधी तू त्याच्या स्वप्नात जात असशील हे नक्की.

फार कमी गोष्टी अश्या आहेत की ज्याच्याबाबत मी ठाम आहे किंवा असेन. आत्ता धर्म, देश वैगरे बदलण्याचा प्रश्न येत नाही म्हणून त्या आपण सोडून देऊ. पण सध्या काम करीत असलेला प्रॉजेक्ट म्हणा, दर महिना पगार देणारी कंपनी म्हणा फार कशाला अगदी करियर म्हणा मी कश्याच्याही बाबतीत ठाम आहे असे मला तरी वाटत नाही. आमच्या धंद्यात तसे कुणीच ठाम नसते त्यामुळे ते सोडा. पण स्वता:ची अक्कल वापरायला लागल्यापासून केवळ तुझ्या बाबतीत मी ठाम आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. टेनिसला मराठीत बॅडमिंटन म्हणतात एवढी समज असलेल्या वयात केवळ तुला पीट सँप्रास आवडतो म्हणून तो माझाही आवडता टेनिस खेळाडू होता. आत्ता मोठेपणी टेनिस आणि बॅडमिंटन मधला फरक कळायला लागल्यावर आपल्या दोघांनाही फेडरर आवडतो हा योगायोगच म्हणायचा. थोडक्यात काय मला पण टेनिसमधलं बर्‍यापैकी कळू लागलं आहे. पूर्वी अतिरेकी खुळ्यासारखे जिहाद ह्या एका शब्दासाठी दुसऱ्याचा जीव घेतात कसा आणि आपला जीव देतात कशाला हे कळायचे नाही पण तुझा धर्म स्वीकारला आणि कट्टरता म्हणजे काय हे कळले. तुझ्या धर्मात आल्यामुळे तुझ्याविरुद्ध सॉरी आपल्याविरुद्ध बोलणारे नेहमी भेटटातच. आधी लय राडे व्हायचे, अगदी जिहाद. सुरुवात झाली ती शाळेत असताना शेजारच्या गोकुळबरोबर. पुर्वी गोकुळला मी त्यांच्या वयाला मान देऊन काका वैगरे म्हणायचो पण ते आपल्या धर्माच्या उगीचच विरोधात आहेत हे कळल्यापासून मी खाजगीत त्यांचा उल्लेख एकेरीत करतो. तर हा गोकुळ भारी खाजीव माणूस. तू भन्नाट खेळतोस तेंव्हा हा तुझ्याबद्दल चांगले चार शब्द न काढता समोरची गोलंदाजी कशी कचखाऊ होती ते बोंबलत बसतो. पण एकदा का तू आउट झालास की मात्र तू तो चेंडू कव्हर्सच्या ऐवजी सरळ किंवा थर्डमॅनच्या दिशेने कसा खेळायला हवा होतास हे अगदी साभिनय दाखवत बसतो. साला ह्या गोकुळला आपल्या घराच्यापाठी असलेल्या संडासचा पाइप कुठल्या दिशेला सोडला तर ते पाणी आपल्याच अंगणात येणार नाही हे गेली कित्येक वर्षे कळलेले नाही तो कव्हर्स, गली आणि थर्डमॅनबद्दल कसा बोलू शकतो हेच मला समजत नाही.

असे कित्येक गोकुळ भेटतात. काही जणांची त्यात देखील खासियत आहे बरं. त्यांच्या मते तू शतक लावलंस की भारत हरतो. बहुतेक तू शतक लावल्यानतर भारत ७०% सामने जिंकला आहे हे त्यांना माहीत नाही किंवा त्यांच्या गणिती ज्ञानानुसार ३०% म्हणजे उर्वरित ७०% पेक्षा मोठा भाग असावा. आत्ता ह्या लोकांना फुललेली कमळं पहाण्यापेक्षा चिखलात डुंबणे जास्त पसंत असेल तर नाईलाज आहे. अगदी परवा देखील टी-२० मध्ये तू पहिलंवहीलं शतक झळकावलस आणि मुंबई हरली तर ही जमात सुरू झाली, तू शतक केलं म्हणून मुंबई हरली. अरे मेल्यांनो मुंबई घ्या नाहीतर भारतीय संघ, तू शतक लावल्यावर उरलेली दहा लोकं काय माधुकरीचे वार लावल्यासारखे फुकटचे गिळायला ठेवलेले आहेत काय? अरे तुझ्या शतकानंतर देखील आपण हरत असु तर तो तुझा नाही तर इतर दहा जणांचा दोष आहे हे साधं सोप्प समीकरण मंद लोकांना कसं कळतं नाही कुणास ठाऊक. बाकी हल्ली ही विरोधी पक्षाची लोकं आपण विश्वकप जिंकल्यापासून जरा गप्प आहेत. आत आग-आग होतं असेल पण काय करणार? त्यात तू धावा काढण्यात पण आपल्या सगळ्यात पुढे त्यामुळे त्यांची पुरी बुच्च बसली आहे.

बाकी यंदाची देव दिवाळी अगदी स्पेशल आहे हे सांगायला नको. इतकी वर्षे वाट पाहायला लावून शेवटी विश्वकप तुझ्या हाती पहायला मिळाला. साखळी सामने सुरु असताना तू बाद झाल्यावर बाकीचे फलंदाज All Out लावल्यावर जसे डास मरतात तसे All Out होत होते ते पाहून यंदा पण येरे माझ्या मागल्या होणार आणि आपण उप-उपांत्य किंवा उपांत्य फेरीत गाशा गुंडाळणार हे स्पष्ट दिसत होते. राहून राहून २००७ मध्ये विश्वचषकातून बाहेर पडलो तेंव्हाचे तुझे पाणावलेले डोळे समोर दिसत होते. त्यावेळी निदान २०११ मध्ये तू पुन्हा खेळशील ही आशा होती. ह्यावेळी तू खेळत होतास. नुसता खेळत नव्हतास तर गेली २-३ वर्षे तू विश्वचषक हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खेळत होतास हे ही कळत होतं. वर्षभरापूर्वीच एकदिवशीय सामन्यात द्विशतक झळकावून तू आपला फॉर्मपण दाखवून दिलास. तरी देखील बाकीच्या दहा लोकांवर भरोसा नव्हता. त्यात उप-उपांत्य फेरीतच समोर कांगारू. कांगारू नेहमीच्या औकातीत नसले तरी आपल्या लोकांचाच मला भरोसा नव्हता. पण सुदैवाने २००३ च्या अंतिम फेरीचा बदला उप-उपांत्य फेरीत घेतला गेला. नंतर पाकडे. पाकला विश्वचषकात आपण नेहमी कुटले असले तरी ते पाकडे आणि नाही म्हटलं तरी ते देखील जबरी खेळत होते पण २००३ मध्ये अक्रमच्या गोलंदाजीवर तुला एक जीवदान देवून त्यांचे समाधान झाले नव्हते त्यामुळे ह्यावेळी तुला पाच जीवदाने देवून ढेकर देत ते परत गेले.

शेवटी अंतिम सामान्यासाठी मुरली, मलिंगा, मेंडीस, मॅथ्युज हा 'M' Factor होताच पण आपल्या बाजूनेदेखील मोटेरा, मोहाली आणि मुंबई असा 'M' Factor असल्याने चिंता थोडी कमी होती. तरी देखील अंतिम सामन्याच्या दिशेने आपण जसे एक-एक पाऊल टाकत होतो तसतशी बेचैनी वाढत होती. उगीचच डॉन ब्रॅडमनचे शेवटच्या सामन्यात शून्यावर बाद होवून १०० च्या सरासरीपासून वंचित रहाणे किंवा पीट सँप्रासने शेवटपर्यंत फ्रेंच ओपन जिंकू न शकणे असल्या गोष्टी सतत आठवत होत्या. तू प्रयत्नांमध्ये काही कसर सोडली नसलीस तरी नियतीची भीती वाटत होती. एक विश्वचषक सोडून तुझ्याकडे सगळं काही आहे आणि नियती तो तुझ्या हातून हिरावून तर घेणार नाही अशी धास्ती मनात सतत होती. त्यात माजोरी जात तू टी-२० विश्वचषकात न खेळल्यामुळे आपण जिंकलो होतो आणि आत्ता तुझ्यामुळे हरणार अश्या पुड्या सोडत बसलेली होतीच. आठवडाभर धड झोप लागली नव्हती. इंजिनिरिंगला असताना Engineering Mechanicsचा पेपर तीनदा दिला होता पण तिन्ही वेळा पेपरच्या आदल्या रात्री Mechanicsचा पेपर सोड पण पूर्ण अभ्यासक्रमातली साधी २ मिलीमीटरची आकृतीदेखील कधी माझ्या झोपेची तटबंदी भेदू शकली नव्हती.(Mechanicsचा पेपर चार वर्षातून एकदा येण्याऐवजी निर्लज्जासारखा दर सहा महिन्यांनी येत असल्यामुळे असेल कदाचित) पण तुझ्यासाठी मात्र ही जवळपास शेवटचीच संधी होती. विश्वचषक जिंकायचा जसा तुला ध्यास लागला होता तसा तो तुझ्या हाती पहायचा ध्यास आम्हाला लागला होता. शेवटी दीड वर्षापूर्वी म्हांराजाला घातलेलं गार्‍हाणं म्हांराजानं ऐकलान आणि आपण जिंकलो. तुझ्या हाती विश्वचषक पाहिला तेंव्हा मात्र केवळ समाधान सोडून इतर काहीच वाटलं नाही. मनातल्या मनात तो विश्वचषक तुझ्या हाती अनेक वेळा पाहिल्यामुळे असेल कदाचित. तुझ्यासाठी अभिनंदनाची पोस्ट लिहिणार होतो पण काही सुचलंच नाही. संपूर्ण समाधान आणि तृप्तीचे असे ते क्षण होते. मनात साठवून ठेवले आहेत. आयुष्यभरासाठी...

लहानपणापासून मराठी पंचांगाप्रमाणे वर्षभरात सगळ्यात शुभ असे साडेतीन मुहूर्त असतात असे ऐकून होतो. गेल्या काही वर्षापासून माझ्यासाठी ते साडेचार मुहूर्त झालेत. आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्यामध्ये येणारा अजुन एक शुभ मुहूर्त. आमच्यासाठी देव दिवाळी. लहानपणी काही वर्षे फटाके म्हणजे दिवाळीतच वाजवायचे असतात अशी संकुचित विचारसरणी होती. पण तुझ्यामुळे आम्ही भर शिमग्यातच नव्हे तर सणासूदीचे दिवस नसताना देखील दिवाळीच नाही तर विजयादशमी देखील फटाके लावून साजरी केली. आज तुझा वाढदिवस. तुला मी काय शुभेच्छा देणार? उलट मीच तुझ्याकडे मागणे मागेन की माझ्या नशिबात कधी भाग्योदय लिहलेला असेल तर त्यात एखादा दिवस तरी तुला तुझ्या आवडीच्या कोलंबी, कुर्ल्यांचा नैवेद्य दाखवण्याचे भाग्य मला लाभू दे.

Sunday, March 13, 2011

रत्नागिरीतला शिमगा - लहान होळी

शिमगा आणि गणेशोत्सव म्हणजे कोकणातले दोन मुख्य सण. सध्या शिमगा सुरू आहे. आज होळी. मुंबई तसेच उत्तर भारतात होळी म्हणजे रंगांची उधळण पण कोकणात रंगाचा सण रंगपंचमीला म्हणजे होळी नंतर पाच दिवसांनी साजरा केला जातो. लहानपणी माझी मुंबईची भावंडे होळी दिवशीच रंगपंचमी खेळलो, गच्चीतून फुगे फेकून मारले असे सांगायचीत तेंव्हा मला आश्चर्य वाटायचे. मग मी खुळ्यासारखे अरे रंगपंचमीला वेळ आहे अजून असे म्हणायचो. आम्हाला होळी, धुलीवंदन (धूळवड्) आणि मग पाच दिवसांनी रंगपंचमी अश्या आठवड्यात मस्त ३ दिवस सुट्ट्या मिळत. आजची पोस्ट शिमगा स्पेशल. कोकणात शिमगा म्हणजे मस्त बोंबाबोंब. खरोखरच्या चोर्‍या. चोर्‍या म्हणजे लाकूडफाटा वैगरे. अगदीच पोचलेले टवाळ असतील तर डायरेक्ट कोंबडासुद्धा चोरायला कमी नाही करत.

कोकणात शिमगा निरनिराळ्या पद्धतीने साजरा होतो. प्रत्येक गावागावात वेगळी पद्धत पण मुख्यत: बर्‍याच गावात पालखी असते. रत्नागिरीचे ग्राम दैवत म्हणजे देव भैरी. होळीच्या दिवशी भैरी पालखी बाहेर पडते आणि पाच दिवस आजूबाजूच्या मुख्य वाड्यांमध्ये फिरून रंगपंचमीपर्यंत झाडगावात सहाणेवर बसते. तिथे सूरमाडाची होळी असते. ह्या काळात निरनिराळ्या गावाचे मानकरी येऊन पालखी नाचवण्याचा कार्यक्रम असतो. कधी दोन लोकं तर कधी एकटा माणूस डोक्यावर ती भली मोठी पालखी घेऊन नाचवतो. मज्जा येते पहायला. पुढे कधी तरी शिमग्यात सुट्टी काढून ह्या सगळ्याचे रेकॉर्डिंग केले पाहिजे. दूरदर्शनच्या काळात जयू भाटकरांनी रत्नागिरीमधला शिमग्यावर एक कार्यक्रम करून प्रक्षेपित केला होता.

आमच्या गावात मात्र शिमगा होळीच्या दहा दिवस आधीपासून सुरू होतो. गावात लहान मुलांची आणि मोठ्या लोकांची होळी चक्क वेगवेगळी असते. होळीच्या होमाची एक ठरलेली जागा आहे. तिथे दोन खड्डे पाडले जातात. त्या बाजूला होलदेवाच्या (होळीचा देव) मूर्त्या मांडलेल्या असतात. होळीचा सण झाला की पाडव्या दिवशी हे होलदेव पुन्हा त्या खडड्यांमध्ये ठेवून खड्डे पुन्हा पुढच्या होळीपर्यंत बुजवले जातात. लहान मुलांच्या होळीचा खडडा गूढगाभर खोल तर मोठ्या (गावाच्या) होळीचा खडडा चांगला पुरूषभर खोल असतो. होळीच्या सणाच्या दहा दिवस आधी लहान मुलांची होळी सुरू होते. इथे खडडा खणण्यापासून सगळी कामे लहान मुलेच करतात. लहान म्हणजे ६-७ पर्यंत कारण गावातली शाळा सातवीपर्यंतच आहे. आठवीसाठी शहरातल्या शाळेत जावे लागते आणि शहरातल्या शाळेत जाणारी मुले लहान मुलांच्यात जास्त मिक्स होत नाहीत. थोडक्यात गावातली शाळा आणि होळी एकदमच सुटते. तर लहान मुलांची होळी म्हणजे रोज शाळा सुटली की गावातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून एरंडाचे एखादे झाड तोडून आणायचे. होळी आणाताना 'हाय रे हाय आणि xxxच्या जिवात काय नाय रे' आणि इथे देता येणार नाहीत अश्या फाका घालायचे.

एरंडाचेच झाड का? ह्याबद्दल काही माहिती नाही पण बहुतेक ही झाडे पुष्कळ आहेत आणि दुसरे म्हणजे हे कुणाच्याही आवारातून परवानगी शिवाय तोडून आणले तरी चालते. अजुन एक म्हणजे पाचवी-सहावीच्या मूलानां हे तोडून खांद्यावरुन मिरवत आणण्यासारखे असते. कधी कधी मुले जास्त असतील किंवा लहानांची होळी आणायचा शेवटचा दिवस असेल तर मजबूत असे एरंडाचे झाड निवडले जाते. ते घेऊन पूर्ण गावभर 'होळी ओ' करत, मिरवत अगदी काळोख पडून गेल्यावर होमाच्या ठिकाणी आणून ते एरंडाचे झाड खड्ड्यात मधोमध उभे केलं जातं. मग आजूबाजूचा किंवा गावातून जमवून आणलेला झाडांचा सुकलेला पाचोळा (पातेरा), झावळ्या, काटक्या असं काय मिळेल ते सगळं त्या खड्ड्यात भरून होम केला जातो. गावात सागाची आणि माडाची खूप झाडे असल्याने रोज बसल्या जागी ४-५ टोपल्या पातेरा, झावळ्या सहज मिळायचा. अजुन ही मिळतो. पुर्वी म्हणजे अगदी १०-१२ वर्षापूर्वी देखील बरीचशी लोकं चुलीवरच जेवण करायची. आज ही गावातल्या उत्सवांच्यावेळी किंवा लग्नकार्यात गाव जेवणासाठी लाकूड फाटाच वापरला जातो.

होमाच्यावेळी तथाकथित मोठी झालेली म्हणजे आठवी-नववीतील मुले (ज्यांना मोठे आपल्यात घेत नसत) देवळातून ढोल-ताशे घेऊन यायचे आणि मोठ्या होळीच्या मिरवणुकीसाठी ढोल-ताशे वाजवण्याची जोरदार प्रॅक्टिस चालायची. मी लहान होतो म्हणजे पाचवी सहावीपर्यंत घरचे मला गावातल्या इतर मुलांबरोबर होळी आणायला पाठवत नसत. तोपर्यंत मी इतर मुले होळी आणेपर्यंत पातेरा गोळा करून ठेवण्याचे काम इमानेइतबारे बजावले होते. मी पाचवी आणि सहावीत असताना २ वर्षे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लहान मुलांच्या होळीत पूर्ण सहभागी होतो. सहावी पास झाल्यावरच मी हायस्कूलला प्रवेश घेतल्यामुळे सहाजिकच मी एक वर्ष आधीच 'मोठा' झालो त्यामुळे आपोआपच लहान होळीची मज्जा एक वर्ष कमी झाली. तेंव्हा होळी कुठून आणायची, एरंडाचे कुठले झाड निवडायचे, होळी आणाताना शेंड्याकडे कोण? मुद्याकडे (खोडाकडे) कोण? हे ठरवणारी मुले म्हणजे आमच्यासाठी हीरो असायची. अर्थात सगळ्यात अंगापींडाने जो जास्त दणकट आणि त्यात शाळेत नापास वैगरे झालेला असतो त्यालाच हा मान आपोआप मिळतो. मी ह्या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड मागासलेला असल्याने मी नेहमी हुकुमाची अंमलबजावणी करणार्‍यांमध्ये राहिलो. मला त्यातल्या त्यात मानाचे काम म्हणजे होळी तोडण्यासाठी बरोबर नेलेला कोयता सांभाळणे हेच असायचे कारण बाकीच्या अवलादिंच्या हाती कोयता वैगरे देणे म्हणजे जिकीरीचे असायचे.

होम लागेपर्यंत साधारण सात-साडेसात वाजायचे. त्याचवेळी कामधंद्याला बाहेर गेलेली लोकं पण परत येत असायची मग कधी सगळ्या मुलांना जवळच्या गादीवरच्या लिमलेटच्या गोळ्या किंवा तळलेल्या पिवळ्या नळ्या असा खाऊ मिळायचा. इथे पुन्हा माझ्या अंगच्या प्रामाणिकपणामुळे खाऊवाटपामधले संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी ते काम बहुतेक वेळा मीच करायचो. पण काही असो मज्जा यायची. होळी आणणे असो की पातेरा जमवणे, कोयता सांभाळणे असो किंवा खाऊवाटप, आपण एक जबाबदारीचे काम पार पाडतोय असं एक प्रकारचे समाधान असायचे जे आत्ता मोठेपणी खूप दुर्मिळ झाले आहे.

Monday, February 28, 2011

ट्रॅफिकमधला गारवा

काल सकाळी ३५ मिनिटांचा रस्ता पार करून ऑफीसला पोहोचायला तब्बल दीड तासांहून अधिक वेळ लागला. गाडी चालू बंद करून करून कंटाळा आला. अश्याच एका निवांत क्षणी मोबाईलवर गाणी लावून ईअर् फोन कानात घातले आणि पहिलच गाणं लागलं ते म्हणजे मिलिंद इंगळेचे गारवा. त्यातल्या पहिल्याच "ऊन जरा जास्तच आहे" ह्या ओळी कानावर पडल्या आणि पुढचं विडंबन सुचले. तसं पाहिलं तर कविता करणे, कवितेचा आस्वाद घेणे (अर्थात संदीप खरेच्या कविता आणि बझ्झवरच्या चारोळ्या, दिपोळ्या, आपोळ्या असे काही सन्माननीय अपवाद वगळता) वैगरे दूरच पण यमक जुळवणेदेखील मुश्कील अशी माझी अवस्था. त्यामुळे भर उन्हात त्या ट्रॅफिकमधल्या परिस्थितीला गांजून माझ्यातल्या कोकणी भाषेला 'भ'हर आलेला असताना सुचलेला हा ट्रॅफिक मधला गारवा तुमच्यासाठी. तसं पाहायला गेलं तर हे विडंबन ब्लॉगवर पोस्ट करण्याच्या लायकीचं नाही तरी माझ्यासारख्या पद्य विभागातल्या माठ माणसाकडून त्या रखरखीत परिस्थीत का होईना चुकुन जुळले गेलेले यमक (जे पुन्हा घडण्याची तीळमात्र शक्यता नाही) तुमच्या समोर यावे म्हणून हा खटाटोप.

मी माझ्या परीने धोक्याचे इशारे दिले आहेत. एका टुकार काव्यापासून स्व:ताला वाचवण्याची तुम्हाला ही शेवटची संधी. अजूनही मागे फिरा. मनस्तापातून जन्माला आलेल्या काव्यापासून केवळ मनस्तापच होऊ शकतो आणि त्या मनस्तापला कविवर्य(?) जबाबदार राहाणार नाहीत.


ट्रॅफिक जरा जास्तच आहे, दररोज वाटतं,
भर गर्दीत मोकळ्या रस्त्याचे चित्र मनात दाटतं,
लोकं चालत रहातात, गाडी मात्र चालत नाही,
गर्दीमध्ये हॉर्नशिवाय कुणीच बोलत नाही,
तितक्यात कुठून एक पांडू सिग्नल समोर येतो,
ट्रॅफिक मधला चालू भाग हाताखाली घेतो,
गियर ऊनाड मुलासारखा सैरावैरा पडू पहातो,
न्यूट्रल सोडून उगीचच फर्स्ट सेकंडवर पडून पाहतो,
क्लच सोडताच वेगाचा सुरू होतो पुन्हा खेळ,
पुढचा सिग्नल मिळेपर्यंत कुणाकडेच नसतो वेळ,
मघाचचाच मोकळा रस्ता अचानक गजबजून जातो,
पुन्हा लाल होण्यासाठी सिग्नल हिरवा होतो.


तुम्हाला झालेला मानसिक त्रास ही श्रींची इच्छा. तरीही ह्या मनस्तापाला निमित्तमात्र झाल्याबदल आपण प्रतिक्रीयेमध्ये वरचा 'भ' देऊन अस्मादिकांनीं तुमच्यावर केलेल्या अन्यायाची परतफेड करू शकता.

Friday, January 14, 2011

टाइम मॅनेजमेंट



एखादी जॉब प्रोफाइल वाचताना टाइम/टास्क मॅनेजमेंट, मल्टी टास्किंग वैगरे शब्द हमखास वाचायला मिळतात. मिळालेली वेळ कामांचे महत्व पहाता त्या त्या कामांना विभागून देऊन त्यानुसार काम पुरे करणे ही झाली टाइममॅनेजमेंटची ऑफीसमधली व्याख्या. अगदी परफेक्ट नसेल. सांगायचा मुद्दा हा की ऑफीसमध्ये टाइम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट वैगरे गोष्टी प्रॉजेक्ट प्लॅनिंगचा एक हिस्सा असतात. काम नेमुन देण्यासाठी आणि दिलेले काम होतं आहे की नाही हे पहाण्यासाठी मॅनेजर असतो. पण प्रॉजेक्ट म्हणजे टीमवर्क आलंच. इथे काही प्रॉब्लेम असतील, काही मदत हवी असेल तर टीम असते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि ट्रॅकिंग सिस्टमची निरनिराळी सॉफ्टवेअरस् वापरुन सगळी कामं (बहुतेकवेळा) नीट पार पडली जातात. त्यामुळे प्रोफेशनल लाइफमध्ये तरी डेड लाईन या ना त्या प्रकारे पाळली जाते किंबहुना काम करणार्‍या लोकांकडून (झक मारुन का होईना) पाळून घेतली जाते.

टाइम मॅनेजमेंटचा खरा प्रश्न सुरू होतो तो ऑफीस मधून बाहेर पडल्यावर. वैयक्तिक आयुष्यात आपण किती वेळा कामे आखून त्या नुसार काम करतो? माझ्या मते मी आत्ता आपण म्हणणे थांबवावे. मी माझ्यापासून सुरूवात करतो. ऑफीसच्या बाहेर किती कामे मी आखून त्या नुसार ती पार पाडतो? नक्की नाही सांगता येत. नक्की नाही म्हणजे आखणी होते. बहुतेक सगळ्या कामांची आखणी ही होतेच. ऑफीसप्रमाणे अगदी पद्धतशीर कागदोपत्री प्लॅनिंग नाही पण मनात कुठे तरी काही गोष्टी ठरवल्या जातात. अमुक तमुक गोष्ट करायची. आणि त्यासाठी एक ढोबळ वेळ/तारीख/महिना निश्चित करायचा. अजुन तरी मी कधी वर्ष वैगरे निश्चित नाही केलेलं कारण तेवढी दूरदृष्टी नाही. आधीच वेळ/तारीख/महिना असे जे काही मनात ठरवतो ते ढोबळ असते. हा ढोबळ शब्दच घात करतो.

जेंव्हा एखादी गोष्ट पुढे ढकलली तरी चालून जाते तेंव्हा ती गोष्ट माझ्या हातून कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. सगळ्या सुविधा असतात पण जोवर ती करायचीच असा मनात ठाम निर्णय होत नाही तोवर हातून काहीच होत नाही. आत्ता टॅक्स सेव्हींग. हा दरवर्षीचा प्रकार आहे. दरवर्षी ठरवतो की डिसेंबरपर्यंत सगळी गुंतवणूक पूर्ण करून कागदपत्र तयार ठेवायची. एचआरचा मेल आला रे आला की दिली. पण नाही. मेल आला की शेवटची तारीख बघायची. मग त्याच्या आधीच्या वीकेंडला जाऊन पैसे भरायचे आणि पावत्या आणायच्या. बरं सगळी कागदपत्र तयार आहेत तर जमा करेन तर तेही नाही. दोन दिवस आधी एचआरचा Gentle Reminder म्हणून एक प्रेमळ मेल येतो पण आपण अगदी शेवटची तारीख उजाडेपर्यंत वाट पाहायची. तो दिवस आला तरी अगदी संध्याकाळ होण्याची वाट बघा. दुपारी जेवून वैगरे आलं की प्रिंटआऊट काढा आणि मग एकदाचा घरी जाता जाता एचआर कडे जायचे. तिथे आपली भावंडे उभी असतातच. एकदम कामाचा लोड पडू नये म्हणून त्या बिचार्‍या एचआरने महिनाभर आधी तारीख दिलेली असते तर माझ्यासारखी लोकं अगदी ती तारीख म्हणजे एक एकच आणि शेवटचा दिवस असल्यासारखे त्या दिवशी संध्याकाळी हजर. काही लोकं तर कुठे काही माहिती भरून आणतात. शेवटच्या दिवशी ह्यांच्या हजार शंका. नशिबाने मी इतका गया गुजरा नसल्याने ह्यांच्यामुळे आम्हाला उशीर ;-)

टॅक्स सेव्हींगचे उदाहरण हे वार्षिक श्रेणीमध्ये मोडते. मासिकश्रेणीमध्ये लाईटबिल येते. लाईटबिल साधारण दर महिन्याच्या ४-५ तारखेला हातात पडते. बरं इथे बिल भरण्याची शेवटची तारीख १८ असते. बिल भरण्याचे ठिकाण देखील ५ मिनिटांवर आणि रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर आहे पण बिल हातात मिळाल्यापासून वीकेंडला भरू, वीकेंडला भरू असे करता करता १७ तारीख उजाडते. वीकेंडला आठवण असते, नाही असे नाही पण सकाळी वाटते आत्ता गेलो तर गर्दी असेल. लोकं उन्हातून बाहेर पडत नाही तेंव्हा आपण १२-१२:३०च्या आसपास जाऊ पण दुपारी ऊन्हातून किती लोकं बाहेर पडतात हे पाहायला मी आजपर्यंत बाहेर पडलो नाही. १७ तारखेला नेहमीप्रमाणे ऑफीसला जायला उशीर झालेला असतो त्यामुळे उद्या शेवटचा दिवस आहे ह्या भरोश्यावर बिल भरायला १८ तारीख उगवतेच. आत्ता १८ शेवटची तारीख असल्याने दंड भरावा लागू नये म्हणून झक मारत त्या दिवशी बिल भरायला जावं तर नेमका त्या दिवशी तिथे प्रिंटर बिघडलेला असतो. आणि बहुतेक प्रत्येक महिन्यात १८ लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने आपली 'वेळेचा सदुपयोग करणारी भावंडे'देखील त्याच दिवशी गर्दी करून रांगेत उभी असतात. पण गर्दी पाहून दुपारी/संध्याकाळी येऊ म्हणाव तर शक्य नसतं त्यामुळे तिथे रांगेत उभं राहून वीकेंडला आलो असतो तर बर झालं असतं असं वाटून जातं. आत्ता बिल मिळालं की पहिल्याच वीकेंड्ला भरून टाकायचे असं ठरवतो पण हाच निश्चय पुन्हा पुढच्या महिन्यात १७-१८ तारखेला केला जातो.

ही झाली दोन ठळक उदाहरणे. पण सध्या बर्‍याचश्या गोष्टी ह्या अश्या ढोबळ कारभारावर सुरू आहेत. काही ठिकाणी गोष्टी अडून बसल्या आहेत तर काही ठिकाणी सगळ्या चाव्या माझ्या हाती असून केवळ नियोजनाचा अभाव आणि कंटाळा ह्यामुळे मी स्व:त सगळ्या गोष्टी अडकवून ठेवल्या आहेत. जेवढ्या लवकर टाइम मॅनेजमेंटच्या घड्याळात मी सेल्फ स्टार्टची चार्ज झालेली बॅटरी टाकेन तितक्या लवकर गोष्टी टिक-टिक करीत पुढे सरकतील.

फोटो गूगलवरुन साभार

Monday, January 10, 2011

देवबाग बीच रिसॉर्ट

३१ डिसेंबर विकांताला लागून येत असल्याने कुठेतरी बाहेर जायचे हे नक्की ठरवले होते. केरळला जायचे कधी पासून मनात होते म्हणून कोट्टयाम-आलप्पी येथे हाउसबोटवर ३१ची रात्र घालवण्याचा प्लॅन केला. पण ख्रिसमस आणि वर्षअखेर असल्याने केरळचे बुकिंग ४ महिने आधीच फुल्ल होते. आत्ता कुठे जायचे असा विचार सुरू होता. एका मित्राकडून देवबाग बीच रिसॉर्टबद्दल ऐकून होतो. तिथेदेखील हाउसबोट उपलब्ध असते असे कळले पण केरळच्या बॅक-वॉटर इतकी मज्जा नाही पण प्रत्यक्ष बीच रिसॉर्टचा रिव्यू चांगला होता. बुकिंग तसं महाग होतं आणि त्यात हे रिसॉर्ट कर्नाटक सरकारद्वारा चालवले जाते म्हणून कसं असेल ह्याबद्दल मन जरा साशंकच होतं. नेट वर पाहिलं तर रिव्यू चांगला होता. अर्थात काही ठिकाणी under utilize असा उल्लेख होता पण बहुतेक सर्व लोकांनी या ठिकाणाला पसंती दर्शवली होती. म्हटलं तसं ही काही मिळत नाही तर करून टाकु बुकिंग. ऑनलाइन बुकिंग सेवा आहे आणि अगदी तत्पर. मी तिथे चौकशीची नोंद केल्यावर काही तासात त्यांनी फोन करून शेवटची काही कॉटेज शिल्लक आहेत असं कळवलं. मी पण फार आढे वेढे न घेता त्याच दिवशी बुकिंग करून टाकलं.

ठरल्याप्रमाणे ३०च्या रात्री बंगलोरहून आम्ही निघालो. देवबाग कारवारमध्ये आहे. दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही कारवारला पोहोचलो. चेकईन दुपारी बारा वाजताचे होते. आत्ता इतका वेळ काय करायचे हा प्रश्न. मला वाटले होते की कारवार बर्‍यापैकी मोठे शहर असेल. सकाळी फ्रेश होऊन आजूबाजूला काही भटकण्यासारखे असेल तर चक्कर मारू. पण कसलं काय? तिथे धड बस स्टॅंड देखील नव्हता. ब्रेकफास्ट करावा तर धड नीट हॉटेल नाही. शेवटी एक बर्‍यापैकी हॉटेल दिसले तिथे टिपिकल डोसा वैगरे खाऊन घेतला. तिथे जवळपास काही बघण्यासारखे आहे का अशी चौकशी केली तर कारवार बीच सोडून दुसरं काही ऐकू आले नाही. आत्ता इतक्या सकाळी बीचवर खो-खो खेळायला बसलेली लोकं थोडीच पाहायची होतीत?

दुसरा काही मार्ग नव्हता म्हणून सरळ देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला फोन लावला. तर त्यांनी ऑफीसला या असे सांगितले. म्हटले चला इथे तिथे भटकत बसण्यापेक्षा सरकारी कचेरीतल्या बाकड्यावर बसून मख्ख चेहरे पाहत बसू. मग रिक्षा करून देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला गेलो. शहरापासून ५-६ किलोमीटर आहे. तिकडे पोहोचल्यापासून एक एक सुखद अनुभव यायला सुरूवात झाली. त्यांचे ऑफीस कारवारबीच जवळ एका बंगल्यात होते. आजूबाजूला मस्त नारळ पोफळीची झाडे. आत गेलो तर सकाळ असून ऑफीसची पुरेशी लोकं होती. चौकशी केल्यावर समजलं की ते लोकं शिफ्टमध्ये काम करतात आणि ऑफीस कायम उघडे असते. आमचे वाऊचर पाहून आधी आमची आल्याची नोंद केली आणि लगेचच आम्हाला बारा वाजेपर्यंत रहाण्यासाठी त्याच बंगल्यात वरच्या मजल्यावरची एक सुसज्ज रूम दिली. चेक-ईन/चेक-आउट हे दुपारी बारा वाजता असल्याने आणि शहरातील असुविधांचा विचार करून पर्यटकांसाठी ही सोय केलेली होती. जाताना देखील दुपारपासून ते रात्री तुमची बस/ट्रेनची वेळ होईपर्यंत तुम्ही इथे आराम करू शकता. आधीच रात्री बसमध्ये झोप नीट झाली नव्हती त्यात सरकारी कचेरीतल्या बाकड्या ऐवजी बेड मिळाल्यावर आम्ही मस्त ताणून दिली. दोन-अडीज तास झोप पूर्ण केल्यानंतर आंघोळ वैगरे करून आम्ही रिसॉर्टला जायला तयार झालो. तोवर इतर लोकं देखील आली होती. मग तिथून बोटीत बसून आम्ही रिसॉर्टला जायला निघालो. रिसॉर्ट म्हणजे तसं पूर्ण बेटावर वसलेलं नाही. एका बाजूने जमिनीला जोडलेले आहे. पण शहराच्या दिशेने पाहिलं की दर्शनी भागाकडून ते पाण्यात आहे असे वाटते. त्यात बोटराइडचा आनंद मिळावा म्हणून पर्यटकांना बोटीने रिसॉर्टला घेऊन जातात. १५-२० मिनिटांच्या बोटराइड नंतर आम्ही तिकडे पोहोचलो.

बोटीतून खाली उतरल्या उतरल्या सुरुची दाट झाडी सुरू होते. सुरुवातीलाच जंगल लॉजेस अँड रिसॉर्टचा फलक आहे. सुरूच्या बनातून एक पायवाट आत जाते. समुद्रावरचा वारा सुरुच्या झाडामधून वाट काढत सूss सूss आवाज करत जात होता. आजूबाजूचे वातावरण पाहाता सगळे अपेक्षेपेक्षा चांगले अनुभवायला मिळत होते. ८-१० वर्षा पुर्वी रत्नागिरीलादेखील भाट्ये समुद्रकिनारी असलेल्या नारळ संशोधनकेंद्रासमोर समुद्रावरुन येणार सोसाट्याचा वारा अडावा म्हणून दाट सुरूची झाडी होती. पण तिथे येणार्‍याजाणार्‍यावर बंधन नसल्याने ती हळू हळू कमी झाली. येणारे जाणारे ह्यामध्ये सुरुबनात चाळे करायला येणार्‍या लोकांचाच जास्त भरणा होता. त्यात पावसाळ्यात वादळाने पडलेली झाडे जवळपासची लोकं जळणासाठी लाकूडफाटा म्हणून वापरु लागली. पुढे पुढे तर लोकांनी जळणासाठी झाडे तोडून देखील नेली पण पुन्हा झाडे लावण्याचे कुणाच्या मनात आलेले नाही. त्या दृष्टीने कर्नाटक सरकारने देवबागला सुरुबनाचा पर्यटनासाठी खूप चांगला वापर करून घेतला आहे. असो...

१०-१५ मिनिटे चालल्यानंतर कॉटेज दिसू लागली. सुरुवातीला काही चिरेबंदी कॉटेज लागली. ती बहुतेक नवीन बांधलेली दिसत होती. तिथे एकूण १५ कॉटेज आहेत. सर्व एसी. पुढे गेलो तशी पुर्वी बांधलेली, जमिनीपासून उंचावर असलेली लाकडी कॉटेज होती. प्रत्येक कॉटेजसमोर सुरूच्या झाडामध्ये बांधलेला झुला. आमच्या सुदैवाने आम्हाला वुडन फ्लोअर असलेलं लाकडी कॉटेज मिळालं. कॉटेज देखील आतमधून एकदम प्रशस्त आणि सुसज्ज. सगळी सोय बघून इथे येण्याचा खेळलेल्या जुगारातून जॅकपॉट लागल्याचे समाधान मिळाले. बरं बायकोला नेहमीप्रमाणे काहीच न सांगितले असल्याने तिच्यासाठी तर मस्त सरप्राइज होते. खरं तर मला देखील आधी काय आणि कसं असेल ह्याची काहीच माहिती नसल्याने माझ्यासाठीसुद्धा मोठे सरप्राइजच होते.

कॉटेजमध्ये फ्रेश होऊन आजुबाजूला काय काय आहे त्यावर नजर टाकतो तोच जेवणाची वर्दि घेऊन एक जण आला. अरे हो एक सांगायाचेच राहीले. इथले लोकं कोंकणी भाषा बोलतात. कन्नड पण चालते पण आम्ही सकाळपासून लोकांचे बोलणे ऐकत होतो ते यंडूगुंडू नव्हते. बर्‍यापैकी कळत होते. त्यांना पण आम्ही आपापसात काय बोलतो ते थोडे फार कळत होते. कॉटेज दाखवायला जो मुलगा आमचे सामान घेऊन आला आमच्या बरोबर आलेला तोच पुन्हा जेवाणाचा निरोप घेऊन आलेला. आम्हाला मराठीत बोलताना ऐकले असल्याने त्याने सरळ "१ वाजल्या पासून गोलघरमध्ये जेवण सुरू होते" असा शुद्ध मराठीत निरोप दिला. सुरूबनात मधोमध गोलघर आहे. नावाप्रमाणेच गोलबांधणीचे. तिथे डायनिंगची सोय आहे. सगळं बुफे पद्धतीने. दुपारचे जेवण आणि संध्याकाळी स्नॅक्स/चहापाणी गोलघरमध्ये. स्नॅक्सनंतर समुद्रात तासाभराची बोटराइड, रात्री बार्बीक्‍यू, ड्रिंक्स आणि जेवण समुद्रकिनारी वाळूत कॅंपफायरमध्ये. भल्या सकाळी ६:३० वाजता Nature Walk आणि त्यानंतर पुन्हा गोलघरमध्ये ब्रेकफास्ट आणि दुपारी चेकआउट असा २४ तासांचा कार्यक्रम होता जो दुपारच्या जेवणापासून सुरू होतो.



भुका लागल्याच होत्या. नॉनव्हेज मेनुमध्ये फिश् फ्राय आणि मटण होते. भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर कोकण किनारपट्टी आणि मंगलोर, कारवारमध्ये काही फरक नाही. फक्त मंगलोर, कारवार कर्नाटकात येत असल्याने भाषा सोडली तर जेवणाखाण्याच्या पद्धती बर्‍याचश्या सारख्या आहेत. निदान फिश्-फ्राय, माश्याचे कालवण ई प्रकार तरी अगदी रत्नागिरी सारखे. इथली लोकं देखील तांदळाची भाकरी खातात, तांदळाच्या भाकरीला अक्की रोटी म्हणतात इतकचं. देवबाग समुद्र किनारीच मग काय मासा एकदम ताजा होता. भुकेच्या गडबडीत कॉटेज सोडताना कॅमेरा विसरलो. तसं ही मच्छी पुढयात आली की फोटो वैगरे काढायचे लक्षात राहात नाही. जेवाणात इतरही प्रकार होते पण नेटवरच्या रिव्यूप्रमाणे जेवणात (नॉनव्हेज सोडता) जरा सुधारणा करायला वाव आहे. आम्ही सगळ्याची थोडी थोडी चव घेऊन मुख्य:त फिश्-फ्राय आणि चपात्या हाणल्या. जेवण जरा जडच झाले म्हणून आजूबाजूला फेर फटका मारायला निघालो. गोल घराला लागूनच टीव्ही रूम आहे. ती देखील गोल घरासारखीच गोल. एकीकडे टीव्ही आणि समोर गोलाकार मांडलेल्या खुर्च्या. गोलघर आणि टीव्हीरूम लाकडी पुलाने जोडलेली आहे. टीव्ही पहात जेवायची सवय असेल तर जेवण घेऊन इथे बसू शकता.

जवळच काही अंतरावर टेंट ठोकलेले दिसले. जेंव्हा कॉटेज फुल्ल होतात किंवा जे कुणी ८-१० च्या ग्रूपने येतात त्यांची सोय टेंटमध्ये केली जाते. हे टेंट देखील अगदी सुसज्ज आहेत. आतमध्ये डबल बेड, छोटे टेबल, सामान ठेवायला खण. तीन बेड असलेले देखील २-३ टेंट होते. ह्या टेंटचा दुसरा उपयोग म्हणजे दुपारी १२ वाजता चेक-आउट केल्यानंतर जर का तुम्हाला संध्याकाळपर्यंत बीचवर वेळ घालवायचा असेल तर कॉटेज मधून तुम्हाला टेंटमध्ये शिफ्ट करून देतात. तेदेखील विनामूल्य.

बीचवर काही वेळ भटकून आम्ही पुन्हा कॉटेजवर परतलो. ४ वाजता चहा घेऊन बोटराइडचा प्लान होता. तासाभराच्या बोटराइडमध्ये बीचजवळ समुद्रात आत ३ छोटी बेटे आहेत त्याला फेरी मारुन आणतात. त्या बेटांच्या थोडं पुढे खोल समुद्रात डॉल्फिनचे दर्शन देखील होते. मधूनच पाण्यावर येणारे काही डॉल्फिन दिसायचे पण 'तो बघ', 'तिकडे बघ' असे म्हणे पर्यंत ते पटकन गायब व्हायचे. बरेचदा सूर मारल्यानंतरच्या त्यांच्या शेपट्याच दिसायच्या. बरोबर गाईड होता. तो इंग्रजी, हिंदी, कन्नड अश्या प्रत्येकाच्या सोयीनुसार सगळ्या भाषेत माहिती देत होता. जर कधी वारे जोरात वहात असतील तर ही बोटराइड दुसर्‍या दिवशी सकाळी ठेवतात किंवा रद्द देखील करतात. आमच्या नशिबाने त्या वेळी वातावरण खूप छान होते. बोटराइड वरुन परत आल्यावर आम्ही पुन्हा बीचच्या दिशेने निघालो. येणार्‍या जाणार्‍या लोकांवर निर्बंध असल्याने बीच एकदम स्वच्छ आहे. कुठे ही फोडलेल्या बाटल्या, प्लास्टिक, समुद्रातून वहात आलेला कचरा नाही. सरकारी काम असलं तरी सगळी व्यवस्था चोख होती. कॉटेज आणि गोल घर ही बांधकामे सोडली तर तिथे बाकी काही विशेष बदल केलेले नाहीत. त्यामुळे च तिथे त्या नैसर्गिक वातावरणाचा जास्त आनंद मिळतो. उगीचच उंट घोडे आणून, पाळणे लावून तिथे कमर्शियलगिरी केलेली नाही. मी समुद्र किनारीच लहानचा मोठा झाल्याने बीच वैगरे गोष्टींचे मनाला फार कौतुक वाटत नाही पण तरीदेखील व्यापारीकरणापासून अलिप्त असा तो शांत आणि स्वच्छ देवबाग बीच भावला एवढे मात्र नक्की.

२०१० च्या शेवटच्या सुर्यास्ताचा आनंद घ्यायला सगळे किनार्‍यावर जमले होते. बहुतेक सगळ्या फॅमिलीज होत्या. थोड्याच वेळाने मघाशीच फिरून आलेल्या त्या छोट्या छोट्या बेटांच्या पाठीमागे सुर्यनारायण मावळतीला आला. १०-१५ मिनिटे सूर्यास्ताच्या मस्त वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. सूर्यास्तानंतर किनार्‍यालगत एका ठिकाणी कॅम्पफायरची तयारी सुरू झाली. बाजूलाच बार्बीक्‍यूसाठी निखारे फुलू लागले होते. दुपारचे जेवण अजुन जिरले नव्हते पण बार्बीक्‍यूची तयारी पाहून पुन्हा हाणायला तयार होण्यासाठी आम्ही त्या संधीप्रकाशात पुन्हा बीचवर भटकून घेतले. फेरफटका मारुन परत आलो तर कॅंपफायर धगधगत होते. आजुबाजूला गोलाकार खुर्च्या मांडल्या होत्या. स्नॅक्स तयार होता. ज्यांना ड्रिंक्स हवीत त्यांच्यासाठी एका बाजूला वेगळी सोय होती. एकंदरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मस्त माहौल तयार झाला होता.

तश्या सगळ्या फॅमिलीज असल्याने ३१ डिसेंबरच्यावेळी असतो तसा फार धांगड धिंगा नव्हता. एकमेकांशी फार ओळख नसल्याने सगळेजण आपल्या आपल्या ग्रूपमध्ये होते. लवकरच मिक्स भजी, चिकन चिली, व्हेज ६५ असा रुचकर आणि अप्रतिम स्नॅक्स सर्व्ह केला गेला. हळू हळू गारठा वाढु लागला तस तसे सगळे खुर्च्या ओढून कॅम्पफायरच्या जवळ येऊ लागले. जवळच समुद्राच्या लाटांचा संथ आणि लयबद्ध आवाज येत होता. एकदम परफेक्ट अशी संध्याकाळ आम्ही अनुभवत होतो. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने तिथे काही वेगळे होते अश्यातला भाग नाही. तिथल्या कर्मचार्‍यासाठी तो रूटिनचा भाग होता. एका अर्थी सरकारी आळस किंवा निष्क्रियाता का काय ती थोडीफार जाणवली. कदाचित ३१ डिसेंबरच्या मुहूर्तावर नेहमी दिसणारा झगमगाट आणि गोंधळ तेथे नव्हता म्हणून देखील असं वाटलं असण्याची शक्यता आहे. अधून मधून ते कॅम्पफायरमध्ये लाकडे लावून जात होते. चांदणे फार नव्हते त्यामुळे कॅंप फायरच्या उजेडातच सगळे व्यवहार सुरू होते. थोड्यावेळाने काही लोकं आपापल्या कॉटेजच्या दिशेने पांगली आणि कपडे वैगरे बदलून पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी तिथेच एकत्र जमली. जेवण दुपारपेक्षा छान होते. आलू-पालक तर अप्रतिम होता. कदाचित दुपार पासून यथेच्छ नॉनव्हेज खाऊन झाले असल्याने आम्हाला तो पालक रुचकर लागला असेल. असो जेवणानंतर पुन्हा बीचवर जवळच फेर फटका मारुन नंतर कॅम्पफायरमधली लाकडे वर खाली करत शेकोटी करीत बसलो होतो. कॅम्प फायरची मज्जा लुटण्याचे खूप जुने स्वप्न पूर्ण झाले होते. कोकणातले शिमग्याचे दिवस, समुद्र, काळोख आणि घनदाट सुरूबन यावरून लहानपणीच्या भुताखेतांच्या गोष्टी असे करता करता बारा वाजले. नाही म्हणायला त्या दिवशी देवबाग बीचवर देखील थोडी आतषबाजी केली गेली. हॅपी न्यू ईअरचा नारा झाला. फोनाफोनी सुरू झाली. त्या शांततेत वेगवेगळ्या रिंगटोनचे आवाज येऊ लागले. बीचवरुन समोरच कारवार शहरातून आकाशात सोडले जाणारे फटाके दिसत होते. ती रोषणाई बघून साधारण १ च्या सुमारास आम्ही सगळे आपापल्या कॉटेजवर परतलो. सकाळी लवकर उठून सुर्योदयाबरोबर नवीन वर्षाचे स्वागत करायचे होते नां!!!

ShareThis