सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नववर्षाचे स्वागत करायला कारवारला देवबाग बीचवर आलोय. २०१० ची सुरूवात स्कंधगिरीवरुन सूर्योदय पाहून केली होती त्यामुळे २०१० चा शेवट सूर्यास्ताने. बाकी यंदा जास्त फिरणे झाले नाही म्हणून आत्ता २०११ चा पहिला विकांत देवबाग आणि मुरुड़ेश्वर फिरून साजरा करणार. परतलो की पोस्ट लिहायचा विचार आहे पण ईग्रहांची महादशा अजुन संपली नसल्याने आजकाल ब्लॉगिंग पूर्णपणे थंडावले आहे. संकल्प सोडत नाही पण निदान २०११ मध्ये तरी लिखाण नियमीत सुरू व्हावे असे मनापासून वाटते. पाहू...
२०१० चा निरोप घेऊन मावळलेला सुर्यनारायण...
जाता जाता नवीन वर्षासाठी म्हांराजाकं गार्हानं घालतायं.
रे म्हांराजा !!!!!
बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्हाणं घालतायं रे म्हांराजा !!!
ह्या सरत्या साला बरोबर हे भ्रष्टचारी, त्यांचे घोटाले, महागाई पण नष्ट होऊदें...
व्हयं म्हांराजा !!!
लोकांच्या ईडा-पीडा त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाइतक्याच टिकूदें...
व्हयं म्हांराजा !!!
कांदाभजी परत रस्त्यावरच्या गाडीवर मिलूदें...
व्हयं म्हांराजा !!!
सगळ्यांका चांगली बुद्धी आणि आरोग्य लाभूदें...
व्हयं म्हांराजा !!!
आणि येता नवीन वर्ष सगळ्यांका सुखसमृद्धी आणि भरभराटीचो जावंदे...
व्हयं म्हांराजा !!!
Friday, December 31, 2010
Tuesday, September 21, 2010
ई ग्रहांची महादशा
गेले दीड वर्ष बी.एस्.एन्.एल्.चे इंटरनेट वापरतोय. आत्तापर्यंत सरकारी काम म्हणून कधी बी.एस्.एन्.एल्.चे कुठलेही कनेक्शन घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. एका शनिवारी सकाळी चहा प्यायला म्हणून बाहेर पडलेलो. चहा पिता पिता बी.एस्.एन्.एल्.ने रस्त्यावर लावलेला स्टॉल दिसला. बी.एस्.एन्.एल्.चा आधून मधून ग्राहक मेळावा भरतो आणि त्या दोन तीन दिवसांमध्ये फुकट सिम कार्ड, ज्यादा टॉक टाइम, बिना डीपॉझीट नवीन ब्रॉडबॅंड कनेक्शन वैगरे वैगरे स्किम असतात. मित्र म्हणाला अरे तसही डीपॉझीट वैगरे काही घेत नाही आहेत तर भर अर्ज. मग काय पत्ता लिहून आलो. मोडेम आणि फोन वैगरे माझ्याकडे होताच. त्यामुळे मला केवळ इंटरनेटचे बिल भरायला लागणार होते. मग आम्ही "आज अर्ज दिलाय, आत्ता हे येतील एक वर्षांनी" अश्या गप्पा मारत घरी आलो आणि विसरून पण गेलो. पण झालं भलतचं सोमवारी दुपारीच मोबाइल थरथरला.
मी: हॅलो
पलीकडून: साssssर, बी.एस्.एन्.एल्.कनेक्सन.
मी: हू ईज़ धिस?
पलीकडून: साssssर तमिल, तेलगू, कन्नडा?
आयला ह्यांच्यासाठी तमिल, तेलगू, कन्नडा झालं की थेट पाकिस्तान आणि नेपाळची बॉर्डर लागते. मध्ये बाकी कुणी नाहीच. मराठी सोडा राष्ट्रभाषा पण फाट्यावर?
मी: (मनात: हाड् रे) हिंदी हिंदी.
पलीकडून: साssssर बी.एस्.एन्.एल्. कनेक्सन होना ?
मी: हां हां मैने अप्लिकेशन किया था.
पलीकडून: हा करेक्ट साssssर.
मी: कब मिलेगा कनेक्शन?
पलीकडून: अब्बी.
मी: अभी? अभी तो मैं ऑफीस मे हूँ.
पलीकडून: आय यॅम इन फ्रंट ऑफ युवर हौस नो? कम नाऊ ओन्ली.
नशिबाने ऑफीस पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी त्याची नाऊ ऑर नेव्हर ऑफर स्वीकारून लगेच रूमवर पोहोचलो. पुढच्या दहा मिनिटात सगळं जोडून माणूस (पैसे न मागता) निघून गेला देखील. बी.एस्.एन्.एल्.चं असं सुसाट काम बघून माझा विश्वासच बसत नव्हता. ऑफीसच्या लोकांनाही ही गोष्ट पचनी पडली नाही. त्यातल्या काही बुजुर्ग लोकांनी "अरे आत्ता बघ रोज रोज डिसकनेक्ट झाल्याच्या तक्रारी करायला बी.एस्.एन्.एल्. ऑफीसच्या वार्या करायला लागतील" असा आशीर्वाद दिला. पण नाही. तो ते कनेक्शन जोडुन गेल्या पासून पुढची दीड वर्षे मी ती रूम बदले पर्यंत काडीचीही तक्रार नाही. केवळ वेळेवर बिल भरा आणि सेवेचा आनंद घ्या. बिलात देखील कधी चुकीचे रीडिंग नाही की भरमसाठ रक्कम नाही. ह्याच बी.एस्.एन्.एल्.च्या कृपेमुळे ब्लॉग देखील सुरू झाला. जमेल तसं लिखाणं झालं. बी.एस्.एन्.एल्.बद्दल असलेलं माझं मत पूर्ण बदललं होतं. प्राइवेट कनेक्शन वापरणार्या माझ्या एक दोन मित्रांना पण मी पुढच्या मेळाव्यावर लक्ष ठेवा आणि बी.एस्.एन्.एल्. चं ब्रॉड बॅंड घ्या असं सांगून ठेवलं.
सगळं कसं सुरळीत सुरू होतं. मे महिन्याची सुट्टी संपवून हापूस आंब्याचे फोटो ब्लॉगवर टाकले आणि जून अखेरीस ग्रह फिरले. नवीन जॉब जॉइन केला त्याच बरोबर आधीच्या मालकाने भाडेवाढ मागीतल्याने त्याच गल्लीत चार घरं सोडून नवीन रूमवर शिफ्ट देखील झालो. नवीन नोकरीत आणि नवीन जागेत इतर गोष्टी सुरळीत सुरू झाल्या मात्र माझ्या पत्रिकेतले ई-ग्रह मात्र बिघडले. त्यांची महादशा सुरू झाली. नवीन प्रॉजेक्टमध्ये बाहेरच्या सगळ्या साइट्स ब्लॉक. ब्लॉगिंग सोडा पर्सनल ई-मेल्सदेखील वाचता येईनात. म्हटलं नवीन रूम त्याच गल्लीत आहे बी.एस्.एन्.एल्. ब्रॉडबॅंड कनेक्शन पटकन जोडुन देतील. जुलैच्या पहिल्याच विकांताला जाऊन त्याबद्दल अर्ज देऊन आलो. म्हटलं नवीन कनेक्शन फटकन दिलं तर हे रिलोकेशन रातोरात करून टाकतील. पण नाही. ई-ग्रहसौख्य पूर्ण बिघडून गेलेलं होतं. पूर्ण आठवडा गेला तरी साधा फोन देखील नाही. शनिवारी बी.एस्.एन्.एल्. ऑफीसला चक्कर टाकून आलो तर संबंधित माणसे गायब. कुठे तरी मोठा लोचा झालेला तो सोडवात बसलेले. आत्ता माझं नवीन ऑफीस लांब गेल्याने सोमवार ते शुक्रवार काहीच करता येईना. दोन आठवड्यानंतर संबंधित माणूस भेटला एकदाचा. इथल्या प्रथेप्रमाणे त्याचंही नावं श्रीनिवास होतं. मी माझी शिफ्टिंगची वर्कऑर्डर त्याच्या पुढयात धरली. ती हातात धरून एखाद्या माणसाची पत्रिका पाहावी तशी पहात २-३ मिनिटे काहीतरी गूढ विचार करीत बसला. थोड्यावेळाने त्याने गंभीर शब्दात समस्या सांगितली
श्रीनिवास : "साssर, केबल नही है".
मी: क्या??? केबल नही?
श्रीनिवास : हा स्टोर रूम ने भी नही. आप अपना नंबर दो मुझे मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ.
मी आपला नंबर देऊन आलो पण पुन्हा आठवडा भर काहीच हालचाल नाही. साहेबांना फोन केला तर साहेब फोन उचलतील तर हराम. महिना होऊन गेला पण रूमवर ब्रॉडबॅंडचा काहीच पत्ता नाही. महिना अखेरीस बी.एस्.एन्.एल्.ने न वापरलेल्या इंटरनेटचे बिलमात्र नवीन पत्त्यावर पाठवून आपली तत्पर सेवा दाखवून दिली. त्याच्या पुढच्या शनिवारी ते बिल घेऊन बी.एस्.एन्.एल्.च्या ऑफीस मध्ये गेलो. म्हटलं इंटरनेटचा पत्ता नाही आणि हे बिल कुठून आले? तर म्हणतात कसे "ते तुम्ही इंजिनियरला विचारा. आम्ही फक्त बिलं बघतो." श्रीनिवासच्या थोबाडासमोर बिल नाचवलं तर त्याचं पुन्हा "साssर, केबल नही है". म्हटलं अरे महिना उलटून गेला तरी बी.एस्.एन्.एल्.कडे केबल नाही सांगताना लाज वाटतं नाही का? त्याच्यावर काही परिणाम दिसला नाही. मागच्यावेळीप्रमाणे "मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ" सांगून मला मार्गाला लावला. सर्वीस नसताना बिल कसं काय आलं हे विचारायला तिथल्या वरिष्ठ अधिकार्याकडे गेलो तर तो म्हणे "डोण्ट वरी साssर. वी विल कॅन्सल इट नो." कॅन्सल कसलं डोंबलाचं आधीच्या महिन्याची लेट फी मिळवून दर महिना बिल येतय. मध्यंतरी माझ्या बोलण्यातून हा विषय घरी बाबांना पण कळला होता. ते म्हणाले अरे दे १०० रुपये, करेल काम सटकन. मी म्हटलं त्याला हवे तर त्याने हात पसरून मागवेत. मी स्वत:हून देणार नाही. भीक हवी तर भीक मागण्यात लाज कसली? आणि मला असं दोन महिने पिळल्यानंतर आत्ता तर मी त्याला xxदेखील देणार नाही.
हळूहळू कामाच्या गडबडीत बी.एस्.एन्.एल्.चा नाद सोडून दिला. दरम्यान ह्या महादशेतून एक दोन ग्रह हटले आणि महिनाभरात मला दुसरा प्रॉजेक्ट मिळाला. आत्ताच्या ह्या प्रॉजेक्टमध्ये कुठलीही साइट ब्लॉक नाही. त्यामुळे ऑफीसमधून का होईना इंटरनेट वापरायला मिळतं. अधूनमधून बझता येतं. बी.एस्.एन्.एल्.कडून पुन्हा कनेक्शन मिळेलं ही अशा सोडली आहे तरी पण परवा पुन्हा सहजच त्यांची छेड काढायला गेलो. पाहतो तर श्रीनिवासकडे नेहमीप्रमाणे कुणीतरी आपले गार्हाणे घेऊन उभा होता आणि श्रीनिवास आपल्याकडच्या कागदावर काहीतरी लिहून घेत होता.
मी: क्या ये आप से अपना नंबर मांग रहे है?
पीडीत: हां
मी: इसने कहा की ये आप को दो बजे कॉल करेगा?
इतकं अचूक निदान ऐकल्यावर त्या पीडीत माणसाबरोबर श्रीनिवासनेदेखील चमकून वर पाहिले. मला पाहून तो काही बोलणार इतक्यात
मी: इसने बहूत लोगोंक को कहा है की ये दो बजे कॉल करेगा. क्या है ना इसे सिर्फ दो बजे फ्री कॉलिंग होता है. आज दो बजे तो आप का नंबर नाही लगने वाला क्यों की मैं पहलेसे लाइन मे हूं और मुझे दो महिने से कभी कॉल नही आया. अगर आप चाहते हो की ये आपको कॉल करे तो इसे ५० पैसा दे दो.
मग श्रीनिवासकडे वळून
मी: बराबर है ना? आपको आउट गोइंग ५० पैसा ही है ना?
त्याला काही बोलू न देता पुन्हा त्या पिडीताला उद्देशून
मी: चलो छोड दो. आप पुरा १ रुपया ही दे दो. पक्का कॉल आयेगा.
पुन्हा श्रीनिवासकडे वळून
मी: ठीक है ना?
ह्या दरम्यान श्रीनिवासच्या चेहर्यावर "हा आत्ता कुठून उपटला" पासून "क्या बात करते साssर", "हो", "नाही", "अबे चूप" असे सगळे भाव झरझर उमटत होते. माझा बोलण्याचा पवित्रा पाहून ह्या वेळी मी कनेक्शन कधी देताय हे विचारायला आलेलो नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. तरी पण काहीतरी सबळ आणि नवीन कारण देण्यासाठी त्याने तोंड उघडले.
श्रीनिवास: साssर, ऐसा नही है साssर. आप बोलते ऐसा क्या भी नाही होता.
मी मात्र माझ्या भलत्याच मुद्द्यावर ठाम.
मी: क्यों आप को दोपहर दो बजे फ्री कॉलिंग नही होता? तो कब होता है? आप तो सब को दो बजे हो बोलते हो.
श्रीनिवास: (त्रासून तरी पण शक्य तितक्या समजावणीच्या सुरात) नही साssर. क्या है ना पहले हमारे पास केबल नही था. अब केबल आया पर उस के लिये रास्ता खोदना पडता. मुन्सिपालटी उसका पर्मिसन नही देता.
मी: तो अब क्या? मैं क्या करू?
श्रीनिवास: क्या बी नही . जैसे ही काम होगा मैं आप को कॉल करूंगा.
मी: (जाता जाता) हा ठीक है, लेकिन बस दोपहर को दो बजे कॉल मत करना. क्या है दो बजे मैं थोडा ज्यादा बिज़ी रहता हूँ. आप कॉल करो. काम होते ही आप के कॉल का पैसा मैं आपको लौटा दूँगा.
एवढे बोलून अजुन काही आणा भाका न घेता मी तिकडून बाहेर सटकलो.
तर असं आहे. सध्या नवीन प्रॉजेक्टमध्ये काम पण खूप आहे त्यामुळे ऑफीसमध्येच जास्त वेळ जातो. ऑफीसच्या जवळच नवीन रूम पहावी म्हणतो त्यामुळे सध्यातरी नवीन कनेक्शन घ्यायचा विचार नाही. ऑफीसमध्ये वेळ मिळाला तशी ही पोस्ट टंकली. बी.एस्.एन्.एल्.बद्दल बोलायचं तर अपेक्षाभंग नक्की कधी झाला हे कळत नाही? अपेक्षा नसताना मिळालेल्या सेवेमुळे की त्यांनी आपली औकात दाखवून दिली तेंव्हा?
असो. आत्ता पाहू ई-महादशा कधी संपते आणि पुन्हा कधी घरून विकांताला मस्त लोडाला टेकून वाचन सुरू होतं. कोकणात असतो तर एखाद्या भगताकडून श्रीनिवासचे भूत उतरवले असते (की त्याच्या मानेवर बसवले असते?). सध्या तरी ह्या ईहलोकात असून ई-लोकात येण्याजाण्यावर काही निर्बंध आले आहेत हे नक्की.
मी: हॅलो
पलीकडून: साssssर, बी.एस्.एन्.एल्.कनेक्सन.
मी: हू ईज़ धिस?
पलीकडून: साssssर तमिल, तेलगू, कन्नडा?
आयला ह्यांच्यासाठी तमिल, तेलगू, कन्नडा झालं की थेट पाकिस्तान आणि नेपाळची बॉर्डर लागते. मध्ये बाकी कुणी नाहीच. मराठी सोडा राष्ट्रभाषा पण फाट्यावर?
मी: (मनात: हाड् रे) हिंदी हिंदी.
पलीकडून: साssssर बी.एस्.एन्.एल्. कनेक्सन होना ?
मी: हां हां मैने अप्लिकेशन किया था.
पलीकडून: हा करेक्ट साssssर.
मी: कब मिलेगा कनेक्शन?
पलीकडून: अब्बी.
मी: अभी? अभी तो मैं ऑफीस मे हूँ.
पलीकडून: आय यॅम इन फ्रंट ऑफ युवर हौस नो? कम नाऊ ओन्ली.
नशिबाने ऑफीस पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी त्याची नाऊ ऑर नेव्हर ऑफर स्वीकारून लगेच रूमवर पोहोचलो. पुढच्या दहा मिनिटात सगळं जोडून माणूस (पैसे न मागता) निघून गेला देखील. बी.एस्.एन्.एल्.चं असं सुसाट काम बघून माझा विश्वासच बसत नव्हता. ऑफीसच्या लोकांनाही ही गोष्ट पचनी पडली नाही. त्यातल्या काही बुजुर्ग लोकांनी "अरे आत्ता बघ रोज रोज डिसकनेक्ट झाल्याच्या तक्रारी करायला बी.एस्.एन्.एल्. ऑफीसच्या वार्या करायला लागतील" असा आशीर्वाद दिला. पण नाही. तो ते कनेक्शन जोडुन गेल्या पासून पुढची दीड वर्षे मी ती रूम बदले पर्यंत काडीचीही तक्रार नाही. केवळ वेळेवर बिल भरा आणि सेवेचा आनंद घ्या. बिलात देखील कधी चुकीचे रीडिंग नाही की भरमसाठ रक्कम नाही. ह्याच बी.एस्.एन्.एल्.च्या कृपेमुळे ब्लॉग देखील सुरू झाला. जमेल तसं लिखाणं झालं. बी.एस्.एन्.एल्.बद्दल असलेलं माझं मत पूर्ण बदललं होतं. प्राइवेट कनेक्शन वापरणार्या माझ्या एक दोन मित्रांना पण मी पुढच्या मेळाव्यावर लक्ष ठेवा आणि बी.एस्.एन्.एल्. चं ब्रॉड बॅंड घ्या असं सांगून ठेवलं.
सगळं कसं सुरळीत सुरू होतं. मे महिन्याची सुट्टी संपवून हापूस आंब्याचे फोटो ब्लॉगवर टाकले आणि जून अखेरीस ग्रह फिरले. नवीन जॉब जॉइन केला त्याच बरोबर आधीच्या मालकाने भाडेवाढ मागीतल्याने त्याच गल्लीत चार घरं सोडून नवीन रूमवर शिफ्ट देखील झालो. नवीन नोकरीत आणि नवीन जागेत इतर गोष्टी सुरळीत सुरू झाल्या मात्र माझ्या पत्रिकेतले ई-ग्रह मात्र बिघडले. त्यांची महादशा सुरू झाली. नवीन प्रॉजेक्टमध्ये बाहेरच्या सगळ्या साइट्स ब्लॉक. ब्लॉगिंग सोडा पर्सनल ई-मेल्सदेखील वाचता येईनात. म्हटलं नवीन रूम त्याच गल्लीत आहे बी.एस्.एन्.एल्. ब्रॉडबॅंड कनेक्शन पटकन जोडुन देतील. जुलैच्या पहिल्याच विकांताला जाऊन त्याबद्दल अर्ज देऊन आलो. म्हटलं नवीन कनेक्शन फटकन दिलं तर हे रिलोकेशन रातोरात करून टाकतील. पण नाही. ई-ग्रहसौख्य पूर्ण बिघडून गेलेलं होतं. पूर्ण आठवडा गेला तरी साधा फोन देखील नाही. शनिवारी बी.एस्.एन्.एल्. ऑफीसला चक्कर टाकून आलो तर संबंधित माणसे गायब. कुठे तरी मोठा लोचा झालेला तो सोडवात बसलेले. आत्ता माझं नवीन ऑफीस लांब गेल्याने सोमवार ते शुक्रवार काहीच करता येईना. दोन आठवड्यानंतर संबंधित माणूस भेटला एकदाचा. इथल्या प्रथेप्रमाणे त्याचंही नावं श्रीनिवास होतं. मी माझी शिफ्टिंगची वर्कऑर्डर त्याच्या पुढयात धरली. ती हातात धरून एखाद्या माणसाची पत्रिका पाहावी तशी पहात २-३ मिनिटे काहीतरी गूढ विचार करीत बसला. थोड्यावेळाने त्याने गंभीर शब्दात समस्या सांगितली
श्रीनिवास : "साssर, केबल नही है".
मी: क्या??? केबल नही?
श्रीनिवास : हा स्टोर रूम ने भी नही. आप अपना नंबर दो मुझे मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ.
मी आपला नंबर देऊन आलो पण पुन्हा आठवडा भर काहीच हालचाल नाही. साहेबांना फोन केला तर साहेब फोन उचलतील तर हराम. महिना होऊन गेला पण रूमवर ब्रॉडबॅंडचा काहीच पत्ता नाही. महिना अखेरीस बी.एस्.एन्.एल्.ने न वापरलेल्या इंटरनेटचे बिलमात्र नवीन पत्त्यावर पाठवून आपली तत्पर सेवा दाखवून दिली. त्याच्या पुढच्या शनिवारी ते बिल घेऊन बी.एस्.एन्.एल्.च्या ऑफीस मध्ये गेलो. म्हटलं इंटरनेटचा पत्ता नाही आणि हे बिल कुठून आले? तर म्हणतात कसे "ते तुम्ही इंजिनियरला विचारा. आम्ही फक्त बिलं बघतो." श्रीनिवासच्या थोबाडासमोर बिल नाचवलं तर त्याचं पुन्हा "साssर, केबल नही है". म्हटलं अरे महिना उलटून गेला तरी बी.एस्.एन्.एल्.कडे केबल नाही सांगताना लाज वाटतं नाही का? त्याच्यावर काही परिणाम दिसला नाही. मागच्यावेळीप्रमाणे "मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ" सांगून मला मार्गाला लावला. सर्वीस नसताना बिल कसं काय आलं हे विचारायला तिथल्या वरिष्ठ अधिकार्याकडे गेलो तर तो म्हणे "डोण्ट वरी साssर. वी विल कॅन्सल इट नो." कॅन्सल कसलं डोंबलाचं आधीच्या महिन्याची लेट फी मिळवून दर महिना बिल येतय. मध्यंतरी माझ्या बोलण्यातून हा विषय घरी बाबांना पण कळला होता. ते म्हणाले अरे दे १०० रुपये, करेल काम सटकन. मी म्हटलं त्याला हवे तर त्याने हात पसरून मागवेत. मी स्वत:हून देणार नाही. भीक हवी तर भीक मागण्यात लाज कसली? आणि मला असं दोन महिने पिळल्यानंतर आत्ता तर मी त्याला xxदेखील देणार नाही.
हळूहळू कामाच्या गडबडीत बी.एस्.एन्.एल्.चा नाद सोडून दिला. दरम्यान ह्या महादशेतून एक दोन ग्रह हटले आणि महिनाभरात मला दुसरा प्रॉजेक्ट मिळाला. आत्ताच्या ह्या प्रॉजेक्टमध्ये कुठलीही साइट ब्लॉक नाही. त्यामुळे ऑफीसमधून का होईना इंटरनेट वापरायला मिळतं. अधूनमधून बझता येतं. बी.एस्.एन्.एल्.कडून पुन्हा कनेक्शन मिळेलं ही अशा सोडली आहे तरी पण परवा पुन्हा सहजच त्यांची छेड काढायला गेलो. पाहतो तर श्रीनिवासकडे नेहमीप्रमाणे कुणीतरी आपले गार्हाणे घेऊन उभा होता आणि श्रीनिवास आपल्याकडच्या कागदावर काहीतरी लिहून घेत होता.
मी: क्या ये आप से अपना नंबर मांग रहे है?
पीडीत: हां
मी: इसने कहा की ये आप को दो बजे कॉल करेगा?
इतकं अचूक निदान ऐकल्यावर त्या पीडीत माणसाबरोबर श्रीनिवासनेदेखील चमकून वर पाहिले. मला पाहून तो काही बोलणार इतक्यात
मी: इसने बहूत लोगोंक को कहा है की ये दो बजे कॉल करेगा. क्या है ना इसे सिर्फ दो बजे फ्री कॉलिंग होता है. आज दो बजे तो आप का नंबर नाही लगने वाला क्यों की मैं पहलेसे लाइन मे हूं और मुझे दो महिने से कभी कॉल नही आया. अगर आप चाहते हो की ये आपको कॉल करे तो इसे ५० पैसा दे दो.
मग श्रीनिवासकडे वळून
मी: बराबर है ना? आपको आउट गोइंग ५० पैसा ही है ना?
त्याला काही बोलू न देता पुन्हा त्या पिडीताला उद्देशून
मी: चलो छोड दो. आप पुरा १ रुपया ही दे दो. पक्का कॉल आयेगा.
पुन्हा श्रीनिवासकडे वळून
मी: ठीक है ना?
ह्या दरम्यान श्रीनिवासच्या चेहर्यावर "हा आत्ता कुठून उपटला" पासून "क्या बात करते साssर", "हो", "नाही", "अबे चूप" असे सगळे भाव झरझर उमटत होते. माझा बोलण्याचा पवित्रा पाहून ह्या वेळी मी कनेक्शन कधी देताय हे विचारायला आलेलो नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. तरी पण काहीतरी सबळ आणि नवीन कारण देण्यासाठी त्याने तोंड उघडले.
श्रीनिवास: साssर, ऐसा नही है साssर. आप बोलते ऐसा क्या भी नाही होता.
मी मात्र माझ्या भलत्याच मुद्द्यावर ठाम.
मी: क्यों आप को दोपहर दो बजे फ्री कॉलिंग नही होता? तो कब होता है? आप तो सब को दो बजे हो बोलते हो.
श्रीनिवास: (त्रासून तरी पण शक्य तितक्या समजावणीच्या सुरात) नही साssर. क्या है ना पहले हमारे पास केबल नही था. अब केबल आया पर उस के लिये रास्ता खोदना पडता. मुन्सिपालटी उसका पर्मिसन नही देता.
मी: तो अब क्या? मैं क्या करू?
श्रीनिवास: क्या बी नही . जैसे ही काम होगा मैं आप को कॉल करूंगा.
मी: (जाता जाता) हा ठीक है, लेकिन बस दोपहर को दो बजे कॉल मत करना. क्या है दो बजे मैं थोडा ज्यादा बिज़ी रहता हूँ. आप कॉल करो. काम होते ही आप के कॉल का पैसा मैं आपको लौटा दूँगा.
एवढे बोलून अजुन काही आणा भाका न घेता मी तिकडून बाहेर सटकलो.
तर असं आहे. सध्या नवीन प्रॉजेक्टमध्ये काम पण खूप आहे त्यामुळे ऑफीसमध्येच जास्त वेळ जातो. ऑफीसच्या जवळच नवीन रूम पहावी म्हणतो त्यामुळे सध्यातरी नवीन कनेक्शन घ्यायचा विचार नाही. ऑफीसमध्ये वेळ मिळाला तशी ही पोस्ट टंकली. बी.एस्.एन्.एल्.बद्दल बोलायचं तर अपेक्षाभंग नक्की कधी झाला हे कळत नाही? अपेक्षा नसताना मिळालेल्या सेवेमुळे की त्यांनी आपली औकात दाखवून दिली तेंव्हा?
असो. आत्ता पाहू ई-महादशा कधी संपते आणि पुन्हा कधी घरून विकांताला मस्त लोडाला टेकून वाचन सुरू होतं. कोकणात असतो तर एखाद्या भगताकडून श्रीनिवासचे भूत उतरवले असते (की त्याच्या मानेवर बसवले असते?). सध्या तरी ह्या ईहलोकात असून ई-लोकात येण्याजाण्यावर काही निर्बंध आले आहेत हे नक्की.
Labels:
इंटरनेट,
बी.एस्.एन्.एल्.,
भ्रष्टाचार,
महादशा,
विनोदी
Wednesday, August 25, 2010
श्रावण, शाकाहार आणि आम्ही
सोमवारी रत्नागिरीच्या भैरीचा (रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी) श्रावणातला हरीनाम सप्ताह संपला आणि आज तब्बल दोन आठवड्यानी नॉनव्हेज खाल्ले. सतत उसळी, पालेभाज्या खाऊन पोटावर अमानुष अत्याचार झाले होते. श्रावण महिना म्हणजे आमच्यासारख्यांना काळ्या पाण्याची शिक्षा. आमच्या घरी रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे मांसाहार करण्याचे तीन दिवस. त्यापैकी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे कसे एकदिवासाआड येतात. रविवारनंतर बुधवारची तब्बल दोन दिवस चातकाप्रमाणे वाट पाहाणारे आम्ही, आमच्यासाठी श्रावणाचा पूर्ण महिना पाळणे म्हणजे जिभेची आणि पोटाची काय अवस्था होत असेल बरे? लहानपणापासून घरची वडीलधारी माणसे (पक्षी: महिला वर्ग) घरातल्या सगळ्यांनी (म्हणजे मुख्यत: आम्ही लहान मुलांनी, कारण मोठी माणसे (पक्षी: पुरूष वर्ग) त्यांचे ऐकत नसत) श्रावण पाळावा असा आग्रह धरत असत. आपल्या मुलाबाळानां थोडेफार पुण्य लागावे असं त्यांना वाटायचे. पण श्रावण पाळण्यावरून ह्या दोन्ही वर्गाचे (आजतागायात) कधीही एकमत न झाल्याने आणि आम्हा मुलांचा पुरूषवर्गाला मूक आणि बिनशर्त पाठिंबा असल्याने ग्रामदेवतेचा हरीनाम सप्ताह संपेपर्यंत तरी शाकाहार करावा असा एक अघोषित कायदा आमच्याकडे पाळला जातो.
हरीनाम सप्ताहादरम्यान आठ दिवस देवळात अखंड भजन सुरू असते. आत्ता आमचे ग्राम दैवत भैरी म्हणजे शंकराचे एक रूप. त्यामुळे त्याचा सप्ताह श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन दुसर्या सोमवारी म्हणजे आठ दिवसांनी संपतो. त्यामुळे शाकाहाराचा हा अघोषित नियम केवळ सोमवार ते सोमवारच्या साप्ताहा दरम्यान पाळायचा की श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावणातल्या दुसर्या सोमवारपर्यंत पाळावा ह्यावर आजही दुमत आहे. वर वर जरी हा प्रश्न अत्यंत साधा दिसत असला तरी खोलवर विचार करता तो गहन आहे. उदाहरणार्थ यंदा श्रावण मंगळवारी सुरू झाला म्हणजे श्रावणाचा पहिला सोमवार उजाडला तेंव्हा श्रावणातले पहिले ७ दिवस उलटून गेले होते. याचाच अर्थ आमच्या घरी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही हक्काचे दिवस फुकट गेले. म्हणजेच हरीनाम साप्ताहातले बुधवार, शुक्रवार आणि रविवार धरून एकूण दोन आठवडे शाकाहारी. याउलट श्रावण जर का सोमवारीच सुरू झाला तर मोजणी पहिल्या दिवसापासूनच सुरू होईल आणि एका आठवड्यात 'जन'जीवन पूर्व पदावर येईल. आत्ता ह्या विचार सरणीस आमचे आजोळ जबाबदार आहे कारण मामा मंडळी (स्त्रीवर्ग धरून बरं का) केवळ सोमवार ते सोमवार श्रावण पाळतात.
यंदा शाकाहाराचे दोन आठवडे पाहाता गटारी आमावस्येच्या (पुण्य?) दिवशी आमच्या मामामंडळीच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही केवळ हरीनाम सप्ताहादरम्यान, म्हणजे सोमवार ते सोमवार श्रावण पाळावा असा प्रस्ताव संबंधित मंडळींनी मांडला होता परंतु तो प्रस्ताव गृहखात्याने गटारीच्या मटणाच्या उरलेल्या हाडकांबरोबर केराच्या टोपलीत टाकला. उलट यंदा तसेही दोन आठवडे श्रावण पाळता आहातच तर अजुन दोन आठवडे कळ काढा आणि गौरी विसर्जनानंतरच सगळे मिळून उपवास सोडू असा उलटा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव आज मासे खाऊन आम्ही Dustbin मध्ये (ऑफीसमध्ये असल्याने) टाकला हे सांगायलाच नको. असो पुढील वर्षी मामा मंडळीचा पाठिंबा घेऊन पुन्हा हा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवायचा मनसुबा आहे. मामा लोकं बिनशर्त पाठिंबा देतीलच पण तरी देखील त्यांच्याकडून अधिक जोर लागण्यासाठी पुढील आषाढात कोलंबी, पापलेट, सरंगा, बांगड्याच्या उपस्थितीत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणी करून घेऊ म्हणतो. तूर्तास पुढील गटारीपर्यंत नियमीतपणे रविवार, बुधवार आणि शुक्रवारची वाट बघणे.
हरीनाम सप्ताहादरम्यान आठ दिवस देवळात अखंड भजन सुरू असते. आत्ता आमचे ग्राम दैवत भैरी म्हणजे शंकराचे एक रूप. त्यामुळे त्याचा सप्ताह श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन दुसर्या सोमवारी म्हणजे आठ दिवसांनी संपतो. त्यामुळे शाकाहाराचा हा अघोषित नियम केवळ सोमवार ते सोमवारच्या साप्ताहा दरम्यान पाळायचा की श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावणातल्या दुसर्या सोमवारपर्यंत पाळावा ह्यावर आजही दुमत आहे. वर वर जरी हा प्रश्न अत्यंत साधा दिसत असला तरी खोलवर विचार करता तो गहन आहे. उदाहरणार्थ यंदा श्रावण मंगळवारी सुरू झाला म्हणजे श्रावणाचा पहिला सोमवार उजाडला तेंव्हा श्रावणातले पहिले ७ दिवस उलटून गेले होते. याचाच अर्थ आमच्या घरी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही हक्काचे दिवस फुकट गेले. म्हणजेच हरीनाम साप्ताहातले बुधवार, शुक्रवार आणि रविवार धरून एकूण दोन आठवडे शाकाहारी. याउलट श्रावण जर का सोमवारीच सुरू झाला तर मोजणी पहिल्या दिवसापासूनच सुरू होईल आणि एका आठवड्यात 'जन'जीवन पूर्व पदावर येईल. आत्ता ह्या विचार सरणीस आमचे आजोळ जबाबदार आहे कारण मामा मंडळी (स्त्रीवर्ग धरून बरं का) केवळ सोमवार ते सोमवार श्रावण पाळतात.
यंदा शाकाहाराचे दोन आठवडे पाहाता गटारी आमावस्येच्या (पुण्य?) दिवशी आमच्या मामामंडळीच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही केवळ हरीनाम सप्ताहादरम्यान, म्हणजे सोमवार ते सोमवार श्रावण पाळावा असा प्रस्ताव संबंधित मंडळींनी मांडला होता परंतु तो प्रस्ताव गृहखात्याने गटारीच्या मटणाच्या उरलेल्या हाडकांबरोबर केराच्या टोपलीत टाकला. उलट यंदा तसेही दोन आठवडे श्रावण पाळता आहातच तर अजुन दोन आठवडे कळ काढा आणि गौरी विसर्जनानंतरच सगळे मिळून उपवास सोडू असा उलटा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव आज मासे खाऊन आम्ही Dustbin मध्ये (ऑफीसमध्ये असल्याने) टाकला हे सांगायलाच नको. असो पुढील वर्षी मामा मंडळीचा पाठिंबा घेऊन पुन्हा हा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवायचा मनसुबा आहे. मामा लोकं बिनशर्त पाठिंबा देतीलच पण तरी देखील त्यांच्याकडून अधिक जोर लागण्यासाठी पुढील आषाढात कोलंबी, पापलेट, सरंगा, बांगड्याच्या उपस्थितीत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणी करून घेऊ म्हणतो. तूर्तास पुढील गटारीपर्यंत नियमीतपणे रविवार, बुधवार आणि शुक्रवारची वाट बघणे.
Monday, June 14, 2010
सुट्टी संपली!!!
तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या...
Friday, April 30, 2010
फसलेली खादडी
आजपर्यंत बर्याच खादडिच्या पोस्ट वाचल्या आणि तोंडाला पाणी सुटलं. किती ही निषेध नोंदवला गेला तरी तो निषेध म्हणजे प्रोत्साहन समजून जनतेने फोटोसकट खादडी महात्म्य सुरुच ठेवले. आज मी माझी खादडीची एक आठवण लिहितोय ज्यामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटले नाही पण तोंडचे पाणी पळाले होते.
झालं काय तर अमेरिकेत असताना दर दुपारी जेवायला बाहेर जायचो. भारतातून गेलेले आम्ही दोघे, मी आणि चंद्रु, नेहमीच दुपारी बाहेर जायचो. दररोज टॅकोबेल, चिलीज्, पिझ्झाहट, बर्गर-किंग, चिपोटले, कधी चायनीज तर कधी जापनीज अश्या ठराविक ठिकाणी आलटून पालटून भेटी दिल्या जायच्या. शुक्रवारी ऑफीसचे इतर लोक देखील घरून लंचबॉक्स न आणता बाहेरच येत असतं. अश्याच एका शुक्रवारी आमच्या बरोबर आमच्या टीम मधले ३-४ अमेरिकन निघाले जेवायला. कुठे जायचं कुठे जायचं करता करता Joe's या इटालियन रेस्तोरंटला जायचे असे ठरले. तो पर्यंत मेक्सिकन, जापनीज चाखुन झालेच होते. आम्ही पण म्हटले चला आत्ता इटालियन होऊन जाऊ दे. Joe's ला गेलो. आत गेल्या गेल्या शोले स्टाइलमध्ये कितने आदमी है वैगरे विचारून झाल्यावर आम्ही सगळे मावू असे टेबल दिलं गेलं. मी, चंद्रु आणि टॉम असे तिघे बसलो. टॉम वेगन होता. हे वेगन लोकं म्हणजे नॉनव्हेज सोडाच पण दुधापासून बनलेले पदार्थ पण खात नाहीत. फक्त नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी घासपुस आणि त्यापासून बनणारे पदार्थ खातात म्हणे. इतर अमेरिकन जसे सकाळ संद्याकाळ कॉफीचा एक मोठा मग नाहीतर कोल्डड्रिंकचा टीन घेऊन फिरताना दिसायचे तिथे हा पठ्ठ्या केवळ पाणी प्यायचा. ऑफीसपार्टीला देखील डोनट सोडून कुठल्या चीज-बर्गर अश्या पदार्थांना देखील शिवायचा नाही. आधी टॉम वेगन आहे म्हणून हे सगळं खात नाही असं मला कळलं तेंव्हा वेगन म्हणजे काहीतरी रोग असावा असं मला वाटलं होतं पण वेगन हा रोग नसून तो डाएट आहे हे मला नंतर कुणीतरी सांगितलं. त्यात विकीपिडियावर वेगनबद्दल पहिल्या ओळीतच हा काय प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या पूर्णपणे विरुद्ध जीवनशैलीचा प्रकार आहे हे समजताच मी ते पेज बंद केलं. आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही तिथला पत्ता कशाला शोधा... असो. तर असा हा टॉम (बिच्चारा!!! व्यर्थ ते जीवन) त्याच्या ह्या वेगन डाएटमुळे म्हणे त्याचे विमान प्रवासात हाल व्हायचे आणि ह्या एकाच कारणामुळे तो कधी अमेरिकेबाहेर गेला नव्हता.
तर मूळ मुद्दा असा की मला आणि चंद्रुला दोघांना ही काय ऑर्डर कारायचं काहीच माहीत नव्हतं. इतर वेळी रेस्तोरंटमध्ये जायच्या आधी आम्ही लिंडाला विचारून अमुक अमुक ठिकाणी काय मागायचं ते विचारून जायचो आणि हाणून यायचो. आज बरोबर टीममधली लोकं असल्याने आम्ही लिंडाला काही न विचारता आलेलो. त्यामुळे सहाजिकच टॉमला तूच आमच्यासाठी (काहीतरी नॉनव्हेज) ऑर्डर दे असं सांगितलं. त्याप्रमाणे टॉमने सगळ्यांसाठी ऑर्डर दिली. साधारण १५-२० मिनिटांनी तो वेटर एका प्लेटमध्ये पालापाचोळा आणि एका परडीमध्ये बरेचसे पाव घेऊन आला. ते बघून आम्ही आधी "ह्याने काय होणार" या अर्थी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि टॉमला तू सगळ्यांसाठी एकच डिश ऑर्डर केलीस का? असे विचारले. नंतर आम्हाला कळले की इटालियन रेस्तोरंट मध्ये गेलं की हा घास पूस प्रकार येतोच. मग आम्ही आपले चीज लावून दोन दोन पाव आणि ती कोवळी पाने खाल्ली आणि उरलेली भूक मुख्य ऑर्डरसाठी राखून ठेवली. थोड्या वेळाने वेटर उरलेले पाव आणि आमच्या रिकाम्या डिश घेऊन गेला आणि दुसर्याने ऑर्डर प्रमाणे प्रत्येका समोर मेन मेनू आणून ठेवला. आमच्या दोघांसाठी टॉमने पास्ता ऑर्डर केला होता. चंद्रुसाठी पेन्ने रिगाते आणि माझ्यासाठी असच एक अगम्य नाव असलेली डिश. चंद्रुची डिश निदान दिसायला तरी देखणी आणि आकर्षक होती. टॉमच्या पुढयात मात्र मागाच्याच घासपूसप्रमाणेच पण जरा अधिक चांगली दिसणारी डिश होती. पण माझ्या पुढयातील प्रकार पाहण्यालायक देखील नव्हता. माझ्यासाठी टॉमने काहीतरी चिकनची डिश ऑर्डर केलेली. चरबी किंवा पातळ मऊ रबराचा शोभेल असा एक सेंटिमीटर जाडीचा कसलासा थर होता, तो चमच्याने भोसकला तर रक्त यावं तसा लाल लाल जरा जरा घट्ट असा (टोमॅटो??) सॉस बाहेर आला. आत चमच्याने ढोसून पाहिलं तर काही तुकडे असावेत असा अंदाज आला. बहुतेक तेच चिकन असावं. स्मगलिंग केल्यासारखं चिकन त्या अगम्य थराखाली लपवून ठेवलं होतं. रेस्तोरंटमध्ये शिरल्या पासून जो एक प्रकारचा आंबट वास येत होता तो त्या सॉसचाच होता ह्याची खात्री पटली. जसं दुसर्याची बायको चांगली दिसते (असं म्हणतात बुवा, आम्हासनी काय बी ठावं नाय) तसं मला दुसर्यांच्या पुढयातल्या डिश चांगल्या वाटू लागल्या. चंद्रुच्या डिशमध्ये पिवळ्या रंगाच्या रेघा-रेघांच्या एक दीड इंच लांबीच्या लांब नळ्या होत्या. त्या पण रबरीच दिसत होत्या. काही माणसे कशी स्वभाव कळण्या अगोदरच प्रथम दर्शनीच मनातून उतरतात तशीच माझ्या पुढयातील डिशदेखील चाखण्याआधीच माझ्या जिभेवरून उतरली होती. पहिल्या प्रथम मी तो थर फाडून बाहेर आलेला चमचा भर सॉस घेतला. जसजसा तो तोंडाजवळ नेत गेलो तसतसा त्याचा वास (दर्प) अधिकच जाणवला. जिभेवर ठेवताच डिश जशी दिसते तशीच आहे ह्याची खात्री पटली. मी चंद्रुकडे पाहिलं तर तो काट्या-चमच्यामध्ये त्या नळ्या पकडून गिळण्यात रमला होता. मला वाटलं नळ्या दिसतात त्या प्रमाणे चांगल्या असाव्या. टॉम नेहमीप्रमाणे प्रसन्न वदनाने वदनी केवळ पाला पाचोळा घेत होता. बहुतेक माझाच गेम झालाय असं मला वाटलं आणि मी पण माझं थोबाड् शक्य तितकं प्रसन्न ठेवत आणखी दोन चमचे ओरपले. गिळायला होईना. त्या सॉसचा वास तर नाकात घुमत होता. शेकडो मैल दूर असून देखील मला अचानक कोल्हापूर-रत्नागिरी बसमध्ये आंबा घाट लागल्यावर मुलं ओकली की जो वास येतो तो आठवला आणि अजुन कसतरीच झालं. मग पटकन पाण्याचा ग्लास तोंडाला लावून सॉस गिळला. मग म्हटलं चला काहीच नाही तर चिकनचे तुकडे हाणू म्हणून सॉसमध्ये चमच्याने शोधाशोध करून दोन तुकड्यामध्ये चमचा खुपसला आणि मोठ्या अपेक्षेने स्वाहा केले तर इथेही त्या तुकड्यानां लागलेला सॉस आपली चव पुन्हा उतरवून गेला. चिकन देखील चिकन नसून कसल्याश्या कंदमुळाचे उकडलेले तुकडे असावे असे वाटले. इथेही पचका. जिथे भरोश्याच्या चिकनने ऐनवेळी घात केला तिथे त्या रबरी थराकडून काडीची देखील अपेक्षा नव्हती आणि त्याने अपेक्षेप्रमाणे ती खरी केली. बहुतेक मैद्याचा थर असावा, मला तो घास गिळल्यावर आठवडाभर दररोज १-२ किमी धावलो तरच हा थर आपल्या पोटातून निघून जाईल असे वाटले. एखाद्या दिवशी सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध जातात (मुंबई इंडियन्स फाइनल हारल्यावर सच्चुपण असचं म्हणाला होता) तसा माझ्या आयुष्यातला तो दिवस होता.
चंद्रुदेखील आधी आवडीने खातो आहे असं मला वाटलेलं पण तो देखील जरा थंडावला होता. पण त्याने कसं बसं का होईना बर्याचश्या नळ्या घश्याखाली उतरवल्या होत्या. मी त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन आपण पण डोळे मिटून गिळून टाकु म्हणून पुन्हा माझ्या डिशकडे वळलो आणि सॉस, चिकन, रबर असे जे काय मिळेल ते एकत्र चमच्यात उचललं आणि मुखी लावलं. म्हटलं एक एक डिश खाण्याची ठराविक पद्धत असते, हे सगळं एकत्र चांगलं लागत असेल. जशी म.रा.प.म.च्या बस स्टॅंडवर सगळे टाकाऊ पदार्थ एकत्र करून त्यावर रस्सा ओतला की कशी मिसळ बनते आणि समस्त जनता ती कशी आवडीने खाते. तिथेही जर एक एक टाकाऊ पदार्थ वेगळा खायला गेलं तर त्याला घंटादेखील चव नसते पण बाकीच्या टाकाऊ पदार्थंबरोबर कसं 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' होतं. म्हटलं तसं करून पाहू पण नाही. तिथे ही आधी सॉसचा वास, मग सॉसची चव आणि मग कंदमुळं अश्या क्रमाने पुन्हा सगळं पाण्याच्या घोटाबरोबर माझ्या पोटात गेलं. त्या रबराला रंग रूप सोडलं तर वास, चव आणि इतर काहीच गुणधर्म नव्हते. त्या क्षणी टॉमकडे पाहून मलादेखील आपण वेगन बनून पालापाचोळा खावा असे वाटून गेले. बहुतेक टॉमने लहानपणी हीच डिश खाल्ली असावी आणि त्या घटनेने त्याला आयुष्यभरासाठी वेगन डाएटची दीक्षा घेण्यास प्रवृत्त केले असावे.
एव्हाना आज उपाशी राहावं लागणार हे समजून चुकलं होतं. भूक तर काहीच भागलेली नव्हती. मनातून सारखं त्या वेटर ला बोलावून "अरे ते माघाचचे पाव घेऊन ये रे जरा" असे सांगावेसे वाटत होते. टॉमदेखील माझ्या डिशकडे "Sid didn't like it huh?" पाहून असं म्हणाला. मी कसबसा हसलो. कारण नाही नाही, मला आवडली, ठीक आहे असं काही म्हणणं शक्य नव्हतं. चार पाच चमचे सोडले तर ती डिश जशीच्या तशी होती. मी देखील प्रथमच असं अन्न टाकून उठनार होतो. पण काही इलाज नव्हता, मी माझ्या परीने प्रयत्न केला होता. वेटरने देखील पॅक करून देऊ का? असं विचारलं. मी नको म्हटलं आणि आम्ही बिल वैगरे भरून तीकडून बाहेर पडलो. ऑफीसला आल्यावर जवळची सगळी चिल्लर वेंडिंग मशीन मध्ये टाकून वेफर्स, कूकीज, चॉक लेट्स असं जे मिळेल ते खाल्लं आणि वरुन पाणी प्यायलो. त्या दिवसापासून संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून ऑफीसच्या बॅगेत मॅगीचं एक पॅकेट ठेवू लागलो. लिंडाला देखील माझा कसा पोपट झाला ते सांगितलं पण झालं भलतचं. तिला इटालियन खूप आवडायचं आणि ती आत्ता पुढच्या वेळी मी तुम्हाला घेऊन जाते असं म्हणाली. गेम झाला. लिंडाला नाही म्हणणं शक्य नव्हतं त्यामुळे पुन्हा आम्ही Joe'sच्या वारीला गेलो. ह्या वेळी मात्र भविष्यातली गुंतवणूक म्हणून मी आधीच ५-६ पाव आणि सगळा पाला पाचोळा साफ करून टाकला. मागच्या वेळी चंद्रु "इतक्या काही खास नसतात पण गिळण्यालायक असतात" असं म्हणाला होता म्हणून मी त्याच्या अनुभवावरून ह्या वेळी त्या पिवळ्या नळ्या ऑर्डर केल्या होत्या. त्याने सांगितल्या प्रमाणे त्या नळ्या गिळण्याइतपतच बर्या होत्या आणि ऑफीसमध्ये मॅगीचे पॅकेट असल्याने चिंता नव्हती. पण तेंव्हापासुन कानाला खडा लावला आणि पुन्हा कधी इटालियन रेस्तोरंटचं नाव देखील काढलं नाही.
तर ही होती माझ्या फ़सलेल्या खादडीची कहाणी.
(ता. क. भारतात परत येताना फ़्लाइटमध्ये एअरहोस्टेसने जेवणासाठी माझ्यापुढे पास्ता धरला त्याच वेळी माझ्या MP3 प्लेअरवर "भय इथले संपत नाही" हे गाणं सुरु झालं हा योगायोग असावा.)
झालं काय तर अमेरिकेत असताना दर दुपारी जेवायला बाहेर जायचो. भारतातून गेलेले आम्ही दोघे, मी आणि चंद्रु, नेहमीच दुपारी बाहेर जायचो. दररोज टॅकोबेल, चिलीज्, पिझ्झाहट, बर्गर-किंग, चिपोटले, कधी चायनीज तर कधी जापनीज अश्या ठराविक ठिकाणी आलटून पालटून भेटी दिल्या जायच्या. शुक्रवारी ऑफीसचे इतर लोक देखील घरून लंचबॉक्स न आणता बाहेरच येत असतं. अश्याच एका शुक्रवारी आमच्या बरोबर आमच्या टीम मधले ३-४ अमेरिकन निघाले जेवायला. कुठे जायचं कुठे जायचं करता करता Joe's या इटालियन रेस्तोरंटला जायचे असे ठरले. तो पर्यंत मेक्सिकन, जापनीज चाखुन झालेच होते. आम्ही पण म्हटले चला आत्ता इटालियन होऊन जाऊ दे. Joe's ला गेलो. आत गेल्या गेल्या शोले स्टाइलमध्ये कितने आदमी है वैगरे विचारून झाल्यावर आम्ही सगळे मावू असे टेबल दिलं गेलं. मी, चंद्रु आणि टॉम असे तिघे बसलो. टॉम वेगन होता. हे वेगन लोकं म्हणजे नॉनव्हेज सोडाच पण दुधापासून बनलेले पदार्थ पण खात नाहीत. फक्त नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी घासपुस आणि त्यापासून बनणारे पदार्थ खातात म्हणे. इतर अमेरिकन जसे सकाळ संद्याकाळ कॉफीचा एक मोठा मग नाहीतर कोल्डड्रिंकचा टीन घेऊन फिरताना दिसायचे तिथे हा पठ्ठ्या केवळ पाणी प्यायचा. ऑफीसपार्टीला देखील डोनट सोडून कुठल्या चीज-बर्गर अश्या पदार्थांना देखील शिवायचा नाही. आधी टॉम वेगन आहे म्हणून हे सगळं खात नाही असं मला कळलं तेंव्हा वेगन म्हणजे काहीतरी रोग असावा असं मला वाटलं होतं पण वेगन हा रोग नसून तो डाएट आहे हे मला नंतर कुणीतरी सांगितलं. त्यात विकीपिडियावर वेगनबद्दल पहिल्या ओळीतच हा काय प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या पूर्णपणे विरुद्ध जीवनशैलीचा प्रकार आहे हे समजताच मी ते पेज बंद केलं. आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही तिथला पत्ता कशाला शोधा... असो. तर असा हा टॉम (बिच्चारा!!! व्यर्थ ते जीवन) त्याच्या ह्या वेगन डाएटमुळे म्हणे त्याचे विमान प्रवासात हाल व्हायचे आणि ह्या एकाच कारणामुळे तो कधी अमेरिकेबाहेर गेला नव्हता.
तर मूळ मुद्दा असा की मला आणि चंद्रुला दोघांना ही काय ऑर्डर कारायचं काहीच माहीत नव्हतं. इतर वेळी रेस्तोरंटमध्ये जायच्या आधी आम्ही लिंडाला विचारून अमुक अमुक ठिकाणी काय मागायचं ते विचारून जायचो आणि हाणून यायचो. आज बरोबर टीममधली लोकं असल्याने आम्ही लिंडाला काही न विचारता आलेलो. त्यामुळे सहाजिकच टॉमला तूच आमच्यासाठी (काहीतरी नॉनव्हेज) ऑर्डर दे असं सांगितलं. त्याप्रमाणे टॉमने सगळ्यांसाठी ऑर्डर दिली. साधारण १५-२० मिनिटांनी तो वेटर एका प्लेटमध्ये पालापाचोळा आणि एका परडीमध्ये बरेचसे पाव घेऊन आला. ते बघून आम्ही आधी "ह्याने काय होणार" या अर्थी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि टॉमला तू सगळ्यांसाठी एकच डिश ऑर्डर केलीस का? असे विचारले. नंतर आम्हाला कळले की इटालियन रेस्तोरंट मध्ये गेलं की हा घास पूस प्रकार येतोच. मग आम्ही आपले चीज लावून दोन दोन पाव आणि ती कोवळी पाने खाल्ली आणि उरलेली भूक मुख्य ऑर्डरसाठी राखून ठेवली. थोड्या वेळाने वेटर उरलेले पाव आणि आमच्या रिकाम्या डिश घेऊन गेला आणि दुसर्याने ऑर्डर प्रमाणे प्रत्येका समोर मेन मेनू आणून ठेवला. आमच्या दोघांसाठी टॉमने पास्ता ऑर्डर केला होता. चंद्रुसाठी पेन्ने रिगाते आणि माझ्यासाठी असच एक अगम्य नाव असलेली डिश. चंद्रुची डिश निदान दिसायला तरी देखणी आणि आकर्षक होती. टॉमच्या पुढयात मात्र मागाच्याच घासपूसप्रमाणेच पण जरा अधिक चांगली दिसणारी डिश होती. पण माझ्या पुढयातील प्रकार पाहण्यालायक देखील नव्हता. माझ्यासाठी टॉमने काहीतरी चिकनची डिश ऑर्डर केलेली. चरबी किंवा पातळ मऊ रबराचा शोभेल असा एक सेंटिमीटर जाडीचा कसलासा थर होता, तो चमच्याने भोसकला तर रक्त यावं तसा लाल लाल जरा जरा घट्ट असा (टोमॅटो??) सॉस बाहेर आला. आत चमच्याने ढोसून पाहिलं तर काही तुकडे असावेत असा अंदाज आला. बहुतेक तेच चिकन असावं. स्मगलिंग केल्यासारखं चिकन त्या अगम्य थराखाली लपवून ठेवलं होतं. रेस्तोरंटमध्ये शिरल्या पासून जो एक प्रकारचा आंबट वास येत होता तो त्या सॉसचाच होता ह्याची खात्री पटली. जसं दुसर्याची बायको चांगली दिसते (असं म्हणतात बुवा, आम्हासनी काय बी ठावं नाय) तसं मला दुसर्यांच्या पुढयातल्या डिश चांगल्या वाटू लागल्या. चंद्रुच्या डिशमध्ये पिवळ्या रंगाच्या रेघा-रेघांच्या एक दीड इंच लांबीच्या लांब नळ्या होत्या. त्या पण रबरीच दिसत होत्या. काही माणसे कशी स्वभाव कळण्या अगोदरच प्रथम दर्शनीच मनातून उतरतात तशीच माझ्या पुढयातील डिशदेखील चाखण्याआधीच माझ्या जिभेवरून उतरली होती. पहिल्या प्रथम मी तो थर फाडून बाहेर आलेला चमचा भर सॉस घेतला. जसजसा तो तोंडाजवळ नेत गेलो तसतसा त्याचा वास (दर्प) अधिकच जाणवला. जिभेवर ठेवताच डिश जशी दिसते तशीच आहे ह्याची खात्री पटली. मी चंद्रुकडे पाहिलं तर तो काट्या-चमच्यामध्ये त्या नळ्या पकडून गिळण्यात रमला होता. मला वाटलं नळ्या दिसतात त्या प्रमाणे चांगल्या असाव्या. टॉम नेहमीप्रमाणे प्रसन्न वदनाने वदनी केवळ पाला पाचोळा घेत होता. बहुतेक माझाच गेम झालाय असं मला वाटलं आणि मी पण माझं थोबाड् शक्य तितकं प्रसन्न ठेवत आणखी दोन चमचे ओरपले. गिळायला होईना. त्या सॉसचा वास तर नाकात घुमत होता. शेकडो मैल दूर असून देखील मला अचानक कोल्हापूर-रत्नागिरी बसमध्ये आंबा घाट लागल्यावर मुलं ओकली की जो वास येतो तो आठवला आणि अजुन कसतरीच झालं. मग पटकन पाण्याचा ग्लास तोंडाला लावून सॉस गिळला. मग म्हटलं चला काहीच नाही तर चिकनचे तुकडे हाणू म्हणून सॉसमध्ये चमच्याने शोधाशोध करून दोन तुकड्यामध्ये चमचा खुपसला आणि मोठ्या अपेक्षेने स्वाहा केले तर इथेही त्या तुकड्यानां लागलेला सॉस आपली चव पुन्हा उतरवून गेला. चिकन देखील चिकन नसून कसल्याश्या कंदमुळाचे उकडलेले तुकडे असावे असे वाटले. इथेही पचका. जिथे भरोश्याच्या चिकनने ऐनवेळी घात केला तिथे त्या रबरी थराकडून काडीची देखील अपेक्षा नव्हती आणि त्याने अपेक्षेप्रमाणे ती खरी केली. बहुतेक मैद्याचा थर असावा, मला तो घास गिळल्यावर आठवडाभर दररोज १-२ किमी धावलो तरच हा थर आपल्या पोटातून निघून जाईल असे वाटले. एखाद्या दिवशी सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध जातात (मुंबई इंडियन्स फाइनल हारल्यावर सच्चुपण असचं म्हणाला होता) तसा माझ्या आयुष्यातला तो दिवस होता.
चंद्रुदेखील आधी आवडीने खातो आहे असं मला वाटलेलं पण तो देखील जरा थंडावला होता. पण त्याने कसं बसं का होईना बर्याचश्या नळ्या घश्याखाली उतरवल्या होत्या. मी त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन आपण पण डोळे मिटून गिळून टाकु म्हणून पुन्हा माझ्या डिशकडे वळलो आणि सॉस, चिकन, रबर असे जे काय मिळेल ते एकत्र चमच्यात उचललं आणि मुखी लावलं. म्हटलं एक एक डिश खाण्याची ठराविक पद्धत असते, हे सगळं एकत्र चांगलं लागत असेल. जशी म.रा.प.म.च्या बस स्टॅंडवर सगळे टाकाऊ पदार्थ एकत्र करून त्यावर रस्सा ओतला की कशी मिसळ बनते आणि समस्त जनता ती कशी आवडीने खाते. तिथेही जर एक एक टाकाऊ पदार्थ वेगळा खायला गेलं तर त्याला घंटादेखील चव नसते पण बाकीच्या टाकाऊ पदार्थंबरोबर कसं 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' होतं. म्हटलं तसं करून पाहू पण नाही. तिथे ही आधी सॉसचा वास, मग सॉसची चव आणि मग कंदमुळं अश्या क्रमाने पुन्हा सगळं पाण्याच्या घोटाबरोबर माझ्या पोटात गेलं. त्या रबराला रंग रूप सोडलं तर वास, चव आणि इतर काहीच गुणधर्म नव्हते. त्या क्षणी टॉमकडे पाहून मलादेखील आपण वेगन बनून पालापाचोळा खावा असे वाटून गेले. बहुतेक टॉमने लहानपणी हीच डिश खाल्ली असावी आणि त्या घटनेने त्याला आयुष्यभरासाठी वेगन डाएटची दीक्षा घेण्यास प्रवृत्त केले असावे.
एव्हाना आज उपाशी राहावं लागणार हे समजून चुकलं होतं. भूक तर काहीच भागलेली नव्हती. मनातून सारखं त्या वेटर ला बोलावून "अरे ते माघाचचे पाव घेऊन ये रे जरा" असे सांगावेसे वाटत होते. टॉमदेखील माझ्या डिशकडे "Sid didn't like it huh?" पाहून असं म्हणाला. मी कसबसा हसलो. कारण नाही नाही, मला आवडली, ठीक आहे असं काही म्हणणं शक्य नव्हतं. चार पाच चमचे सोडले तर ती डिश जशीच्या तशी होती. मी देखील प्रथमच असं अन्न टाकून उठनार होतो. पण काही इलाज नव्हता, मी माझ्या परीने प्रयत्न केला होता. वेटरने देखील पॅक करून देऊ का? असं विचारलं. मी नको म्हटलं आणि आम्ही बिल वैगरे भरून तीकडून बाहेर पडलो. ऑफीसला आल्यावर जवळची सगळी चिल्लर वेंडिंग मशीन मध्ये टाकून वेफर्स, कूकीज, चॉक लेट्स असं जे मिळेल ते खाल्लं आणि वरुन पाणी प्यायलो. त्या दिवसापासून संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून ऑफीसच्या बॅगेत मॅगीचं एक पॅकेट ठेवू लागलो. लिंडाला देखील माझा कसा पोपट झाला ते सांगितलं पण झालं भलतचं. तिला इटालियन खूप आवडायचं आणि ती आत्ता पुढच्या वेळी मी तुम्हाला घेऊन जाते असं म्हणाली. गेम झाला. लिंडाला नाही म्हणणं शक्य नव्हतं त्यामुळे पुन्हा आम्ही Joe'sच्या वारीला गेलो. ह्या वेळी मात्र भविष्यातली गुंतवणूक म्हणून मी आधीच ५-६ पाव आणि सगळा पाला पाचोळा साफ करून टाकला. मागच्या वेळी चंद्रु "इतक्या काही खास नसतात पण गिळण्यालायक असतात" असं म्हणाला होता म्हणून मी त्याच्या अनुभवावरून ह्या वेळी त्या पिवळ्या नळ्या ऑर्डर केल्या होत्या. त्याने सांगितल्या प्रमाणे त्या नळ्या गिळण्याइतपतच बर्या होत्या आणि ऑफीसमध्ये मॅगीचे पॅकेट असल्याने चिंता नव्हती. पण तेंव्हापासुन कानाला खडा लावला आणि पुन्हा कधी इटालियन रेस्तोरंटचं नाव देखील काढलं नाही.
तर ही होती माझ्या फ़सलेल्या खादडीची कहाणी.
(ता. क. भारतात परत येताना फ़्लाइटमध्ये एअरहोस्टेसने जेवणासाठी माझ्यापुढे पास्ता धरला त्याच वेळी माझ्या MP3 प्लेअरवर "भय इथले संपत नाही" हे गाणं सुरु झालं हा योगायोग असावा.)
Monday, March 29, 2010
एक क्षण मोहाचा
गेले काही महिने रोज सकाळी हा मोहाचा क्षण येतो. रोज रात्री झोपताना न चुकता सकाळी सहा साडे-सहाचा गजर लावतो. का तर सकाळी उठून जॉगिंगला जायचे. कमरेभोवती साइकलचा टायर झालाय. म्हटलं त्याची स्कूटर आणि नंतर सुमो किंवा ट्रॅक्टरच्या टायरपर्यंत पदोन्नती व्हायच्या आत काही हालचाल करायला हवी. कोंबडी-बोकडाच्या रूपाने कॅलरी नित्यनेमाने शरीरात प्रवेश करत असतात आणि वर आम्ही निर्लजपणे दिवसभर कचेरित क्लिकक्लिकाट करीत बसलेले. त्यात शुक्रवार हा चिकन बिर्याणी आणि शोरमा रोल खाल्ल्याशिवाय जात नाही. असो ही पोस्ट खादडीवर नसून खादडीच्या दुष्परिणामांवर आहे त्यामुळे तोंड आवरतं घेतो. तर सांगायचा मुद्दा असा की सकाळी गजर झाला की हात आपसूक ताणला जातो आणि गजर बंद करण्यात येतो. रोज वेगवेगळी कारणं असतात. गुरुवार ते रविवार "आज कुठे सोमवार पासून जाऊ", सोमवारी "वीकेंडला जागरण झालाय. झोप पूर्ण करू. आज पासून पुन्हा काम करायचं आहे". मंगळवार बुधवार मनात येईल ते काही कारण. महिन्याच्या २० तारखेनंतर "अरे आत्ता कुठे १ तारखेपासून जाऊ." तरी नशीब मी पोर्णिमा-आमावस्या बघत नाही. डिसेंबर मध्ये नवीन वर्षाचा संकल्प करू असं म्हणून टाळलं आणि नवीन वर्ष सुरू झाल्यावर "आत्ता नवीन वर्षाच्या संकल्पवाल्यांची गर्दी असेल" म्हणून टाळलं. स्व:तच स्व:तला द्यायची असली तरी कारणे कशी स्व:तच्या मनाला पूर्णपणे पटतील अशी. उगीचच "आज कंटाळा आलाय", "आज नको उद्या जाऊ" अशी थातुर मातुर कारणे कधी नाही दिली.
तसा गेल्या वर्षी जून-जुलैपर्यंत जॉगिंगला जात देखील होतो पण ऑगस्टच्या दरम्यान बंगलोरला पाऊस जरा वाढला आणि जरा खंड पडला. मग काय आत्ता गणपतीला घरी जायचं आहेच मग ४ दिवस चुकेल, नंतर काय तर दिवाळीला घरी जायचं आहे मग ४ दिवस चुकेल म्हणून आत्ता घरी जाऊन आलो की मगच सुरू करू असा विचार करून गजर बंद करून पुन्हा घोरु लागायचो. गणपती दिवाळी चे ४ दिवस खंड पडेल असा सुद्न्य विचार करून ४ महिने मी जॉगिंगला गेलो नाही. दिवाळी तर काय थंडी घेऊन आली मग गुलाबी थंडीत गजर बंद करण्यासाठी देखील डोळे उघडत नव्हते तर उठून बाहेर पडायचा तर प्रश्नच नव्हता.
दुसरी गोष्ट म्हणजे त्याच दरम्यान ब्लॉगिंगचा पण नाद लागला. ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे, आपण काहीतरी लिहण्याचा प्रयत्न करणे ह्यात रोजचे बारा वाजू लागले. वर आम्हाला "लवकर निजे लवकर उठे"पेक्षा "शरीराला किमान ८ तास झोप हवी" हे जास्त लक्षात राहते त्यामुळे रात्री किती ही उशीर झाला तरी किमान ८ तास झोप पूर्ण करण्याची नवीन चांगली सवय लागली. ह्या सवई नुसार सकाळचे सहा-साडेसहा म्हणजे मध्यरात्र की हो. मग माणूस कसा उठणार?
बरं मी जेंव्हा जॉगिंगला जायचो तेंव्हा देखील Motivation नाही हो. सकाळी पार्कात धावायला येणार्या मुलींमध्ये पण consistency म्हणून नाही. अशी एखादी कुणी नाही की जिच्यासाठी उठून जावे आणि ती बया नित्य नेमाने साडेसहाला पार्कात हजर होईल. कुणी दिसलीच आणि आम्ही पुढचे दोन दिवस आशेने पहाटे पहाटे उठून गेलो की दररोज न चुकता येणार्या जेष्ठ नागरिक संघाचे दर्शन घेऊन परत. कसं होणार ह्यां मुलींचं?
असो चला तर मग, आधीच बराच उशीर झालाय. झोपायला जातो. उद्या सकाळी ६ वाजता उठायचे आहे.
तसा गेल्या वर्षी जून-जुलैपर्यंत जॉगिंगला जात देखील होतो पण ऑगस्टच्या दरम्यान बंगलोरला पाऊस जरा वाढला आणि जरा खंड पडला. मग काय आत्ता गणपतीला घरी जायचं आहेच मग ४ दिवस चुकेल, नंतर काय तर दिवाळीला घरी जायचं आहे मग ४ दिवस चुकेल म्हणून आत्ता घरी जाऊन आलो की मगच सुरू करू असा विचार करून गजर बंद करून पुन्हा घोरु लागायचो. गणपती दिवाळी चे ४ दिवस खंड पडेल असा सुद्न्य विचार करून ४ महिने मी जॉगिंगला गेलो नाही. दिवाळी तर काय थंडी घेऊन आली मग गुलाबी थंडीत गजर बंद करण्यासाठी देखील डोळे उघडत नव्हते तर उठून बाहेर पडायचा तर प्रश्नच नव्हता.
दुसरी गोष्ट म्हणजे त्याच दरम्यान ब्लॉगिंगचा पण नाद लागला. ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे, आपण काहीतरी लिहण्याचा प्रयत्न करणे ह्यात रोजचे बारा वाजू लागले. वर आम्हाला "लवकर निजे लवकर उठे"पेक्षा "शरीराला किमान ८ तास झोप हवी" हे जास्त लक्षात राहते त्यामुळे रात्री किती ही उशीर झाला तरी किमान ८ तास झोप पूर्ण करण्याची नवीन चांगली सवय लागली. ह्या सवई नुसार सकाळचे सहा-साडेसहा म्हणजे मध्यरात्र की हो. मग माणूस कसा उठणार?
बरं मी जेंव्हा जॉगिंगला जायचो तेंव्हा देखील Motivation नाही हो. सकाळी पार्कात धावायला येणार्या मुलींमध्ये पण consistency म्हणून नाही. अशी एखादी कुणी नाही की जिच्यासाठी उठून जावे आणि ती बया नित्य नेमाने साडेसहाला पार्कात हजर होईल. कुणी दिसलीच आणि आम्ही पुढचे दोन दिवस आशेने पहाटे पहाटे उठून गेलो की दररोज न चुकता येणार्या जेष्ठ नागरिक संघाचे दर्शन घेऊन परत. कसं होणार ह्यां मुलींचं?
असो चला तर मग, आधीच बराच उशीर झालाय. झोपायला जातो. उद्या सकाळी ६ वाजता उठायचे आहे.
Wednesday, February 24, 2010
किती सांगू मी सांगू कुणाला... आज आनंदी आनंद झाला...
वेडा झालोय... आज मला माझ्या नशिबावार विश्वास नाही बसत आहे. आज काय झालं आणि मी कंटाळूनच लवकर घरी आलो. जरा चिडचिडच झालेली. पण घरी येऊन पाहतो तर काय सचिन नुसता सुटलेला. तुफान.... १००, १२५, १५० आणि बघता बघता साहेब १८० वर पोहचले. मग स्वत : चा १८६ धावांचा रेकॉर्ड मागे टाकला. मग चेंडू इतके शिल्लक होते की आज काही झालं तरी २०० करतो पट्ठ्या. धडधड वाढु लागली. मग सईद अन्वरचा रेकॉर्ड मागे पडला. अन्वरने हा रेकॉर्ड भारता विरुद्धच केलेला. त्यामुळे तो घाव ही अनेक वर्ष आपल्या उरावर होता. सेहवाग कधीतरी ह्या जखमेवर मलम लावेल ह्याची खात्री होती. पण आज सचिनने ते करून दाखवले. मग २०० कधी होणार? मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. चेंडू कमी कमी होऊ लागले आणि तिकडे धोणी पेटला. नुसते चौके छक्के. म्हटलं काय रे बाबा.... पण नाही शेवटी तो क्षण आला. शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकार हाणून धोणीने दुसर्या चेंडूवर एक धाव घेतली आणि सचिनला स्ट्राइक दिला. सचिन १९९ नाबाद. मग वेळ न काढता, उत्कंठा न वाढवता सचिनने पुढाचाच चेंडू एका धावेसाठी तटावून एक दिवशीय क्रिकेटमध्ये २०० धावा करण्याचा विक्रम केला. नेहमीप्रमाणे हेल्मेट काढून आकाशाकडे पहात बॅट उंचावली. ऐन शिमग्यात देशभर दिवाळी सुरू झाली. आपल्या सगळ्यांच्या सचिनने एकदिवशीय क्रिकेट मध्ये प्रथम २०० धावा करण्याचा मान मिळवला. आज अगणित रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. अहो फार कशाला तो एक धाव करून आउट झाला तरी ती धाव विश्व विक्रमीच असते. २०० केले त्यापेक्षा अन्वरचा रेकॉर्ड मोडला ह्याचा जास्त आनंद आहे. ह्या एका माणसाने गेली २० वर्षे जे काही केलं आहे त्याला तोड नाही. मी काय बोलणार त्याबद्दल. फक्त क्रिकेटसाठी जन्माला आलेला माणूस. परवाच्याच मॅचचं घ्या. भारत एका धावेने जिंकला आणि त्याधीच्या षटकामध्ये सचिनने जी डाइव मारुन चौकार अडवला ते पाहून १५-२० वर्षाच्या मुलांनी पण तोंडात बोटं घातली असतील. कोण म्हणतं होतं ते ३ वर्षापूर्वी की सचिन ने आत्ता रिटायर व्हायला हवे. आज या आणि बोला.
मला नाही वाटतं की कुणी आत्ता भारत दक्षिण आफ्रिकेची जी उरलेली मॅच सुरू आहे ती बघत असेल. न्यूज़ चॅनेल तर फक्त सचिन सचिन आणि सचिन. आजतकने तर नेहमी प्रमाणे अब्दुल कादिरला फोन करून १९८९ मध्ये सचिनने केलेल्या जखमांवरची खपली काढली. अब्दुल कादिरला पुन्हा अल्ला आठवला. जाता जाता अब्दुल कादिर सचिनला शुभेच्छा देताना म्हणाला की "यह रेकॉर्ड सिर्फ सचिन को शोभा देता है, शायद इसिलिये आज तक २०० के इतने करिब जाने के बाद भी कोई २०० को छू नही सका". खरं आहे गेला बाजार हेडन, गिलख्रिस्त आणि आत्ता सेहवाग, गेल आणि असे कितीतरी स्फोटक खेळाडू असताना २० वर्षांनंतर सचिननेच एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वप्रथम २०० धावा केल्या ह्यातच सर्व आले. ब्रायन लाराने कसोटी मध्ये सर्वप्रथम ४०० धावा केल्या त्यामुळे आत्ता कुणीही ४०० चा टप्प ओलांडला तरी लाराने पहिल्यांदा तो ओलांडला असल्याने लाराचं कौतुक कायम राहाणार. तसेच आज आपल्या सचिनने एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम २०० चा टप्पा ओलांडाल्यामुळे उद्या कुणीही २०० चा टप्पा ओलांडला तरी आपला सचिनच लक्षात राहाणार. या आधीच अनेक वेळा सचिनला मानाचा मुजरा करून झालाय.आत्ता काय काय लिहु अजुन. आज इतकं तृप्त वाटत य की काय सांगू. आज मला माझा स्वत:चाच हेवा वाटतोय की मी सचिनला २०० धावा करताना याची देही याची डोळा पाहिले. काही काही गोष्टी न मागता मिळतात. आजची ही सचिनची खेळी त्यापैकीच एक...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
याच विषयी आधी नवज्योतसिंग सिद्धूची मला सर्वात भावलेली कॉमेंट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
.
Saturday, February 13, 2010
मेरा पहेला प्यार!!!
कधी तुम्हा कुणाला बोललो नाही. तशी गरज देखील वाटली नाही. पण माझ्या एकंदरीत बोलण्यावरून सॉरी लिहण्यावरून कदाचित तुमच्या पैकी काही जणांनी ओळखलं देखील असेल की I am engaged. हो आहे माझं प्रेम तिच्यावर आणि तेदेखील लहान पणापासून. जेंव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती तेंव्हापासून. खरं तर तिची ओळख घरच्यांनीच करून दिली त्यामुळे आमच्या प्रेमाला विरोध वैगरे कधी झालाच नाही. आत्ता घरच्यांनी विरोध नाही केला त्यामुळे समाज काय म्हणेल वैगरे फालतू विचार मी कधी केला नाही. त्यामुळे माझे तिच्यावर किती प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय कसा राहू शकत नाही ह्याचा बभ्रा करत मी दुनिया फिरलोय.
तिचा विरह तर मी दोन दिवस देखील सोसू शकत नाही. आत्ता मी कोकणात असताना ती मला जशी मनमोकळे पणाने भेटायची तशी पुण्यात असताना आणि आत्ता बंगलोरला नाही भेटत. खरं तर आधी मी बंगलोरला आलो तेंव्हा तर फार हाल झाले हो. अगदी जिकडे पाहावं तिकडे सारखे तीचेच भास व्हायचे. भेट होणार नाही हे माहीत असल्यामुळे निदान तिला पर्याय शोधण्यासाठी तरी मी वीकेंडला नाना ठिकाणी भटकायचो. अर्थात तिला पर्याय शोधत होतो म्हणजे माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं असं समजू नका. उलट तिला दुसर्या रूपात स्वीकारण्याची ती तडजोड होती. अखेर एक दिवस केरळी वेषात मला तशीच स्वप्न-सुंदरी भेटली देखील. ही खोबरेल तेल लावून यायची पण आत्ता विरहच सहावेसा झाल्यानंतर खोबरेल तेल तर खोबरेल तेल, मी परिस्थितीला सामोरे जाण्याचं ठरवलं. इतक्या दूर बंगलोर सारख्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रेम मिळतय ह्यातच मी खुश होतो. बाकी सणासुदीला घरी गेलो की ती भेटतच होती. त्या दोन चार दिवसात आमच्या प्रेमाला नुसतं उधाण येत असे. नंतर एके दिवशी मला बंगलोरला तिच्यासारखीच अगदी हुबेहुब दुसरी बसस्टॅंड जवळच्या कामातांकडे दिसली. मला तर अगदी "अगर सच्चे दिल से किसी को चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिये जूट जाती है" चा याची देही याची डोळा प्रत्यय आला. ही अस्सल सारस्वत घराण्यातील होती. मी तर बेह्द्द खुश. सारस्वतांबद्दल ऐकून होतो पण आत्ता तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते. घरापासून इतक्या दूर मला माझे प्रेम पुन्हा मिळाले होते. तेंव्हापासून खोबरेल तेल लावून भेटायला येणारीचं तोंड देखील पाहिलं नाही. चालतं तेवढं. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतात म्हणे. आजकाल रविवार दुपारी १५ किलोमीटर अंतर तुडवून मी कामातांकडे जातो. आठवड्यात एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली तर ती देखील सत्कारणी लावतो. हिच्यासोबत घालवलेल्या रविवारच्या आठवणीत आणि येणार्या रविवारच्या भेटीची स्वप्न बघत उरलेला आठवडा कंठतो. खरं प्रेम असेल तर कुठेही भेटतं कारण परदेशी गेलो तेंव्हा मला तिच्या सारख्याच एकीची ओळख झाली. ही जापनीज होती पण किती 'सुशी'ल. आजही तिच्या आठवणीने मनाचा कोपरा हळवा होतो.
आज वॅलिंटाइन डे. शुक्रवारी शिवरात्रीची सुट्टी होती म्हणून खास लॉंग वीकेंडला जोडुन सोमवारी सुट्टी घेऊन आज वॅलिंटाइन डेला हिला भेटायला खासं घरी आलोय. म्हटलं आज वॅलिंटाइन डे हिच्याबरोबर घरी साजरा करू. चला तर मंडळी मी तिला घरी घेऊन जायला आलोय. आत्ता मी तिची एवढी स्तुती केलीय तर तिचे फोटो पण देतो. मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच जण तिला जवळून ओळखत असतील, कदाचित माझ्यप्रमाणे तिच्यावर जीव ओवाळून देखील टाकत असतील. ती आहेच तशी प्रेमात पडण्यासारखी आणि प्रेमात पडल्यावर पुन्हा न विसरण्यासारखी... माझी प्रिय मासोळी...
तिचा विरह तर मी दोन दिवस देखील सोसू शकत नाही. आत्ता मी कोकणात असताना ती मला जशी मनमोकळे पणाने भेटायची तशी पुण्यात असताना आणि आत्ता बंगलोरला नाही भेटत. खरं तर आधी मी बंगलोरला आलो तेंव्हा तर फार हाल झाले हो. अगदी जिकडे पाहावं तिकडे सारखे तीचेच भास व्हायचे. भेट होणार नाही हे माहीत असल्यामुळे निदान तिला पर्याय शोधण्यासाठी तरी मी वीकेंडला नाना ठिकाणी भटकायचो. अर्थात तिला पर्याय शोधत होतो म्हणजे माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं असं समजू नका. उलट तिला दुसर्या रूपात स्वीकारण्याची ती तडजोड होती. अखेर एक दिवस केरळी वेषात मला तशीच स्वप्न-सुंदरी भेटली देखील. ही खोबरेल तेल लावून यायची पण आत्ता विरहच सहावेसा झाल्यानंतर खोबरेल तेल तर खोबरेल तेल, मी परिस्थितीला सामोरे जाण्याचं ठरवलं. इतक्या दूर बंगलोर सारख्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रेम मिळतय ह्यातच मी खुश होतो. बाकी सणासुदीला घरी गेलो की ती भेटतच होती. त्या दोन चार दिवसात आमच्या प्रेमाला नुसतं उधाण येत असे. नंतर एके दिवशी मला बंगलोरला तिच्यासारखीच अगदी हुबेहुब दुसरी बसस्टॅंड जवळच्या कामातांकडे दिसली. मला तर अगदी "अगर सच्चे दिल से किसी को चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिये जूट जाती है" चा याची देही याची डोळा प्रत्यय आला. ही अस्सल सारस्वत घराण्यातील होती. मी तर बेह्द्द खुश. सारस्वतांबद्दल ऐकून होतो पण आत्ता तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते. घरापासून इतक्या दूर मला माझे प्रेम पुन्हा मिळाले होते. तेंव्हापासून खोबरेल तेल लावून भेटायला येणारीचं तोंड देखील पाहिलं नाही. चालतं तेवढं. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतात म्हणे. आजकाल रविवार दुपारी १५ किलोमीटर अंतर तुडवून मी कामातांकडे जातो. आठवड्यात एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली तर ती देखील सत्कारणी लावतो. हिच्यासोबत घालवलेल्या रविवारच्या आठवणीत आणि येणार्या रविवारच्या भेटीची स्वप्न बघत उरलेला आठवडा कंठतो. खरं प्रेम असेल तर कुठेही भेटतं कारण परदेशी गेलो तेंव्हा मला तिच्या सारख्याच एकीची ओळख झाली. ही जापनीज होती पण किती 'सुशी'ल. आजही तिच्या आठवणीने मनाचा कोपरा हळवा होतो.
आज वॅलिंटाइन डे. शुक्रवारी शिवरात्रीची सुट्टी होती म्हणून खास लॉंग वीकेंडला जोडुन सोमवारी सुट्टी घेऊन आज वॅलिंटाइन डेला हिला भेटायला खासं घरी आलोय. म्हटलं आज वॅलिंटाइन डे हिच्याबरोबर घरी साजरा करू. चला तर मंडळी मी तिला घरी घेऊन जायला आलोय. आत्ता मी तिची एवढी स्तुती केलीय तर तिचे फोटो पण देतो. मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच जण तिला जवळून ओळखत असतील, कदाचित माझ्यप्रमाणे तिच्यावर जीव ओवाळून देखील टाकत असतील. ती आहेच तशी प्रेमात पडण्यासारखी आणि प्रेमात पडल्यावर पुन्हा न विसरण्यासारखी... माझी प्रिय मासोळी...
Saturday, January 30, 2010
क्षत्रिय कुला"वसंत"
वसंत नावाचा माझा एक मित्र. पुण्यात असताना ह्या दिव्य व्यक्तीशी माझी ओळख झाली. एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आपल्या घराण्याचा फार अभिमान होता त्याला. कधी काळी पणजोबा खापर पणजोबांनी कुठे राजेशाही अनुभवली होती पण लौकिक अर्थाने राजेशाही गेली तरी पणजोबा खापर पणजोबांचे रक्त मात्र आज ही ह्यांच्या धमन्यांमधून वाहतं आहे. हल्लीच्या युगात देखील ह्यांच्या घरी मानपान, घराण आणि तत्सम राजेशाही थाट टिकून आहेत. पण 'राजविलासी आणि घोडे पलंगाशी' अशा पार्श्वभुमीतून डाइरेक्ट आमच्या सारख्या सामान्य मावळ्यांमध्ये येऊन पडल्यामुळे त्याची 'न घर का ना घाट का' अशी परिस्थिती झालेली. त्याचे जगण्याचे आणि जगाबाद्दलचे फंडे वेगळेच होते आणि शिक्षण संपल्यावर प्रथमच घराबाहेर पडल्यावर खरोखराच्या जगात आपले फंडे संभाळाताना त्याचे हाल झाले.
जे लोकं आम्हा दोघांना ओळखतात आजसुद्ध मला प्रत्यक्ष किंवा फोन वर भेटल्यानंतर पहिल्यांदा "त्याची" चौकशी करतात. "तो" काय म्हणतो किंवा "त्या" चे नवीन पराक्रम (आमच्या भाषेत गेम) याबाबत विचारणा आधी होते. अर्थात "त्या"ला भेटलेला "त्या"च्या सोबत चार "गोष्टी" बोललेला, त्याचे जगावेगळे फंडे ऐकलेला माणूस त्याला विसरणे अशक्य. व्यक्तिमत्वच असे आहे. एखादी सरळ साधी गोष्ट बेकायदेशीररित्या करण्यात ह्याला परमानंद मिळतो. मग ते काही असो. आमची जेंव्हा सुरुवातीला ओळख झाली तेंव्हा माणूस मरणाचा कन्फ्यूज़ होता. विषय काही असो, ह्याचे काही ठराविक फंडे. त्याच्या चौकटीमध्ये काही बसल नाही की माणूस खचला. त्यावेळी आम्हा सगळ्यानाच जॉबची घाई होती. कधी कधी कोणा मित्राला जॉब मिळाल्याची खबर येई. मग तो कुठल्याही डोमेन मधला असो. ज्याला जॉब मिळेल त्याची लाईन चांगली. कोणाला नेटवर्किंग मध्ये जॉब मिळाला की हा सुरू झाला, "अबे तो कोर्स साही आहे. xyz ला Offer लेटर मिळाला आहे, त्याचा Format घेऊ. अमुक अमुक ठिकाणी Experience लेटर बनवून मिळतात. आपण तस करू, १-२ Fake Project टाकु. मस्त जॉब लागून जाईल." बाकी मार्कशीट, लेटरहेड आणि तत्सम प्रकार कुठे छापून मिळतात हे ह्याला माहीत. मला तर वाटते ह्याने मोठा झाल्यावर आपले २-३ फेक जन्मदाखले बनवून घेतले असतील. ना जाणो उद्या जॉब च्या वेळी वय आडवे आले तर लगेच २ वर्षानी माणूस लहान. वय, अनुभव, आणि जे काही बदलता येईल ते सगळ शक्य. कुठेही कसली डिपेंडेन्सी नाय पाहिजे. हा इंजिनियरिंग पास झाला तेंव्हा खुद्द ह्याच्या आजोबांनी "हे पोट्ट पहिल्याच फटक्यात पास झालं म्हणजे दाल मे कुछ काला है" असे कौतुकाचे उद्गार काढले होते. ड्यूप्लिकेट चाव्या बनवणे हा आणखी एक आवडता उद्योग. बेकायदेशीर गोष्टींचा पुरस्कर्ता. एकाचे पासपोर्टचे काम सुरू होते. सगळे व्यवस्थित पार पडले होते. ज्याचे काम होते त्याने सगळे चौकटीमध्ये केले होते. पण हे साहेब काही मान्य करायला तयार नाहीत. "अबे तू पोलिसाना काहीतरी द्यायला हवे. नाहीतर ते तुला कुठेतरी अडकवतील. तुला द्यायचे नसतील तर नको देऊ, मी देतो." जणू काही कोप होईल आणि पासपोर्ट पचणार नाही. पण नाही... अशी कामे कायदेशीर होऊच शकत नाहीत. झाली तरी मी होऊ देणार नाही. हल्ली Dual सिम कार्डचे मोबाइल मिळतात, पण ह्या सदगृहस्थाकडे ही सिस्टम ४ वर्षापूर्वी अस्तित्वात होती. कुठून काळ्या कांड्या करून ह्याने तो सिम कार्ड स्विच आपल्या मोबाइल मध्ये अक्षरश: घुसुवन बसवला होता. बर दोन वेगळे नंबर असण्याची काही गरज नव्हती, पण...
झोल करायची इतकी आवड की मध्ये टेलिफोन डिपार्टमेंट मध्ये जागा भरायच्या होत्या. चांगली मोठी पोस्ट होती. साहेबाना कुठून तरी खबर लागली. भरला फॉर्म. त्यामध्ये नेमणुकीसाठी तीन पसंतीची ठिकाणे द्यायची होती. साहेबानी पहिली पसंती बिहारला दिली. का तर तिथे बेकायदीशीर कामा शिवाय काहीच होत नाही. क्रिकेट खेळणारा माणूस जसे लॉर्ड्स वर खेळण्याचे स्वप्न पाहत असेल तसे हे बिहार मध्ये जाउन भ्रष्टाचार करायला उतावळे झालेले.
कला क्रीडा साहित्य ह्या विभागांमध्ये अत्यानंद. कोणाची शेपूट कोणाला लावेल ह्याचा पत्ता नाही. मध्यंतरी ब्रायन लाराने ४०० धावा करून विश्वविक्रम नोंदवला. आम्ही त्याबद्दल बोलत होतो. साहेब पण आमच्या बरोबर होते. डोक्यामध्ये नेहमीप्रमाणे किडे वळवळ करत होते. आमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष्य नव्हते. पण मध्येच काही तरी आपला सहभाग दाखवावा म्हणून "काय केले लारा दत्ता ने ?" असा प्रश्न टाकून दिला. उद्या अभिनव बिन्द्राने सचिन तेंडुलकरचा क्रिकेट मधला विक्रम ओलिंपिक मध्ये मोडला हे संगितल तरी तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघणार नाही, उलट हे व्यवस्थित लक्ष्यात ठेवून उद्या दुसर्या कोणाला तरी ठसका लावेल ह्याची खात्री आहे. तसा तो कला क्रीडा साहित्या ह्या विभागामध्ये मलाच काय पण कुणालाही नडणार नाही. कारण ह्याला साप्ताहिक/मासिक/पेपर मध्ये भविष्य आणि पेज थ्री बातम्या आणि काही आकर्षक फोटो हे सोडून बाकी कश्याशी पडलेली नसते. राजकारणात थोडेफार स्वारस्य आहे पण ते राजकारणात नसून राजकारणामुळे मिळणार्या गोलमाल करण्याच्या ताकदीत आहे हे वेगळं सांगायला नको.
आत्ता पोरीबाबत. ह्या बाबतीत ह्यानी आध्यात्मिक पातळी गाठलेली. M G रोड वर आढळणार्या सगळ्या पोरी xxx हा नियम. एखादी मुलगी ही मैत्रीण वैगरे असूच कशी शकते? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले म्हणजे केवळ "लफडं"च असू शकते. त्याला दुसरे नाव असूच शकत नाही. पोरी बरोबर मैत्री करून काय करणार? हा वरती भाबडा (?) प्रश्न. वरतीअमुक एक मुलगा एका मुलीबरोबर बोलतो तरी पण त्या दोघांमध्ये "तसलं" काही नाही मग काय आहे? दुसर असूच काय असु शकत? बरं आमची पण कोणी खास मैत्रीण नव्हती, त्यामुळे आम्हीही कधी समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही. तसही उत्तर देऊन काही फरक पडणार नाही ह्याची खात्री अजूनही आहे. नशीब माणसाने "दोस्ताना" नाही पहिलाय. आम्ही कोणी त्याला बघावा म्हणून आग्रह ही करणार नाही. ह्याची केमिस्ट्री बदलून "गे"मिस्ट्री व्हायला नको. आमचे जिणे मुश्कील होऊन जाईल. ह्याचे फंडे बदलले म्हणजे ह्याच्या समोर मित्राबरोबर जायची/फिरायाची पण चोरी होईल. रूम पार्ट्नर बरोबर पण रहता येणार नाही. हा माणूस सगळ्याना वाळीत टाकेल. अजुन एक आठवल. वळू पिक्चर बद्दल बोलणे सुरू होते. मध्येच एकाने ह्याला खोचकपणे विचारले "वळू म्हणजे काय माहीत आहे?" उत्तर: "अबे हा वळू धड बैल ही नसतो धड गाय ही नसते... मधलाच असतो... काही कामाचा नसतो मग त्याला सोडून देतात गावभर, त्याला वळू म्हणतात..." साहेबाना सर्वसामान्य स्त्रीलिंग व्यर्ज आहे. त्यांच्यासाठी तीन लिंग. पुल्लिंग, डार्लिंग आणि नपूसक लिंग.
हे सगळे फंडे असून माणूस शेवटी एक दिवस प्रेमात पडला. पडला म्हणजे कोसळला. पोरीबद्दल जे फंडे होते ते विसरला. पोरगी बरोबर लफडं सोडून नुसतं प्रेम देखील करू शकतो हे साहेबाना समजले. सध्या साहेब प्रेमात गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे जरा नॉर्मलला आलेले आहेत. पण आमचे वांदे झालेत. आमच्या आयुष्यातली मज्जा निघून गेली आहे. बघू प्रकरण किती आणि कसे पुढे जाते.
हा माणूस म्हणजे आमच्या अळणी आणि बेचव आयुष्यामधले मीठ आहे. ह्याच्यामुळे कित्येकदा आम्ही मनापासून खळखळून हसलो आहोत. एकदा एकदा सगळ्याना वाटता ह्याचे फंडे समजले. आत्ता हा माणूस आपल्याला कळला पण नाही. साहेबाकडे फंडे अनलिमिटेड. ह्याच्याबद्दल लिहावं असं कधीपासून मनात होत. शेवटी लिहलं एकदाचं. काय काय आणि किती लिहावं कळतं नव्हतं. काही गोष्टी आठवल्या पण नाहीत. ह्या माणसाला कागदावर उतरवणे सोप नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अशीच काही मला भेटलेली माणसं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जे लोकं आम्हा दोघांना ओळखतात आजसुद्ध मला प्रत्यक्ष किंवा फोन वर भेटल्यानंतर पहिल्यांदा "त्याची" चौकशी करतात. "तो" काय म्हणतो किंवा "त्या" चे नवीन पराक्रम (आमच्या भाषेत गेम) याबाबत विचारणा आधी होते. अर्थात "त्या"ला भेटलेला "त्या"च्या सोबत चार "गोष्टी" बोललेला, त्याचे जगावेगळे फंडे ऐकलेला माणूस त्याला विसरणे अशक्य. व्यक्तिमत्वच असे आहे. एखादी सरळ साधी गोष्ट बेकायदेशीररित्या करण्यात ह्याला परमानंद मिळतो. मग ते काही असो. आमची जेंव्हा सुरुवातीला ओळख झाली तेंव्हा माणूस मरणाचा कन्फ्यूज़ होता. विषय काही असो, ह्याचे काही ठराविक फंडे. त्याच्या चौकटीमध्ये काही बसल नाही की माणूस खचला. त्यावेळी आम्हा सगळ्यानाच जॉबची घाई होती. कधी कधी कोणा मित्राला जॉब मिळाल्याची खबर येई. मग तो कुठल्याही डोमेन मधला असो. ज्याला जॉब मिळेल त्याची लाईन चांगली. कोणाला नेटवर्किंग मध्ये जॉब मिळाला की हा सुरू झाला, "अबे तो कोर्स साही आहे. xyz ला Offer लेटर मिळाला आहे, त्याचा Format घेऊ. अमुक अमुक ठिकाणी Experience लेटर बनवून मिळतात. आपण तस करू, १-२ Fake Project टाकु. मस्त जॉब लागून जाईल." बाकी मार्कशीट, लेटरहेड आणि तत्सम प्रकार कुठे छापून मिळतात हे ह्याला माहीत. मला तर वाटते ह्याने मोठा झाल्यावर आपले २-३ फेक जन्मदाखले बनवून घेतले असतील. ना जाणो उद्या जॉब च्या वेळी वय आडवे आले तर लगेच २ वर्षानी माणूस लहान. वय, अनुभव, आणि जे काही बदलता येईल ते सगळ शक्य. कुठेही कसली डिपेंडेन्सी नाय पाहिजे. हा इंजिनियरिंग पास झाला तेंव्हा खुद्द ह्याच्या आजोबांनी "हे पोट्ट पहिल्याच फटक्यात पास झालं म्हणजे दाल मे कुछ काला है" असे कौतुकाचे उद्गार काढले होते. ड्यूप्लिकेट चाव्या बनवणे हा आणखी एक आवडता उद्योग. बेकायदेशीर गोष्टींचा पुरस्कर्ता. एकाचे पासपोर्टचे काम सुरू होते. सगळे व्यवस्थित पार पडले होते. ज्याचे काम होते त्याने सगळे चौकटीमध्ये केले होते. पण हे साहेब काही मान्य करायला तयार नाहीत. "अबे तू पोलिसाना काहीतरी द्यायला हवे. नाहीतर ते तुला कुठेतरी अडकवतील. तुला द्यायचे नसतील तर नको देऊ, मी देतो." जणू काही कोप होईल आणि पासपोर्ट पचणार नाही. पण नाही... अशी कामे कायदेशीर होऊच शकत नाहीत. झाली तरी मी होऊ देणार नाही. हल्ली Dual सिम कार्डचे मोबाइल मिळतात, पण ह्या सदगृहस्थाकडे ही सिस्टम ४ वर्षापूर्वी अस्तित्वात होती. कुठून काळ्या कांड्या करून ह्याने तो सिम कार्ड स्विच आपल्या मोबाइल मध्ये अक्षरश: घुसुवन बसवला होता. बर दोन वेगळे नंबर असण्याची काही गरज नव्हती, पण...
झोल करायची इतकी आवड की मध्ये टेलिफोन डिपार्टमेंट मध्ये जागा भरायच्या होत्या. चांगली मोठी पोस्ट होती. साहेबाना कुठून तरी खबर लागली. भरला फॉर्म. त्यामध्ये नेमणुकीसाठी तीन पसंतीची ठिकाणे द्यायची होती. साहेबानी पहिली पसंती बिहारला दिली. का तर तिथे बेकायदीशीर कामा शिवाय काहीच होत नाही. क्रिकेट खेळणारा माणूस जसे लॉर्ड्स वर खेळण्याचे स्वप्न पाहत असेल तसे हे बिहार मध्ये जाउन भ्रष्टाचार करायला उतावळे झालेले.
कला क्रीडा साहित्य ह्या विभागांमध्ये अत्यानंद. कोणाची शेपूट कोणाला लावेल ह्याचा पत्ता नाही. मध्यंतरी ब्रायन लाराने ४०० धावा करून विश्वविक्रम नोंदवला. आम्ही त्याबद्दल बोलत होतो. साहेब पण आमच्या बरोबर होते. डोक्यामध्ये नेहमीप्रमाणे किडे वळवळ करत होते. आमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष्य नव्हते. पण मध्येच काही तरी आपला सहभाग दाखवावा म्हणून "काय केले लारा दत्ता ने ?" असा प्रश्न टाकून दिला. उद्या अभिनव बिन्द्राने सचिन तेंडुलकरचा क्रिकेट मधला विक्रम ओलिंपिक मध्ये मोडला हे संगितल तरी तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघणार नाही, उलट हे व्यवस्थित लक्ष्यात ठेवून उद्या दुसर्या कोणाला तरी ठसका लावेल ह्याची खात्री आहे. तसा तो कला क्रीडा साहित्या ह्या विभागामध्ये मलाच काय पण कुणालाही नडणार नाही. कारण ह्याला साप्ताहिक/मासिक/पेपर मध्ये भविष्य आणि पेज थ्री बातम्या आणि काही आकर्षक फोटो हे सोडून बाकी कश्याशी पडलेली नसते. राजकारणात थोडेफार स्वारस्य आहे पण ते राजकारणात नसून राजकारणामुळे मिळणार्या गोलमाल करण्याच्या ताकदीत आहे हे वेगळं सांगायला नको.
आत्ता पोरीबाबत. ह्या बाबतीत ह्यानी आध्यात्मिक पातळी गाठलेली. M G रोड वर आढळणार्या सगळ्या पोरी xxx हा नियम. एखादी मुलगी ही मैत्रीण वैगरे असूच कशी शकते? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले म्हणजे केवळ "लफडं"च असू शकते. त्याला दुसरे नाव असूच शकत नाही. पोरी बरोबर मैत्री करून काय करणार? हा वरती भाबडा (?) प्रश्न. वरतीअमुक एक मुलगा एका मुलीबरोबर बोलतो तरी पण त्या दोघांमध्ये "तसलं" काही नाही मग काय आहे? दुसर असूच काय असु शकत? बरं आमची पण कोणी खास मैत्रीण नव्हती, त्यामुळे आम्हीही कधी समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही. तसही उत्तर देऊन काही फरक पडणार नाही ह्याची खात्री अजूनही आहे. नशीब माणसाने "दोस्ताना" नाही पहिलाय. आम्ही कोणी त्याला बघावा म्हणून आग्रह ही करणार नाही. ह्याची केमिस्ट्री बदलून "गे"मिस्ट्री व्हायला नको. आमचे जिणे मुश्कील होऊन जाईल. ह्याचे फंडे बदलले म्हणजे ह्याच्या समोर मित्राबरोबर जायची/फिरायाची पण चोरी होईल. रूम पार्ट्नर बरोबर पण रहता येणार नाही. हा माणूस सगळ्याना वाळीत टाकेल. अजुन एक आठवल. वळू पिक्चर बद्दल बोलणे सुरू होते. मध्येच एकाने ह्याला खोचकपणे विचारले "वळू म्हणजे काय माहीत आहे?" उत्तर: "अबे हा वळू धड बैल ही नसतो धड गाय ही नसते... मधलाच असतो... काही कामाचा नसतो मग त्याला सोडून देतात गावभर, त्याला वळू म्हणतात..." साहेबाना सर्वसामान्य स्त्रीलिंग व्यर्ज आहे. त्यांच्यासाठी तीन लिंग. पुल्लिंग, डार्लिंग आणि नपूसक लिंग.
हे सगळे फंडे असून माणूस शेवटी एक दिवस प्रेमात पडला. पडला म्हणजे कोसळला. पोरीबद्दल जे फंडे होते ते विसरला. पोरगी बरोबर लफडं सोडून नुसतं प्रेम देखील करू शकतो हे साहेबाना समजले. सध्या साहेब प्रेमात गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे जरा नॉर्मलला आलेले आहेत. पण आमचे वांदे झालेत. आमच्या आयुष्यातली मज्जा निघून गेली आहे. बघू प्रकरण किती आणि कसे पुढे जाते.
हा माणूस म्हणजे आमच्या अळणी आणि बेचव आयुष्यामधले मीठ आहे. ह्याच्यामुळे कित्येकदा आम्ही मनापासून खळखळून हसलो आहोत. एकदा एकदा सगळ्याना वाटता ह्याचे फंडे समजले. आत्ता हा माणूस आपल्याला कळला पण नाही. साहेबाकडे फंडे अनलिमिटेड. ह्याच्याबद्दल लिहावं असं कधीपासून मनात होत. शेवटी लिहलं एकदाचं. काय काय आणि किती लिहावं कळतं नव्हतं. काही गोष्टी आठवल्या पण नाहीत. ह्या माणसाला कागदावर उतरवणे सोप नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अशीच काही मला भेटलेली माणसं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Saturday, January 9, 2010
मराठी ब्लॉग विश्ववरील वाढत्या चोर्या
काळ दुपारी मराठी ब्लॉग विश्वला भेट दिली. पहिल्याच पानावर "कशी मुलगी पाहिजे?" ह्या शीर्षकाने लक्ष वेधून घेतले. आत्ता हल्ली लग्न हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने लगेचच त्या लिंक वर क्लिक करून वाचू लागलो. पहिल्या चार ओळी वाचताच हे आधी कुठेतरी वाचलय हे जाणवले. मध्यंतरी अजयने मुली, लग्न ह्या विषयांवर लिहलं होतं ते आठवलं म्हणून त्याचा ब्लॉग चाळला पण मला हवी असलेली पोस्ट त्याच्या ब्लॉग वर नाही मिळाली म्हणजे अजयच्या ब्लॉगवरुन कुणी कॉपी केलं नव्हतं. अजुन नेहमीचे काही ब्लॉग पाहिले. तिथेही काही नाही सापडलं. मग शेवटी डिटेक्टिव गूगलची मदत घेतली. गूगलमध्ये मराठी भाषा हा पर्याय निवडून "कशी मुलगी पाहिजे?" शोधलं तर मी डिसेंबरमध्ये वाचलेली लिंक मिळाली. म्हटलं चला ह्या ब्लॉगवाल्याला कळवू की तुमचा लेख चोरी झालाय पण त्याच वेळी अजुन एका लिंकने लक्ष वेधून घेतलं. तिथे जाऊन पाहिलं तर अगदी तीच पोस्ट २००७ साली पोस्ट केलेली होती. म्हटलं साला आपण डिसेंबर मध्ये जी वाचली ती देखील चोरीचीच होती. आणि आज ज्याने पोस्ट केली त्याने माहीत नाही कुठून उचलली? मूळ ब्लॉग वरुन की चोराकडून? हा दुसरा चोर म्हणजे आधुनिक श्रीकृष्णच म्हणा ना. कृष्णाने लहानपणी गोकुळात "नंदा"घरी राहून दूध-दही चोरले आणि हा कलियुगातला कृष्ण लोकांचे लेख चोरतोय. ते देखील असे लेख जे मराठी ब्लॉग विश्ववर पोस्ट करून महिना देखील झाला नाही. पहिल्याने निदान थोडं तरी डोकं वापरलं. त्याने अडीज वर्षापुर्वीची पोस्ट ब्लॉगवर टाकली पण हा तिसरा तर चोरावर मोर. आधी मला देखील वाटलं आपण हे लिहतोय खरं पण ही एकच व्यक्ती तर नसेल? जुन्या ब्लॉगवर काही प्रॉब्लेम आला असेल म्हणून नवीन ब्लॉग सुरू केला असेल आणि एक चांगली पोस्ट म्हणून "ती" पोस्ट पुन्हा प्रकाशित केली असेल. पण सगळी खात्री करून पाहिली पण मला तरी ह्या तीन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ह्याची खात्री वाटते. आत्ता कुणाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर सारखा रोग असेल आणि तो रोगी हे धंदे करत असेल तर त्याला काही इलाज नाही. पुढे सगळ्या लिंक देतोय, पहा तुम्हीच तुम्हाला काय वाटते?
मूळ लेख
पहिली कॉपी
दुसरी कॉपी
आत्ता काय माहीत त्यांनी संबधित लेखकांची परवानगी घेतली देखील असेल. असं असेल तर माझे आरोप पूर्ण चुकीचे आहेत हे मी मान्य करेन पण मला तरी तशी नोंद कुठेही आढळली नाही.
पहिल्या कॉपीवाला ब्लॉग जरा नीट बघा. २००९ मध्ये ४३४ पोस्ट केल्या आहेत. आत्ता त्यातल्या किती खर्या किती खोट्या कुणास ठाऊक? मी काही मराठी ब्लॉगवरचे झाडून सगळे ब्लॉग वाचत नाही पण मला त्यात अजुन एक पोस्ट आढळली जी पंकजच्या ब्लॉगवर, २० जून २००९ ला पोस्ट केलेली होती, ती जशीच्या तशी उचललेली आहे. त्याने आपल्या ब्लॉगवर "मित्रानो ..तुमच्याकडे जर मराठी साहित्य असेल, तर ते मला पाठवा...मी ते ह्या ब्लॉग वर पब्लिश ...तुमच्या नावाबरोबर..मग वाट कसली बघताय ?? इथे द्या पाठवून लवकर" असे आश्वासन दिले आहे पण "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजच्या कॉपी केलेल्या पोस्टवर तरी कुणाचंच नाव दिलेलं नाही. आत्ता "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजची "मी फिदा आहे" पोस्ट ह्या दोन्ही मराठी ब्लॉग विश्ववर प्रकाशित झालेल्या आहेत. मग जो कुणी मराठी ब्लॉगवर आपले पोस्ट पब्लिश करत असेल तर एखाद्याला मेल करून पुन्हा तीच पोस्ट मराठी ब्लॉग विश्ववर कशाला पब्लिश करेल?
महेन्द्र काकांच्या ब्लॉगची एका साप्ताहिक पुरवणीने केलेल्या चोरीची घटना सगळ्यांना ठाऊक आहेच. गेल्याच आठवड्यात हेरंबने देखील त्याच्या ब्लॉगवरच्या चोरीबद्दल लिहलं होतं. ब्लॉगवरचे लेख ईमेल मधून forward होणे अश्या घटना देखील सर्रास घडतात. आता ही कालची घटना असो वा आधीच्या, हे चोर जेंव्हा लेख कॉपी करतात तेंव्हा ह्यांना लेखकाचं नाव कॉपी करायला काय जातं? मी काही लेखनाचा वरदहस्त लाभलेला माणूस नव्हे. मी जेंव्हा ही माझ्या ब्लॉगवर लिहतो तेंव्हा माझे निदान दोन तीन तास तरी नक्की खर्ची होतात आणि जर कुणी ctrl+c, ctrl+v ही चार बटणं दाबून ते लिखाणं आपल्या नावावर खपवतं असेल तर ते खपवून घेणं शक्य नाही. ह्या चोर्या कशा थांबवाव्यात ह्यावर सध्या तरी आपल्या ब्लॉगवरुन right click->copy हा option disable करणे हाच एक रामबाण उपाय दिसतो. त्याचबरोबर अशी चोरी आढळून आल्यास आपल्या ओळखीतल्या ब्लॉगर मित्र-मैत्रिणी आणि Twitter वरील लोकांना कळवून जास्तीत जास्त जणांमार्फत त्या चोराच्या पोस्टला प्रतिक्रिया म्हणून मूळ ब्लॉगची लिंक देणे हा एक मार्ग आहे. भले तो ती प्रतिक्रिया स्वीकारो अथवा न स्वीकारो, निदान आपली चोरी पकडली गेली, किंवा आपल्यावर कुणी लक्ष ठेवून आहे हे तरी त्याच्या लक्षात येईल आणि कदाचित अश्या चोर्या कमी होतील. जमल्यास पुढच्या रविवार पुण्यात होणार्या पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यामध्ये हा मुद्दा देखील चर्चिला जावा. त्यातून अजुन काही उपाय सुचल्यास आपण सर्व मिळून तो अंमलात आणू शकतो.
तर गाववाल्यांनू मराठी गूगलवर जावा आणि आपली एखादी आवडीने वाचली गेलेली पोस्ट शोधून बघा, कदाचित चोरीला गेलेली असु शकते...
मूळ लेख
पहिली कॉपी
दुसरी कॉपी
आत्ता काय माहीत त्यांनी संबधित लेखकांची परवानगी घेतली देखील असेल. असं असेल तर माझे आरोप पूर्ण चुकीचे आहेत हे मी मान्य करेन पण मला तरी तशी नोंद कुठेही आढळली नाही.
पहिल्या कॉपीवाला ब्लॉग जरा नीट बघा. २००९ मध्ये ४३४ पोस्ट केल्या आहेत. आत्ता त्यातल्या किती खर्या किती खोट्या कुणास ठाऊक? मी काही मराठी ब्लॉगवरचे झाडून सगळे ब्लॉग वाचत नाही पण मला त्यात अजुन एक पोस्ट आढळली जी पंकजच्या ब्लॉगवर, २० जून २००९ ला पोस्ट केलेली होती, ती जशीच्या तशी उचललेली आहे. त्याने आपल्या ब्लॉगवर "मित्रानो ..तुमच्याकडे जर मराठी साहित्य असेल, तर ते मला पाठवा...मी ते ह्या ब्लॉग वर पब्लिश ...तुमच्या नावाबरोबर..मग वाट कसली बघताय ?? इथे द्या पाठवून लवकर" असे आश्वासन दिले आहे पण "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजच्या कॉपी केलेल्या पोस्टवर तरी कुणाचंच नाव दिलेलं नाही. आत्ता "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजची "मी फिदा आहे" पोस्ट ह्या दोन्ही मराठी ब्लॉग विश्ववर प्रकाशित झालेल्या आहेत. मग जो कुणी मराठी ब्लॉगवर आपले पोस्ट पब्लिश करत असेल तर एखाद्याला मेल करून पुन्हा तीच पोस्ट मराठी ब्लॉग विश्ववर कशाला पब्लिश करेल?
महेन्द्र काकांच्या ब्लॉगची एका साप्ताहिक पुरवणीने केलेल्या चोरीची घटना सगळ्यांना ठाऊक आहेच. गेल्याच आठवड्यात हेरंबने देखील त्याच्या ब्लॉगवरच्या चोरीबद्दल लिहलं होतं. ब्लॉगवरचे लेख ईमेल मधून forward होणे अश्या घटना देखील सर्रास घडतात. आता ही कालची घटना असो वा आधीच्या, हे चोर जेंव्हा लेख कॉपी करतात तेंव्हा ह्यांना लेखकाचं नाव कॉपी करायला काय जातं? मी काही लेखनाचा वरदहस्त लाभलेला माणूस नव्हे. मी जेंव्हा ही माझ्या ब्लॉगवर लिहतो तेंव्हा माझे निदान दोन तीन तास तरी नक्की खर्ची होतात आणि जर कुणी ctrl+c, ctrl+v ही चार बटणं दाबून ते लिखाणं आपल्या नावावर खपवतं असेल तर ते खपवून घेणं शक्य नाही. ह्या चोर्या कशा थांबवाव्यात ह्यावर सध्या तरी आपल्या ब्लॉगवरुन right click->copy हा option disable करणे हाच एक रामबाण उपाय दिसतो. त्याचबरोबर अशी चोरी आढळून आल्यास आपल्या ओळखीतल्या ब्लॉगर मित्र-मैत्रिणी आणि Twitter वरील लोकांना कळवून जास्तीत जास्त जणांमार्फत त्या चोराच्या पोस्टला प्रतिक्रिया म्हणून मूळ ब्लॉगची लिंक देणे हा एक मार्ग आहे. भले तो ती प्रतिक्रिया स्वीकारो अथवा न स्वीकारो, निदान आपली चोरी पकडली गेली, किंवा आपल्यावर कुणी लक्ष ठेवून आहे हे तरी त्याच्या लक्षात येईल आणि कदाचित अश्या चोर्या कमी होतील. जमल्यास पुढच्या रविवार पुण्यात होणार्या पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यामध्ये हा मुद्दा देखील चर्चिला जावा. त्यातून अजुन काही उपाय सुचल्यास आपण सर्व मिळून तो अंमलात आणू शकतो.
तर गाववाल्यांनू मराठी गूगलवर जावा आणि आपली एखादी आवडीने वाचली गेलेली पोस्ट शोधून बघा, कदाचित चोरीला गेलेली असु शकते...
Monday, January 4, 2010
३ इडियट्स!!!
दिवसाढवळ्या चोरी. इथे बरेचसे चोर आहेत हे माहीत होतं पण माझ्या गेली साडेपाच सहा वर्ष बेस्टसेलर असलेल्या पुस्तकाची कथा कुणी चोरेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. माझ्या कथेवर जवळपास पूर्ण सिनेमा बनवून वर माझी कथा फक्त ३ ते ५ टक्के वापरली म्हणे. तो "लूडबूड" तर म्हणे मी पुस्तकं देखील वाचलं नाही. अरे काय? मागे एकदा नुसत्या लुकसाठी त्याने निव्वळ मिशीवर किती मेहनत घेतली होती. तो त्याच्या भूमिकेविषयी किती जागरूक असतो हे दुनियेला माहीत आहे. असा हा माणूस म्हणे मी पुस्तकं वाचलं देखील नाही. कोण विश्वास ठेवेल. खरं तर त्याचा सिनेमा असेल तर दिग्दर्शनापासून ते पब्लिसिटीपर्यंत प्रत्येक कामात हा किती लूडबूड करतो हे जगाला ठाऊक आहे. इथे तर हा केवळ सिनेमाचा नायक आहे, निर्माता/दिग्दर्शकदेखील नव्हे. कथा, पटकथा ह्याच्याशी ह्याचा काडीचा देखील संबंध नाही. ह्याने सिनेमात काम केलं त्याबद्दल ह्याला त्याचे पैसे मिळाले. ह्याला मध्ये नाक खुपसायची काही गरज नव्हती. पण लूडबूड हा नाही करेल तर मग कोण करेल? जेंव्हा मी माझ्या कथेचं श्रेय मला मिळालं नाही असं म्हटलं तर हा का पेटला? निर्माता/दिग्दर्शकांनी बोलायला हवे होते तर ते आधी काहीच बोलले नाहीत. वर म्हणे की त्यांचा जो कुणी पटकथाकार आहे तो म्हणे माझ्यासारखा प्रसिद्ध नाही म्हणून कथेचं श्रेय त्याला जायला हवं. अरे काय? इथे काय दुष्काळग्रस्तांना मदत पुरवली जातेय काय की गरजवंत पाहून कथेचं श्रेय देताय. परवा तर पत्रकार परिषदेत कहर केला ह्या लोकांनी. पत्रकार परिषदेत हे लोकं कसे बोलत होते, काय भाषा वापरात होते हे सगळ्या जगाने पाहिलं. मी माझ्या लिखाणातून देश बदलावा म्हणून बँकेतलं चांगलं करियर सोडून पूर्ण वेळं लिखाण सुरू केलं तर च्यामारी इथे माझीचं कथा चोरून ह्यांनी माझाच गेम केला. सलाम आहे इथल्या लोकांना. आत्ता तो फरहान आपल्या 3 Mistakes of My Life पुस्तकावर सिनेमा बनवतोय, त्याच्याकडे आत्तापासून लक्ष ठेवायला हवे. चला. (Give me some sun shine, Give me some rain, Give me another chance, I wanna grow up once again गाणं गुणगुणत निघून जातो)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चला सलग तिसर्या वर्षी आपण अभिनय केलेल्या चित्रपटाने आठवडाभरात १०० करोडहून अधिक गल्ला जमवला. इंडस्ट्रीने वर्षभरात कमावलेला गल्ला एकीकडे आणि आपल्या एका चित्रपटाचा गल्ला एकीकडे. सगळं कसं सुरळीत सुरू होतं आणि ह्या भगताच्या अंगात आलं. काय काय बरळू लागलाय. आपल्या बहुतेक प्रत्येक चित्रपटाच्या वेळी हे होतचं म्हणा. दोन वर्षापुर्वी त्या अमोल गुप्तेला कसा खड्यासारखा बाजूला केला. गेल्या वर्षीदेखील आपण सोडून गजिनीची बहुतेक टीम तीच होती. तो दिग्दर्शक, नायिका, खलनायक सगळे गजिनी मध्ये दुसर्यादा काम करत होते पण गाजावाजा फक्त आपला. आणि का होऊ नये? मी माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये इतका झोकून देतो. सगळं कसं मला माझ्या मनासारखं हवं असतं. तर लोकं मी दुसर्याच्या कामात ढवळाढवळ करतो म्हणतात. आत्ता मी काम केलेला प्रत्येक चित्रपट २५०, ३०० कोटींचा व्यवसाय करत असेल तर मी केलेली ढवळाढवळ काय वाईट आहे? आणि मी त्याचं श्रेय घेतलं तर काय बिघडलं? बाकी कुणाचे चित्रपट कमावतात का इतका पैसा? पण पोटात दुखत लोकांच्या. आत्ता ह्या भगताचंच घ्या. ह्याच्याच पुस्तकावर आधारित तो सल्लूचा चित्रपट आला होता ना? कुणी बघितला तरी का तो? तेंव्हा कुणी गेलं होतं का भगताकडे की भगत त्या पडलेल्या चित्रपटाचं श्रेय घेत फिरला? आत्तादेखील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिला आठवडा हा काहीच बोलला नाही. आठवड्या भरात १०० कोटींचा आकडा पार झाल्याचं पाहून ह्याला अचानक कथेचं श्रेय हवं झालं. आत्ता त्याचं म्हणण कितीही खरं असलं तरी ह्याला खोटंचं ठरवायला हवं. पण ह्या आधी आपण अशी प्रकरण पचवली असली तरी हे प्रकरण तितकं साधं नाही. हा भगत आपल्याला भारी पडणार असं दिसतं. ह्याच्यावर लिंबू-मिरचीचा साधा उतारा उपयोगी नाही, काहीतरी मजबूत तोडगा काढला पाहिजे. पाहु जे काय करायचं ते आपल्यालाचं लवकरात लवकर करायला हवं नाहीतर तो भगत डोक्यावर बसायचा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्थळं: राजूचं ऑफीस. VVC आणि राजू मस्तं टामकवतं सेलिब्रेट करतं होते.
राजू: चला मुन्नाभाई नंतर बरेच दिवसांनी आपला चित्रपट मजबूत चालतोय.
VVC: आणि खोर्याने कमावतोय देखील. चिअर्स!!!
राजू: बस्स, स्साला हे कॉपीराइटचं लफडं मध्ये उपटायला नको होतं.
VVC: ते जाऊ दे रे. आपण ह्यावेळी त्या चरस्याला घेऊन मुन्ना भाई नाय बनवलाय. आपण त्या मि. परफेक्टला चित्रपटासाठी साइन केला ना तिथेचं आपलं काम संपलं. आत्ता फक्त बसून पैसे मोजायचे. जी काय लफडी उपटली आहेत ती तो खान बघून घेईल.
राजू: हो ते पण खरं आहे. कारण ह्यावेळी मी नावालाच दिग्दर्शक होतो. सेटवर त्याचाच आवाज होता.
VVC: वर आपलं पब्लिसिटीचं काम पण त्यानेचं केलं. कुणी तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली चालतं असेल तर डोळे झाकून त्याला घ्यावं.
राजू: हो रे जिथे तिथे हा कडमड्त होता. म्हणून ह्याच्याबरोबर बहुतेक कुणी परत काम करायला मागत नाही. आणि हा बाहेर उगाचच मी कुणाबरोबर दुसर्यांदा काम करीत नाही म्हणून बढाया मारत फिरत असतो.
VVC: सोड ना आपल्याला कुठे त्याच्या बरोबर परत काम करायचंय. आत्ता ते सगळं जाऊ दे. कुणी कशाचं किती श्रेय घ्यावं ते तो लेखक, तो मि. परफेक्ट आणि पब्लिक बघून घेतील. तेवढीच चित्रपटाची पण पब्लिसिटी होईल आणि गल्ला वाढेल. आपण लांबून मज्जा बघू.
राजू: हे म्हणजे दोघांचं भांडण आणि तिसर्याचा लाभ म्हणतात तसं झालं. आपल्यासाठी आपला खान, तो लेखक आणि प्रेक्षक म्हणजे "३ इडियट्स" ठरले की.
हा हा हा... दोघं बराच वेळं हसत रहातातं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चला सलग तिसर्या वर्षी आपण अभिनय केलेल्या चित्रपटाने आठवडाभरात १०० करोडहून अधिक गल्ला जमवला. इंडस्ट्रीने वर्षभरात कमावलेला गल्ला एकीकडे आणि आपल्या एका चित्रपटाचा गल्ला एकीकडे. सगळं कसं सुरळीत सुरू होतं आणि ह्या भगताच्या अंगात आलं. काय काय बरळू लागलाय. आपल्या बहुतेक प्रत्येक चित्रपटाच्या वेळी हे होतचं म्हणा. दोन वर्षापुर्वी त्या अमोल गुप्तेला कसा खड्यासारखा बाजूला केला. गेल्या वर्षीदेखील आपण सोडून गजिनीची बहुतेक टीम तीच होती. तो दिग्दर्शक, नायिका, खलनायक सगळे गजिनी मध्ये दुसर्यादा काम करत होते पण गाजावाजा फक्त आपला. आणि का होऊ नये? मी माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये इतका झोकून देतो. सगळं कसं मला माझ्या मनासारखं हवं असतं. तर लोकं मी दुसर्याच्या कामात ढवळाढवळ करतो म्हणतात. आत्ता मी काम केलेला प्रत्येक चित्रपट २५०, ३०० कोटींचा व्यवसाय करत असेल तर मी केलेली ढवळाढवळ काय वाईट आहे? आणि मी त्याचं श्रेय घेतलं तर काय बिघडलं? बाकी कुणाचे चित्रपट कमावतात का इतका पैसा? पण पोटात दुखत लोकांच्या. आत्ता ह्या भगताचंच घ्या. ह्याच्याच पुस्तकावर आधारित तो सल्लूचा चित्रपट आला होता ना? कुणी बघितला तरी का तो? तेंव्हा कुणी गेलं होतं का भगताकडे की भगत त्या पडलेल्या चित्रपटाचं श्रेय घेत फिरला? आत्तादेखील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिला आठवडा हा काहीच बोलला नाही. आठवड्या भरात १०० कोटींचा आकडा पार झाल्याचं पाहून ह्याला अचानक कथेचं श्रेय हवं झालं. आत्ता त्याचं म्हणण कितीही खरं असलं तरी ह्याला खोटंचं ठरवायला हवं. पण ह्या आधी आपण अशी प्रकरण पचवली असली तरी हे प्रकरण तितकं साधं नाही. हा भगत आपल्याला भारी पडणार असं दिसतं. ह्याच्यावर लिंबू-मिरचीचा साधा उतारा उपयोगी नाही, काहीतरी मजबूत तोडगा काढला पाहिजे. पाहु जे काय करायचं ते आपल्यालाचं लवकरात लवकर करायला हवं नाहीतर तो भगत डोक्यावर बसायचा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्थळं: राजूचं ऑफीस. VVC आणि राजू मस्तं टामकवतं सेलिब्रेट करतं होते.
राजू: चला मुन्नाभाई नंतर बरेच दिवसांनी आपला चित्रपट मजबूत चालतोय.
VVC: आणि खोर्याने कमावतोय देखील. चिअर्स!!!
राजू: बस्स, स्साला हे कॉपीराइटचं लफडं मध्ये उपटायला नको होतं.
VVC: ते जाऊ दे रे. आपण ह्यावेळी त्या चरस्याला घेऊन मुन्ना भाई नाय बनवलाय. आपण त्या मि. परफेक्टला चित्रपटासाठी साइन केला ना तिथेचं आपलं काम संपलं. आत्ता फक्त बसून पैसे मोजायचे. जी काय लफडी उपटली आहेत ती तो खान बघून घेईल.
राजू: हो ते पण खरं आहे. कारण ह्यावेळी मी नावालाच दिग्दर्शक होतो. सेटवर त्याचाच आवाज होता.
VVC: वर आपलं पब्लिसिटीचं काम पण त्यानेचं केलं. कुणी तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली चालतं असेल तर डोळे झाकून त्याला घ्यावं.
राजू: हो रे जिथे तिथे हा कडमड्त होता. म्हणून ह्याच्याबरोबर बहुतेक कुणी परत काम करायला मागत नाही. आणि हा बाहेर उगाचच मी कुणाबरोबर दुसर्यांदा काम करीत नाही म्हणून बढाया मारत फिरत असतो.
VVC: सोड ना आपल्याला कुठे त्याच्या बरोबर परत काम करायचंय. आत्ता ते सगळं जाऊ दे. कुणी कशाचं किती श्रेय घ्यावं ते तो लेखक, तो मि. परफेक्ट आणि पब्लिक बघून घेतील. तेवढीच चित्रपटाची पण पब्लिसिटी होईल आणि गल्ला वाढेल. आपण लांबून मज्जा बघू.
राजू: हे म्हणजे दोघांचं भांडण आणि तिसर्याचा लाभ म्हणतात तसं झालं. आपल्यासाठी आपला खान, तो लेखक आणि प्रेक्षक म्हणजे "३ इडियट्स" ठरले की.
हा हा हा... दोघं बराच वेळं हसत रहातातं.
Friday, January 1, 2010
नवं वर्षाची पहाट
पंकज भटक्याकडून भटकंती पंथाची दीक्षा घेतल्यामुळे यंदाचे नवं वर्ष नेहमीप्रमाणे ३१ डिसेंबरची रात्र न जागवता नववर्षाचा सूर्योदय पाहून करावी असं ठरवलं होतं. आमचा स्कंधगिरीचा प्लॅन कित्येक दिवस ठरत होताच मग तो थर्टी फर्स्टच्या रात्रीच करावा असे ठरले. ग्रूपमधले कुणी "डोलकर" पार्टीतले नसल्याने पोट्टे देखील तयार झाले. काल रात्री पावणे बाराच्या दरम्यान १२ जणांनी बंगलोर सोडले. पोलिसांनी ४ निरनिराळ्या ठिकाणी थांबवून कुणी आचंमन केलेले नाही नां? ह्याची खात्री केली. जवळपास ७५ किलोमीटरचा पल्ला गाठून आम्ही २ च्या आसपास स्कंधगिरीच्या पायथ्याशी पोहोचलो.
२ वाजता स्कंधगिरीची चढाई सुरू केली. मस्त पोर्णिमेचे टिपुर चांदणे होते. संध्याकाळी मुसळधार पाऊस पडून गेल्याने रस्ता जास्तचं निसरडा झाला होता. त्यामुळे हळूहळू वर चढलो. पावसामुळे थंडी आणखीनच वाढली होती. मध्येच काळोखात रस्ता चुकला, तो शोधण्यात अर्धा-पाउण तास गेला. पहाटेची वेळ जशी जवळ येऊ लागली तसे धुके वाढले आणि २ फुटांवरचे देखील दिसेनासे झाले. स्कंधगिरीवर पोहचेपर्यंत पावणे-सहा झाले. पश्मिमेकडे पोर्णिमेचा चंद्र अस्ताला जात होता थोड्यावेळातच पूर्वेकडून सुर्य नारायणाचे आगमन होणार होते. किंचित प्रकाश पसरला तेंव्हा आजूबाजूला ढग सोडून काही दिसत नव्हते. तांबडे फुटल्यानंतर ते पूर्ण सूर्योदय होईपर्यंत जे काही अनुभवायला मिळाले त्याचे मी वर्णन करू शकत नाही. खाली फोटो देतोय.
खाली उतरल्यानंतर स्कंधगिरीचा पायथ्याकडून काढलेला फोटो.
लहानपणापासून कोकणात निरनिराळ्या ऋतूमध्ये सूर्यास्ताच्या असंख्य छटा पाहिल्या आहेत. या आधीचा आठवणीतला सूर्योदय मात्र एकदाच पॉंन्डीचेरीमध्ये अनुभवला होता आणि त्या नंतर आज. छान प्रसन्न वाटलं. आजवर जागवलेल्या थर्टी फर्स्टच्या सर्व रात्री ह्या एका पहाटेवर ओवाळून टाकाव्यात अशी ही नवं वर्षाची पहाट.
Subscribe to:
Posts (Atom)