Showing posts with label विनोदी. Show all posts
Showing posts with label विनोदी. Show all posts

Sunday, September 8, 2013

लगबग...


काय रे झाली काय तयारी. मखराचे पडदे नीट बांधा. समया, निरांजन आणि बाकी पूजेची भांडी लख्ख घासून पुसून घ्या.

आबांनी बाजारातून येऊन सामानाच्या पिशव्या खाली ठेवत ओटीवर बसल्या बसल्या चौकशी कम सूचना सुरू केल्या. आबांचा लेक सदा आणि पुण्याहून आलेले त्याचे दोन चुलत भाऊ देवघरात गणपतीसाठी मखर तयार करीत होते. तिथे बारीक चुका, खिळे, टेकस, कात्री, हातोडी, पक्कड, वायरी, टेस्टर, स्क्रु-ड्रायवर, फेविकल कॉल, सजावटीचे रंगीत कागद आणि काय काय असे सगळे सामान पडलेले होते. लहान मुले तिथे लुडबूड करायला बघत होती त्यामुळे अधूनमधून माजघरातून एखादा हात येऊन त्या चिल्ल्या-पिल्यांची गठली उचलून त्यांना आत नेत होता. पण गप्प बसतील ती चिल्ली-पिल्ली कसली. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने सगळीकडून त्यांच्या नावाने कल्ला सुरू होता. पडवीत आबांचे वडील नाना आराम खुर्चीत रेलुन पुन्हा पुन्हा तीच वर्तमान पत्रे आणि पुरवण्या चाळीत होते. नानी शाळेत जाणार्‍या नातवंडांबरोबर बसून दुर्वा नीट करीत होती. आजीने नीट केलेल्या दुर्वा मोजून नातवंडे बरोब्बर २१ दुर्वांची एक अश्या जुड्या बांधून त्या टवटवीत रहावया म्हणून तांब्याच्या पाणी भरलेल्या पेल्यात नीट उभ्या करून ठेवत होतीत. आबा येताच नातीने हातातील दूर्वाच्या जुडीचे काम झाल्यावर उठून सगळ्या पिशव्या माजघरात मोठ्या काकूकडे म्हणजे आबांच्या बायकोकडे म्हणजे वासंती काकूकडे नेऊन दिल्या. तिकडे माजघरात जावा जावा आणि त्यांच्या हाताखाली लेकी सुना राबत होत्या. घरात गॅस-सिलेंडर असला तरी माणसे वाढल्यामुळे माजघरातील चूलदेखील पेटलेली होती. त्यावर भात आणि आमटीचे टोप ठेवलेले होते. नविन आणि शहरी सुनांना चुलीची सवय नसल्याने चूल संभाळण्याचे काम अर्थातच वासंती काकूकडे होते.

आबा: तात्याची गाडी कुठपर्यंत आली?

सदा: मघाशी फोन केला तेंव्हा कशेळी घाटात होते म्हणजे येवा चिपळूणपर्यंत आले असतील.

आबा: अरे मुंबै सोडून आठ तास उलटून गेले नां त्यांना? अजुन चिपळूणातच. येवा घरात पोचूक हवो होतो. मखराचा सामान आणि लायटिंग घेवन येतोय तो. आत्ता सजावट करणार कधी?

सदा: ओ तात्या म्हायत हाय नां तुम्हाला? त्याका आधीच सांगितला होता की शुक्रवारी रात्रीच निघ नायतर शनवारी सकाळी तरी. पण नाय. हा आज रविवारी सकाळी निघाला. आज हायवे फुल्ल जाम. गेल्या वर्षी पिंट्या आणि मंडळी आदल्या दिवशी निघालेली ती गणपतीची स्थापना होऊन रात्रीची आरती झाली तरी आली नव्हतीत. मग रात्री चंद्र दिसेल म्हणून माना खाली घालून घरात आलीत.

आबा: मग हे तात्याला म्हायत नाय? जाव दे... तुम्ही मखर पुरा करून ठेवा. चौरंग मांडून घ्या. मग तात्या आला की काय ता लायटिंग लावा.

सदा: ओ तात्या कुणाचा ऐकता काय कधी? सगळीकडे आपला ता खरा. पुणेकरा कशी आंबा घाट उतरून शनवारी सकाळी हजर. मुंबैच्या लोकांक कोण सांगूक जायल. तरी नशीब आत्ता गाडी हाय त्याच्या धुंगणाखाली. नायतर दरवर्षी हा जायपर्यंत यसटी आणि रेल्वेचो बुकिंग फुल्ल झालेला असायचा आणि मग प्रायवेट नायतर ज्यादा गाडी पकडून चेंगरून यायचा.

आबा: मुंबैकरा लै शाणी. पडीचो हापूस साशे रुपये डझन घेवन् खातत. पण तात्याकं काय बोलूचा तर तो नानीचो लाडको लेक. आपण काय बोलणार. बरा ता जाव दे. भटाला किती वाजता बोलावलात हाय? आणि ढोलताशेवाल्याक सांगितला हायस नां. काय हाय, भट आणि वाजंत्रीवाले, उद्या दोघांच्या पण धंद्याचो दिवस. त्यांना पयला सांग. बाकी बघून घेता येता.

सदा: होय तर... भटाकं सकाळी धा वाजता बोलावलंय. ताशेवाला पेंटरच्या घराशी येतंय.

आबा: बरा आठवला. जमला तर संध्याकाळी पेंटरकडे एक फेरी मारुन येतो. गणपती तयार हाय की नाय बघूक हवो नाय तर गेल्यावर्षी सारखो नको. चतुर्थीला आपण गणपती आणूक गेलो तरी पेंटरचो पुतणो आपलो उंदीर रंगवताय.

नानी: सकाळी लवकर उठा. मी चार वाजता बंब पेटवन ठेवतो. आपला आणि आपापल्या कॅलेंडरांचा पटापट आवरा. आठच्या आत पेंटरकडे पोचूक हवा. आणि मिरवणूक काढा काय ती पण धाच्या आत घरी येऊक हवो. नायतर गेल्या वर्षी भट घरात वाट बघीत बसलेलो आणि तुम्ही घाटीत नाचित होतात. तुमची मिरवणुकीची हौस काय ती विसर्जनाच्या दिवशी भागवा. उद्या सगळा टायमात होऊक हवा. मिरवाणूकीसाठी गाड्या आणूक वाडीतली पोरा कधी जातायत् ता बघ.

सदा: गाड्या आणतो आम्ही पण तात्या म्हणीत होता की त्याच्या नवीन गाडीतून गणपती आणायचा म्हणून.

आबा: खुळावलाय काय तो? नविन गाडी घेतलान म्हणून बुजवताय वर्षभर. अरे आपल्या गणपतीचो पाट तरी त्याच्या गाडीच्या दरवाजातून आत जायल काय?

सदा: ता त्यास तुम्ही सांगा. गाडी घेवन येव दे त्यास म्हणजे तुम्ही तात्या आणि बापू अशी तिघा भावंडा तुमचे दुखरे गूढगे, मणके आणि मोतिबिंदू घेऊन त्यात बसून मिरवणुकीच्या मागंन या. नायतरी घाटी चढवत नाय तुमच्यान.

आबा: पेकटात लाथ घालीन माझ्या गूढग्याक काय बोललस तर. तुम्ही आपला बघा. दशावताराची आणि सत्यनारायणाची आरती सुरू झाली की नाल (आरतीच्या वेळी वाजवायचे ढोलके ) वाजवताना तुमच्या चडड्या पिवळ्या होतात. "घालिन लोटांगण" सुरू व्हायच्या आधी तुम्ही लोटांगण घातलेला असता.

सदा: लाथ घालायच्या फंदात पडू नका नायतर परत गूढगा धरून बसायला लागेल... ( देवघरातून तिघांच्या ख्या ख्या ख्या चा आवाज येतो )

नाना: तोंडाकडन् पुढे गेलीत कार्टी...

आबा: जाव दे नाना. काय बोलणार. आपल्याकडे बघूनच शिकलीत ती. (देवघराच्या दिशेने पहात) आणि रात्रीच्या आरत्यांना जास्ती उशीर करू नका. कोणाकडे कधी सत्यनारायण आहे ते विचारून भजनाचा ठरवा. नंतर लोकांची कीटकीट नको. आपल्याकडे गुरुवारी पूजा धरलेली आहे. बापूचा लेक आणि नवीन सूनबाई बसू दे पूजेला. काय नाना, बरोबर नाय?

हो हो... नवीन जोडाच बसू दे पूजेला... नानांची संमती.

अहो आणि बापू आला की त्याला आणि नातवाला सांगून टाका की पुढच्या गणपतीत अंगणात गोधड्या आणि लंगोट वाळताना दिसले पाहिजेत. ता काय ता प्ल्यानिंग बिनिंग करीत बसू नका... नानीने नातवासाठी डेडलाईन जाहीर करून टाकली.

आबा: होय ता पण बराबर. पुढच्या श्रावणात तुमचा सहस्त्र-चंद्रदर्शन सोहळा करायचा आहेच त्यात पणतू दर्शन कार्यक्रम पण करून टाकु. (सदाला उद्देशून देवघराच्या दिशेने पहात) बाकी पूजेचा सामान मी आणून ठेवलंय. उद्याच्या पूजेची तयारी चोख करून ठेवा, उगाच भटासमोर मला तोंड सोडायला लाव नका. पोरांना पाठव वाडीत आणि दुर्वा, शमी आणून ठेव. बाळा आणि राणीला सांगून ठेवलंय मी. रोज सकाळी लवकर उठून दुर्वा, शमी आणि पारिजातकाची फुले पुजेला आणून ठेवायची. दुर्वा नीट करून जुड्या करून ठेवा रोजच्या रोज. मी रोज सकाळी पूजेला बसलो की सगळ्या गोष्टी तयार हव्यात. हे दे ते दे नको. सगळं जागच्या जागी असु दे.

माजघरच्या दिशेने बघत... अहो सगळा जिन्नस आहे नां भरलेला? अगदी पापड लोणच्यापर्यंत सगळं एकदा तपासून पहा. नानी तू तांदूळ धुवून सुकवून दिले होतेस त्याचे पीठ आले का गिरणीतून. त्या बाजारच्या पीठाचे मोदक काही धड होत नाहीत.

नानी: हो रे बाबा. मोदक आणि घावण्याचा पीठ तयारा असा. मुंबैकरा आणि पुणेकरा रविवारी निघतील तेंव्हा त्यांच्यासाठी वड्याचा पीठ पण करून ठेवलाय. वडे सागूती खावन श्रावण सोडून जाव दे पोरा माझी.

नाना: ती श्रावण सोडायची राह्यलीत काय अजुन...

नानी: असू दे ओ. आत्ता आठवडाभर तरी उपास करतीलच नां. रविवारी सकाळ्ळच जेटीवर जा आणि ताजा फडफडीत म्हावरा घेवन ये. माझ्या धाकट्या नातवाक चुलित भाजलेलो बांगडो आवडता.

आबा: होय गो. ते पुढच्या रविवारचो बघू नंतर. आत्ता पासून म्हावर्‍याचो विषय नको. आत्ता सध्या मोदकाचा पीठ महत्वाचा. आणि लेकी सुनांना जरा मऊ हातान मोदक कसे करायचे ते शिकव. त्यांच्या हातचे ते राक्षसी मोदक खावत नायत. देवाच्या नेवेद्याच्या पानात तू केलेले मोदकच लाव.

पुन्हा एकदा माजघराच्या दिशेने... अहो परवाच्या ऋषिच्या भाजीसाठी बाजारातून मिळतील तितक्या भाज्या आणल्या आहेत. कणसे आणि शेंगापण मिळाल्या. उद्या घरोघरी गणपती बसणार त्यामुळे बाजारात भाजी पण भेटताना मुश्कील.

नानी: सगळ्या भाज्या कशाला आणल्यास. वासंतीने परसात वाली, अळु, पडवळ, भेंडा, कारली, दोडकी असा भाजीपाला केला आहे. यंदा पाऊस पण चांगला झाला त्यामुळे भाजीपाला, दुर्वा, शमी, फुले यांना तोटा नाही.

आबा: हो घरची भाजी वापरा. मी पण आपली आणून ठेवली बाजारातून. आत्ता एवढी सगळी मंडळी येणार. ऋषिच्या भाजीत नाही तर दुसर्‍या दिवशीला होईल.

वासंती काकू: सगळं आहे व्यवस्थित. फक्त लेक येणार आहे सासरहून आणि तिचे हौसे आहेत यंदा. त्यासाठी सुपल्या आणि बाकीचे साहित्य आणायचे आहे. आज संध्याकाळी आणून ठेवा. नानी सांगतील काय काय आणायचे आहे ते.

आबा: अरे हो. ता राह्यलाच. गेल्यावर्षी हौसे नव्हते त्यामुळे लेकिचे लग्नानंतर पहिल्या वर्षीचे सगळे सण झाले तरी हा कार्यक्रम बाकी आहे. बरं त्यात तुमच्या जावयाचे काही लाड करायचे नाहीत नां? काय गो नानी?

नानी: नाय रे. जावयाला काय देऊचा नसता.

आबा: नाय मी आपला विचारून घेतला. आमच्या वेळी माज पण काय मिळालो नव्हतो. तरी पण जावयाचो काय मान असात तर मी पण माझ्या सासरी वसुलीकं गेलो असतो.

नानी: जल्ला... तुझा आपला काय तरीच...

आबा: चला. तर सगळी तयारी झाली. आत्ता उद्या मंगल मूर्तीचे आगमन झाले की पुढचे पाच दिवस कसे मंगलमय आणि आनंदाचे जातील.

नानी: होय रे बाबा. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया...

=========================================================

उद्या गणेश चतुर्थी. कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव. कोकणातील बहुतेक सगळ्या घरात पुण्या-मुंबईचा चाकरमानी पोहोचतोय. मंगलमूर्तीच्या आगमनाची तयारी जवळ जवळ पूर्ण होत आलीय. घराघरातील ही सगळी लगबग आणि उत्साह शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न...

Tuesday, August 7, 2012

साला एक मच्छर...

नेहमीप्रमाणेच एक इश्यू आला आणि पाहता पाहता डोक्यावर बसला. कस्टमरचा डेटा Encrypt होत नव्हता म्हणजे आमच्या प्रॉडक्टचा मुख्य उद्देश धाब्यावर बसवला गेल्यामुळे आणि त्यात तो कस्टमर म्हणजे एक इंटरनॅशनल बॅंक असल्याने हा इश्यू अगदी मॅनेजर लोकांच्या पण बापांपर्यंत जाऊन पोहोचला होता. आमचे डेटा एनक्रीप्ट/डिक्रीप्ट करणारे प्रॉडक्ट म्हणजे आपल्या WinZip/UnZip सारखेच पण डेटाची सेक्यूरिटी हा मुख्य उद्देश आणि त्यात ते कस्टमरला विकले जात असल्याने जरा "लै भारी" प्रकारातले. प्रॉब्लेम असा होता की कस्टमरचा एनक्रीप्टेड डेटा USB पेन ड्राइव्ह लावून कॉपी करता येत होता. कुणीही ऐरा गैरा माणूस ती सगळी महत्वाची माहिती वाचू शकत होता. त्यात हा डेटा बॅंकेचा म्हणजे प्रश्न अधिकच नाजूक.

नेमका हा इश्यू शुक्रवारी मध्यरात्री रिपोर्ट केला गेल्यामुळे शनिवारी सकाळी सकाळी फोनाफोनी होऊन आमची सगळी टीम हाफिसात. दुपारपर्यंत सोल्यूशन मिळाले. टेस्टिंग टीममधील विभोरला टेस्ट सेटअप तयार करायाला सांगून मी बिल्ड सुरू केले. बिल्ड पूर्ण व्हायला तासभर तरी लागणार होता. ऐन विकांतात सकाळ पासून दगदग झाल्याने म्हणून मी जरा आरामातच खुर्चीत मागे रेलून मॉनिटरवर लक्ष ठेवून होतो. उगाच बिल्ड फेल झाले तर लगेच कळेल, त्यात आणखी वेळ जायला नको म्हणून. बिल्ड आणि स्टेटस रिपोर्टची वाट पाहाणारे अनेक जण होते त्यामुळे सगळे डिटेल्स भरायला सुरूवात केली. रिपोर्ट लिहीत असतानाच अचानक डाव्या हाताला काहीतरी टोचले. पहातो तर डास. मस्तपैकी रक्त शोषित बसला होता. वातानुकुलित वातावरणात मध्येच हा डास कुठून आला मला कळेना. रिपोर्ट पूर्ण करायची गडबड असल्याने मी फार विचार देखील करीत बसलो नाही. नुसताच हात झटकून त्याला पळवून लावला आणि यूनिट टेस्टमध्ये काय काय टेस्ट्स रन केल्या आहेत याची माहिती भरू लागलो..

त्या टेस्ट केसेस लिहिताना अचानका माझ्या लक्षात आले की जरी कस्टमरचा इश्यू फिक्‍स झाला असला तरी आत्ताच एका साध्या डासाने आपला कोड ब्रेक केला. आपले एनक्रीप्टेड रक्त आपले प्रॉडक्ट न वापरता डिक्रीप्ट करून एक डास शोषून गेला. आपले प्रॉडक्ट फेल गेले. इतकी साधी टेस्ट केस आपल्या लक्षात आली नाही. याचा अर्थ हा बग पूर्णपणे फिक्‍स झालेला नाही. जर हे बिल्ड पास करून आपण कस्टमरला दिले असते आणि हा इश्यू जर कस्टमरला पुन्हा सापडला असता तर काही खरे नव्हते. डायरेक्टर, व्हीपी आणि कुणी कुणी अश्या वरच्या लेवलच्या माणसापर्यंत आपली तक्रार गेली असती. आमच्या कंपनीमधील एक साधा डास तुमच्या इंजिनियरने लिहालेला प्रोग्रॅम ब्रेक करू शकतो अश्या शब्दात कस्टमरने टेक-सपोर्टला सुनावले असते आणि टेक-सपोर्टने असला भिकार फीडबॅक पार CEOच्या कानावर घातला असता. कंपनीचे शेअर्स धाडकन खाली पडले असते. आणि आपली तर पार नोकरीतून हाकलपट्टीच. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर साला एक मच्छर....

नुसत्या विचारानेच मला दरदरुन घाम फुटला. घशाला कोरड पडली. मी समोरच डेस्कवरची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली पण हे काय??? मला पाणी पिताच येत नव्हते. अरे देवा, अजुन एक इश्यू. आमच्याच कंपनीमध्ये एनक्रीप्ट केलेले पाणी मलाच डिक्रीप्ट करून पिता येत नव्हते. आमच्ये एनक्रीप्शन/डिक्रीप्शनचे अल्गोरिदम्स साध्या साध्या गोष्टीत फेल होत होते. ह्या इतक्या साध्या चिंधी टेस्ट केसेस आजवर कुणीच कश्या रन केल्या नाहीत? टेस्टिंग टीम काय माशा मारीत होती? टेस्ट प्लानचा रिव्ह्यू कुणी केला? एक ना अनेक. कुणा कुणाला मेल लिहु आणि कुणा कुणाची तक्रार करू असे झाले होते. इतक्यात विभोर माझ्या क्यूबमध्ये आला आणि म्हणाला "सेटअप रेडी हो गया है. बिल्ड रेडी हो जाएगा तो रिलीज नोटस् के साथ मेल भेज देना." मी त्याला म्हटले "अबे काहे का बिल्ड और काहे का रिलीज. इधर बडा गेम हो गया है. साला एक मच्छर अपना कोड ब्रेक कर गया. और उपर से पानी भी डिक्रीप्ट नही हो रहा है." हे ऐकून विभोर पण एकदम टरकून म्हणाला "अरे क्या बात कर राहा है?".



"अरे क्या बात कर राहा है? बिल्ड रेडी हुवा की नाही?" विभोर माझा खांदा धरून मला गदागदा हलवून विचारात होता? मी खडबडून जागा झालो आणि विभोरला म्हटले "दो बग और है. मेजर इश्यू हुवा है" विभोर म्हणाला "कौन से बग? मैने टेस्ट बिल्ड पर तो सारे टेस्ट केसेस रन कीये. सारे के सारे पास हो राहे है. तूने कौन से टेस्ट रन कीये? और तेरे को ईतना पसिना क्‍यू छूट रहा है बे? ले पानी पिले." असे म्हणून त्याने पाण्याची बाटली माझ्या हातात दिली. अरेच्च्या म्हणजे हे स्वप्न होते तर? ... असा विचार करीत करीत मी घाबरत घाबरत मी ती बाटली तोंडाला लावली तर पुन्हा तेच. मी ते एनक्रीप्ट केलेले पाणी पिऊ शकत नव्हतो. म्हणजे हे स्वप्न नक्कीच नव्हते. आमचे प्रॉडक्ट खरोखरीच ते पाणी डिक्रीप्ट करू शकत नव्हते. "देखा देखा. पानी डिक्रीप्ट नहीं हो रहा है रे" बाटली उलटी करून बाटलीकडे बोट दाखवून मी विभोरला म्हटले. विभोर पहिल्यापेक्षाही विचित्र नजरेने आणि त्रासिक चेहर्‍याने माझ्याकडे पहात म्हणाला "अबे ढक्कन, बोतल का ढक्कन तो खोल..."

अरेच्च्याsss... म्हणजे मी बाटलीचे बुच्च न काढताच ते 'सो कॉल्ड' एनक्रीप्टेड पाणी पिण्याचा प्रयत्न करीत होतो तर... मी पुन्हा शांतपणे सगळा विचार केला आणि सगळ्याचा उलगडा झाला. मला माझेच हसू आले. ती बिल्ड होताना खुर्चीत आरामात रेलून बसल्याने मला छोटीशी डुलकी लागली आणि ते भीतीदायक स्वप्न पडले होते. स्टेटस पाहिले तर बिल्ड रेडी झाले होते. विभोर अजुन ही वेड्यासारखाच माझ्याकडे पहात होता. त्याच्याकडे पाहून हा सगळा घटनाक्रम, स्वप्न आणि प्रॉडक्टमध्ये नसलेले बग हे सगळे समजावून त्याला अजुन गोंधळात टाकण्यापेक्षा मी त्याला म्हटले "अरे कोई नहीं. बिल्ड रेडी हो गया है. मैं अभी मेल भेज देता हूँ. तुम रिलीज टेस्टिंग शुरू कर दो."

विभोरला देखील मी काहीतरी बरळत होतो हे कळले म्हणून जाता जाता तोही बोलला .

"आप एक काम करो. एक बार यह बिल्ड आ जाए तो फिर आप एखाद हप्ते की छुट्टी लेके अपने गाँव हो आओ. वहाँ समंदर के एनक्रीप्टेड पानी में मछली पकड़ोगे नां तो सब ठीक हो जाएगा... :D "

=========================================================

Image Courtesy : Google Images

ता.क. - ही पोस्ट काम धंद्यावर आधारित असल्याने काही संदर्भाबाबतीत जरा जडावली आहे. त्यातून "आमी लैई भारी" वैगरे भासवण्याचा अजिब्बात उद्देश नाही. :-)

Sunday, June 3, 2012

कोंबडी-बोकड चषक


काय म्हणतावं मंडळी?

गंपूशेटनी मामाच्या हाटेलात शिरता शिरता जमलेल्या लोकांना प्रश्न टाकला.

रविवारी रात्री जेवण खाण आटोपून सगळे म्हणजे बाबू तोडणकर, गेंगण्या, मास्तर आणि दोन चार इरसाल टाळकी मामाच्या हाटेलात बसली होती.

मामा : काय गंपूशेट आज लै म्हणजे लैच दिवसांनी आलात. म्हयनाभर तरी थोबाड दिसला नव्हतो. खै कडमडलो होतास?

गेंगण्या : ओ मामा, खै कडमडलो होतो म्हणजे? अवो गंपूशेटचो क्रिकेट प्रेम तुम्हाक म्हायत नसा? IPL सुरु असताना असलो फर्मास मनोरंजन सोडून गंपूशेट तुमच्या हाटेलात कशाक येल?

बाबू तोडणकर : नाय तर काय? मनोरंजन ता मनोरंजन आणि वरतून छक्को-चौको पडलो की नाचणाऱ्या त्या बाया पण असतात. असो सगळो टायम पास सोडून हयसर काय तुझ्या हाटेलातली झापा बघूक येतंय गंपूशेट? खानाची टीम जिंकली त्याची पार्टी करून आज आठवडाभरान गंपूशेट आपल्या अड्ड्यावर आलो.

ए गप्प बसा कि जरा. काय IPL IPL लावलाव हाय? माज क्रिकेट आवडता पण म्हणून काय IPL म्हणजे क्रिकेट नव्हे बघीत बसायला. खानाला एक कचकचीत शिवी हासडून गंपूशेट तोंड वाकडा करीत बोलले.

काय तरी काय बोलताव गंपूशेट?

काय तरी काय म्हंजे? जल्ला पैशाचा बाजार ता. कोण कोणाबरोबर आणि कोण कोणाविरुद्ध खेळताय हे कळेल तर शप्पथ.

गंपूशेट येवढा होता मग कशाक IPL बघूक होतात? गेंगण्या आपला ताच खरा धरून बसलेलो.

मी खै IPL बघीत होतो? माज काय कामा नसात? डॉनच्या पार्टीत नाचून पैसे कमावणारी खानासारखी लोकां दादासारख्याला खेळाडूकं नाचवतात. दारू विकून कोट्याधीश झालेली माणसा सट्टा लावतात तसा खेळाडूवर पैसो लावतात. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणणारी लोका देवमाणसाकं पण मुठीत ठेवतंत. ह्यो खय्चो क्रिकेट? गंपूशेट करवादले.

खेळाडू विकत घेताल्यांनी म्हणून काय झाला? क्लब क्रिकेट ता. तिकडे असाच असता. आत्ता आपण नाय काय, कळीत नसला तरी अधनंमधनं ता इंग्लिश प्रिमिअर लीग म्हणजे खरोखुरो IPL बघाताव? तिकडे काय वेगळा असता? मामानं IPLची बाजू घेतालान.

हो. आणि आपल्या मोदीनं सुरु केलेले IPL पण त्या खऱ्याखुऱ्या IPL वरच आधारित आहे. मास्तरांनी अधिक माहिती पुरवली.

त्या फुटबॉल प्रिमिअर लीगबरोबर आपल्या IPLची तुलना करू नका मास्तर. त्याची बात वेगळीच असा.

कशी वेगळी बात. तिकडे पण खेळाडूचो लिलाव होता. तुका इंग्लिश चालते पण देशी नको? बाबू तोडणकरा आंगठा तोंडाजवळ नेत बोललो.

गेंगण्या : मेलो बेवडो आलो परत बाटली वर.

बाबू अरे इंग्लिश आणि देशीची कसली तुलना करतास? इंग्लिशचो स्टॅंडर्ड खै आणि देशीचो खै हे मी तुका सांगूक नको. गंपूशेटनी बाबूला झेपेल असा प्रश्न विचारालांनी.

ता बाकी बराबर बोललास. बाबू मनातल्या मनात कधी काळी ढोसलेल्या इंग्लिशची आठवण काढीत बोललो.

अस कसं गंपूशेट? अहो फक्त खेळ बदलला पण साचा तोच नां? तिकडे पण खेळाडू संघ बदलतात. जिथे जास्ती पैसे मिळतील त्या संघाबरोबर खेळतात. मास्तर आपल्या मुद्द्याला चिकटून.

हो मास्तर पण फरक आहेच ओ. आत्ता बघा तुम्ही जेम्स बॉंडचे पिक्चर बघाताव. आत्ता बॉंड हिरो म्हटल्यावर तो कैच्याकै कारनामे करतो. अगदी काय पण. ते सगला आपण लै भारी म्हणून कौतुकानं बघाताव कि नाय. होय कि नाय सांगा? गंपूशेटने आपला मुद्दा मांडण्यासाठी स्टार्ट घेतला.

हो हो.

पण तेच कारनामे आपलो देशी 'येजंट विनोद' करतो तेंव्हा ते इनोदी का वाटतात? गंपूशेटनी यॉर्कर टाकला.

अवो प्रत्येक गोष्टीचो एक स्टॅंडर्ड असता. बाबू अजूनही इंग्लिशच्या आठवणीतच रमला होता.

ता पण बराबर. बाबूच्या पाठोपाठ गेंगण्यानं गंपूशेटला पाठींबा दिलान.

गंपूशेटचा यॉर्कर ढेंगातून जावून आपल्या यष्ट्या उध्वस्त करून गेला आहे हे मास्तरांना कळून चुकले आणि अलीकडेच केबलवर लागलेला एजंट विनोद सिनेमा पाहून आपण चॅनेल बदलल्याचे झटकन आठवल्यामुळे मास्तरदेखील पुढे काही जास्ती बोलले नाहीत.

एव्हाना गंपूशेटनां आपली लाईन आणि लेंथ सापडली होती. ते फुल्ल फॉर्ममध्ये आले.

अवो तिकडे क्लब असले तरी त्यांनी खेळाचे नियम नाय बदलालांनी. फुटबॉल लीगमुळे मेन खेळाची मजा कधी कमी नाय झाली. फुटबॉल एक खेळ म्हणून आपल्या जागी अजून मोठोच असा. माडी-बिडी विकणारो कोण पण लुंगो-सुंगो पैशाच्या जोरावर तिकडे आंतरराष्ट्रीय खेळाडूकं कसा पण वागवीत नाय. मॅची संपल्या कि ते खेळाडू पण रेव्ह पार्टीत सापडीत नायत. आपली टीम जिंकली तर टीमचो मालक पैशाचो माज घेवन शिवीगाळ करीत, बिड्या फुकीत स्टेडीयमवर उंडारक्या नाय करीत. आधी मेजर राडे करून आणि मग चुक कबूल करून माफी मागण्याऐवजी "आमी मायनर, आमी मायनर" अश्या बोंबा मारीत फिरत नायत. गंपूशेट एकदम तावातावाने बोलले.

मामा : खरा असा रे गंपू.

गेंगण्या : पण हि एवढी फेमस खेळाडू लोकां. साला ह्या दिडदमडीच्या लोकांकडन अपमान कशाक करूक घेतंत? मी माझो लिलाव होवूक देणार नाय असो एक जण पण नाय बोललो. अगदी गेल्या वर्षी काळ्या कुत्र्यांन पण ह्यांका विचारल्यान नाय तरी हे परत पुढच्या वर्षी शोभा करून घेवक हजर.

बाबू तोडणकर : मंग नाय तर काय? सोताच सोताची लंगोटी अशी दुसऱ्याच्या हातात दिली कि दुसरा काय होणार? होती नव्हती ती इज्जत पण जाते.

गंपूशेट : काय नाय ओ साले पैशेवाल्यांचे नाय ते धंदे. अवो ह्या IPL आत्ता पाच वर्षापूर्वी आला. आमचो कोंबडी-बोकड चषक गेली कित्येक वर्ष सुरु असा. IPL पेक्षा भारी.

होय रे गंपू. आपलो कोंबडी-बोकड चषक म्हणजे लैच भारी. मामाचा दुजोरा.

क्काय? कोंबडी-बोकड चषक? हि काय नविन भानगड?

हि भानगड नाय मास्तर. कोंबडी-बोकड चषक म्हंजे क्रिकेटचीच स्पर्धा. आपल्याच गावात भरते. ती समुद्राजवल खलाशी लोकांची वस्ती हाय नां तिकडे भरते स्पर्धा. टेनिसबॉल क्रिकेट. मामान माहिती पुरवलानानं.

होय कि काय? कधी असते हि स्पर्धा.

गंपूशेट : मास्तर, फेब्रुवारी-मार्चमध्ये शिमग्याच्या आसपास तुम्ही वार्षिक परीक्षेचे पेपर छापायची तयारी करीत असता नां तेंव्हा शाळेतली बरीचशी पोरा शाळा चुकवन् समुद्राजवल सुकटा सुकिवतात नां त्या मैदानावर कोंबडी-बोकड चषक बघूक जमलेली असतात. काय समजलाव?

मास्तर : अरेच्चा. हे मला माहितीच नव्हते. हा काय प्रकार आहे?

मामा : अहो कोंबडी-बोकड चषक म्हणजे IPL सारखीच स्पर्धा. वीस-वीस ओवरची.

गेंगण्या : आणि हिची खासियत अशी कि नावाप्रमाणे कोंबडी आणि बोकड बक्षिस दिला जातो. म्हणजे विजेत्या टीमला अख्खो बोकड आणि उपविजेत्या टीमला कोंबड्या.

कोंबड्या म्हणजे ११ कोंबड्या. प्रत्येक प्लेअरला एक. बाबूनं अचूक माहिती दिलान.

मास्तर : हे भारीच आहे.

गंपूशेट : भारी आहेच ओ पण हि कोंबडी-बोकड चषक IPL पेक्षा पण भारी असते. कारण हिकडे एका टीमकडनं खेळणारा माणूस कायम त्याच टीमकडनं खेळताना दिसल. उगाच चार आठ आणे जास्ती मिळतंत म्हणून कोण टीम बदलणार नाय.

बाबू तोडणकर : कोणाची बिशाद हाय टीम बदलायची. आणि कोणी टीम बदललान तर लोकां टोमणे मारून मारून त्याचो जीना हराम नाय करतील?

मामा : अवो आणि IPLमध्ये कसो जास्ती छक्के मारल्यावर आणि लै भारी कॅच घेतली कि वेगळो अवार्ड असता तसा इथे पण वेगळो अवार्ड असता.

गेंगण्या : आणि ता पण प्रत्येक छक्या-चौक्याकं असता. काय असलं ओळख बघू मास्तर?

काय असते? मास्तर स्पर्धेचे स्वरूप ऐकून आधीच हबकले होते.

गेंगण्या : अवो प्रत्येक छक्या चौक्याकं आणि घेतलेल्या झेलाकं एक-एक कवाट बक्षिस मिळता.

गंपूशेट : कवाट म्हणजे काय ता मास्ताराक कळूचो नाय.

बाबू तोडणकर : मास्तर अवो कवाट म्हणजे अंडो. कोंबडीचो अंडो.

गंपूशेट : म्हणजे विचार करा. फायनल मारलाव तर मटणाची पार्टी!!!

गेंगण्या : आणि एकदा का टीम फायनलला गेली कि किमान कोंबडीची पार्टी नक्की. वरतून कवटा मिळतील ती वेगळीच.

आणि ह्या सगळ्याच्या जोडीला भन्नाट कोकणी कॉमेंट्री. यंव रे यंव. मास्तर अजूनही ह्या सगळ्याची कल्पनाच करीत होते.

मग काय म्हणतावं मास्तर? पुढच्या वर्षी IPL बघणार कि कोंबडी-बोकड चषक?

अर्थातच कोंबडी बोकड चषक. इति मास्तर...



Saturday, September 24, 2011

पैचान कौन? (भाग-१)

टीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.


आज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या "Over Qualified for job" असे ठणकावून सांगून आपल्या तोंडाला पाने का पुसतात हे त्याला अजून हि कळले नव्हते. आत्ता तो देखील "ह्यांना आपली कदर नाही, आपली कदर करणारा कुणीतरी भेटेल" अशी दरवेळी स्वतःची समजूत करून तो कंटाळला होता. पण आपल्याला पारखण्यात लोकं नक्की कुठे चुकतात हे मात्र त्याला कळत नव्हते.

तसा लहानपणापासूनच तो चिकित्सक होता. अर्थात चिकित्सकपणा त्याच्या रक्तातच होता. त्याचे नाव चिंतन ज्ञानसागर. त्यांचे खरे आडनाव तसे कुणालाच माहीत नव्हते. फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी कुणा राजा/बादशहाच्या दरबारी वेदशास्त्राच्या गाढ अभ्यासाने म्हणा, लेखणीच्या तलवारी चालवून किंवा देशोदेशीच्या विद्वानांना वाद-विवाद स्पर्धेत हरवून ज्ञानसागर हे आडनाव पदरात पाडून घेतले असावे आणि पुढच्या पिढीत सगळी पोरं बापाच्या वळणावर गेली असल्याने सहाजिकच आडनावाला साजेशी कामगिरी प्रत्येक पिढीच्या हस्ते घडली होती. घर-गृहस्थी, संसार ह्या इतर दुय्यम गोष्टीत घरातील स्त्रियांनी लक्ष घातल्यामुळे आजवर घराण्याचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु होते.या घराण्यातल्या कर्त्या पुरुषांनीदेखील आयुष्यभर अर्थार्जनापेक्षा कायम ज्ञानार्जनावरच भर दिला. पुस्तके, ज्ञान, शोधनिबंध यांच्या सदैव संपर्कात रहाता यावे म्हणून बहुतेकांनी शिक्षकी पेशा पत्कारला होता.

चिंतनच्या बाबतीत मात्र आपल्या मुलाने इतके ज्ञान मिळवलेच आहे तर त्याचा उपयोग अर्थाजनासाठी तरी करून घ्यावा असे त्याच्या आईचे ठोस मत होते. त्याने नोकरी धंद्यात यश मिळवून इतर मुलांप्रमाणे चार पैसे गाठीशी बांधावे, त्यातून ऐहिक सुखे अनुभवावी असे तिला वाटे. ती त्यासाठी कायम प्रयत्नात देखील असे. ह्याच कारणासाठी स्वतः फोन/SMS करून तिने मध्यंतरी लेकाला "कौन बनेगा करोडपती"मध्ये देखील पाठवले होते जेणेकरून तिथे करोड नाहीतर निदान काही लाख तरी पदरात पडतील आणि त्याला कामधंदा लागेपर्यंत तरी घरखर्चाचा प्रश्न सुटेल. पण चिंतनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायामधून बघून सांगणे म्हणजे आपल्या ज्ञानाचा अपमान वाटे. त्याच्या मते अशी पर्याय बघून उत्तर देणे म्हणजे परीक्षेत कॉपी करण्यासारखे होते. तरीदेखील घरून मारूनमुटकून KBCमध्ये भाग घेण्यासाठी पाठवलेला चिंतन पोहोचला मात्र "राज पिछले जन्म का"च्या सेट वर. त्याने KBCमध्ये महानायाकाची करंगळी धरून पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा सिक्स्थ-सेन्स, आर्टिफिशीअल् इंटेलिजंन्स वापरून स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावून पहाण्यात धन्यता मानली.

तर असा हा चिंतन ज्ञानसागर. आपले ते खरे करणारा. प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानाच्या आधारे पडताळून पहायला बघणारा. आज देखील एका फार मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देवून आलेला. आलेली संधी त्याच्यासाठी आणि त्याच्या भावी संशोधनासाठी फारच उपयोगी होती. ती मल्टी नॅशनल कंपनी सागरी संशोधनासाठी प्रसिध्द होती. चिंतननेदेखील लहानपणापासुनच पाणी आणि पाण्याखालचे जीवन यावर खूप अभ्यास केला होता. त्याचा हा अभ्यास देखील तसा अपघातानेच सुरु झाला होता. शाळेतून जाता येता वाटेत नदीतल्या पाण्यात दगड भिरकावणे हा सगळ्या मुलांचा चंद. पण नुसता दगड भिरकावून पुढे जायला चिंतन हा काही इतरांसारखा सामान्य मुलगा मुळीच नव्हता. पाण्यात दगड भिरकवल्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. पुढे सहाव्या की सातव्या इयत्तेच्या विज्ञान विषयात पाण्यात वस्तू टाकली की पाण्यावर उठणारे तरंग आणि त्यांची वारंवारता ह्यावर एक धडा होता. तिसरीत असला तरी चिंतनने दिवाळी आणि में महिन्याच्या सुट्टीत शेजारपाजारच्या घरात घुसून दहावीपर्यंतची सगळी पुस्तके चाळून काढली होतीत. जे मिळेल ते अधाश्यासारखे वाचणे हा वडिलोपार्जित गुण असल्याने इतक्या लहान वयातदेखील त्याला वाचायला पुस्तके पुरत नसत.

सहाजिकच दगड टाकल्यावर पाण्यावर उठणारे तरंग मोजण्याचा नविन चिंतनला लागला. पुढे कमी-अधिक आकारमानाचे दगड, मग दगडाऐवजी मातीचे ढेकूळ, लाकडाचा तुकडा, शाळेतल्या खडूचा तुकडा आणि नंतर निरनिराळ्या धातूचे तुकडे असे काय हाताला मिळेल ते पाण्यात टाकणे आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण नोंदवणे अशी सवयच त्याला लागून गेली. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि धातूच्या तुकड्यांची निरीक्षणे झाल्यावर या अकाली शास्त्रज्ञाने एकदा थेट बापाची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी घरून आणून पाण्यात फेकली आणि सोने या नविन धातूचे निरीक्षण नोंदवले. यथावकाश हि गोष्ट घरी समजली. बापाला अर्थातच काही फरक पडत नव्हता पण चिंतनाच्या आईने मात्र आकाश पाताळ एक केले. तेंव्हा ती अंगठी परत आणण्यासाठी चिंतनने पहिल्यांदा पाण्यात उडी मारली. पण पाण्यात शिरताच पाण्याखालचे जग पाहून चिंतन इतका हरखून गेला की अंगठी शोधण्याचे विसरूनच गेला. पूर्वी कधीही पाण्यात न पडलेला चिंतन केवळ "पोहायला शिका" या कधीतरी वाचलेल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हात पाय हलवून लगेचच पोहू लागला. त्यासाठी त्याला सुका नारळ वा टायर कमरेभोवती बांधून बिलकुल सराव करावा लागला नाही. अर्थात इतरांसाठी हे भारी प्रकरण असले तरी चिंतनला मात्र आपण पहिल्यांदाच पाण्यात पडलो आहोत आणि पोहू लागलो आहोत हे कळले देखील नाही. तो आपला सराईतपणे पोहत आपल्या समोर नव्यानेच उघडलेले जग आणि त्यातील जलचर न्याहाळण्यात मग्न होता.

तसंही त्याच्या हुशार आणि चिकित्सक स्वभावामुळे बरोबरची मुले त्याला कधीच आपल्या बरोबर सामावून घेत नसत. खरे तर मुलांची पण चूक नव्हती. ती सुद्धा सुरुवातीला चिंतनला बरोबर घेत असत. त्याचे वेगळेपण कळल्यावर त्याला एक हुशार मुलगा म्हणून मान देत असत. पण पुढे पुढे त्यांना चिंतनचा त्रास व्हायला लागला जेंव्हा एखादा प्रश्न किंवा शंका विचारल्यानंतर त्याचे उत्तर खूप खोलात जावून ऐकावे लागे. 'त' वरून तपेलं अश्या अपेक्षेने चिंतनला काही विचारावे तर तो तपेल्याबरोबर 'त' वरून ताट, तांब्या, तराजूपासून सुरुवात करे तो थेट 'ट' वरून टमरेल पर्यंत जाई. परीक्षेत देखील एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न चिंतनला जाचक वाटे. जिथे लोकं त्याच्या पासून पळायला बघत तिथे लोकांना चार गोष्टी जास्त कळल्या तर काय बिघडलं असा प्रश्न चिंतनला पडे. मुलांबरोबर खेळायला गेला तरी गणित/विज्ञान हे विषय त्याला खेळातल्या आनंदापेक्षा वेग, दिशा, वस्तुमान ह्या गोष्टींकडे पहायला लावीत. क्रिकेट खेळताना स्ट्रेट-ड्राईव्ह सरळ रेषेत, कव्हर-ड्राईव्ह ४५ अंशात तर स्क़्वेअर कट ९० अंशातच असला पाहिजे याबद्दल तो आग्रही असे. सहाजिकच चिंतनला खेळात घेण्याऐवजी घासू, पुस्तकी किडा, लाल्या अश्या अनेक उपाध्या बरोबर देवून पोरांनी त्याला वाळीत टाकले होते. ह्या अश्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे चिंतन बहुतेक वेळा एकटाच असायचा. त्यालाही बाहेरच्या जगाचा तसा कंटाळाच आलेला. तो रहात होता तिथे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्टया वा अन्य कुठल्याही प्रकारे आकलन करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच उरले नव्हते. त्यामुळे अपघाताने का होईना पाण्यात पडल्यानंतर आपोआपच त्याच्यासाठी अभ्यासाचे एक नविन दालन उघडले होते. त्याच्या बुद्धीला एक नविन खाद्य मिळाले होते. त्याकाळी डिस्कवरी, अनिमल प्लॅनेट अश्या वाहिन्या नसल्याने चिंतन हे सर्व पहिल्यांदाच पहात होता. त्या घटनेनंतर त्याचे आयुष्यच जलमय झाले. बरोबरची सामन्य मुले जेंव्हा सूर्यकिरणे पाण्यात शिरली की प्रकाश किरणांचा कोन बदलतो हे बालबुद्धीस किचकट विज्ञान लक्षात ठेवण्यासाठी डोकेफोड करीत होतीत तेंव्हा चिंतन मात्र जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून पाण्याखाली कसे रहाता येईल या प्रयत्नात असायचा.

क्रमशः

(पुढील भागात - चिंतन आणि अजून काही व्यक्तिरेखा टीव्हीवरच्या "पैचान कौन" या कार्यक्रमात...)

Saturday, July 30, 2011

बब्याचो बंदोबस्त

बब्या महाडिक... ह्याच्या अंगात लहानपणापासनच हाडका कमी आणि काल्याकांड्या जास्ती. वय वाढलो, मिसरूड फुटलो तशी तोंडाक बाटली लागली अन् ह्याचो अजूनच डोक्यास ताप झालो. आख्ख्या गावात ह्याच्याबद्दल कोण चांगला बोलील तर शप्पथ. ह्याचे घरचे लोकं पण ह्याच्या विरुद्धच असतले. बब्या खै गेलो आणि राडे केलान नाय असा फार कमी वेळा झालो असेल. गावच्या देवळातले पूजा नायतर हरिनामसप्ता असे कार्यक्रम सोडले तर बाकी सगळीकडे हा हजर. बरेचदा टाम् असात म्हणून की देवाक घाबरता म्हणून, पण बब्या तसो देवळात पाऊल नाय टाकणार. पण पालखी बाह्यर पडली की ह्यो आलो ढोल ताशे घेवन. बाकी पूर्वी पासन गावासाठी काय उपयोगाचो काम केलान असेल तर ढोल बनवायचो. बकऱ्याची कातडी आणून सुकवन् त्याचे ढोल ताशे बनवायचो. मग काय शिमाग्याक बब्या म्हणजे हिरो. कोणाक् ढोल ताशे वाजवायचो असाल तर बब्याक् कटवूक लागायचो. बब्या सांगेल त्याचो पयलो चान्स. अगदी झेपा जात आला तरी ढोला जवलन् हलणार नाय. धा वर्षापूर्वी त्यानं बापाच्या नावान् गावच्या देवळाकं नविन स्टायलचे ढोल घेवन देलान.

बब्याचो बाप मास्तर महाडिक. दुसरी तिसरीतच लेकाची प्रगती बघून आपला पोर काय दिवे लावायचो नाय म्हणून मास्तरान गावाची पोरा शिकवता शिकवता आपल्या पोराला, बब्याला मात्र पाचवीत जायच्या आधीच शाळेतना भायर काढलान् आणि सरळ दोन म्हशी घेतालान. पहाटे उठून दूध काढून गावात विकायचा आणि दिवसभर म्हशीकां चरायंक् न्यायाचा, गोठा साफ करायचा अशी कामा बब्याच्या मांग लागली. म्हशी चरवता चरवता गाव भटकूकं मिळायचो म्हणून बब्या पण खुष. मास्तर सोताच्या पोरांक अगदी नीट वळखून होता. बब्या मोठा झालो तसा त्याचा लगीन लावन् दिलान आणि बरोबर हापूसची धा कलमं पण घेवन दिलान. बब्याच्या अंगात किती पन् काल्या कांड्या असल्या तरी मास्तर बापापुढे बब्या वचकून असायचो. मास्तरान पण जीता असे पर्यंत बब्याच्या हातात कधी व्येवार दिलान नाय. मास्तर मजुरी दिल्यासारखा बब्याला आठवड्याला चार-पाच रुपये द्यायचा आणि बब्यापन् गप्-गुमान आपली विडीकाडी त्यात भागवायचा. मास्तर असेपर्यंत गावाकपण बब्याचो तसो त्रास कधी नव्हतो. पण चांगली तीस-बत्तीस वर्षा पेन्शन खावंन् मास्तर खपलो आणि बब्यान् पण कात टाकल्यान. जणू मास्तर आणि बब्या दोघांचे आत्मे कसे एकदम मोकळे झाले. एकीकडं मास्तरान् जाता जाता बब्याच्या उरलेल्या आयुष्याची पन् सोय लावलान् होती. बब्याकं पन् त्याची जाणीव होती पण मास्तराच्या रूपात एक प्रकारचा धाक-दडपन् होता, ता गेला म्हणून बब्याकं कसो मोकळा मोकळा वाटला. आत्ता मास्तराच्या उपकाराची जाणीव म्हणा की तो खपल्याचा आनंद म्हणून म्हणा, पण मास्तर खपल्या खपल्या बब्यान् आधी मास्तराच्या नावान् गावच्या देवळाला ढोल देलान्.

मास्तर अगदी जुन्या हाडाचो त्यामुळे तो खपेपर्यंत बब्यान् पण पन्नाशी पार केलान् होती. नोकरीक् अस्ता तर बब्या पेन्शनीत गेला असता. मास्तरानं अख्खो आयुष्य पांढरा शर्ट आणि खाकी हाफ प्यांट घालून काढलान्. म्हातारपणी डोळ्याला चष्मा आणि आधाराकं घेतलेली काठी हीच काय ती चैन केलान् असेल. करमणूक म्हणजे रोजचो रत्नांग्री टायम्स मोठ्यान वाचायचो. नाय म्हणायाला मास्तरान नंतर ब्लाक अन् व्हाईट टीवी घेतालान पण केबलबिबल घ्यायच्या भानगडीत न् पडता दूरदर्शनवरच भागावाल्यान. म्हावरा बब्याच गरवन आणायचो समुद्रावरून. सांगायचा मुद्दा काय तर घरात पैसा असून सुदिक म्हाताऱ्यामुळे बब्याक् त्याचो कधी उपभोग घेवूक मिळालो नसा. त्यामुळे मास्तर खपल्या खपल्या उभ्या आयुष्यभर सायकलवर फिरून दारोदार दूध घातलेला, चार-पाच रुपयात सगळी चैन भागवलेला बब्या रातोरात राजा झाला. उशिरा का व्हयनां पण बब्याच्या हातात पैसा आला. मग काय बब्यान् आधी दुधाचा धंदा आणि कलमाची कामा करायसं दोन गडी लावलान् आणि आपण सोता इतकी वर्षे आत दाबून ठेवलेल्या काल्याकांड्यांची जादू गावाक् दाखवायक् बाह्यर पडला. घरात कलर टीवी आली, सायकलच्या ऐवजी बुडाखाली फटफटी आली आणि पूर्वी शिमग्याला, गटारीला मिळणारी पहिल्या धारेची आत्ता रोजची झाली. बब्या गावाबाहेरच्या खोपटाचा रोजचा गिऱ्हायक आणि त्याच बरोबर गावातल्या लोकांक् एक नविन ताप झालो.

शिमग्यातले राडे काय गावाक् नविन नवते. शिमग्यात गाऱ्हानां घालायचो काम कैक वर्ष मास्तरांन केलेला त्यामुळे मास्तराच्या पाटी गाऱ्हानां घालायचो मान बब्यास हवो होतो. मन्या गुरवानं अगदी कडकडून विरोध केलान. गावकऱ्यांनी कसो बसो आवरल्यानी बब्याक्. पुऱ्या गावासमोर मन्या गुरवानं केलेल्या विरोधाचा बदला म्हणून बब्यान् हापूसचा सिझन यायच्या आतच आपले गडी लावन् गुरुवाच्या कलमावर लागलेल्या सगळ्या तयार झालेल्या कैऱ्या काढून रातोरात लोणची करणाऱ्या व्यापाऱ्याला जावन् विकलान्. आत्ता हे काम बब्याचाच हे गुरवाला आणि गाववाल्यांना पण ठावक होता पण पुरावा नसल्याने बब्याच्या नादी कोन लागणार म्हणून सगळे गप्प बसले. त्यानंतर बब्यान् पुढचो किडो रंगपंचमीस केलान. रंगपंचमीस गावातली पोरा रंग घेवन गावभर फिरतात आणि जो भेटील त्यास रंगवितात. बब्यान् काय केलान तर तेच्या घरासामोरच्या म्हशीनां पाणी पिवूच्या हौदात चार दिवस आधीपासना शेण कालवन् ठेवल्यान. अगदी सारवान घालायला करतात तसो आणि रंगपंचमीक् जवा गावातली पोरा बब्याच्या घरा समोरून जावक् लागली तेवा अचानक पाटन् येवन पटकन तिघा चौघांना उचलून त्या शेणाच्या हौदात टाकल्यान. बेवडो आणि दिसायाक किडकिडीत, काटक असलो तरी लहानपणी पासन् अंगमेहनतीची कामा करून बब्यात ताकत चांगलीच होती. त्याच्यासमोर पोरा दिसायला वजनदार असली तरी शेवटी वडापाव-मिसळपाव खाल्लेली पोरा ती. त्यांच्यान् काय बब्या आवरला नाय. दोघजण बब्याक पकडूक् गेले आणि आयते त्याच्या तावडीत गावले. बब्यान् त्या दोघांक् पण उचलून हौदात टाकल्यान. पोरांचे अवतार बघवत नव्हते. चांगला चार दिवस कुसवलेला शेण ता, पाच पाच वेळा आंघोळी करून पण पोरांच्या अंगाचो वास जायत नव्हतो.

नंतर बब्याचो अवतार दिसलो दहीकाल्यास्. ह्या वेळी बब्यान् हंडी बांधल्यान पण दोरी दोनीकडे पक्की न बांधता दुसऱ्या बाजूला सोता दोरीचो एक टोक हातात धरून झाडावर जावन् बसलो. पोरा हंडी फोडायस् आली, मनोरा रचल्यांनी. जशी पोरा हंडीच्या जवल जायची बब्या दोरी ताणून हंडी वर घ्यायचो. पोरा पडली की परत हंडी खाली. लै झुंजवल्यान् पोरांना. शेवटी पोरा कंटाळून गेली मग बब्यान् हंडी खाली करून अगदी दुसरी-तिसरीतल्या बारक्या बारक्या पोरांकडन् फोडून घेतल्यान् आणि वर मोठ्या बाप्या लोकांनां "बारक्या पोरांनी हंडी फोडलांनी पण तुमच्या बुडात दम नाय. थू तुमच्यावर" असो बोंबलत गावभर फिरलो.

हळू हळू बब्याचो तरास वाढू लागलो. पूर्वी पौर्णिमा अमावास्येला म्हणजे अधनंमधनं ह्याच्या अंगात यायचो, पण नंतर जवळपास रोजचाच झाला. त्याचो तरास ह्याच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनां आणि घरच्यांना जरा जास्तीच होता. बब्यान् म्युजिक सिष्टीम घेतलान् आणि मग कधी मनात येल तेवा मोठ्या आवाजात गाणी लावन् डोस्की फिरवायला लागला. शेजारीच काय तर आख्ख्या वाडीतल्या लोकांचे कान किटले. पोरांना अभ्यास करणे आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांना दुपारी वामकुक्षी आणि रात्रीची झोप कठीण होवून बसली. ह्या सगळा कमी की काय म्हणून बब्यान् रोज झिंगून आल्यावर वाटेत पारावर बसलेल्या पोरांना शिव्या द्यायस् सुरुवात केलेली. पोरा बिचारी दिवसभर कामधंद्या वरून आल्यावर जेवन-खावंन् जरा पारावर गजाल्या मारायास बसायची तर हा तिकडे जावन् त्यांच्या कुरापती काढायचा. सगळे बब्याला वैतागले होते. शेवटी पोरांनी बब्याचा गेम करायचाच असा ठरवल्यांनी. पप्या मांडवकराच्या डोक्यात एक आयडिया आली, पोरा पण तयार झाली.

रत्नांग्रीत रेल्वे आली पण त्याच्याबरोबर रेल्वे स्टेशनच्या भागात चोऱ्या पण वाढल्या. रेल्वेस्टेशन जवळची घरफोडी, दुकाने छोट्या-मोठ्या टपऱ्या फोडून चोर रातोरात रेल्वेनेच पसार व्हायचे. गावातली पोरा आत्ता अशीच एखादी चोरी होतेय का त्याची वाट बघीत होते. सगळी व्यवस्था तयार करून ठेवलेली होती. आता सगळी पोरा फक्त योग्य संधीची वाट बघीत बसली होतीत. तशी संधी महिना भरात मिळाली पण. कोणीतरी रेल्वेस्टेशन जवळची चायनीजची गाडी फोडलान्. तशी किरकोळ चोरी होती, नुकसान जास्त झाला नव्हता. पैसा अडका चोरीला गेला नव्हता केवळ भांड्याकुंड्यावर निभावले होते. पोरांना पण असाच कायतरी हवा होता जेणेकरून पोलिसांची भानगड जास्ती नसेल. चोरी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोरं संध्याकाळपासून बब्यावर पाळत ठेवून होतीत. बब्यानेहमी प्रमाणे संध्याकाळी टामकावायाला गावाबाहेर गेला आणि दोघे जण थोड्या वेळानं त्याच्या मागावर गेले. बब्या एकटोच पायी चालत जायचो त्यामुळे अजून कोण बघील अशी काही भीती नव्हती. बब्या टामकवून झाल्यावर झेपा टाकत यायला निघाला तसा एका ठिकाणी झाडी बघून पोरांनी पाटना येवन बब्यावर घोंगडं टाकलानी आणि तो बोंबलायच्या आत त्याच्या मुसक्या बांधून तिकडेच आत रानात आडवाटेला ठेवून दिलांनी. रात्रीची जेवणा आटपून पप्या मांडवकर, सुन्या, दादू असे दोघे तिघे बब्याचा बोचका घेवन् नानाच्या रिक्षान् रेल्वे-स्टेशनला गेले. बब्या टाम् होताच त्यामुळे त्यान काय जास्ती त्रास दिलान नाय. रेल्वेस्टेशनवर जावन् पप्या आणि दादू त्या चायनीजवाल्याला भेटले आणि तुमची गाडी फोडलान् तो चोरटा आमच्याच गावातला असा, त्याका घेवन् इलोय असा सांगितल्यानी. तो तसो भुरटो चोर असा, म्हणून पोलिसात न् देता तुमच्या ताब्यात द्यायला आलो. आम्ही गेल्यावर तुम्ही काय ती वसुली करा असे सांगून पोरा परत घरी आली आणि शांत झोपली.

तिकडे चायनीजवाल्याकं पण चोरी करणारा कोन तो भेटला नव्हताच. पोरा काय खरा-खोटा सांगून गेली ते बघुया आणि अगदीच काय नाय तर हा जो कोन भुरटा चोर हाय त्याच्याकडून निदान भांडी तरी घासून घेवया म्हणून त्यानं बब्याचो बोचको सोडल्यान. तोपर्यंत बब्याची पण जरा उतरली होती. हे काम गावातल्याच पोरांचे हे बब्याला माह्यत होता त्यामुळे घोंगड्याच्या बाह्यर आल्या आल्या बब्यान् समोर कोन हाय कोन नाय ते न् बघता घोंगडं काढणाऱ्या चायनीजवाल्याच्याच कानाखाली एक सणसणीत ठेवन् दिल्यान्. वरतून तोंडातन् नाय नाय त्या शिव्या सुरु होत्याच. आत्ता मघापासनं हा माणूस कोन हाय, ह्याने चोरी केलान हाय की नाय अश्या सगळ्याच बाबतीत संभ्रम असलेला चायनीजवाला बाकायदा कानाखाली खाल्ल्यामुळे पिसाळला. मग त्याने आणि आजूबाजूच्या गाडीवाल्यांनी बब्याला असा काय कुटलानी की बास रे बास. पावसाळी दिवस त्यात त्यांनी बब्याला धुतल्यावर त्याचे कपडे काढून हाफ प्यांटवर सोडून दिलानी. आत्ता अश्या अवस्थेत परत घरी जायचा तर रिक्षाला पैसे पण नाहीत. एवढ्या रात्री चालत जायचा तर शरीराचो जो भाग हलतो तो ठणकत होतो, अशा अवस्थेत मार खावंन् सुजलेल्या बब्यान् उघड्या अंगाने तिकडेच एका बस स्टापवर भिकाऱ्यांच्या बाजूला पुरी रात्र कुडकुडत काढलान् आणि दुसऱ्या दिवशी मेनरोड सोडून आडवाटेनं, कातळावरून, शेतीच्या बांधांच्या आडोशाला लपत बब्या कसाबसा दुपारी घरी आला. मुको मार तर इतको पडलो होतो की बब्याक बरा होवूक आटवडो लागलो. झाल्या प्रकारानं बब्यानं गावातल्या पोरांची अशी काही धास्ती घेतलानं की बाहेर जावन् कोणाला जाब विचारायची पण त्याची हिंमत व्हत नव्हती आणि हिंमत व्हयल तरी कशी कारण त्या गाडीवाल्याच्या ताब्यात द्यायचा आधी, पप्या घोंगडीत बांधलेल्या बब्याच्या कानात पुटपुटला होतो...

"आज नुसतीच तुका कुटायची सुपारी दिलीय, पण परत फिरून काल्याकांड्या करशील तर पुढच्या वेळी किल्ल्यावरच्या लाईट हावसवर नेवन् दरीत ढकलून देव. काय समजलास?"

Monday, February 28, 2011

ट्रॅफिकमधला गारवा

काल सकाळी ३५ मिनिटांचा रस्ता पार करून ऑफीसला पोहोचायला तब्बल दीड तासांहून अधिक वेळ लागला. गाडी चालू बंद करून करून कंटाळा आला. अश्याच एका निवांत क्षणी मोबाईलवर गाणी लावून ईअर् फोन कानात घातले आणि पहिलच गाणं लागलं ते म्हणजे मिलिंद इंगळेचे गारवा. त्यातल्या पहिल्याच "ऊन जरा जास्तच आहे" ह्या ओळी कानावर पडल्या आणि पुढचं विडंबन सुचले. तसं पाहिलं तर कविता करणे, कवितेचा आस्वाद घेणे (अर्थात संदीप खरेच्या कविता आणि बझ्झवरच्या चारोळ्या, दिपोळ्या, आपोळ्या असे काही सन्माननीय अपवाद वगळता) वैगरे दूरच पण यमक जुळवणेदेखील मुश्कील अशी माझी अवस्था. त्यामुळे भर उन्हात त्या ट्रॅफिकमधल्या परिस्थितीला गांजून माझ्यातल्या कोकणी भाषेला 'भ'हर आलेला असताना सुचलेला हा ट्रॅफिक मधला गारवा तुमच्यासाठी. तसं पाहायला गेलं तर हे विडंबन ब्लॉगवर पोस्ट करण्याच्या लायकीचं नाही तरी माझ्यासारख्या पद्य विभागातल्या माठ माणसाकडून त्या रखरखीत परिस्थीत का होईना चुकुन जुळले गेलेले यमक (जे पुन्हा घडण्याची तीळमात्र शक्यता नाही) तुमच्या समोर यावे म्हणून हा खटाटोप.

मी माझ्या परीने धोक्याचे इशारे दिले आहेत. एका टुकार काव्यापासून स्व:ताला वाचवण्याची तुम्हाला ही शेवटची संधी. अजूनही मागे फिरा. मनस्तापातून जन्माला आलेल्या काव्यापासून केवळ मनस्तापच होऊ शकतो आणि त्या मनस्तापला कविवर्य(?) जबाबदार राहाणार नाहीत.


ट्रॅफिक जरा जास्तच आहे, दररोज वाटतं,
भर गर्दीत मोकळ्या रस्त्याचे चित्र मनात दाटतं,
लोकं चालत रहातात, गाडी मात्र चालत नाही,
गर्दीमध्ये हॉर्नशिवाय कुणीच बोलत नाही,
तितक्यात कुठून एक पांडू सिग्नल समोर येतो,
ट्रॅफिक मधला चालू भाग हाताखाली घेतो,
गियर ऊनाड मुलासारखा सैरावैरा पडू पहातो,
न्यूट्रल सोडून उगीचच फर्स्ट सेकंडवर पडून पाहतो,
क्लच सोडताच वेगाचा सुरू होतो पुन्हा खेळ,
पुढचा सिग्नल मिळेपर्यंत कुणाकडेच नसतो वेळ,
मघाचचाच मोकळा रस्ता अचानक गजबजून जातो,
पुन्हा लाल होण्यासाठी सिग्नल हिरवा होतो.


तुम्हाला झालेला मानसिक त्रास ही श्रींची इच्छा. तरीही ह्या मनस्तापाला निमित्तमात्र झाल्याबदल आपण प्रतिक्रीयेमध्ये वरचा 'भ' देऊन अस्मादिकांनीं तुमच्यावर केलेल्या अन्यायाची परतफेड करू शकता.

Tuesday, September 21, 2010

ई ग्रहांची महादशा

गेले दीड वर्ष बी.एस्.एन्.एल्.चे इंटरनेट वापरतोय. आत्तापर्यंत सरकारी काम म्हणून कधी बी.एस्.एन्.एल्.चे कुठलेही कनेक्शन घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. एका शनिवारी सकाळी चहा प्यायला म्हणून बाहेर पडलेलो. चहा पिता पिता बी.एस्.एन्.एल्.ने रस्त्यावर लावलेला स्टॉल दिसला. बी.एस्.एन्.एल्.चा आधून मधून ग्राहक मेळावा भरतो आणि त्या दोन तीन दिवसांमध्ये फुकट सिम कार्ड, ज्यादा टॉक टाइम, बिना डीपॉझीट नवीन ब्रॉडबॅंड कनेक्शन वैगरे वैगरे स्किम असतात. मित्र म्हणाला अरे तसही डीपॉझीट वैगरे काही घेत नाही आहेत तर भर अर्ज. मग काय पत्ता लिहून आलो. मोडेम आणि फोन वैगरे माझ्याकडे होताच. त्यामुळे मला केवळ इंटरनेटचे बिल भरायला लागणार होते. मग आम्ही "आज अर्ज दिलाय, आत्ता हे येतील एक वर्षांनी" अश्या गप्पा मारत घरी आलो आणि विसरून पण गेलो. पण झालं भलतचं सोमवारी दुपारीच मोबाइल थरथरला.

मी: हॅलो
पलीकडून: साssssर, बी.एस्.एन्.एल्.कनेक्सन.
मी: हू ईज़ धिस?
पलीकडून: साssssर तमिल, तेलगू, कन्नडा?

आयला ह्यांच्यासाठी तमिल, तेलगू, कन्नडा झालं की थेट पाकिस्तान आणि नेपाळची बॉर्डर लागते. मध्ये बाकी कुणी नाहीच. मराठी सोडा राष्ट्रभाषा पण फाट्यावर?

मी: (मनात: हाड् रे) हिंदी हिंदी.
पलीकडून: साssssर बी.एस्.एन्.एल्. कनेक्सन होना ?
मी: हां हां मैने अप्लिकेशन किया था.
पलीकडून: हा करेक्ट साssssर.
मी: कब मिलेगा कनेक्शन?
पलीकडून: अब्बी.
मी: अभी? अभी तो मैं ऑफीस मे हूँ.
पलीकडून: आय यॅम इन फ्रंट ऑफ युवर हौस नो? कम नाऊ ओन्ली.

नशिबाने ऑफीस पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी त्याची नाऊ ऑर नेव्हर ऑफर स्वीकारून लगेच रूमवर पोहोचलो. पुढच्या दहा मिनिटात सगळं जोडून माणूस (पैसे न मागता) निघून गेला देखील. बी.एस्.एन्.एल्.चं असं सुसाट काम बघून माझा विश्वासच बसत नव्हता. ऑफीसच्या लोकांनाही ही गोष्ट पचनी पडली नाही. त्यातल्या काही बुजुर्ग लोकांनी "अरे आत्ता बघ रोज रोज डिसकनेक्ट झाल्याच्या तक्रारी करायला बी.एस्.एन्.एल्. ऑफीसच्या वार्‍या करायला लागतील" असा आशीर्वाद दिला. पण नाही. तो ते कनेक्शन जोडुन गेल्या पासून पुढची दीड वर्षे मी ती रूम बदले पर्यंत काडीचीही तक्रार नाही. केवळ वेळेवर बिल भरा आणि सेवेचा आनंद घ्या. बिलात देखील कधी चुकीचे रीडिंग नाही की भरमसाठ रक्कम नाही. ह्याच बी.एस्.एन्.एल्.च्या कृपेमुळे ब्लॉग देखील सुरू झाला. जमेल तसं लिखाणं झालं. बी.एस्.एन्.एल्.बद्दल असलेलं माझं मत पूर्ण बदललं होतं. प्राइवेट कनेक्शन वापरणार्‍या माझ्या एक दोन मित्रांना पण मी पुढच्या मेळाव्यावर लक्ष ठेवा आणि बी.एस्.एन्.एल्. चं ब्रॉड बॅंड घ्या असं सांगून ठेवलं.

सगळं कसं सुरळीत सुरू होतं. मे महिन्याची सुट्टी संपवून हापूस आंब्याचे फोटो ब्लॉगवर टाकले आणि जून अखेरीस ग्रह फिरले. नवीन जॉब जॉइन केला त्याच बरोबर आधीच्या मालकाने भाडेवाढ मागीतल्याने त्याच गल्लीत चार घरं सोडून नवीन रूमवर शिफ्ट देखील झालो. नवीन नोकरीत आणि नवीन जागेत इतर गोष्टी सुरळीत सुरू झाल्या मात्र माझ्या पत्रिकेतले ई-ग्रह मात्र बिघडले. त्यांची महादशा सुरू झाली. नवीन प्रॉजेक्टमध्ये बाहेरच्या सगळ्या साइट्स ब्लॉक. ब्लॉगिंग सोडा पर्सनल ई-मेल्सदेखील वाचता येईनात. म्हटलं नवीन रूम त्याच गल्लीत आहे बी.एस्.एन्.एल्. ब्रॉडबॅंड कनेक्शन पटकन जोडुन देतील. जुलैच्या पहिल्याच विकांताला जाऊन त्याबद्दल अर्ज देऊन आलो. म्हटलं नवीन कनेक्शन फटकन दिलं तर हे रिलोकेशन रातोरात करून टाकतील. पण नाही. ई-ग्रहसौख्य पूर्ण बिघडून गेलेलं होतं. पूर्ण आठवडा गेला तरी साधा फोन देखील नाही. शनिवारी बी.एस्.एन्.एल्. ऑफीसला चक्कर टाकून आलो तर संबंधित माणसे गायब. कुठे तरी मोठा लोचा झालेला तो सोडवात बसलेले. आत्ता माझं नवीन ऑफीस लांब गेल्याने सोमवार ते शुक्रवार काहीच करता येईना. दोन आठवड्यानंतर संबंधित माणूस भेटला एकदाचा. इथल्या प्रथेप्रमाणे त्याचंही नावं श्रीनिवास होतं. मी माझी शिफ्टिंगची वर्कऑर्डर त्याच्या पुढयात धरली. ती हातात धरून एखाद्या माणसाची पत्रिका पाहावी तशी पहात २-३ मिनिटे काहीतरी गूढ विचार करीत बसला. थोड्यावेळाने त्याने गंभीर शब्दात समस्या सांगितली

श्रीनिवास : "साssर, केबल नही है".
मी: क्या??? केबल नही?
श्रीनिवास : हा स्टोर रूम ने भी नही. आप अपना नंबर दो मुझे मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ.

मी आपला नंबर देऊन आलो पण पुन्हा आठवडा भर काहीच हालचाल नाही. साहेबांना फोन केला तर साहेब फोन उचलतील तर हराम. महिना होऊन गेला पण रूमवर ब्रॉडबॅंडचा काहीच पत्ता नाही. महिना अखेरीस बी.एस्.एन्.एल्.ने न वापरलेल्या इंटरनेटचे बिलमात्र नवीन पत्त्यावर पाठवून आपली तत्पर सेवा दाखवून दिली. त्याच्या पुढच्या शनिवारी ते बिल घेऊन बी.एस्.एन्.एल्.च्या ऑफीस मध्ये गेलो. म्हटलं इंटरनेटचा पत्ता नाही आणि हे बिल कुठून आले? तर म्हणतात कसे "ते तुम्ही इंजिनियरला विचारा. आम्ही फक्त बिलं बघतो." श्रीनिवासच्या थोबाडासमोर बिल नाचवलं तर त्याचं पुन्हा "साssर, केबल नही है". म्हटलं अरे महिना उलटून गेला तरी बी.एस्.एन्.एल्.कडे केबल नाही सांगताना लाज वाटतं नाही का? त्याच्यावर काही परिणाम दिसला नाही. मागच्यावेळीप्रमाणे "मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ" सांगून मला मार्गाला लावला. सर्वीस नसताना बिल कसं काय आलं हे विचारायला तिथल्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे गेलो तर तो म्हणे "डोण्ट वरी साssर. वी विल कॅन्सल इट नो." कॅन्सल कसलं डोंबलाचं आधीच्या महिन्याची लेट फी मिळवून दर महिना बिल येतय. मध्यंतरी माझ्या बोलण्यातून हा विषय घरी बाबांना पण कळला होता. ते म्हणाले अरे दे १०० रुपये, करेल काम सटकन. मी म्हटलं त्याला हवे तर त्याने हात पसरून मागवेत. मी स्वत:हून देणार नाही. भीक हवी तर भीक मागण्यात लाज कसली? आणि मला असं दोन महिने पिळल्यानंतर आत्ता तर मी त्याला xxदेखील देणार नाही.

हळूहळू कामाच्या गडबडीत बी.एस्.एन्.एल्.चा नाद सोडून दिला. दरम्यान ह्या महादशेतून एक दोन ग्रह हटले आणि महिनाभरात मला दुसरा प्रॉजेक्ट मिळाला. आत्ताच्या ह्या प्रॉजेक्टमध्ये कुठलीही साइट ब्लॉक नाही. त्यामुळे ऑफीसमधून का होईना इंटरनेट वापरायला मिळतं. अधूनमधून बझता येतं. बी.एस्.एन्.एल्.कडून पुन्हा कनेक्शन मिळेलं ही अशा सोडली आहे तरी पण परवा पुन्हा सहजच त्यांची छेड काढायला गेलो. पाहतो तर श्रीनिवासकडे नेहमीप्रमाणे कुणीतरी आपले गार्‍हाणे घेऊन उभा होता आणि श्रीनिवास आपल्याकडच्या कागदावर काहीतरी लिहून घेत होता.

मी: क्या ये आप से अपना नंबर मांग रहे है?
पीडीत: हां
मी: इसने कहा की ये आप को दो बजे कॉल करेगा?

इतकं अचूक निदान ऐकल्यावर त्या पीडीत माणसाबरोबर श्रीनिवासनेदेखील चमकून वर पाहिले. मला पाहून तो काही बोलणार इतक्यात

मी: इसने बहूत लोगोंक को कहा है की ये दो बजे कॉल करेगा. क्या है ना इसे सिर्फ दो बजे फ्री कॉलिंग होता है. आज दो बजे तो आप का नंबर नाही लगने वाला क्यों की मैं पहलेसे लाइन मे हूं और मुझे दो महिने से कभी कॉल नही आया. अगर आप चाहते हो की ये आपको कॉल करे तो इसे ५० पैसा दे दो.

मग श्रीनिवासकडे वळून

मी: बराबर है ना? आपको आउट गोइंग ५० पैसा ही है ना?

त्याला काही बोलू न देता पुन्हा त्या पिडीताला उद्देशून

मी: चलो छोड दो. आप पुरा १ रुपया ही दे दो. पक्का कॉल आयेगा.

पुन्हा श्रीनिवासकडे वळून

मी: ठीक है ना?

ह्या दरम्यान श्रीनिवासच्या चेहर्‍यावर "हा आत्ता कुठून उपटला" पासून "क्या बात करते साssर", "हो", "नाही", "अबे चूप" असे सगळे भाव झरझर उमटत होते. माझा बोलण्याचा पवित्रा पाहून ह्या वेळी मी कनेक्शन कधी देताय हे विचारायला आलेलो नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. तरी पण काहीतरी सबळ आणि नवीन कारण देण्यासाठी त्याने तोंड उघडले.

श्रीनिवास: साssर, ऐसा नही है साssर. आप बोलते ऐसा क्या भी नाही होता.

मी मात्र माझ्या भलत्याच मुद्द्यावर ठाम.

मी: क्यों आप को दोपहर दो बजे फ्री कॉलिंग नही होता? तो कब होता है? आप तो सब को दो बजे हो बोलते हो.
श्रीनिवास: (त्रासून तरी पण शक्य तितक्या समजावणीच्या सुरात) नही साssर. क्या है ना पहले हमारे पास केबल नही था. अब केबल आया पर उस के लिये रास्ता खोदना पडता. मुन्सिपालटी उसका पर्मिसन नही देता.
मी: तो अब क्या? मैं क्या करू?
श्रीनिवास: क्या बी नही . जैसे ही काम होगा मैं आप को कॉल करूंगा.
मी: (जाता जाता) हा ठीक है, लेकिन बस दोपहर को दो बजे कॉल मत करना. क्या है दो बजे मैं थोडा ज्यादा बिज़ी रहता हूँ. आप कॉल करो. काम होते ही आप के कॉल का पैसा मैं आपको लौटा दूँगा.

एवढे बोलून अजुन काही आणा भाका न घेता मी तिकडून बाहेर सटकलो.

तर असं आहे. सध्या नवीन प्रॉजेक्टमध्ये काम पण खूप आहे त्यामुळे ऑफीसमध्येच जास्त वेळ जातो. ऑफीसच्या जवळच नवीन रूम पहावी म्हणतो त्यामुळे सध्यातरी नवीन कनेक्शन घ्यायचा विचार नाही. ऑफीसमध्ये वेळ मिळाला तशी ही पोस्ट टंकली. बी.एस्.एन्.एल्.बद्दल बोलायचं तर अपेक्षाभंग नक्की कधी झाला हे कळत नाही? अपेक्षा नसताना मिळालेल्या सेवेमुळे की त्यांनी आपली औकात दाखवून दिली तेंव्हा?

असो. आत्ता पाहू ई-महादशा कधी संपते आणि पुन्हा कधी घरून विकांताला मस्त लोडाला टेकून वाचन सुरू होतं. कोकणात असतो तर एखाद्या भगताकडून श्रीनिवासचे भूत उतरवले असते (की त्याच्या मानेवर बसवले असते?). सध्या तरी ह्या ईहलोकात असून ई-लोकात येण्याजाण्यावर काही निर्बंध आले आहेत हे नक्की.

ShareThis