Tuesday, August 11, 2009

H1N1: दुष्काळात तेरावा महिना

ह्या वर्षाची सुरूवात मंदीच्या विषयाने झाली. महागाई वैगरे चिल्लर विषय होतेच नेहमीप्रमाणे. मग सालाबाद प्रमाणे हळूहळू पावसाळ्याची भाकितं सुरू झाली. 26 जुलैची पुनरावृत्ती होऊ नये केलेली उपाय योजना पाहून घाबरलेला पाऊस पडलाच नाही. दुष्काळ तोंडावर आला तर स्वाइन फ्लूची भर पडली. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ते ह्याला.
आपल्याकडची सुरक्षा व्यवस्था म्हणजे आधीच बोलायची सोय नाही. कुठेतरी बॉम्बस्फोट झाला की त्यानंतरचे दोन दिवस बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अगदी कसून तपासणी असते. परत 4 दिवसा नंतर कुणीही पुन्हा बॉम्ब घेऊन सहज आत जाऊ शकतो. हा ही त्यातलाच प्रकार आहे फक्त दहशतवाद्याएवजी इथे न दिसणारा पण जास्त संहारक विषाणू आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर घटना स्थळांना भेटी देणारे राजकारणी आत्ता कुठे शेपूट घालून बसले आहेत? आपल्याकडे निष्पाप लोकांचा बळी गेल्याशिवाय यंत्रणेला जाग येत नाही हे त्रिवार सत्य आहे. नेहमीप्रमाणे आत्ता देखील सगळीकडे कडक सुरक्षा असेल आणि हे प्रकरण निवळल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या. 2-3 महिन्या पुर्वी जेंव्हा स्वाइन फ्लूचे लोण पसरले तेंव्हाच योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे.

आत्ताच बातमी वाचली की पुण्यात दहीहंडी रद्द करून येता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बर्‍याच मंडळानी घेतला आहे. अगदी योग्य वेळी योग्य पाऊल उचलले असून हा निर्णय सर्वांच्या हिताचा आहे. पुण्या मुंबईतील गणेशोत्सवाची गर्दी पाहता हा सण डामडौल न करता जितक्या साधेपणाने केला जाईल तितके चांगले.

No comments:

Post a Comment

ShareThis