मी माझ्या परीने धोक्याचे इशारे दिले आहेत. एका टुकार काव्यापासून स्व:ताला वाचवण्याची तुम्हाला ही शेवटची संधी. अजूनही मागे फिरा. मनस्तापातून जन्माला आलेल्या काव्यापासून केवळ मनस्तापच होऊ शकतो आणि त्या मनस्तापला कविवर्य(?) जबाबदार राहाणार नाहीत.
ट्रॅफिक जरा जास्तच आहे, दररोज वाटतं,
भर गर्दीत मोकळ्या रस्त्याचे चित्र मनात दाटतं,
लोकं चालत रहातात, गाडी मात्र चालत नाही,
गर्दीमध्ये हॉर्नशिवाय कुणीच बोलत नाही,
तितक्यात कुठून एक पांडू सिग्नल समोर येतो,
ट्रॅफिक मधला चालू भाग हाताखाली घेतो,
गियर ऊनाड मुलासारखा सैरावैरा पडू पहातो,
न्यूट्रल सोडून उगीचच फर्स्ट सेकंडवर पडून पाहतो,
क्लच सोडताच वेगाचा सुरू होतो पुन्हा खेळ,
पुढचा सिग्नल मिळेपर्यंत कुणाकडेच नसतो वेळ,
मघाचचाच मोकळा रस्ता अचानक गजबजून जातो,
पुन्हा लाल होण्यासाठी सिग्नल हिरवा होतो.
तुम्हाला झालेला मानसिक त्रास ही श्रींची इच्छा. तरीही ह्या मनस्तापाला निमित्तमात्र झाल्याबदल आपण प्रतिक्रीयेमध्ये वरचा 'भ' देऊन अस्मादिकांनीं तुमच्यावर केलेल्या अन्यायाची परतफेड करू शकता.